दसरा सण आनंदाचा
सोनं द्या प्रेमाचं मोठं
देऊन पानं आपट्याची
नका देऊ सोनं खोटं
आलिंगन देऊन परस्परांना
सोनं म्हणून वृक्षबीज देऊ
झाडे जगवा झाडे वाचवा
वसा आज हा आपण घेऊ
हर्षाच्या या मंगल समयी
नका रडवू अबोल वृक्षा
रक्षण करती आपुले जीवन
आपण करूया त्यांची रक्षा
वृक्ष सदैव देतच असती
पाने-फुले किती संपदा
होऊ नकोस तू कृतघ्न
वृक्षाविन ओढवी आपदा
वृक्ष असती मित्र आपुले
आपटा, वड, पिंपळ, शमी
वृक्ष-मानव सहजीवनाने
करू साजरी विजयादशमी
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
एक होती साधीभोळी आजी ,
पण आजोबा होते कहर !
काहीतरी वेगळं करण्याची,
आजोबांना मध्येच आली लहर !!
“यावेळेस आपण करूया का गं,
प्रेमाचा आठवडा साजरा ?”
लाजत मुरडत हो म्हणत ,
आजीने लगेच माळला गजरा !!
“रोझ डे” चा गुलाबी दिवस ,
केला गोडाधोडाचा भडीमार !
एकमेकांना भरवला गुलकंद ,
मग रोझ सरबत थंडगार !!
हीरो प्रमाणे गुडघ्यावर बसून ,
आजोबांनी मागणी घातली आजीला !
“प्रपोज डे” साजरा करून गेले,
दोघं आठवडी बाजारात भाजीला !!
आता “चॉकलेट डे” ला काय द्यायचं ?,
म्हणून आजीने केला आटापिटा !
शेवटी ग्लास भरून दूध घेतलं ,
त्यात घातला भरपूर बोर्नविटा !!
“टेडी डे” ला आजोबांनी आणली,
छान अस्वलाच्या आकाराची उशी !
झोपेत दुखऱ्या मानेखाली ठेवताना,
आजीने आजोबांनाच मारली ढुशी !!
दिवसभर लवंगा चघळण्याची,
आजोबांना सवय होती फार !
“प्रॉमिस डे” ला आजीने दिल्या,
त्यांना प्रॉमिस टुथपेस्ट चार !!
म्हातार वयात काय हा चावटपणा ?,
असं म्हणत आजी बसली अडून !
“कीस डे” लाच झालं भांडण अन् ,
दिवस सरला शब्दांचा कीस पाडून !!
वाद मिटवायला आजोबांनी आणले,
आजीच्या आवडीचे खास बटाटेवडे !
अरेरे दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं,
पार पडला मराठीतला “हग डे” !!
अखेर एकदाचा गाठला त्यांनी ,
“व्हॅलेंटाईन डे” चा अवघड टप्पा !
गरमागरम चहासोबत रंगल्या ,
राहिलेल्या बऱ्याच दिवसांच्या गप्पा !!
“जमायचं नाही बुवा आपल्याला,
असलं नाटकी प्रेम करणं !”
नुसता सोहळा करायच्या नादात ,
असं उगाचच्या उगाच झुरणं !!”
“प्रेमाचा फक्त एकंच दिवस ,
आपण म्हाताऱ्यांसाठी का असावा ? “
“प्रत्येक दिवस प्रत्येक श्वास ,
एकमेकांवर जीव लावून सोडावा !!”
सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा,
आपलं मनातलं प्रेमच बरं !
दिसलं नाही कुणालाच तरी,
एकमेकांवर असतं मात्र खरं !!
सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा,
आपलं मनातलं प्रेमच बरं
दिसलं नाही कुणालाच तरी,
एकमेकांवर असतं मात्र खरं !!
©️ क्षितिज दाते , ठाणे
लाटांचा न्यारा स्वभाव ,उंच उंच उचंबळती,
खडी एक भिंत बनवत,
सागरात उभ्या राहती,
थेंबांची नक्षी हालती,
पुढेमागे होती मोती,--!!!
पुन्हा पुन्हा खेळत खेळत ,
मजेत धुंदीतनाचत-- नाचत, एकमेकींवर आदळत आपटत,
किती संख्येने उभ्या राहती,--!!!
सागर मात्र शांत राही,
लेकींचा आपल्या खेळ पाही त्याचीच मजा लुटत लुटत,
कसा काय तटस्थ राही,--!!!
शांतता धीरगंभीरता,
आणतो तरी कुठून एवढी,
इतकी मोठी स्थितप्रज्ञता,
राखून असतो कशी केवढी,--!!!
पाण्याचे असीम प्रवाह,
सारखे जाती पुढेमागे,
तरीही एवढा मोठा सागर, धरणीशी आपले नाते सांगे,--!!!
निसर्गातील प्रत्येक घटक,
पाय जमिनीवर ठेवे,
जात-पात ठाऊक नाही,
न कुठले हेवेदावे,--!!!
कुठली नसतेच अहंता,---
न कसला दुराभिमान,
घटक कुठलाही असो,
कर्तव्याचेच दिसते भान,--!!!
हिमगौरी कर्वे.©
शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो
गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो
अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही
अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो
शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत
क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो
आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा
उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो
ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा भरोसा
अंधारास फितूर होणाऱ्या सावल्या विकाया शिकलो
साक्षात्कार जरी मोक्षाचा आहे मृत्यूस चुंबल्यानंतर
सुखी माणसाचा नागव्याने सदरा विकाया शिकलो
रजनीकान्त
सहज एकदा फेरफटका मारताना
वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला...
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो अरे नुकताच
"संयम" पाळलाय घरात
आणि "माया" पण माहेरपणाला
आली आहे..
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!
पुढे बाजारात "चिडचिड"
उभी दिसली गर्दीत, खरं तर
ही माझी बालमैत्रीण पण पुढे
कॉलेजात "अक्कल" नावाचा
मित्र मिळाला आणि हिच्याशी
संपर्क तुटला..!!
आज मला पाहून म्हणाली अरे
"कटकट" आणि "वैताग"
ची काय खबरबात ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा..
हल्ली मी "भक्ती" बरोबर
सख्य केलय त्यामुळे
"आनंदा"त आहे अगदी..!!
पुढे जवळच्याच बागेत
"कंटाळा" झोपा काढताना दिसला
माझं अन त्याच हाडवैर....
अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख
दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला..!!
मीही मग मुद्दाम "गडबडी" कडे
लिफ्ट मागितली आणि
तिथून सटकलो..!!
पुढे एका वळणावर "दुःख"
भेटलं, मला पाहताच म्हणालं
"अरे ये, तुझीच वाट पहात होतो"
मी म्हणालो, "अरे वाट पहात
होतास कि वाट लावायच्या
तयारीत होतास? आणि माझ्या
बायकोपेक्षा तूच जास्त वाट
बघतोस कि रे माझी
"तसं "लाजून" ते म्हणालं,
"अरे मी पाचवीलाच पडलो
(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.
कस काय सर्व ? घरचे मजेत ना?"
मी म्हणालो, "छान" चाललय सगळं...
"श्रद्धा" आणि "विश्वास"
असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात
त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
तू नको "काळजी" करूस.
हे ऐकल्यावर "ओशाळलं"
आणि निघून गेलं..!!
थोडं पुढे गेलो तोच
"सुख" लांब उभं दिसलं
तिथूनच मला खुणावत होतं,
धावत ये नाहीतर मी चाललो
मला उशीर होतोय..
मी म्हणालो, "अरे कळायला
लागल्यापासून तुझ्याच तर मागे
धावतोय उर फुटे पर्यंत,
आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट
झालीय... एकदा दोनदा भेटलास
पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट
करून मला एकटं पाडलत..
दर वेळी. आता तूच काय तुझी
"अपेक्षा" पण नकोय मला.
मी शोधलीय माझी "शांती"
आणि घराच्यानीं माझ नावच
"समाधान" ठेवलंय..!!
पावन हो तू आई
पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।।
संसाराचा खेळ मांडला
खेळविसी तूं मजला
थकूनी मी जाई ।।१।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
रात्रंदिनीं ध्यास लागला
जीव माझा तगमगला
झोप तर येतच नाही ।।२।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
आळवितो मी तुजला
विसरुनी देहभानाला
नयनी तव रुप पाही ।।३।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
देह झिजविला
दुर सारुनी सुखाला
कां तप फळा न येई ।।४।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
साद दे हांकेला
पेटलो आहे हट्टाला
नसता परत जन्म घेई ।।५।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती ।
किडे नि मुंग्या झुरळे, यांची रेलचेल होती ।।
चिवचिव करीत चिमण्या, येती तेथे ।
काड्या-कचरा आणूनी, घरटी बांधत होते ।।
झाडून घेई हळूवारपणे, तो कचरा ।
भिंती आणि माळ्यावरी ठेवी, तसाच पसारा ।।
स्वातंत्र्याची मुभा होती, झुडपांना तेथे ।
स्वच्छंदानें अंगणी वाढती, सर्व दिशांनी ते ।।
जगणे आणि जगू देणे, ब्रीद निसर्गाचे ।
पाळीत होता तत्व महान, जीवन जगण्याचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.
हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ कि. मी. च्या डोंगरपट्ट्यास गर्भगिरी किंवा गर्भाद्रि असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार या लोकप्रिय पोथीतील २३ व्या अध्यायात नवनाथांच्या गर्भगिरीतील वास्तव्याचे व कार्याचे वर्णन आहे. आदिनाथ शिवाचे वृध्देश्र्वर हे प्राचीन क्षेत्र तसेच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ या प्रमुख नाथसिध्दांच्या संजीवन समाध्या यासह अनेक नाथकालीन स्मृतीस्थळांनी हा परिसर गजबजलेला आहे. तीन तालुक्यांच्या भूभागावर इतक्या दाटीने वसलेली नवनाथांची स्थाने भारतात अन्यत्र कोठे अभावानेच असतील.
गर्भगिरीतील नाथपंथ
लेखक : टी. एन. परदेशी
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २५०/- रुपये
पाने : २०८
Copyright © 2025 | Marathisrushti