प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.
निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते ।
दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।।
अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया ।
लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।।
उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल ।
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।।
भरेल भांडे काठोकाठ , केवळ धरता योग्य दिशेने ।
टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची, अशीच केवळ शुद्ध मनानें ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चहुकडे अंधार पडलेले
दुरवर नजर जात नाही
आकाशी चंद्राला चांदण्या
काही केल्या सोडत नाही
-- शरद अर्जुन शहारे
सत्य हे नेहमीच पोरकं असतं
माझ्या जीवनात जर तो आला नसता
तर कदाचित मीही हे मानलं नसतं
पण... तसं व्हायचं नव्हतं
अजूनही मला तो आठवतो आहे
उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा
आणि हो, त्याचे डोळे!
त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते
तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत
तुमच्याशी संवाद साधायला लागायचे
सत्याबद्दल त्याला अपार आदर होता-असीम निष्ठा होती
आदर्श जगाबद्दल काही कल्पना होत्या त्याच्या
पहिल्या भेटीत मी काहीच बोललो नाही
नंतरच्या भेटीत त्याच्या डोळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला
त्याची मूल्यांवरची निष्ठा अटळ होती
मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला
पण.... त्याने मानलं नाही
त्यानंतर तो अनेकदा भेटला
नेहमी काहीतरी आदर्शवादी बोलायचा
सगळंच काही लक्षात राहणं शक्य नव्हतं पण
त्याचे ते विलक्षण बोलके डोळे मात्र सतत जाणवायचे
असाच एकदा भेटला असताना
मिळालेल्या नोकरीविषयी उत्साहाने बोलत होता
मी त्याला आदर्शवादी भूमिका सोडून द्यायला सांगितली
तडजोडीचा व्यावहारिक अर्थ समजावला... पण
त्याने दुर्लक्ष केले
त्याला सत्यकाम बनायचं होतं
तेव्हाच मला त्याच्या गंभीर भवितव्याची कल्पना आली
पण तरीही; त्याच्या डोळ्यातील तेजस्वीपणाचा मला हेवा वाटला
मध्यंतरी त्याला नोकरीवरुन हाकलण्यात आल्याचं समजलं
'सत्यकाम'च भूत त्याला अद्यापि छळत होतं
एका खटल्यातही त्याला गोवण्यात आलं होतं
त्याबद्दल त्याला मी नंतर हटकल्यावर
'पराभव मान्य!'
एवढंच बोलून तो गप्प झाला
कदाचित ओठांतून व्यथा ओसंडेल म्हणून
ओठ घट्ट आवळून घेतले होते त्याने
आपली निराशा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यानं
पण; आपले डोळे विलक्षण बोलके आहेत
हे मात्र तो विसरला
त्या नंतरच्या भेटीमध्ये, त्याच्या डोळ्यातील तेज
अस्तंगत होत जाणं पहाणंच माझ्या नशीबी होतं
असेच काही दिवस गेले, आणि...
अचानक 'ती' बातमी कानांवर आदळली
झालं ते अटळ असूनही मला खूप वाईट वाटलं
जीवनभर सत्याच्या पाठी धावणाऱ्या वेड्याला
सत्य नेहमी पोरकं असतं हे कटू सत्य उमगलं नव्हतं
आणि अशाप्रकारे सत्य अखेरीस पोरकंच राहिलं
आणखी एका आहुतीनंतरही...!
-- यतीन सामंत
आकाशाला शब्द भिडले,
हृदयामधले ।
भाव मनीचे चेतविता,
स्फोटक बनले ।।१।।
देह जपतो हृदयाला,
सदा सर्व काळी ।
धडकन त्या हृदयाची,
असे आगळी ।।२।।
जमे भावना हलके तेथे,
एकवटूनी ।
सुरंग लागता तीच येई,
उफाळूनी ।।३।।
कंठ दाटता
जीव गुदमरे आत ।
रंग बदलती चेहऱ्यावरले,
काही क्षणात ।।४।।
उद्वेग बघूनी शरीर,
कंपीत होते ।
हृदयातील भाव जाऊनी,
मन हलके होते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मी शांत बसलेला असताना
मी एकटा असतो; स्वत:शीच
जगापासून दूर...
मी जगाचा तिरस्कार करतो
हे जग स्वार्थी आहे, ढोंगी आहे
भयानक क्रूर आहे, आपमतलबी आहे
हे जग माझ्यासाठी नाही
मी या जगाचा धि:कार करतो
माझ्यापुढे ठाकलेला असतो आदर्शाचा हिमालय
सुंदर, स्वच्छ, स्फटिकधवल
दूरदूरुन मला खुणावत असतात
विवेकानंद, राम नावाची त्या हिमालयाची उंच शिखरे
शिवाजीच्या असामान्यतेची विविधरुपे
स्वाभिमानसूर्याची भेदक, जहाल किरणे
टिळक, सावरकर नावाची!
याक्षणी माझ्या चेहऱ्यावर साचतो दिव्य प्रकाश
आदर्श नामक पैलूदार हिऱ्याचा
त्याक्षणी मी भारावून जातो; नि
नेमका जगरहाटीपासून दूर सरकतो
माझ्यापुढे उभे असतात; नाना प्रश्न
स्वाभिमानाचा, अस्मितेचा, देशप्रेमाचा, आपलेपणाचा, न्यायाचा
जे वर्षानुवर्षे अनुत्तरित राहिलेले आहेत
ज्यांना आज लाज झाकण्यापुरतेही कपडे नाहीत
असे अनेक नागडे प्रश्न!
अखेर हे जपायचं कुणी? कुणीतरी जपायलाच हवं
लिलावात निघालेली नीतिमत्ता कुणीतरी राखायलाच हवी
पण....
या सगळ्या गर्दीतून एक नेमका प्रश्न निसटला होता
पोटापाण्याचा! जीवनसंघर्षाचा!!
उदात्तता कुणीतरी सांभाळायला हवी असा फक्त मी जप करतो
प्रत्यक्षात तसं करण्याचं धाडस मला होत नाही
कारण, मला पुढे यायचं आहे
आता माझ्यापुढे आदर्श असतो
-मंत्र्याच्या आश्वासनाचा
मग मी माझ्या आदर्शाचं वल्हं
अलगद दुसऱ्याच्या हातात सोपवतो
नि घाईघाईने जगाच्या गर्दीत सामील होतो
या काळ्या महासागरात विलिन होतो एक बिंदू होऊन
लोकलच्या गर्दीत आपसूक पुढे सरकल्या जाणाऱ्या माणसासारखा
-यतीन सामंत
दे हाक आपल्या जन्मदात्या
संकटात धावून येती ते
दे हात तयांना वृद्धपणी
कृतकृत्य होतील नक्की ते
हाक जन्मदात्यांसी
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नव्या घराचा पाया भरतांना,
तो दिसला मला माझ्याकडे येतांना..!
येताच म्हणाला,
"मी वास्तुशास्त्र जाणतो..!"
"कुठे बेड, कुठे हाॅल,
कुठे किचन असावं सांगतो..!"
"शास्त्र माझे सर्व काही सांगते,
मी सांगेन तिथेच सुख नांदते..!"
ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो,
"दोस्ता थोडं थांब
अन्...
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग..!"
"जिथं दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो..!"
"जिथं या कुशीवर वळलं की
बेड होतो..!"
"त्या कुशीवर वळलं की
हाॅल होतो..!"
"पोटात आग पडली की
तेच होतं किचन..!"
"कुठल्याच सुखसोई
नसल्या तरीही
मजेत फुलतो देह,
ना कुणा रक्तदाब
ना कुणा मधुमेह..!"
"काही सूचत नसेल
तर तसं सांग..!"
"न बोलताच
का चाललास लांब..?"
"दोस्ता...
कदाचित इलाजाला पैसा नसेल,
‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील..!"
"त्यांचं दुःखच देतं त्यांना
जगण्याचं बळ..!"
"त्याचं दुःखच घालतं त्यांना
जगण्याची गळ..!!"
"नीट उत्तर दे..!"
प्रश्न आणखी विचारतो सोपा,
"कुठल्या शास्त्राला विचारून
सुगरण विणते रे खोपा..?"
"दोस्ता…
सुख नांदण्यासाठी
"या खोलीचं तोंड
त्या दिशेला नसावं..?"
अन्
"त्या खोलीचं तोंड
या दिशेला नसावं..?"
या तकलादू शास्त्रापेक्षा रे,
"माणसाचं तोंड
माणसाकडं असावं..!"
अन्
"माणसाचं मन
माणसाला दिसावं रे..!!!"
दत्त मनी दत्त ध्यानी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव
कर्म माझे जाणिले तूम्ही
चित्त तुम्हा ठायी सदैव
दत्त नामस्मरण नित्य
पुण्य काळ सुखाचा..
मोक्षार्थी करीतसे गमन
भक्त गुरू दत्तांचा..
दत्त वसले औंदुबरी
भोवताली श्वान गाई
कृपेचा भवसागर
ध्यानस्थ कृष्णा माई..
चराचरात पाहतो
गुरु विना कोण तारक
ब्रम्हा विष्णू महेश
एका स्थळी चित्तवेधक
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
Copyright © 2025 | Marathisrushti