(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • चालणे सुरु तर कर

    चालणे सुरु तर कर ....पोहोचणार नाही कशावरुन ?

    बोलणे सुरु तर कर ...टाळ्या पडणार नाही कशावरुन ?

    टिम्ब काढ रेषा होतील...रेषारेषांचे चित्र जाईलच बनून

    आवड तयार होईल ...कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ?

    लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून

    जमणार नक्की ...लाईक मिळणार नाही कशावरुन ?

    हे जमत नाही ते जमत नाही...सोड सांगणं( गाऱ्हाणं) फिरून फिरून

    गाणं सुरु तर कर ...सूर सापडणार नाही कशावरुन ?

    घाबरतो उगाच आपण...रुपडं बघून वरुन वरुन

    अंतरंगात बघ गुण शोधून ...जगणं जमणार नाही कशावरून ?

    # कौशल

    -- श्रीकांत पेटकर

  • वनवास

    कोण म्हणतं वनवास दःखाचा होता?
    तिथे तर राम फक्त माझा होता।
    ती पर्णशाला उभारलेली त्याच्या समर्थ बाहूंनी
    मीच तर होते - तिथली अनाभिषिक्त महाराणी
    तिला प्रीतीच्या सुवास होता.. कष्टाचा सुगंध होता
    कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
    कधी तो जायचा रानात दूर..
    तेव्हा उरायचे मी नि माझं घर
    मला एकांत सुसह्य व्हावा म्हणून
    लता हसायच्या सुरेख फुलांच्या पाकळ्यातून
    नि एखादा उतरायचा अंगणात दिगंचर
    साद घालायचा मला हलकेच खुणावून
    तिथला एकांत इथल्या परक्या गर्दीहून
    फार वेगळा होता!
    कोण म्हणतं वनवास दु:खाचा होता?
    प्रत्येक दगडाशी पाऊल अडखळलं
    राजधानीत परतताना
    माझे मृत्तिकाकुंभ... तीन दगडांची चूल..
    माझा संसार सोडताना
    डोळ्यात अश्रू दडला होता
    कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
    राजधानीत कृत्रिम कुंज नि उपवनं...
    या नृत्यशाला - चित्रशाला मनोरंजनासाठी
    यातलं काहीच नाही माझ्यासाठी
    माझा रामसुध्दा
    तो इथे फक्त एक सम्राट
    निमी... 'महाराणी' ..फक्त जनकल्याणासाठी
    मखमली पायघड्यांवर अदबीनं चालताना
    मी आठवते - ते मुक्त विहरण
    फुलातून... काट्यातून
    त्यांचा हात तेव्हा माझ्या हातात होता।
    कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
    तिथेच फक्त माझ्या स्वप्नांचा संसार होता!

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • कृपाळु कनवाळू

    मोहरलेल्या सृष्टी गर्दी पर्णफुलांची
    झुळझुळतो वारा मस्ती भावनांची...

    निसर्गाची जादुई प्रचिती प्रसन्नतेची
    ठेवा चैतन्याचा उधळण आनंदाची...

    कवटाळीता सुखा साक्ष स्वर्गसुखाची
    स्पर्श मांगल्यमयी अनुभूती देवत्वाची...

    जीवन व्हावे पावन ही भावनां अंतरीची
    तो कृपाळु कनवाळू आंस त्याच्या कृपेची...

    रचना क्र.९४

    ३/८/२०२३

    वि.ग सातपुते (भावकवी)

    9766544908

  • असे पंचतारांकित पदार्थ मराठमोळे!

    देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे.

  • अवकळा

    आभाळ ढगांनी
    दाटलेले होते,
    पावसांच्या सरी
    कोसळतील
    या आशेने
    सारे सिवार
    बहुरंगी नटलेले होते.

    नांगरण – कुळवनाने,
    माती आता
    चांगलीच पेटली होती,
    लाले-लाल
    मातीची आग,
    आता तळपायातून
    मस्तकी पोहचली होती.

    खर्चाचे डोंगर,
    आता चांगलेच
    जीवावर बेतले होते,
    बेताल जीवनाने
    मरनोत्तर गोष्टीत
    आज चांगलेच
    रस घेतले होते.

    दऱ्या – खोऱ्यातून
    नदी- नाल्यातून
    तळी – ओढ्यातून
    आपुलकी, जिव्हाळ्याचे
    पाणी....
    आता बऱ्यापैकी
    आटले होते.
    कठोर – निर्दयी
    दुष्ठ – नीतीने
    सुख – दुःखाला
    मधो – मध
    चिरले होते.

    पाखंडी, भ्रष्ट
    झुंड, शंड
    ठोक, बिनडोक
    मनमानी, मनोवृत्तीने
    सुव्यवस्थेस,
    आता चांगलेच
    घेरले होते.

    मळे, धन–दांडग्याचे,
    आता चांगलेच
    फुलले होते,
    अवकाळाने
    झोडपले तरी,
    व्यवस्थेने मात्र..
    हात जोडले होते.

    दुःखाचे धनी,
    नशिबाने चांगलेच,
    होरपळले होते,
    कितीही हात
    जोडले तरी,
    व्यवस्थेने पायदळी
    तुडविले होते.

    न्यायाचेच हात
    आज डोळ्यादेखत ,
    रक्ताने माखलेले होते,
    भ्रष्ट नोकरशाहीपुढे, आज
    सत्य हि झुकलेले होते...

    - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे (कवि, लेखक, संमिक्षक, संपादक, गीतकार)
    ☎️ मो.न.8830800335 ================================
    Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ================================

  • मंगळागौरीची आरती

    (चाल : आरती साईबाबा)

    जयदेवी मंगलमाता, मनोभावे पुजू आता,
    महिन्यांचा श्रावण राजा, मंगळवारी करती पूजा
    फळे फुले, नानापत्री, हळदी कुंकू नारळ खण,
    धूप दिप उजळोनी ओवाळती निरांजन ।। जय......

    सोळा घरच्या सोळा जणी, व्रत करती सुहासिनी
    नानापरी नैवेद्याच्या, थाट असे उत्सवाचा,
    झिम्मा फुगड्या, गोफविण, करती रात्री गाजरण ।। जय......

    नाग आणि कलश दान, साडी चोळी सौख्यदान,
    मायमाता तोषवोनी, लेक करी उद्यापन
    अखंडित सौभाग्याचे मागतसे वरदान ।। जय......

  • विजेचे दुःख

    चमकत लपकत आली

    कडकडाट करुनी गेली

    प्रकाशमान केले जगासी

    सारुनी दूर अंधारासी

    भयाण होता अंधःकार

    लख्ख प्रकाश देई आधार

    घेई सर्वांच्या मनाचा ठाव

    भिती असूनही, प्रसन्न भाव

    करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन

    निर्माण झाला मनी अभिमान

    परि दुःखी होते तीचे मन

    'क्षणिक' लाभले तिला जीवन

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • घराचं स्वप्नं साकारताना…..

    आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं.

  • जातीमधील उद्रेक

    लाट उसळतां क्रोधाची, बळी घेतले कित्येकांचे,
    हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे ।।१।।

    फार पुरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें,
    कुणीतरी पाडुनी वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने ।।२।।

    त्याच क्षणाला बीज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे,
    ईश्वराकडे जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे ।।३।।

    विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी,
    विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी ।।४।।

    चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची रीत न्यारी,
    धर्म पंथांचे मार्ग आखूनी, सलोख्यात निर्मिली दरी ।।५।।

    कमी न होईल अंतर हे, केवळ दुजा धर्म जाणतां,
    एकत्र येवूं तेव्हांच सारे, ईश्वरास तो एक समजतां ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आत्म गुरू

    गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार
    सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां १

    वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी
    मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां २

    न कळला ईश | न उमगले आयुष्य
    दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे ३

    अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट
    प्रकाशाचा किरण झोत | योग्य रस्ता दाखवी ४

    तैसा गुरू तुमचा | पडदा फाडी अज्ञानाचा
    मार्ग दाखवी जीवनाचा | आनंद मिळण्यासाठी ५

    गुरूविना नाही ज्ञान | दूर करी तुमचे अज्ञान
    ज्ञान ज्योत देई पेटून । तुमच्या ज्ञानदिपाची ६

    ओळखावा आत्माराम | जाणावा ज्ञानराम
    समजावे मनोराम | आपल्या देहातील ७

    गुरू असता देहमंदिरी | कां फिरतोस दारोदारी
    करावी श्रद्धा प्रभूवरी | आत्म गुरूसी जाणोनी ८

    गुरू भेटणे कठीण | जाणील त्यासी कोण
    जवळी तुमच्या असून | कां शोधतासी ९

    तुमचा गुरू अंतर्मनी | महत्व त्याचे जानोणी
    घ्यावे त्यास ओळखूनी । हेची तुमचे यश १०

    जाणावे आत्मज्ञान | करावे स्वचिंतन
    तोच गुरू असून । उद्धारूनी नेई ११

    ज्याचा गुरू त्याचे जवळ | मग का दवडसी वेळ
    शोधण्यास जाई काळ | निरर्थक १२

    आयुष्य आहे थोडे | चित्त द्यावे प्रभूकडे
    जीवनाचे उकलेल कोडे | त्याच्या आशिर्वादे १३

    जीवनाचे मर्म | जाणावे हा धर्म
    त्याचप्रमाणे करावे कर्म | आयुष्य सार्थकी होणेसी १४

    गुरूसी करावे वश | समजोनी त्यास ईश
    घ्यावा त्याचा उपदेश | जीवनाचा १५

    एकदा अंतर गुरू लाभता | उपदेश त्याचा मिळता
    मार्गदर्शन सतत होता | तुमच्या जीवनाचे १६

    श्रेष्ठ गुरू अंतरीचा | परि विवेक पाहीजे मनाचा
    सराव करावा एकाग्रतेचा | उपदेश त्याचा घेण्या १७

    अंतरज्ञान मिळे कठीण | करावे लागते बहुत चिंतन
    श्रद्धा प्रभूवर ठेवून | ध्यान करावे १८

    एकाग्रतेचे चिंतन | लागता प्रभूध्यान
    विचार रहीत करावे मन | प्रकाश पडेल अंतरमनी १९

    आंतरमनातील प्रकाश | चेतना देईल सावकाश
    आनंदी करील आयुष्य | गुरू बनोनी तुमचा २०

    रोज करावे ध्यान | मनी एकाग्र भाव आणून
    जाता बाह्य जगाला विसरून | नियमाने २१

    योगाचे आसते सामर्थ्य | जीवनाचा दाखवी अर्थ
    न जाई प्रयत्न व्यर्थ | विश्वास ठेवावा प्रभूवर २२

    गुरू तुमच्या अंतरी | शोधता त्यासी बाहेरी
    हिच शोकांतिका खरी | तुमच्या जीवनाची २३

    सारे जीवन वाया जाई | जीवन तत्व ध्यानी न येई
    पश्चातापूनी उपयोग नाही | शेवटचे क्षणी २४

    चार दिवसांचे जीवन | सार्थकी लागावे म्हणून
    पाया त्याचा आत्मज्ञान | समजोनी घ्यावा २५

    संशय मनी न यावा | ध्यानयोग सिद्ध करावा
    तोच आपुला गुरू समजावा । अंतरात्मा २६

    गुरू नसतो कुणी व्यक्ती | अंतर्मनातील ती शक्ती
    आत्मा त्यास संबोधती । विद्वान जन २७

    जागृत अंतरात्मा । तोच होय परमात्मा
    श्रम न येई कामा । शोधता देहाबाहेरी २८

    तुमचा गुरू तुमचेपाशी । परी तुम्ही वाट चुकलासी
    जाणोनी घ्यावे गुरूसी । आत्मचिंतनाने २९

    प्रत्येक ती व्यक्ती । तिच्यातील सुप्त शक्ती
    सूचना देत असती । जिवन मार्गाच्या ३०

    जागृती आसवे चित्ती । चेतवावी सुप्त शक्ती
    मार्ग तयांना दिसती । ज्ञान प्रकाशाने ३१

    एकाग्र ज्याचे मन । न होत चुका त्याचे कडून
    संसार सागर जाय पोहून, केव्हांही ३२

    असावा आत्मविश्वास । मिळेल त्यासी यश
    मदत करी ईश । तयांना ३३

    आत्मबल महान । मार्ग त्यासी दिसून
    यश करी संपादून । जीवनाचे ३४

    इच्छा तेथे मार्ग असती । अंतरगुरू मार्ग दाखविती
    श्रद्धा ठेवावी त्याचे वरती । ध्येय गाठण्यासाठी ३५

    आपण चुका करिती । दोष प्रभूसी देती
    नशीबास नावे ठेवती । अज्ञानामुळे ३६

    निर्णयाचे बहूत क्षण । सुख - दु:खे त्यावरी अवलंबून
    जीवन होई कठीण । चूक तुमची घडता ३७

    चूक होते विचारांची । परिस्थिती जाणण्याची
    चाहूल न येती संकटाची । तुम्हांसी ३८

    भावना आणि विचार । यांची मर्यादा असणार
    नियती तिला न कळणार । हाच आहे निसर्ग ३९

    आपण जगतो विचाराने । आपल्यातील भावनेने
    परंतु जगावे आत्मज्ञानाने । हाच यशाचा मार्ग ४०

    आत्म्याचे सामर्थ्य श्रेष्ठ । त्यास कळे इष्ट
    अंश प्रभूचा स्पष्ट । असे तो एक ४१

    म्हणून जाणावे आत्मज्ञान । जावे त्यास शरण
    अंशात्मक परमात्मा समजून । चिंतन करावे त्याचे ४२

    निर्णय कधी न चुकती । जेव्हां तो आत्मा देती
    योग्य निर्णय आनंदती । तुम्हां लागी ४३

    आत्मज्ञान हाचगुरू । सुप्त शक्ती जागृत करू
    निर्णय त्याचे शिरी धरू । हाच करावा संकल्प ४४

    एकाग्र होता मन । लागेल तुमचे ध्यान
    निर्णय तोच देईन । तुमच्यातील सुप्त शक्ती ४५

    प्रसंग येता तुमचे वरी । एकाग्र चित्ती विचारी
    आत्मगुरू निर्णय करी । तुमचे साठी ४६

    आत्म्त्याचा निर्णय । समाधान देय
    चुका न होय । कधीही ४७

    जीवानाचे सार । समजता ईश्वर
    आत्मज्ञान गुरूवर । विश्वास ठेवावा ४८

    आत्मज्ञान गुरू । चिंतन त्याचे करू
    मार्ग तोच धरू | जीवन यशासाठी ४९

    आत्मज्ञान असे महान || घ्यावे समजोन सर्वांनी ५०

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com