(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • दिवाळी स्पेशल – फराळाचं गाणं

    चकली, कडबोळी, भाजाणी आणि करंज्या… या गाण्यात…

  • आत्ता खरंच….

    आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,

    खरंच मला वाटत नाही....

    आत्ता माझ्या चेहऱ्यावर,

    खरंच हसू येत नाही....

    आत्ता तुझ्या आठवणी विना ,

    मला काही आठवत नाही....

    आत्ता वाटतं तुझ्या विना,

    काहीही जीवनात नाही....

    आत्ता प्रिये तुझ्या सारखं,

    कुणी गोड बोलत नाही....

    एकाकी एकटा असतो,

    कुणीही विचारत नाही....

    आत्ता प्रिये पूर्वीसारखं,

    नवं काय स्वप्नात नाही....

    एकटेपणा आहे फक्त,

    जगावसं वाटत नाही....

    माझं प्रेम - माझी तू ,

    काहीही नशिबात नाही....

    आत्ता प्रिये तुझ्या विना,

    काहीही जीवनात नाही....

    -- गजानन साताप्पा मोहिते

  • प्रतिक्रिया

    क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।
    तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।।

    फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।
    प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।।

    शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।
    येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।।

    प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।
    आनंदी लहरी, मनां सुखावते ।।


    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आम्ही स्वतंत्र आहो

    (काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )

    आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
    स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
    अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
    बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
    त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
    निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
    परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
    गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
    जागतीकरण मारी देशी उद्योगाला
    इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
    झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
    जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
    परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
    उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
    साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’

    शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
    घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
    कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
    देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
    बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
    डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
    वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
    बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
    पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
    नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
    ‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
    परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
    राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
    उघडलें दार आम्हिच, सार्‍या उगाच बाता
    बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
    पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
    शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
    आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
    ‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
    स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
    प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
    करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
    लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
    एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
    सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
    चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
    दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
    ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
    स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    - - -
    लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
    वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
    (अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
    -

    - सुभाष स. नाईक
    ( M- 9869002126).

  • विश्वास

    कधी मनाच्या फुलती पाकळ्या

    काट्यांचाही डंख जिव्हारी

    अदृष्टाच्या पानावरती

    कशी लिहावी मौनडायरी

    धूळमाखल्या आयुष्याला

    प्रश्न विचारू नये फुकाचे

    काजळकाळ्या रात्री तरीही

    उघड्या डोळी स्वप्न सुखाचे

    रुणझुणत्या इच्छांची माया

    खुणावितो शुक्राचा तारा

    जागवितो विश्वास आतला

    पहाटचा प्राजक्ती वारा

    पैलपार त्या अंधाराच्या

    जाईन उडुनी पंख पालवित

    आभाळाच्या माथी लाविन

    या मातीचा टिळा सुगंधित

    पाचोळ्यातून फुलवित राहिन

    हिरवा अंकुर नव्या दमाचा

    अभीष्टचिंतन करा दिशांनी

    क्षण जपतो त्या अंतःस्थाचा

    - वृंदा भांबुरे

    (व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

  • आर्त तन हे, आर्त मन हे

    आर्त तन हे, आर्त मन हे,
    करुणानिधे,तुला साद रे,
    शांती, प्रेम, आस्था,
    गेल्या भावना कुठे रे,--!!!

    उगा काळीज उलते,
    मन किती धास्तावते,
    का मम अंतरातुनी,
    अस्वस्थपण छळते रे,--!!!

    सांग तुझ्याविना माझा,
    असेल कोण त्राता रे,
    कोलाहल दाटे मनी,
    ही जीवनाचीच करणी,
    घायाळ हृदया, न वाली,
    जावे कुठे,विधात्या रे,--!!!

    सुखाची कशी वानवा असे,
    दुःख, अमोज अगणित रे
    जीवनाचेच गणित चुके,
    ही भल्याभल्यांचीच कथा रे,--!!!

    जे हवे ते मिळत नाही,
    नको तेच वाट्यास येई,
    जे मिळे,ते पुरत नाही,
    समाधान मानावे कशात रे,--!!

    प्रेम कुणालाच कळत नाही,
    नात्यात विफलता येई,
    ताणतणावां माप नाही,
    जीव सदैव बेचैनी राही,
    आधारच नच कोणी,
    सांगू कोणा व्यथा रे,-!!

    भोवताली माणसांचे रान,
    वाटा वाकड्या, सुनसान,
    जिवाची फक्त उलघाल, अंतरात्मा किती रडे रे,--!!!

    शोधिते मी पहा तुला,
    इकडून तिकडे, सगळीकडे,
    कुठे असशी तू ,
    कुठे का न दिसशी तू ,
    आत,जीव कसानुसा रे,--!

    हिमगौरी कर्वे ©

  • तुझे तुलाच अर्पण !

    तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी
    उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी

    वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो
    सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो

    अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो
    जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो

    विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक
    दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • चोरांची उपासमार

    या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय.

  • देह ईश्वरी रूप

    स्नान करूनी निर्मळ मनीं,
    दर्पणापुढे येऊन बसला ।
    जटा साऱ्या एकत्र बांधूनी,
    भस्म लाविले सर्वांगाला ।।

    ओंकाराचा शब्द कोरला,
    चंदन लावूनी भाळावरती ।
    रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,
    गळा हात नि शिरावरती ।।

    वेळेचे भान विसरूनी,
    तन्मय झाला रूप रंगविण्या ।
    प्रभू नाम घेत मुखानें,
    नयन आतूर छबी टिपण्यां ।।

    पवित्र आणि मंगलमय,
    वाटत होते स्वरूप बघूनी ।
    सजविला होता देह त्यानें,
    प्रभूचेच एक रूप समजूनी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ०९ जुलै (मी आणि माझ्या कविता)

    “ती बेफामपणे पुढे जात होती तो फरफटत होता…. त्याला फरफट असह्य होत होती… शेवटी तो शांत झाला झोपला तो झोपलाच”