(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • भावना

    गलेलठ्ठ झाले ठेकेदार उंदीर मारणारे
    अवकाळी फाशी चढत आहे शेतात राबणारे

    दिनरात राबतो घामात न्हाहतो शीवारात तो
    मिळवीत आहे नफा तक्क्यास टेकून लोळणारे

    कसे रे मिटावे कर्ज हे सातबाऱ्यावरचे आज
    सभागृहात कमी माझ्या हक्कांसाठी भांडणारे

    पुराव्याच्या फाईली सगळ्या कुरतडल्या उंदरांनी
    होतील मुक्त सारेच आता घोटाळे करणारे

    मिळावा अधिकार मलाही उंदीर हे मारण्याचा
    मारील आनंदाने चारदोन बाँम्ब पेरणारे

    भावना ही तूझी " जयवंता " आतली वेदना रे
    हसते रे ते अंधभक्त पाय सत्तेचे चाटणारे

    © जयवंत वानखडे,कोरपना

  • त्यागवृत्ति

    जीवनाच्या सांज समयीं ।
    उसंत मिळतां थोडीशी ।।

    हिशोब केला स्वकर्माचा ।
    वर्षे गेली होती कशी ।।

    दिवसामागून वर्षे गेली ।
    नकळत अशा वेगानें ।।

    सुख दुःखाच्या मिश्रणीं ।
    जीवन गेले क्रमाक्रमानें ।।

    आज वाटे खंत मनीं ।
    आयुष्य वाया दवडिले ।।

    ऐहिक सुखाच्या मागे जातां ।
    हातीं न कांहीं राहीले ।।

    'घेणे' सारे आपल्यासाठीं ।
    करीत जीवन घालविले ।।

    'देण्या' मधल्या आनंदाला ।
    मन सदा वंचित राहिले ।।

    सुधारुन घे आतां तरी ।
    अनुभवाने चूक आपली ।।

    उर्वरित वर्षे जाऊं दे ।
    त्यागवृत्ति मध्यें सगळी ।।

    भोगातले सुख कसे ते ।
    क्षणांत येवून क्षणांत जाई ।।

    त्यागातील समाधान परि ।
    उशीरा लाभून सदैव राही ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मायेचा हात

    पहाटे जाग येते तेव्हा
    खिडकीतून चंद्रप्रकाश
    अंगभर पसरलेला असतो
    जणू आईच्या मायेची
    अंगभर चादर पसरतो

    शीतल शांत निराकार
    आईची कुशी उबदार
    जावेसे वाटते फार चंद्रा
    तिच्या मायेच्या मांडीवर

    चंद्रा तुझ्या शितल
    चांदण्याचा स्पर्श
    जणू मायेने तोंडावर
    फिरतोय आईचा हस्त

    आहे ना रे आई माझी
    तुझ्या संगे देवापाशी?
    तिच्या मायेचा हात
    असेच येऊ दे तुझ्या किरणात!

    -- विनायक अत्रे.

  • बहिरा ऐके कीर्तन

    गम्मत वाटली प्रथम मजला बहिरा ऐके कीर्तन

    अश्रू वाहू लागले माझे नयनी भाव त्याचे जाणून

    नियमित येई प्रभूचे मंदिरी श्रवण करी कीर्तन

    केवळ बघुनि वातावरण ते तल्लीनच होई मन

    सतत टिपत होते मन त्याचे इतर मनांचे भाव

    केवळ जाणण्या भगवंताला डोळे आतुर सदैव

    रोम रोमातून शिरत होत्या प्रभू निनाद लहरी

    संदेश प्रभूचा पोह्चूनी आत्म्यास जागृत करी

    होऊन गेला प्रभूमय बहिरा धुंद त्या वातावरणी

    ऐकत होता तो शब्द प्रभूचे श्रवण दोष असुनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • गळफास बोलला फांदीला

    गळफास बोलला फांदीला

    का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला

    आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं

    भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं

    मग अाज कसा आला ह्यो ताफा

    भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा

    मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला

    कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला

    गळफास बोलला फांदीला............

    .........................................................

    वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं

    ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं

    कुणीच काही बोलत नाही....

    कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला

    मलाही आता याचा भार तोलत नाही

    कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय

    पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय

    .............................................................

    सुकलेली, पानं झडलेली फांदी

    मग गळा दाटुन लागली म्हणायला

    मला काही हे नवं नाही बाबा,

    माझ्या खालचा जवा करपुन जातो माल

    तवा असच होतं सारं, जे झालं काल

    कोण देईल उत्तरे लाखो हुंदक्यांची

    पुसलेल्या कुंकवांची कोण घेईल जबाबदारी

    किड्यामुंग्यांसारखी माणसं मरायला लागली

    यापरिस बरी असते महामारी ............

    ..........................................................

    तु काय विचारतोस ह्या फांदीला

    चल दोघं मिळुन आता विचारु

    एकदाचं नोटेवरल्या गांधीला

    सांदीला पडलेला दोर

    कुठवर असा लटकत राहणार

    बापु तुमच्याच देशात तुमचीच लेकरं

    कुठवर मरत राहणार...........

    ........................................................

    डोळ्यावरचे हात काढुन , बापु माकडांनाही हे बघु द्या

    कानांनी किंकाळ्या ऎकुन , तोडांनी काही बोलु द्या

    तुमची खादी घालणारे , बापु इथं साधी भाषा बोलतच नाही

    अन् त्यांचे जड जड शब्द , आम्हाला काही तोलतच नाही

    नाहीतर बापु या देशात माती राहिल पण शेती नाही

    अन् राहिलीच शेती तरी शेतकरी नाही....

    ..........................................................

    कवि:- शशिकांत मा. बाबर

    संपर्क :- ९१३०६२०८३४
    shashikantbabar12@gmail.com


  • दृष्टीची भ्रमंति

    बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं

    लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १

    चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे

    फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २

    वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले

    भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३

    मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला

    स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४

    दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे

    व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५

    प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे

    रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६

    राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते

    अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७

    दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला

    शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८

    तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी

    आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९

    वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली

    दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०

    फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता

    डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११

    आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते

    आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दिवसां दिसणारा चंद्र

    रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं

    भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं....१

    कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती

    कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती....२

    शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत

    एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात....३

    कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो

    चुकून देखील तुझ्या राज्यीं, कधी येत नसतो....४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • दु:खी अनूभवी

    दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
    सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता

    धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
    शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज

    मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
    चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी

    त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
    झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी

    सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
    दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अणूतील ईश्वर

    पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,

    सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,

    या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,

    अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,

    हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,

    उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,

    ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे

    अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,

    याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,

    अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • योग्यतेनुसार यश

    उंचावून झेप, नको घेवू उडी
    खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१

    अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम
    यश येई तुला, तया मध्यें ठाम...२

    अनुमान काढ, आपल्या शक्तीचे
    झेपेल कां ते, विचार युक्तीचे...३

    निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी
    निराश न होई, त्यामध्ये कुणी....४

    जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता
    यश असे पाठी, ज्याची जी योग्यता...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com