विचारांची उठूनी वादळे
अशांत होते चित्त सदा
आवर घालण्या चंचल मना
अपयशी झालो अनेकदां
विष्णतेच्या स्थितीमध्यें
नदीकांठच्या किनारीं गेलो
वटवृक्षाच्या छायेखालच्या
चौरस आसनावरी बसलो
डोळे मिटूनी शांत बसतां
अवचित घटना ती घडली
विचारांतले दुःख जावूनी
आनंदी भावना येऊं लागली
एक साधूजन ध्यान लावीत
बसत होता त्या आसनावरी
पवित्र्याची वलये फिरती
आसन दिसले रिकामें जरी
वातावरणाची ही किमया
अनुभवते ती प्रखरतेनें
शुद्ध अशुद्ध ते विचार येती
सभोवतालच्या जाणिवेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail - bknagapurkar@gmail.com
मूल्य नाही कुणा,
तूं दिल्या वेळेचे,
गमावून टाकी,
जाणूनी फुकाचे ।।१।।
लागत नसते,
दाम वेळेसाठीं,
म्हणून दवडे,
अकारणा पोटीं ।।२।।
वस्तूचे मूल्य ते,
पैशांनीच ठरते,
परी वेळेची किंमत,
कुणा न समजते ।।३।।
वेडे आहोत सारे,
कसे होई मूल्य
वेळ जातां मग,
आयुष्य जाईल ।।४।।
आयुष्य खर्चणे,
हेच वेळेचे मुल्य ठरते,
जीवनांतील यश,
त्यावरुन कळते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते
आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते
इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि
लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी
मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या
बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या
इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला
चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला
चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी
दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar”Gmail.com
रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात,
एकत्र येऊन फिरतात,
पंचमी साजरी करतात,--!!
निळेशार राखाडी पांढरे,
मेघांची लगीनघाई,
इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,--!!!
प्रभात काळी एकेक रंग,
उषा क्षितिजावर उधळते,
पिवळे निळे काळे तांबडे,
त्यात सोनसळी भर असे,--!!!
कुठून येई,लख्ख प्रकाश ,
खजिनाच वर वर येई,
ढगांआडून प्रकाशदाता,
सगळ्यांना आपुले दर्शन देई,--!!!
सकाळ होता राज्य त्याचे,
सम्राटाची सारी जादू ,
रंग पिवळसर सोनेरी,
लागतो पसारा मांडू,--!!!
श्यामल संध्या गगनी येतां,
पुन्हा रंगांचीच लीला,
तांबडे निळे राखाडी सोनेरी,
क्षितिजावर पखरण होतां,--!!!
वसुंधरेवर तम टाकते,
आपले पहिले पाऊल,
जसा सूर्या घरी निघतो,
होता तांबूस संधिकाल,--!!!
काळा रंग आता पसरे,
महत्त्व त्याचे येता रजनी,
नभी दुधी चांदणे,उगवता,
काळ्या ढगांस कडा रुपेरी,--!!!
हिमगौरी कर्वे ©
फुलेल नातं तुझं माझं
करून बघ एक उपाय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?------!!
तोलू नकोस ताजव्यात
आल्या गेल्या क्षणांना
काठावरच बसून रहा
सोडून फक्त पाण्यात पाय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?------!!१
माझ्या मनात तूच आहेस
चाचपडणं सोडून दे
खदखदतंय मनात जे
अलगद त्यावर धरेल साय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?------!!२
मोजु नकोस वळणं वेडी
घालु नकोस अवघड कोडी
वळून बघ तुझ्यामागे
पाऊल माझं पडत जाय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?------!!३
………. मी मानसी
मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
विचारांती तेच करू ....।।धृ।।
सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
मनाची कदर करूं...१
मीच माझा गुरु
निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
निवड एकाची करूं...२
मीच माझा गुरु,
इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
सोईचा आग्रह धरूं...३
मीच माझा गुरू
शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
स्वतःसाठीं योग्य करू...४
मीच माझा गुरू
ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
आदर त्याचाच करूं...५
मीच माझा गुरू
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,
या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,
हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,
उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
कन्या रत्न हे जन्मता
सदा असावे स्वागता
जाईची रे भासे कळी
ह्या अंगणामध्ये ती रांगता
का खुडता रे सुगंधी कळी
तीचं नशिब असे तीच्या भाळी
का रक्ताने हात माखता
घेऊन तो निष्पाप बळी
आई म्हणजे ईश्वर असे
मुलीमध्ये तो का न दिसे
भावी जगाची तीच आई
उमटते सोनपावलांचे ठसे
शिवा जन्मला जिजा पोटी
सावित्री झाली क्रांती ज्योती
अन्यायाचा करण्यास अंत
राणीच्या हाती तलवार होती
येऊ द्या तीला ह्या जगती
वंशाची समजा पणती
पाहू द्या हे जग तीला ही
आनंदाच्या क्षणासंगती
आकाशी ती घेईल भरारी
घेईल जिंकून दुनिया सारी
फक्त एकदा जन्म घेऊ द्या
करील जादू ती सोनपरी
कवी - महेश सुखदेव पुंड
तामसवाडी,ता - नेवासा, जि - अहमदनगर
मो.नं - 8459043090
Copyright © 2025 | Marathisrushti