सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का??
June 23, 2019
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहण्याची सवय मनाला केवळ असून चालत नाही. शरीराला सुद्धा मनाची साथ द्यावी लागते. मी विजेता होणारच या पुस्तकाची शंभरावी आवृत्ती केवळ निघाली नाही तर अनेकांना यशाची पायवाट दाखवणारे उमेश कणकवलीकर यांनी अनेकांच्या जीवनात अमुलाग्रह बदलही केला आहे.
June 30, 2025
खते, बियाणे, मजूर अशा प्रत्येक बाबतीत शेतकऱ्याला अपंग करणाऱ्या सरकारनेच आता शेतकऱ्यांना आधार देऊन उभे केले पाहिजे, ही सरकारचीच जबाबदारी आहे. ‘मामा’ला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही. ‘मामा’ पूर्वीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे; त्याने कधी शेतकऱ्यांचा जीव घेतला नाही.
June 7, 2009
भारतीय समाजातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक बाब आहे. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण, आर्थिक स्वायत्तता, आणि सामाजिक जागरूकता या सर्वांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.
October 2, 2024
प्रकाशन दिनांक :- 11/01/2004
देशाची प्रगती (जर झाली असेलच तर) कुणामुळे झाली हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकेल; नव्हे तो वादाचाच मुद्दा आहे. परंतु प्रगतीची काही मोजकी क्षेत्रे वगळली तर इतर सर्व क्षेत्रात देशाची जी सर्वांगीण अधोगती झाली त्यासाठी मात्र भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहाच जबाबदार आहेत. हे केवळ आमचे मत नाही तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच तशी स्पष्ट कबुली दिली आहे.
January 11, 2004
पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी ‘ टेलिव्हिजन शाप की वरदान ‘ या विषयावर दहावीला निबंध असायचा. साठीला आलेल्या शिक्षकाकडे पेपर तपासायला गेला की टेलिव्हिजन वरदान नसुन शाप आहे , असे लिहिणार्या निबंधाला जास्त मार्कस पडायचे. तर विशीच्या नवीनच नोकरी लागलेल्या शिक्षकाकडे पेपर गेला तर टेलिव्हिजन शाप नसुन वरदान आहे , असे लिहिणार्या निबंधाला जास्त पडायचे. यात विद्यार्थीवर्गाची चांगलीच गोची व्हायची. हा धोका माझ्या वेळीच लक्षात आला आणि मी या विषयावर निबंध लिहायचे टाळुन ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ या विषयावर निबंध लिहिला. ( माझ्या बर्याच मित्रांनी या विषयात झीनत अमान विषयी लिहिले, पण हा निबंध झीनत अमानवर नसुन गांधीजींवर लिहायचा होता ) असो. हळुहळु टिव्हीमधेही अनेक बदल होत गेले,नवीन नवीन चैनल्स आले , चोवीस तास न्युज चैनल नावाच्या प्रकाराचा जन्म झाला . सुरुवातीला सातच्या बातम्या या प्रकाराला सरावलेल्या आम्ही चोवीस तास बातम्या काय दाखवणार ? याची चर्चा करायचो. हळुहळु या सर्व चर्चा मागे पडल्या आणि न्युज चैनल या प्रकाराने आपला पाय टिव्हीविश्वात भक्कमपणे रोवला .
पुर्वीच्या काळी चैनल्सची सुरुवात ही सकाळी सव्वापाचला होत असे. आजकाल ही सगळी न्युज चैनल चोवीस तास . त्यामुळे चैनलची सुरुवात म्हणजे आपली झोपेतुन उठण्याची वेळ असे आपण ठरवावे. सर्व न्युज चैनलची सुरुवात ही भक्तीरसाने होते . वेगवेगळे महाराज , ज्यांची नावेपण आपण कधी ऐकली नसतात , ती या चैनल्सवर ब्रम्ह , जीवन किंवा अध्यात्मिक प्रतीरोध अशा अत्यंत दुर्बोध विषयावर बोलत असतात . समोर प्रेक्षकगण माना डोलावत असतात . त्यांचे एकसुरी निरुपण ऐकुन आपल्याला झोप येते . त्यामुळे हे कार्यक्रम कदाचित रात्रपाळी करुन आल्यावर लोकांना शांत झोप येण्यासाठी लावत असावेत , अशी एक शंका माझ्या मनात आली. काही चैनल्सवर योगासने चालु असतात . ती मात्र आपण फक्त बघायची असतात . त्याप्रमाणे आपण करायला गेल्यास आपले हातपाय विचित्र अवस्थेमधे अडकुन बसतात , हा माझा स्वानुभव आहे.अत्यंत धोकादायक स्टंट्स केल्यावर ” हे स्टंट्स प्रोफेशनल लोकांनी सुरक्षिततेची सर्व साधने वापरुन केलेले आहेत , लोकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न करु नये ” अशी पट्टी खाली येते , तशी पट्टी योगाच्या कार्यक्रमात दाखवायला हवी असे माझे मत आहे.
या सर्व न्युज चैनलवर बघण्यासारखी कोणती गोष्ट असते , तर ती त्यावरील निवेदिका. या मात्र अत्यंत सुंदर असतात. त्यांचा मेकप अत्यंत व्यवस्थित असतो. मात्र बातम्या सांगताना त्यांच्या चेहेर्यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव नसतात. कुणाला पुरस्कार मिळाल्याची बातमी जितक्या निर्विकारपणे त्या सांगतात , त्याच निर्विकारपणे कुणाचे निधन झाल्याचीपण सांगतात . आदला जन्म संताचा घेतल्यानंतर कदाचित पुढल्या जन्मी त्या निवेदिका बनत असाव्यात . संतांच्या वागण्यात निर्विकारपणा असायचा , यांच्या चेहेर्यात असतो. सहा महिन्यापुर्वीच एकदा एका नविन चालु होणार्या न्युज चैनलच्या निवेदिकेसाठी जाहिरात आली , ती अशी
” अडिचशे कोटी टर्नओव्हर असणारा क्ष ग्रुप न्युज चैनलच्या व्यवसायात पदार्पण करीत आहे . या नवीन चालु होणार्या न्युज चैनलसाठी निवेदिका हव्यात . वय वर्षे वींस ते पंचवीस. दिसायला सुंदर हव्यात . भाषेचे उत्तम ज्ञान हवे. संपर्क करा . “ पुढे एक मोबाइल नंबर दिला होता . आता विचार करा , ही जाहिरात “ मिस इंडीया स्पर्धेसाठी स्पर्धक हवेत “, यासाठीपण चालली असती. जागतिक घडामोडींचे चांगले ज्ञान हवे, अशी त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती .
आजकाल कुठल्याच न्युज या नुसत्या न्युज नसतात , तर त्या ब्रेकींग न्युज असतात. कुठलीही न्युज घ्या , ब्रेकींग न्युज . आता ही ब्रेकींग न्युज म्हणजे काय ? हा प्रश्न मी माझ्या न्युज चैनलमधे काम करणार्या मित्राला विचारला . तेव्हा त्याने ” हार्ट ब्रेक करणारी न्युज म्हणजे ब्रेकींग न्युज” असे उत्तर दिले. मराठीत त्याला ” आतडे पिळवटुन टाकणारी बातमी “असे म्हणतात , हेही त्याने मला सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी ”मुंबईच्या आयएएस अधिकार्याचा कुत्रा गेस्ट्रोने आजारी , रुग्णालयात दाखल , ” अशी ब्रेकींग न्युज ऐकुन आतडे खरोखर पिळवटुन निघाले.
या चैनल्सवर काही नेत्यांच्या सतत मुलाखती चालत असतात . हा मात्र खरोखर विनोदी प्रकार असतो . उदाहरणार्थ , एका न्युज चैनलवर य या नेत्याची मुलाखत चालु आहे . हे चैनल स्वतःला सर्वोतम असे म्हणवुन घेते.
निवेदक - आज आपल्या या वाहिनीवर राज्याचे तरुण तडफदार नेते मिस्टर य आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या या अत्यंत बिझी शेड्युलमधुन त्यांनी ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलला दिली आहे. पुन्हा एकदा, ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलवर आहे. कारण आम्ही सर्वोत्तम आहोत.
( साहेबांवर कैमेरा ) सर , राज्याच्या सद्यपरिस्थितीबद्दल आपले मत काय ?
य - सरकार बदल केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. ( मिस्टर य हे विरोधी पक्षात आहेत हे आपल्या लक्षात आले असेलच )
निवेदक - पण सर , यापुर्वी पाच वर्षे आपण सत्तेत होतात ?
य - त्या काळात एकही दंगल झाली नाही .
निवेदक - दंगल करणारे लोकच सत्तेत होते , म्हणुन झाली नाही असे सगळे म्हणतात ?
य - कोण म्हणतो असे ? स्साला हराम - ( आपण टीव्हीवर आहोत हे लगेच जाणवुन ) म्हणजे हे चुक आहे .
निवेदक - राज्याचा विकासपण झाला नाही ?
य - हे चुक आहे , माझे कार्यकर्ते पुर्वी सायकलवर फिरायचे. आजकाल ते टाटा सफारीत फिरतात . आमचे कार्यकर्ते हे सामान्य लोक आहेत . सामान्य लोक सायकलवरुन टाटा सफारीत आले तर तुम्हा लोकांना वाईट का वाटते ? म्हणजे विकास झाला .
निवेदक - तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो ?
य - आम्ही खासदार आहोत , हे खरे आहे . मात्र आमदारपद आम्ही घराणी वेगळी असणार्या आमच्या जावयांना दिली आहेत, त्यामुळे आम्ही घराणे शाही करतो , हा आरोप खोटा आहे …..आम्ही एकाच घराण्यात पदे वाटत नाही .
ही मुलाखत अशीच चालु रहाते. अर्धा तास संपल्यावर एकदाची मुलाखत संपते, आणि तरुण तडफदार नेत्याला शुभेच्छा देउन निवेदक एकदाचा आपला निरोप घेतो. या मुलाखतीतुन आपल्या हाती काहीच लागत नाही. नेत्यांचे चेहेरे बदलतात, वाक्ये मात्र तीच रहातात.
तरीही शेवटी ही चैनल्स आपण का बघतो ? हा प्रश्न उरतोच . त्याचे उत्तर म्हणजे , हल्ली आपल्यालाही असेच आवडते . दिखाउपणा आवडतो , कुठल्याही गोष्टीच्या खोलात जायला आवडत नाही . त्यामुळे दोष शेवटी आपणावरच येतो .त्यामुळे चैनलवाल्यांची सध्या चलती आहे . ’ पिकते ते विकते ‘, या जुन्या म्हणीपेक्षा ‘ जे विकते ते लोक पिकवतात ‘ हेच खरे ! शेवटी काय , तर कालाय तस्मै नमः !
-- निखिल नारायण मुदगलकर
February 24, 2016
आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?
August 18, 2019
आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात विशेष खबरदारी घेतली. शरद पवारांसारखा अतिकुशल रणनीतीकार आघाडीकडे होता. जनमानसाची नाडी अचूक ओळखण्याचे त्यांचे कसब शेवटी युतीला भारी पडले.
October 25, 2009
दारिद्र्य रेषा’ हा सरकारी भाषेतील एक नेहमी ऐकू येणारा शब्द. या रेषेचे काही निकष आहेत. हे निकष साधारणत: उत्पन्नाच्या संदर्भात असतात.
November 6, 2005
हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे. मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते. मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. १-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते. तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन ’पाणी साधे का बिसलेरी’ असे विचारतो. दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो.
मग बराच वेळ ताटकळत ठेऊन, ८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", शितपेये ई. गोष्टी येतात. या सर्व गोष्टी आल्यावर, हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही, पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो. सहाजिकच स्टार्टर्स ची क्वांटीटी कमी असल्याने, जेमेतेमे एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो...पण आम्ही एकदम मस्त मुडमधे !
मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटर कडे आपण आशाळभुतासारखे पाहून थोडासा अवधी मागुन घेतो. कोणी व्हेज, कोणी नॉन व्हेज असे ठरत ठरत आपण शेवटी, वेटर नी ’सजेस्ट’ केलेले पदार्थ ऑर्डर करतो. त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेश मधे राहीलेले स्टार्टर्स चे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस ई. पदार्थांचे सेवन, सो कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते. तो पर्यंत आजुबाजुला असलेल्या एखाद्या ग्रुप मधे जोरदार हाश्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो. त्यातच एखादे अगम्य "म्युझीक" ’बॅग्राउंडला’ लावलेले असते. थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतय, पण ए.सी. तर चालू असतो. मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला’ सांगतो, तो ’वाढवल्यासारखे’ करून निघून जातो, थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही. मग खूपच गर्दी आहेना, ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्स च्या वाटणीच्या मागे लागतो.
काही चांगल्या, काही अपेक्षाभंगीत, काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मुड मधे जेवण सुरू करतो. मग सुरूवातीला काही विनोद, मग एस.एम.एस, मग ’नेबर्स’ बद्द्ल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्कींग प्रॉब्लेम... इ इ इ विषय ’डिस्कस’ करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणी वातट रोटी अजून शिल्लक आहे. मग ती रोटी कशीबशी संपवून न-वाफाळणारा ’स्टीम राईस’ समोर येतो. आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल’ सांगीतली जाते जी डाल, राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा कींवा दह्या बरोबर ढकलला जातो.
लगेच फिंगर ’बोल’ ची आज्ञा सुटते आणी नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बोल येतात. कसे तरी बुचकळून हात ’साफ’ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो कॉल्ड ’डेझर्ट’ आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.
एका पापडाचे १० -१५ रू; एका रोटीचे १५-२० रू; एका सुपचे ७५-८० रू; एका भाजीचे ८० -१०० रु; नॉन व्हेज डीश चे प्रत्येकि २००-४०० रू: व जर मत्स्याहार केला असेल तर तर एका डीश चे ६००-८०० रू; असे एकुण १८०० ते २२०० रू. चे बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो. मग त्या बिलाचा राग म्हणा कींवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा, पण आपण सुगंधीत बडीशोप, चवळ्या मटक्या व टूथपिक, भरभरून घेतो. बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्या सारखा, आपण १०-२० रू. टिप ठेवतो आणि बाहेर पडतो. मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत’ करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.
जरा विचार करा की आपण खालेल्या पदार्थांचे मुल्यांकन पटण्यासारखे असते ? कितपत स्वादिष्ट व आरामदायक होते ते जेवण ? किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ? हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी, जेमेतेमे २०-२५ मिनीटांच्या गप्पा, आणी निम्याहुन अधिक खिसा रिकामा.
मला हे अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठीकाणी नसेल सुध्दा पण बहुसंख्य ठीकाणी आहेच. त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरतो ? का नेहमी स्वत:चीच समजुत घालत बसतो ?
आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे पण म्हणून असे पैसे उडवायचे
त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ करून आणून घराच्या हॉल मधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा ?
तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितितरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर जेमतेम निम्मा होतो. बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते....
"रिलॅक्सेशन" हे कारण असते हॉटेलिंग करण्यामागे, पण मलातरी वाटत नाही की प्रत्येक वेळेस ते साध्य होते !
-- वसंत चरमळ
फेसबुक वॉलवरुन
January 26, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti