वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
"आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!" असं सांगणाऱ्या करीता खास टीप....
सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ......
हे सर्व कशासाठी करताय ?
दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना.....
खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना.....
पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?
कशासाठी ? पोटासाठी !
एकच बदल करून पहा,
फक्त जेवणाची वेळ बदला...
आता असं करता येतं का बघा.
सकाळचा नाश्ता कॅन्सल.
नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.
दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.
सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.
( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)
दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.
सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.
दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.
दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.
बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.
सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं.... कावळ्यासारखं !
पथ्य एकच ....
खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.
बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि "रांधा वाढा उष्टी काढा" मधे खर्च होणारा वेळ वाचेल.
सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.
सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग.... थोडं मोकळे वाटेल.
स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,
फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल.... आणि बरंच काही...
मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.
नाहीतर......
डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच...
आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली...
वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.03.2017
March 6, 2017
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो. तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संतोष जळूकर
December 30, 2016
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ. त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या संशोधनाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
March 11, 2013
समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.
आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
June 10, 2017
दुसऱ्या महायुद्धात ज्या काही वीरांगना होऊन गेल्या त्यामध्ये एक महत्वाची होती ती म्हणजे वर्जिनिया हॉल.तिचा जन्म बाल्टिमोर येथे ६ एप्रिल १९०६ रोजी झाला.कोलंबिया विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. तीचे फ्रेंच,इटालीयन,जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.फेब्रुवारी १९४०च्या सुरवातीला तिने फ्रांस सैन्यामध्ये रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम केले.फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ती स्पेनला गेली.तिथे तिची ओळख ब्रिटीश गुप्तहेर,जॉर्ज बेलोस याच्याशी झाली. तो तिच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. वर्जिनिया हॉल-(SOE) मध्ये एप्रिल १९४१मध्ये दाखल झाली.
January 5, 2023
आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.
March 20, 2022
CRIC कथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.
November 21, 2022


शासनव्यवस्था कुठलीही असो, ती कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते किंवा त्या व्यवस्थेच्या सुचारूपणाला कोणताही एकच घटक जबाबदार नसतो. अगदी हुकुमशाही असली तरी हुकुमशहाला सैन्याची, मुलकी अधिकाऱ्यांची मदत घ्यावीच लागते. परस्परांशी संबंधित अशा अनेक घटकांनी मिळूनच कोणतीही शासन व्यवस्था प्रभावीपणे कार्य करू शकते, यशस्वी होऊ शकते. देशात किंवा राज्यात जेव्हा अराजकाची स्थिती निर्माण होते, तेव्हा दोष त्या व्यवस्थेचा, (मग ती कुठलीही असो) नसतो. त्या व्यवस्थेला संचालित करणाऱ्या एखाद्या प्रभावी घटकाला हानी पोचल्यामुळे, त्याचा सरळ परिणाम व्यवस्थेच्या संचालनावर होऊन अराजक निर्माण झालेले असते.
November 23, 2003
मन मनास उमगत नाही
इंद्रियातील सर्वात सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन. या मनाचा सहभाग पचनामधे महत्वाचा असतो. कशासाठी हे अन्न मी सेवणार ? असा विचार त्यावर चिंतन मनन केल्याशिवाय जेवू नये. यासाठी घास बत्तीस वेळा चावायचा. तेवढाच वेळ चिंतनाला मिळेल. लाळ चांगली मिसळेल पचन सुलभ होईल आणि महत्त्वाचे म्हणजे लक्ष जेवणातच राहील.
खाताना भीती बाळगू नये, आणि खाल्ल्यावर आठवू नये.
मी हे खाल्ले तर मला चालणार का ? मला अमुक पदार्थ पचेल का ? हे उष्ण आहे की थंड ? अशा शंका कुशंका मनात आणून खाल्ले तर हमखास त्रास होतो. आणि खाऊन झाल्यावर, "उगाच खाल्ले, त्यानेच त्रास झाला असणार ! असं आठवत खाल्लेल्या अन्नाला दूषणे दिली की पचन बिघडणारच !
रोग असेल तेव्हा पथ्य नाहीतर प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ तपासूनच खाल्ला पाहिजे असं नाही. आयुष्य कसं मस्त मजेत जगावं. संसारातल्या सर्व सुखांचा आस्वाद घ्यावा. पण त्यांच्या आहारी जावू नये, एवढी खबरदारी जरूर घ्यावी.
समर्थ म्हणतात,
संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका।
नेटका करीता, फिका होत जातो ।।
त्यातील आसक्ती सोडावी म्हणजे गुंतुन राहू नये, मायेत अडकू नये, हे मला पाहिजेच या नादात वर्तमानातला आनंद हरवू नये. नसलं तरी चालेल, असलं तर आनंदच आहे, ही मनोवृत्ती आपल्याला प्रयत्नांनी, विवेक वापरून तयार करता येते.
विशेषतः जेवताना मन प्रसन्न असलेच पाहिजे. तरच भावना आनंदाच्या तयार होतात, राग, असूया, मत्सर, द्वेष, भांडण, मनात ठेवून जेवलो तर मेंदूतले न्युरो ट्रान्समीटर बदलतात. आपल्याच मनातल्या भावना चांगल्या हव्यात असे नाही तर समोर सुद्धा चेहरा हसरा हवा. टीव्हीवर सुरू असलेली नकोत ती भांडणे, नको त्यांच्या अंत्ययात्रा, नकोत त्या विषयवासना चाळवणाऱ्या जाहीराती, आणि याच्या सगळ्या समोर आपण जेवणार ! कसं पचणार आणि कसं त्यातून चांगलं तयार होणार ?
आज पाश्चात्य जगतातील अशांती भारतात येऊन पोचली आहे. न्यूनगंडाने भरलेली पिढी अनेक दुसऱ्या रोगाना जन्माला घालत आहे.
'मला काय त्याचे, माझे घर तर जळत नाही ना, मग मी कशाला काळजी करू ? एवढे बेभरवंशी राहून चालणार नाही. ती आग स्वतःच्या घरात केव्हा भडकेल ते कळणार देखील नाही.
वेळीच सावध व्हायला हवे. पाश्चात्य जगतात ही अशांती कशी आली, यावर चिंतन व्हायला हवे. मनाचा तोल कसा सांभाळावा, याच्या नीतीनियमांची चौकट, भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आहे. वेदवाञ्ग्मय, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता, नाथांचे भागवत, तुकारामांची गाथा, आणि समर्थ रामदास स्वामींचे मनोबोध या सर्वांचा पुनः एकदा नव्याने अभ्यास व्हायला हवा. मनाचे श्लोक पुनः एकदा पाठांतराला घेतले पाहिजेत.
मनाच्या आजाराची चिकित्सा सूत्रे म्हणजे मनाचे श्लोक आहेत, हे जेव्हा जर्मन लोक आम्हाला सांगतील तेव्हा आम्हाला पटेल. नाहीतर आम्हाला 'रामदास स्वामी हा माणूस म्हणे आमच्या शिवरायांचा गुरू नव्हताच, यासारख्या बिनबुडाच्या भांडणात गुंतुन ठेवले जात आहे. वेळ जात नसलेली बिनडोक माणसे, नको ते वाद उकरून काढून, समाजमनाला कलुषित करून जातीय वादाचे भूत जागे करीत आहेत.
या सर्वांपासून सावध रहाणे, आपल्या मनाला सुरक्षित ठेवणे, काळाची गरज आहे.
" चला, चर्चा करूया मनाच्या आरोग्याची ! " असे, जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षीचे घोषवाक्य आहे. या निमित्ताने आपणच आपल्या मनाशी संवाद साधूया. आपल्या मनाशी संवाद साधायला आपले मन आपल्या जवळ तर हवे, कारण ते आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्याजवळ रहातच नाही. त्यामुळे ते आपल्यालाच उमगत नाही.
मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.04.2017
April 8, 2017
पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊर्ध्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थांप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात. साधारणतः पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात.
March 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti