वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.
अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल ? त्यांना आवडेल का? मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…!
सर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.
Read Online on Deshonnati: http://deshonnati.digitaledition.in/c/4074440
April 25, 2016
आयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात.
April 17, 2022
अ-जपा जपाबद्दलची माहिती क्वचितच कांही लोकांना असेल. ‘हे मोठे रहस्य आहे’
December 30, 2011
वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते ।
श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके
पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
वीणानादनिमीलितार्धनयने - वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली.
शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा आपण सुखसंवेदना प्राप्त करतो त्यावेळी त्याचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी आपले डोळे आपोआप मिटले जातात.
कानावर येणारे अप्रतिम संगीत असो जिभेवर ठेवलेला रसपूर्ण पदार्थ. अत्तराचा गंध असो की गालावर फिरणाऱ्या मोरपिसाचा स्पर्श. कोणताही आनंद घेताना डोळे आपोआप मिटले जातात. पूर्ण आनंद घेण्याची ती स्वाभाविक प्रक्रिया असते. आई जगदंबा वीणा वादनाचा असा परिपूर्ण आनंद घेत आहे.
विस्रस्तचूलीभरे- केश समूह विखुरलेली. वीणा वादनाच्या तल्लीनतेत मानेला सतत झटके दिल्याने तिची वेणी विस्कटली आहे. केस विखुरलेले आहेत.
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते- तांबूल भक्षण केल्याने आई जगदंबेचे ओष्ठ पल्लव लालबुंद झाले आहेत. कानाच्या आनंदासाठी वीणा तर रसनेच्या आनंदासाठी आई तांबूल भक्षण करते. ताटङ्कहारान्विते- ताटंक म्हणजे बाजूबंद. हार म्हणजे मोत्याच्या माळा. यांना धारण करून सुंदर दिसणारी.
श्यामे- सावळ्या वर्णाची. शरीरशास्त्राच्या दृष्टीने अति गोरेपण आयोग्य आहे. त्यात सूर्यकिरणांनी प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक रंग कणांचा अभाव असल्याने, भारतीय संस्कृतीत सावळा वर्ण खऱ्या सौंदर्याचे प्रतीक मानलेला आहे. चन्द्रकलावतंसकलिते- मस्तकावर आभूषण रूपात चंद्रकोर धारण करणारी.
कस्तूरिकाफालिके- भांगे मध्ये कस्तुरी भरणारी.
पूर्णे- स्वतःचाच ठाई परिपूर्ण असणारी. पूर्णकलाभिरामवदने- पौर्णिमेचा पूर्ण चंद्राप्रमाणे मुखकमल असणाऱ्या,
मां पाहि मीनाम्बिके- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 31, 2020
स्वामी चिदानंद आणि अम्मा या काळाने आमच्या पदरात टाकलेल्या विभूती आहेत. त्यांच्या सान्निध्यात सगळं सार्थक होतं. पण अम्मा “भेटतात”, कुशीत घेतात-मातृरूपाने ! विश्वभर त्या Hugging Saint म्हणून प्रसिद्ध आहेत.
September 27, 2021
कोकण हा महाराष्ट्रातील अत्यंत रमणीय सदाहरित अरण्याचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. या प्रदेशात आंबा, फणस काजू यासारखे बहुगुणी फळे आहेत. पण ह्या फळामध्ये गेली एक दोन दशके दुर्लक्षित राहिलेले बहुगुणी औषधी फळ आहे. त्याचो आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव कोकम किंवा रातांबा आहे. उन्हाळ्यात कोकणात आंबा, फणस व काजू सारखी अतिरथी महारथी फळे बाजारात मिळत असल्यामुळे याच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. परंतु जसजशी त्याच्या औषधी उपयोगाबद्दल माहिती उजेडात येऊ लागली तशी त्याला बरीच मागणी वाढली आहे व ह्या फळ झाडाचे नशीब सध्या जोरावर आहे.
कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव Garcinia indica आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत केली जाते. यांच्या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे हा द्विदल वर्गातील असूनसुद्धा याच्या पानांमध्ये समांतर शिरा असतात.
कोकमचे झाड हे सदाहरित अरण्यामध्ये, नदीकिनारी व खूप पावसाच्या ठिकाणी चांगले वाढतात. ह्याची क्वचित ठिकाणी शेती केली जाते. बहुतांश ठिकाणी ही झाडे घराभोवती व शेताच्या बांधावर लावली जातात. बाकीच्या ठिकाणी हि नैसर्गिक रीत्या जंगलामध्ये वाढतात. ह्याला खास पाण्याची सोय व कीटकनाशकाची फवारणी करावयास लागत नाही.
जगात ह्याच्या जवळ जवळ एकूण २०० प्रजाती आहेत पैकी भारतात १७ प्रजाती आहेत. या १७ भारतीय प्रजाती पैकी ७ प्रजाती ह्या पश्चिम घाटावर आढळतात व बाकी अंदमान निकोबार बेटावर आढळतात. सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील कोकम फळाच्या व्हरायटीस भौगोलिक संकेत (Geographical Indications, GI टॅग) मिळाले आहेत.
रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण छोट्या अशोकाची वाढतात तशी. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते मात्र त्यामध्ये ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी झाडे निपजतात. ह्याची पाने लांबट असतात, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पातळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट, आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी चवीला आंबटसर असतात. हे झाड ज्या वेळेस पूर्ण वाढते त्या वेळी ते पिरॅमिड सारखे दिसते.
फुले पांढरी, लहान झुबक्यामध्ये असतात. याचे फळ संत्र्याच्या आकाराचे व नारिंगी रंगाचे, रसदार असते. फळ पूर्ण पिकल्यावर त्यात पाच ते सात बिया असतात व त्यांचे वजन फळाच्या २०-२५ टक्के एवढे असते व मगजाचे प्रमाण साधारण ४५% असते. बिया ह्या ऍसिडिक लगद्यात दाबून बसलेल्या असतात. ह्या झाडास साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.
सुधारीत जातीः
• कोकण अमृताः डॉ. बा.सा.कोंकण कृषी विद्यापीठाने (दापोली) ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १४० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळयापूर्वी पिकतात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
• कोकण हातीसः डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठाने (दापोली) ही दुसरी मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १५० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठया आकाराच्या फळामुळे या जातीची मागणी जास्त आहे.
लागवड आणि निगा:
• लागवडीसाठी मे महिन्यात ६x६ मीटर अंतरावर ६०x६०x६० सेमी आकाराचे खड्डे काढावेत आणि पावसाळयापुर्वी चांगली माती, १ घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्पेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून सरंक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम २ टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्डयात टाकावी आणि पावसाच्या सुरूवातीला प्रत्येक खड्डयात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.
• विषेशतः कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार दयावा. आधार देवून सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते.
• कोकमामध्ये फळधारणा ५ व्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.
उपयोग :
• अ. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म :
कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.
उपयोग
० चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
० कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
० कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क (काढा) बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
० कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोथींबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
० अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
० अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
० पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
० हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
० हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.
० हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
० रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
० कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
० कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
० शंभर ग्राम कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
० मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
ब. औषधी गुणधर्म:
१. कोकुमच्या बियांमध्ये २३-२६ टक्के तेल असते. तेलाचे प्रमाण वाढवायचे असेल तर बिया ५-६ दिवस राखेत ठेवतात त्यामुळे तेलाचे प्रमाण ४०% होते असा अनुभव आहे. बिया वाळवून उकडून उकळत्या पाण्यात टाकतात. त्यामुळे बियांतील तेल तरंगून वर येते. थंड झाल्यावर त्याचा गोळा बनतो. तो साठवून ठेवतात. .त्याचा उपयोग चॉकोलेट व कन्फेकशनरीत करतात.
२. थंड झाल्यावर त्याचा गोळा बनतो. हे बटर तेल टाचेच्या भेगांवर व मुरुमांवर रामबाण उपाय आहे.
३. तेलाचा उपयोग त्वचा निरोगी व तजेलदार राखण्यासाठी होतो.
४. याच्या फळांच्या सालीत Hydroxycitric acid (Hca ) हा घटक असतो. नवीन संशोधनानुसार याचा उपयोग वजन कमी करण्यास होतो. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या उतिसंवर्धन विभागात यावर बरेच संशोधन झाले आहे. सध्या पाश्चिमात्य देशात जवळ जवळ ५० टक्के लोक अति वजनाचे शिकार बनले आहेत. व तेथे हे Hca वापरून औषधी गोळ्या बनवतात व औषधी कंपन्या ते भरमसाठ किमतीत विकतात. त्यामुळे भारताला खूप परकीय चलन मिळते.
५. कोकम सरबत व आगळ बनवण्याचे छोटे उद्द्योग कोकणात खूप प्रमाणात आहेत व त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन मिळते.
क. स्वयंपाक घरातील उपयोग :
कोकमच्या फळाची गर काढलेली साल म्हणजे ओले आमसूल. ओले आमसूल साखरेत घालून ४-५ दिवस उन्हात ठेवतात व त्याचा रस म्हणजे कोकम सरबत.
गर काढलेली साल साखर न घालता रस केला कि तो आगळ या नावाने ओळखला जातो. साखर नसल्यामुळे तो मधुमेही व्यक्तींना उपयोगी असतो.
फळाची ओली साल सूर्यप्रकाशात पूर्ण व कडक वाळवली कि त्यास आमसूल म्हणतात. ह्याच्या चटणीस श्राद्धाच्या जेवणात मानाचे स्थान असते. आमसूल चिंचेच्या ऐवजी आमटीत घालतात. त्यात आंबटपणा कमी असतो. कोकमचा पल्प, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवतात.
कोकम सरबत व सोलकढी हि पेये सर्वाना आवडतात व त्याचा खप उन्हाळ्यामध्ये प्रचंड होतो. त्यामुळे परदेशी थंड पेयांचे मार्केट निम्म्यावर आले आहे व आपल्या देशाचे परकीय बाजारात जाणारे वाचत आहे.
-- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
July 22, 2021
भगवंताच्या विश्व मनोहर मुखकमलाचे वर्णन करीत असताना आचार्य श्री पुढे म्हणतात….
October 7, 2020
भारताचं अतिपूर्वेचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्याच्या सीमेपर्यंत रेल्वेनं जायचं म्हणजे ६० ते ६५ तासांच्या प्रवासाची मानसिक तयारी असावी लागते. हे अतिपूर्वेकडील सर्वांत मोठं राज्य. त्यातच हा चिनी सरहद्दीवरील संवेदनशील प्रदेश. दुर्दैवानं, या ठिकाणी अजूनही रेल्वेचा मागमूसही नाही, घनदाट जंगलांनी संपन्न असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील लाकडापासून रेल्वेच्या रुळांमधील स्लीपर्स बनविले जातात. किंबहुना, संपूर्ण भारताच्या रेल्वेलाईनची मदार एक वेळ त्यावर अवलंबून होती; सिमेंटचे स्लीपर्स हे आता आलेले आहेत. अशा या आसाममधील सर्वांत शेवटचं स्टेशन दिब्रुगड. इथून अरुणाचलमध्ये बस, मोटार वा नदीमधून मोटरबोटीने शिरावं लागतं. त्याकरता 'इनर लाईन परमिट' घ्यावं लागतं.
अरुणाचल प्रदेशाची संपूर्ण माहिती गोळा करत आम्ही आठ जणांनी रेल्वेनं दिब्रुगडपर्यंत जाण्याचं ठरविलं. हा प्रवास आरामात करायचा व जलद गाड्या पकडायच्या असंही ठरलं. मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते दिब्रुगड अशा दोन राजधानी एक्सप्रेसनी प्रवासनियोजन केलं. मुंबई-दिल्ली १७ तास, ६ तास दिल्ली स्टेशनवर थांबणं, असं करत दिल्ली ते दिब्रुगड ४० तास, असा हा एकूण प्रवास काळ ६३ तासांचा होता.
भारतात राजधानी एक्सप्रेसचं युग साधारण ३५ ते ४० वर्षांपूर्वी सुरू झालं. प्रथम मुंबई-दिल्ली व कलकत्ता-दिल्ली या दोन गाड्या सुरू झाल्या आणि हळूहळू प्रत्येक राज्याच्या राजधानीतून एक वा दोन गाड्या दिल्लीपर्यंत धावण्यास सुरुवात झाली. या गाड्या सुरू झाल्या तेव्हा त्याबाबत अनेक उलट-सुलट मतं पेपरमध्ये येत होती, पण आता राजधानी एक्सप्रेस गाड्या ह्या भारतीय रेल्वेवरील सर्वांत मानाच्या व कायम मागणी असलेल्या गाड्या आहेत. नवी दिल्ली स्टेशनमध्ये लालचुटूक व पिवळसर रंगाच्या डब्यांच्या गाड्यांची सतत ये-जा चालू असते. संपूर्ण वातानुकूलित (ए.सी.) गाडीला जनरेटर्स. चहा-नाश्ता, लज्जतदार जेवण यांचा समावेश तिकिटातच असल्यामुळे प्रत्येक प्रवासी हा आनंद मनसोक्त लुटत असतो. मुंबई-दिल्ली राजधानी ५०० ते ६०० कि.मी. अंतर न थांबता धावत असते. या मार्गावर आता जर्मनीत बांधलेले डबे आहेत. त्यांत काही सोयी जास्त आहेत, पण भारतात बांधलेले डबेच लोकांच्या जास्त पसंतीस येतात.
या गाडीचा पहिल्या वर्गाचा प्रवास म्हणजे जेवणा-खाण्याची चंगळच असते. घडीची टेबलं मांडून खाण्याच्या पदार्थांचा मारा रेल्वे कर्मचारी तत्परतेने व प्रेमाने करत असतात. झोपण्याचे बर्थ अगदी आलिशान आहेत. धांदलीत विमानाने प्रवास करण्यापेक्षा हा प्रवास सुखद अनुभवाचा आहे.
राजधानी एक्सप्रेसने दिल्ली ते दिब्रुगड प्रवास ४० तासांचा, दोन रात्रींचा!
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, अशी राज्ये ओलांडत जाताना प्रत्येक राज्याची विविधता पाहता येते. या गाडीतील प्रवासीसुद्धा वेगवेगळ्या ढंगांचे! त्यांच्या निरनिराळ्या भाषा प्रवासभर कानांवर पडत असतात. लखनौ, मुगलसराई, बरौनी, न्यु जलपईगुरी, गौहत्ती, अशा भव्य स्टेशनांवर तिला थांबे आहेत. गौहत्ती येण्याअगोदर विशाल ब्रह्मपुत्रेवरील १।। कि.मी. लांबीचा अतिभव्य -कम-मोटाररोड ब्रिज पाहून आपण अवाकच होतो. ब्रिजवरून जाताना गाडीच्या कानांत घुमणाऱ्या कर्कश आवाजाची लय, खोलवर दिसणारं नदीचं संथ पात्र, हे सर्व व्हिडिओमध्ये घेण्याकरता आम्ही दोघे मित्र एकमेकांना घट्ट पकडून दारात उभं राहून शूटिंग केलं होतं. तो एक अविस्मरणीयच अनुभव होता.
गौहत्ती ते दिब्रुगड हा संपूर्ण रात्रभराचा प्रवास. यावेळी गाडी अतिशय कमी वेगात जाते. हा संपूर्ण प्रदेश अशांत आहे आणि त्यात एकेरी मार्ग (सिंगल लाईन)! हा प्रवास करून पहाटे ५ वाजता न्युतीनसुखिया स्टेशनवरील एका छोट्या स्टॉलवरच्या गरम वाफाळलेल्या चहाची लज्जत औरच होती. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार भातशेती, मध्यात माशांच्या पैदाशीकरता तयार केलेली छोटी तळी, बांबूंवर उभारलेल्या छोट्या झोपड्या, मधून जाणाऱ्या लालचुटुक मातकट पाऊलवाटा, क्षितिजाला भिडलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, मध्येच भुरभुरणारा पाऊस, काही रस्त्यांच्या कडेनं झालेला चिखलाचा रबाडा. निसर्गाचं असं वेगळं, अविस्मरणीय दृश्य पाहत ३९०० कि.मी.चा प्रवास दिब्रुगडमध्ये पुरा झाला. हा प्रवास पूर्ण केला, की भारताच्या दुसऱ्या टोकाला पावलं लागल्याचा आनंद ओसंडून वाहतो. केवढा पसरलेला भारत आणि त्याच्या कानाकोपऱ्यांत पोहचणारी भारतीय रेल्वे! ६५ तासांच्या प्रवासाचा शिणवटा अजिबात जाणवत नाही. पावलं समाधानानं विशाल ब्रह्मपुत्रेच्या काठाकडे वळतात.
-डॉ. अविनाश वैद्य
June 25, 2022
सुभेदार रतन सिंग १० ऑगस्ट, २०१६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने मरण पावले. आमच्या प्रसारमाध्यमांनी बारीकशी बातमी दिली. साहजिकच आहे. वाचकांच्या मनात थोडीदेखील राष्ट्रीय भावना निर्माण होता कामा नये, असंच आपल्या माध्यमांचं अलिखित धोरण आहे. विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक खर्याा-खोट्या ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’ उभ्या करायच्या आणि लोकांचं चित्र त्यात गुंतवून ठेवायचं; ‘नॉन-इश्यूज’ ना ‘इश्यूज’ बनवायचं आणि खर्याय ‘इश्यूज’ पासून जनतेचं लक्ष दूर न्यायचं, हे खरं अलिखित धोरण आहे.
January 12, 2017
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही राष्ट्रीय सणांचं महत्त्व आणि गांभीर्यही आपण विसरत चाललो आहोत. शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना तर हे दोन्ही दिवस शिक्षेसारखे वाटतात. गेल्या २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक दिसले. त्यांना नमस्कार केला.
August 12, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti