येतात तुझे आठव,
डोळ्यांत काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव ,--!!!
येतात तुझे आठव ,
होते सरींची बरसात,
चित्तात उठे तूफान",
मनात चालते तांडव,--!!!
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन ,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,---!!!
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसतेच डाव,--!!!
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पाणथळ,
कसानुसा होई जीव,--!!!
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब
, कधी बनती विष:कण,--!!!
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल,
काट्यांची बनते शेज,--!!!
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 22, 2021
दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस
प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस.. १
खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२
खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते
तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३
विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४
-- डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 26, 2019
कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन
जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन...१,
झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले
सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले...२,
कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी
जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी...३,
गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला
सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 18, 2017
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
August 25, 2015
कल्लोळ मनभावनांचा
सावट, निमिष वेदनांचे
अंतरंगात, सावळबाधा
नेत्री उपवन भावफुलांचे ।।
ऋतूगंधली, कुसुमसुमने
गंधाळ सारा प्रीतभारला
उमलता, नित्य शब्दफुले
प्रणयगंधी गुछय फुलांचे ।।
शब्दाशब्दात, भास तुझा
मनी भावनांचे चंद्रचांदणे
ओठी झरते काव्यप्रतिभा
भावनांत थेंब गंगाजलाचे ।।
देहात नांदते, तूं कुमुदिनी
आळविता मीच प्रतिभेला
शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता
भाग्यच! हेची मम भाळीचे ।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २३.
२३ - १ - २०२२.
February 2, 2022
ती आणि तो स्टेशनवर दिसले
कॉलेजमधले असतील...
काहीतरी बिनसले होते....
ती त्याच्या गळ्याला हात
लावून शपथ घेत सांगत होती
आणि ती पण तसेच करतहोती...
दोघेही साधे ...लोक बघत होते
त्यांना कळत होते तरीपण
ते दुर्लक्ष करत होते..
शपथा....सागणे..आर्जव करणे..
हे असेच चालते प्रेमात..
शेवटी त्याची गाडी आली..
तो थोडे ' किस ' सारखे करून गेला..
ती तशीच परत...
पुढे चालू लागली...
तोच तिचा मोबाईल सुरु झाला
परत तेच सुरु....
प्रेमात असेच असते...
त्यांना थांबणे माहीत नसते.....
-- सतीश चाफेकर.
December 13, 2021
पूर्णपणें मज पटले आतां
कविता कुणी करवून घेतो
कोण असेल तो माहित नाहीं
मजकडून तो लिहून घेतो
घ्यानी मनीं कांहींही नसतां
विषय एकदम समोर येतो
भाव तयांचे जागृत होऊन
शब्द फुले ती गुंफून जातो
एका शब्दानंतर दुसरे
आणि तिसरे, लगेच चौथे
शब्दांची ती भरुनी ओंजळ
माझ्या पदरीं कुणी टाकतो
गुंफण करुनी हार बनता
त्याजकडे मी बघत असे
फक्त प्रभूचे नाम घेऊनी
अर्पण त्याला करीत असे
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 22, 2012
विठूचे पद मजला लाभावे
देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवे ?
नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ?
असती कां क्षितिजापल्याड श्रिठ्ठलवस्तीच्या खुणा ?
विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।।
अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं
त्या सार्यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती
मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें ।।
क्षणभंगुर ही दुनिया चंचल, पळभर येथें थांबायाचें
त्या थांब्यावर, अखंड तोंडीं नाम चिरस्थिर-विठुरायाचें
नच गंगा, अंतीं ओठांना विठुनामच लागावें ।।
-- सुभाष स.नाईक
पंढरीचा राणा
July 3, 2017
सखये सृष्टिलाही स्वप्न तुझे
ऋतुं ऋतुंतूनी तूं झुळ झुळते....
ऋतुं रंगली, तुं स्वरूप सुंदरी
चैतन्याला मनमुक्त उधळीते....
कुसुम सुमनी, तुझेच दरवळ
कांचन किरणातुनी तू स्पर्शते....
तव अधरीचे, हास्य श्रावणी
मन मनांतर, मोहरुनी जाते....
तूच अंतरी सप्तरंगले इंद्रधनु
आत्म सुखाची प्रचिती असते...
तूच श्रावणातील श्रावणधारा
अव्यक्तालाही चिंब भिजविते....
क्षण हेच खरे अवीट ब्रह्मानंदी
निर्झरी, संथ गुणगुण तोषविते....
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.१९५
१०/८/२०२२
September 12, 2022
उद्याच्या चिंतेत आजचा आनंद कशाला हरवायचा,
आजचा प्रत्येक क्षण मनभर आनंदाने जगायचा.
कालच्या आठवणींना प्रेमाने निरोप द्यायचा,
उद्याच्या काळजीचा भार वेळेवरच सोपवायचा.
जे आपल्या हातात नाही, ते नियतीच्या स्वाधीन करायचं,
मनावरचं प्रत्येक ओझं हसत हसत हलकं करायचं.
संकटं येतातच आयुष्यात ऋतू बदलल्यासारखी,
पण आशेची ज्योत मात्र कधीच मावळू द्यायची नाही.
सुखात साथ देणारे अनेक भेटतात वाटेवर,
दुःखात हात धरणाऱ्यांनाच मनात कायमचं स्थान द्यायचं.
क्षणभंगुर आहे हा सुंदर प्रवास आयुष्याचा,
म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने, समाधानाने आणि हसतमुखाने जगायचा.
कारण...
आनंद वाटला की तो अनेकपटींनी वाढतो,
दुःख वाटलं की मन हलकं होतं.
माणुसकीनी नाती जपली की,
आयुष्य खऱ्या अर्थाने फुलून येतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 14, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti