कालपर्यंत
पावसाच्या एका सरीसाठी
डोळे आभाळाकडे लागले होते.
आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
मनात भीतीचं वादळ उठलं आहे.
आयुष्य इतकंच शिकवतं
अभाव दुःख देतो,
पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.
जिथे "पुरेसं" थांबतं,
तिथेच समाधान फुलतं.
जिथे हव्यास वाढतो,
तिथे आनंद हरवत जातो.
भाकरी पुरेशी असेल,
तर ती अमृताहून गोड लागते.
छप्पर पुरेसं असेल,
तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.
श्रीमंती म्हणजे
अफाट संपत्ती नव्हे.
"आहे ते पुरेसं आहे,"
असं मनापासून म्हणता येणं
हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.
कारण...
अति पाऊस पूर आणतो,
अति ऊन दुष्काळ घडवतो.
निसर्ग असो वा आयुष्य
"पुरेसं" हाच सुखाचा खरा समतोल असतो.
ज्याला पुरेसं कळलं,
त्याला समाधान लाभलं.
आणि ज्याला समाधान लाभलं,
त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
महिला दिनानिमित्त,
स्त्रीत्वाच्या साऱ्या आभाळाला,
पेलणे सोपे नाही,
नाजूक साजूक धाग्यांना,
कणखर बनवणे सोपे नाही,
कुठे कुठे पोहोचत,
उंची गाठत, आपले हात, फैलावत, ध्येय गाठणे सोपे नाही,
कर्तव्यकर्मांचे विळखे सांभाळत,
सांभाळत जगणे सोपे नाही,
आपले ध्येय गाठताना,
खंबीर भूमिका निभावणे,
याच अंतिम हेतूने जगणे,
सोपे नाही,
संवेदना भावना यातना वेदना,
सोसत निमूट श्वास घेत राहणे, सोपे नाही,
कुठल्या क्षेत्रात मागे नाही,
राधा मीरा वहिदा,
किती रुपे निभावते,
पुरुषाला यश आनंद समाधान,
नव्हे मातृत्वच बहाल करते,
हळूहळू ,---!!!!!!
न देण्याला सीमा न करण्याला,
विचार बुद्धी भावना क्षमता कर्तृत्व,----!!!!! ,
कसोशी ,खरीच धनीण ती,
काय नसते तिच्यात,
तीच अन्नपूर्णा, गृहिणी, दामिनी, कामिनी,
शेवट माता असेच ना सगळे रेशमी बंध ,--!!!!!
स्वतः मात्र विमुक्त,---!!!!!
हिमगौरी कर्वे.©
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे....१
तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला....३
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे
तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’....६
केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली
काय हवे तिजला, या अवचित वेळी....७
जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती
हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती....८
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो...९
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य
चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य....११
चाहूल माझी लागता, सावध परि झाला
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला...१२
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी....१३
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली...१४
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती....१५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कृष्ण कमळ-
आज मागे वळून पाहताना मला उमगतेय की
मला माझं अस्तित्व नाही... किंबहुना नव्हतेच कधीही
कारण मी अंश आहे- तुमचाच वंश आहे
तुमचाच मी भाग आहे- थोडा आईचा थोडा माझ्या पप्पांचा
मग इतक्या उशिरा का या जाणीवांची जाण यावी
अर्ध आयुष्य उलटल्यावर- स्पंदने का तीव्र व्हावी
शक्तींच्या माझ्या उगम तुम्ही नि स्त्रोतही माझ्या न्यूनत्वाला
निर्मीती तुमचीच मी; भास माझ्या आकृतीला नि रंग आहे प्रकृतीला .
अश्रू माझ्या अपयशाचे नि दुदुंभीही यशाची तुमचीच आहे
वेदना-संवेदनांना आपल्या तारही तर एकच आहे
आयुष्याच्या खडतर चढणीवर होता मला तुमच्या बोटांचा आधार
माझ्या वाढल्या हातांनी मग का न जपावा आता तुमचा उतार
मला माझा ध्यास आहे, ध्येय आहे, आशा नि महत्वाकांक्षाही
पण अभिलाषा त्या यशोशिखरांची मला यत्किंचितही नाही
जेथे हाक तुमची मला ऐकू येणार नाही
जमलंच तर आभाळात झेपावण्याचं वेड मला जरुर असावं
पण इतकंही नाही की सावलीला तुम्हा झाकायचं धाडस व्हावं
छातीचा कोट उभारला तुम्ही डेरेदार वृक्षाच्या निष्ठांनी
जपली उभारी उमलत्या मनांची रणरणत्या मध्यान्ही
मग त्या थकल्या भागल्या पारंब्यांना तजेला शिंपडावया
आमच्या मायेचा ओलावा आतूर का नसावा!
हुडहुडल्या शाखा जर, हळूवार शाल का आम्ही न पांघरावी
विसावण्यास त्यांना निवांत आमच्या खांद्यांचा निवारा
वावरण्यास अन् ऐसपैस का नसावा मनाचा गाभारा
रचल्या होत्या उन्हांत तुम्ही विटा घराच्या या वेड्यासाठी
त्या श्रमांची झाली लेणी बनून काळजातल्या मर्मबंधांच्या नर्म गाठी
वाटते तुम्ही विसावे अन् धराव्या आम्ही कमानी सावलीला
आपुलकीची लावू बिछायत पखरुन स्नेहाचा सौम्य परिमळ
चित्तवृत्तींच्या करुन वाती, उजळावी प्रसन्न संध्याकाळ
आठवणींचे उठवावे मोहोळ, नेमक्या टिचक्या मारुन
फुलवावा चहुअंगी मोहोर, स्पंदनांना साक्षी ठेवून
ओंजळीत साठवावे, निसटते क्षण, आयुष्यभर हुंगण्यासाठी
उचंबळत्या भावनांत भिजावे, करावे बंदिस्त आवेगाची घालून मिठी
संध्याछायांनाही करावे मोहक, लोभसवाणं
वीणेच्या हृदय छेडणाऱ्या झंकाराप्रमाण॑
झुंजुमुंजुचा घेत कानोसा, करीत जयकार रामाचा
निश्चिंत व्हावे शांत सोबतीने दूरच्या चंद्राच्या
ज्यांनी शिंपली माती आपली उभं आयुष्य खर्ची घालून
त्यांना जीवनवृक्षाची करावी बहाल किमान काही फुले मनापासून
कधी वाटतं उधळाव्या आपल्या आयुष्याच्या करुन कगाठी
लख्ख उजळावे त्यांनी क्षण दोन क्षण केवळ तुमच्यासाठी
अज्ञानापासून ते अज्ञाताच्या प्रवासापर्यंत, अविरत
एका मानवाची आपल्या मनुला कृतकृत्य कृतज्ञता ॥
-अंत:करणपूर्वक
--यतीन सामंत
अस्तित्व तुझे सभोवार
सर्वत्र तुझाच स्पर्शभास
वात्सल्य तुझे लडिवाळ
माते तुझाच अंतरी ध्यास.....
तुझ्याच कुशीत स्वर्गसुख
पान्हा, तुझा अमृती घास
तव आशीष कवचकुंडले
आठवे तुझे रूप निरागस.....
सत्य! तुच जननी सृष्टिची
निरपेक्ष तुझाच गे सहवास
आज अंतरी अस्तिव तुझे
मज सावरिते क्षणाक्षणास....
साक्षात, तुच गे देवदेवता
तुझ्या, उदरी ईश्वरीय वास
मातृत्व! एक ब्रह्म शुचिता
लाभते जन्मी भाग्यवंतास....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४१
१९/९/२०२२
हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी
केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी
असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे
सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे
सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी
कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी
मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा
सर्वजणाची दु:खे झेलण्या, वज्र देह हा धारीला असवा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले
जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।।
निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण
आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।
उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी
काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।।
सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे
तेच आहेत ईश्वरमय, तुम्हीच ते समजावे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें.
१.
सुवर्णमहोत्सव हा
सुवर्णाक्षरांनी लिहा
क्रमांक पहिला' फलक वाहा
असूं देत क्रम नऊ-दहा.
'महाराष्ट्र हें राज्य महा'
फलद्रूप होईल मंत्र हा
अनंत वाट पहा ।।
२.
नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा
घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा
मस्तक उन्नत, समारंभ शत, वाद्यघोष उन्मत्त
इमल्याचा या खचतो पाया, कुणां खबर ना खंत ।।
३.
संदर्भ : उष:काल होतां-होतां काळरात्र झाली
अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली ।
(कवी - सुरेश भट)
उष:काल होणें नच , ना संपणार रात्र
चुडे पेटवाया , आशा नुरे नाममात्र
महाराष्ट्रीं दिवा ना समई, काजवा न तारे
वाट उजेडाची बघतां जीव चालला रे !
४.
कालचा अभिमान उज्ज्वल, आज पण अंधारलें
फोल, तरिही ढोल हा - 'भवितव्य फारच चांगलें'!
उंचवाया मान अमुची झुंजला राजा शिवा
लढत राजे आज-उद्याचे कापण्यां अमुचे गळे ।।
५
वाचत भ्रामक प्रगतीपाढा , प्या कटु दुर्गतिकाढा
कळे न तरि - पळतोहे परि गर्तेत चालला गाडा ।।
६ -
राष्ट्राचें-महाराष्ट्राचें नच आतां काहिं खरें
आम्ही बापडे, बांधु झापडें ; आम्हां तेंच बरें ।।
७
सगळी पानें गळती , तरिही पुनश्च रानें फुलती
जरि हत झाली आशा, तरि जागेल पुन्हां खचितच ती
आज जरी महाराष्ट्र-प्रगतिची खात्री नाहीं आम्हां
तरि ठाउक, अवसेमागुन येतिल पुनवेच्या राती ।।
- सुभाष स. नाईक
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१||
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२||
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३||
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४||
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ||५||
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें
लूटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ||६||
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ||७||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti