हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे
लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१
लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी
धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२
काही हवेसे वाटू लागले एके दिवशी
विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३
आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती
गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४
तगमग करूनी तेच मिळविता आज
कल्पना विलास होता तो झाली ही समज....५
खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती
स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती....६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित,
लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,---!!!
उठे स्मृतींचे मोहळ,
स्मरणांच्या माशा डंसत,
भारतीय म्हणून मी,----
झुरतो तिच्यासाठी अविरत,---!!!
थांबे ना कुणासाठी काळ ,
मागेमागे धावे मन,
आलो जेव्हा परदेशात,
उदास होतो आत उरांत,---!!!!
खडी करण्या कारकीर्द,
मनात होती खूप उमेद,
आईपासून तुटले मूल ,
सारखी जिवा वाटत खंत,--!!!
नीतिमंत तो भारतीय ,
असे नाव काढाया सज्ज, संस्कारांचा असे प्रश्न,
संस्कृतीचा पाईक अत्यंत,--!!!
वाटे मज अभिमान,
एक भारतीय म्हणून,
चांगले तेवढेच घेत ,
भारतीय मी कर्तृत्ववान,--!!!
कवटाळीत उराशी स्वप्न,
एक दिवस तिथे येईन,
करत आपल्या जनांचा उद्धार,
देशां, माझ्या समृद्ध करेन,--!!!
© हिमगौरी कर्वे.
आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१,
प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२,
तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३,
जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो
त्या मागे माणूस धावतच राहतो
अपेक्षांचा ओघ वाहवत असतो
कुठेतरी विश्राम द्यायचा असतो
आणि ...........
इथच चुकतं,नव्वद टक्के मार्कस् मिळाले
आई म्हणे बाळा
थोडा अभ्यास केला असतास तर......
तर नक्कीच वाढले असते टक्के
पाच लाखाचं पॅकेज
अमुक कंपनी जास्त देईल पॅकेज
तृप्ती नाहीच........
अपेक्षांचा नाही.....
तृप्तीचा डोंगर वाढू दे
प्रयत्न सोडू नको रे,
अपेक्षा ठेव रे,
पण मिळालेल्या यशास
तुच्छ लेखू नको रे
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले
साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले १
वाङ्मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी
अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी २
खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी
साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी ३
गोंधळून गेलो होतो मनीं नव्हते ज्ञान कांहीं मजला
बरसत असतां त्यांचे ज्ञान छिद्रे होती मज झोळीला ४
कुणीही नसता मार्गदर्शक घडत होते सारे अवचित
चेतना देण्यास मज लागी आशिर्वाद त्यांचा होता सतत ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चिंचो, आवळे, काजू आणि गरे,
कोकणी माणूस लय लय बरे....
शिवीगाळये घालतत खरे,
मनांत त्यांच्या काय नाय बरे.....
करवंदा खावची तर कोकणात
जावचा,
डोंगरातून फिरतांना, मजा लय
गावता....
नदी किनारी झाडा बघा
नारळाची,
पाणी पिता तेतूरला, स्वर्गच
गावता.....
हिरवी हिरवी गार आंब्याची
तोरा,
काजीचो रंग बघा लाली लाल
जरा....
जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका
ठाऊक हा,
पण डायाबिटीसवाल्यांका मात्र
लय लय भावता......
कापो आणि बरको, हे फणसाचे
प्रकार,
प्वॉटभर खाल्ल्यार वाढता
पोटाचो आकार.....
होडयेतून फिरतांना म्हणता,
वल्हव रे नाखवा,
मुंबईचो चाकरमानी इलो, त्येका
कोकण दाखवा........इति
-- मयुर तोंडवळकर.
गवाक्षातुनी डोकाविती
रविकिरण सुवर्णकांती
प्रहर प्रभाती चैतन्याचा
ब्रह्मांडी स्पंदने जागती
उजळते रूपरंग सृष्टिचे
धरा ल्याली हरितहिरवाई
झुळझुळतो गंधितवारा
तृणांकुरी , डुलती पाती
संथ वाहते गंगा पावन
पारावरी झुलतो पिंपळ
राऊळ गाभारी विश्वेश्वर
तेजाळती मंद फुलवाती
गुलमुसलेली सांज पश्चिमी
धुळ गोधुळीची आसमंती
अधीर ओढ़ ती पाऊलांना
ही वात्सल्यप्रीतीची नाती
संध्या बिलगते यामिनीला
शांत निःशब्द माहोल सारा
परिमार्जन , साऱ्या श्रमांचे
विसासते बाहुत भावप्रीती
-- वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १६०
११ - ७ - २०२२
एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//
ऐष आरामांत राहून देह झाला मलीन
शरीर सुखासाठी करती नाना खटपटी
आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१//
मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी
राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार
टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //२//
विसरुनी चाललो मानवता प्रत्येक बघतो स्वार्थता
विश्वासाचे आपले नाते विसरुन गेले सारे ते
निस्वार्थी बुद्धीने आतां जाणा इतर मनाचे ठाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //३//
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सख्या, तुझ्या आठवात
मी, चालते संथ पाऊली
सांजवर्खी या सांजवेळी
ओघळले, काजळ गाली
सोबती तीच वाट निरंतर
तुझ्याच स्पर्शात नाहलेली
पापण्यातील अस्तिव तुझे
खुलवीते या गालीची खळी
ही नित्याची साक्ष अंतरी
उमलते पाकळी पाकळी
अनवट मोहक वाटेवरचा
तूच नटखट माझ्या भाळी
तुज मी स्मरता वेळोवेळी
लोचनी प्रीत गहिवरलेली
तुझा असा असह्य दुरावा
सर्वत्र तुझी स्मृती रंगलेली
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२७
६/९/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti