विसरलास तू मानव पुत्रा,
नीतिमूल्ये सगळी,
काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली....।। धृ ।।
स्वप्नामध्ये दिले वचन,
पाळीले ते राज्य घालवून,
हरिश्चद्रांची कथा आजही
करीते मान ताठ आपुली....१,
विसरला तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
राजा साठी देई प्राण,
दुजासाठी होते जीवन,
‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी
शिवरायाची शान राखली....२,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
काळ असो तो पुरातन,
वा आधुनिक शिवकालीन,
पूर्वज सारे महान असता,
आज पुण्याई अशी का आटली?....३,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
विश्वासाचे नाते गेले,
स्वार्थीपणाचे बीज अंकुरले,
लुटतो मानव एकमेका,
हीच चित्रे आज उमटली.....४,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 1, 2016
भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 9, 2019
(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)
एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी...१,
मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते
गादीवरती पडून सारे, स्वप्ने आपली रंगवीत होते,
तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी
हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी,
कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने
शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने,
भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप ते काय असते
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 15, 2019
कां व्हावे निवृत्त मी ?
कुणी सांगतो म्हणूनी
निसर्गालाच सांगू द्या
वय झाले समजूनी
कार्यक्षमता माझ्या मधली
मोजमाप हे कुणी करावे ?
विकलांग होईल केंव्हा शरीर
निसर्गालाच हे ठरवूं द्यावे
सहजची जगतो ऐंशी वर्षे
संसार सागरी पोहता पोहता
स्थिरावले मन विचार करुनीं
निवृत्तीची जाणीव येता
सर्वासंगे जगता जगता
शेवटचा तो श्वास ठरु दे
हासत खेळत आनंदाने
ह्या जगाचा निरोप घेऊं दे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 19, 2016
त्या झऱ्यापाशी,
एकच झाड उभे होते,
निश्चल, निर्धास्त, अढळ,
वाऱ्यावर झुलत होते ,
वर्षे गेली दिन गेले,
रात्री आणि दिवस सरले,
अनेक बाके प्रसंग आले,
आले गेले नि परतले,
झाड मात्र तसेच राहिले,
झऱ्याकाठी लोक येती,
पाण्याने ताजेतवाने होती,
अनेक म्हातारे कोतारे ,
डोळ्यातून पाणी काढती,
त्यांच्या असती किती,
तारुण्यातील गोड स्मृती,
तिथेच येती तरुण-तरुणी,
हातात हात आपुले गुंफुनी,
विफल प्रेमाचे बसता चटके,
इथेच येऊन अश्रू ढाळती,
झाडाखाली तरुण जोडपी,
संसारातील गोष्टी करती,
वाद भांडणे प्रेम सारे,
झाडाला पहायला मिळती,
कुणी एकाकी जीव भटकती,
आपले दुःख प्रकट करती,
लहान मुलांगत सारखे रडती,
दु:ख वाटून झाड संन्यासी,
कुणी येई त्या डोंगरमाथी,
वैतागून जीवही देई ,
निष्काम ते कर्मयोगी,
झाड निमूट बघत राही,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 18, 2019
आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे,
खालून मुळ्यांची पेरणी,
झाडाझुडपांचा पायाच असे,
वाढावे असेच उदंड,
खालून वरवर जावे,
कितीही वर गेलो तरी,
पायाला न कधी विसरावे,
गगन विस्तीर्ण भोवती,
बुंध्यातून वाढीस लागावे,
फांद्या पाने ,फुले यांनी,
खोडास सतत बिलगावे,
झाड लेकुरवाळे असते,
तरी किती निस्संग,---!!!
एक निळाई त्याच्या डोळी,
दुसरा न कुठला रंग ,--!!!
*हिरवे असून, आसमानी जाई,
अवती भोवती किती लेकरे,
सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे*,--!!!
फांद्या, पाने, फुले सारे,
शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
स्वार्थ कधी नसतोच मनी,--!!!
म्हणूनच का एवढे जाते,
उंचावरती पसरत ते ,------?
कुठून आणे तटस्थ वृत्ती,
संन्यस्त अश्वत्थ बनते,--?
© हिमगौरी कर्वे.
January 2, 2020
चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे
रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,
कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली
टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,
जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले
श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,
यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी
कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 17, 2018
भाळीचे भाग्य असावे
मृदुलस्पर्शी स्वर्गसुखाचे
अमृत प्रीतवात्सल्याचे
सौभाग्य सहृदी मित्रत्वाचे....
आयुष्याच्या वाटेवरती
दुःखातही सुखावणारे
आधाराचे हात देवूनी
कुणी असावे सावरणारे....
रमविणाऱ्या रम्यनिसर्गी
ऋतुरंगात भुलूनी जाता
मोहरल्या मिठित विरूनी
दिव्यस्पर्शात मिटुनी जावे....
जन्म, मृत्यु सत्यशाश्वती
हॄदयांतरी जपता भावप्रीती
सांजाळल्या क्षितिजावरती
जीवा लाभावी आत्मशांती....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५६
१२/१०/२०२
October 18, 2022
ऋतू हा बरवा, वसंत हा आला,
नवा गंध घेऊन आनंद फुलला.
हिरव्या पानांनी धरित्री नटली,
सुगंधी फुलांनी दिशा मोहरली.
मंद मंद वारे सुरेल गीत गाती,
वनी कोकिळा मधुर स्वर छेडिती.
नभी इंद्रधनू रंग उधळून जाते,
निसर्गात सारी सृष्टी न्हाऊन निघते.
शिवारात डोलती सोन्याची शेते,
श्रमिकांच्या मुखी उमलती हसू फुले.
नदीचे जल गाते प्रसन्न गाणी,
भरुनी जीवनी नवी चेतना आणी.
असा हा ऋतू दे सुखाचीच छाया,
मनी प्रेम, शांती, नवी मंगल माया.
निसर्गा तुझ्या या कृपेचा ठेवा,
सदा लाभो आम्हा ऋतू हा बरवा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 23, 2026
आयुष्य पुढे धावत असते,
वय सारखे वाढत असते,
पण......
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते ,,,,,
उच्छृंखल आणि समंजसपणा,
यामधली मर्यादा कळते,
अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
जगण्याची परिभाषा,
थोडी थोडी बदलू लागते,
काय हवे अन् काय नको,
हे नेमकेपणे कळू लागते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
मन जोडीदाराचं,
न बोलताच कळू लागते,
गोडी संसारातली,
एक पायरी वर चढते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
जगणे समजुन घेण्याचे,
हेच खरे वय असते,
याच वयात आपण स्वत:साठी, जगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
आयुष्याच्या चित्रपटातील,
हेच मध्यंतर असते,
इथूनच पुढे,
शेवटच्या क्लायमेक्स कडे
जायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
म्हातारे होण्याआधीचे,
हे शेवटचे तरूणपण असते,
ते, आपण मनापासून उपभोगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
चाळीशीनंतरही पावसात
भिजावेसे वाटणे,
हे मन अजुन हिरवे असल्याचे
लक्षण असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
चाळीशीपुढच्या मित्र मैत्रिणींनो, एकदा तरी अवश्य वाचाच....
खरंतर हेच वय आहेन आयुष्याला चॅलेंज करायचे.
त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याचे.
आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्ता तर कुठे "सिट बेल्ट ऑफ" ची साईन आली आहे.
ही वेळ आणि वय आहे "क्रूझ" करायचं, नवी क्षितिज गाठायचं, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं..!
कारण चाळीशी / पन्नाशी म्हणजे नृसिंह अवस्था.!
ना तरुण ना म्हातारा,
ना नवशिका,
ना पूर्ण अनुभव संपन्न,
ना खूप आसक्ति
ना पूर्ण विरक्ति,
ना पूर्ण सौष्ठव,
ना गलित गात्र,
आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा....
अरे जमवा मित्र दर महिन्याला,
घेऊन जा घरच्यांना फॉरेन ट्रिपला,
नसेल परवडत तर शक्य असेल तिथे करा एखादी "हनीमून स्पेशल" टूर वर्षातून एक दोनदा....
जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा.
आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा,
पोरांचे मित्र व्हा,
त्यांच्या मित्र मैत्रिणींचे Buddy व्हा,
सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या,
सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त फ्लर्ट करा,
गॉसिप करा,
शाळेची गेट टुगेदर आयोजित करा,
ट्रेकला जा,
रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यावर दादागिरी करून "आवाज कुणाचा" चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा.
बर्फी वहिनी किंवा पेढा शेजारी दिसला तर हळूच कटाक्ष टाका.
औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या, पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा.
पावसात भिजा,
जॉगिंग करा,
सूर्यनमस्कार घाला,
लाँग ड्राइव्हला जा,
सिनेमे पहा,
काका / काकू म्हणतील त्यांचे काका / काकू व्हा,
दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा,
अनुभवाचं ओझं इतरांना वाटून थोड हलक करा.
मुख्य म्हणजे हसत रहा.
एकदा मनाशी पक्के बांधले की चाळीशीचा / पन्नाशीचा घाटमाथा म्हणजे, पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. पन्नाशी टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते.
आणि मग चाळीशी / पन्नाशी हा फक्त एक आकडा रहातो...
जस्ट अनदर ब्लडी नंबर...
म्हणूनच म्हणतो .....
ENJOY YOUR
चाळीशी पुढे ......
June 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti