(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ८

    शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी
    नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी ।
    तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी
    सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥

    आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी.
    चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या दोन्ही रूपात नटलेली.
    ज्योतिर्मयी- ज्योती अर्थात तेज स्वरूपिणी.
    वाङ्मयी- वाणी स्वरूप असलेली. मानवी विकासाचा महान बिंदू आहे वाणी. विचार तर पशूच्या मस्तकात देखील असतात. पण त्याचे सुयोग्य प्रगटीकरण केवळ बुद्धीमंताला करता येते. वाणी या स्वरूपात या विकासाचा श्रेष्ठबिंदू असणारी.
    नित्यानन्दमयी- अखंड आपल्याच आनंदात असणारी. निरञ्जनमयी- अंजन म्हणजे काजळी. मळ. घाण. याचा लवलेश देखील नसलेली. परम शुद्ध.
    तत्त्वंमयी - शास्त्रात परब्रह्मालाच तत्व असे म्हणतात. परब्रह्मस्वरूपिणी.
    चिन्मयी - चैतन्य अर्थात तेज, ज्ञान हेच जिचे स्वरूप आहे अशी.
    तत्त्वातीतमयी- शास्त्रात अन्न, प्राण आदी गोष्टींना देखील विवेचना पुरते ब्रह्म म्हणजे तत्व म्हटले जाते. अशा सर्व तत्त्वांच्या अतीत असणारी. परमतत्त्व स्वरूपिणी.
    परात्परमयी - पर म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या श्रेष्ठ गोष्टींमध्ये देखील परमश्रेष्ठ.
    मायामयी - विश्वाला संचालित करणाऱ्या माया रूपात लीला करणारी.
    श्रीमयी- श्री म्हणजे वैभव. शास्त्रामध्ये ऐश्वर्य, वीर्य,यश,श्री, ज्ञान आणि वैराग्य या सहागोष्टींना षडैश्वर्य असे म्हणतात. या सगळ्या रूपात लीला करणारी.
    सर्वैश्वर्यमयी- सर्व प्रकारच्या वैभवांनी युक्त .
    सदाशिवमयी - भगवान सदाशिव यांची सहधर्मचारिणी. अतीव पवित्र.
    मां पाहि मीनाम्बिके - हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
    जय श्री मीनाक्षी !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ११

    अयं दानकालस्त्वहं दानपात्रं
    भवानेव दाता त्वदन्यं न याचे |
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं
    कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖

    भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत.
    ते म्हणतात,
    अयं दानकाल:- हा दानाचा काळ आहे. कारण आत्ता मी आपल्यासमोर याचक स्वरूपात उभा आहे. मला आत्ता आपल्या कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणी मागणारा असेल, आणि त्याला ज्या वेळी आवश्यकता असेल तीच दानाची खरी वेळ. या हिशोबात ही दानाची वेळ आहे.
    त्वहं दानपात्रं- मी दानास पात्र आहे. दान नेहमी पात्र व्यक्तीलाच द्यावे. ज्याच्याजवळ एखादी गोष्ट नसते तो ती गोष्ट प्राप्त करण्यास पात्र आहे. हे भगवंता माझ्यावर आपली कृपा झालेली नाही. त्यामुळे मी कृपेला पात्र आहे.
    भवानेव दाता- आपण दाता आहात. आपल्याजवळ देण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दातृत्वाची भाव अर्थात देण्याची इच्छा देखील आहे.
    त्वदन्यं न याचे - आपल्या शिवाय अन्य कोणालाही मी मागत नाही.
    आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नंतर आपण मला कृपेचे दान देणार नाही तर कुणाला देणार?
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं- मला आपली स्थिर भक्तिप्रदान करा. भगवंताच्या चरणी नेमके काय मागायचे? हेच आचार्यश्री येथे सांगत आहेत. त्या चरणाशी व्यवहारातील सामान्य गोष्टी नव्हे तर भगवंताच्या भक्तीची मागणी हीच एकमेव योग्य मागणी आहे.
    कृपाशील - हे कृपाशील अर्थात कृपा हा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंता.
    शंभो - हे कल्याणकारका !
    आपण माझ्यावर अशी कृपा केली की,
    कृतार्थोऽस्मि तस्मात- त्यामुळे मी कृतार्थ होईल. मग माझ्या आयुष्यात करण्यासारखे काहीही उरणार नाही. माझे जीवन सफल होईल.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १

    कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं,
    नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् |
    नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां,
    त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१||

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी.
    बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते.
    या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती असणारी आई जगदंबा कदंब वृक्षाच्या वनामध्ये विचारण, भ्रमण करणारी. मुनिकदम्बकादंबिनीं- मुनी अर्थात ऋषीमुनी. कदंब शब्दाचा दुसरा अर्थ आहे समूह. तर कादंबिनी म्हणजे मेघमाला. ऋषीमुनींच्या समूहाला आपल्या कृपा वर्षावाने तृप्त करणारी मेघमाला.
    नितंबजितभूधरां- आपल्या नितंब प्रदेशाच्या गोलाई आणि पुष्टतेने पृथ्वीला जिंकणारी. सुरनितंबिनीसेविताम् - सुर म्हणजे देवता. त्यांच्या नितंबिनी अर्थात सुंदरींच्या द्वारे सेवा केली जात असणारी.
    नवंबुरुहलोचनाम् - नव अर्थात नवीनच उगवलेल्या, अंबुरूह म्हणजे कमळाप्रमाणे, लोचन म्हणजे नेत्र असणारी.
    अभिनवांबुदश्यामलां- अभिनव अर्थात नवीनच तयार झालेल्या, अंबु म्हणजे पाणी, अंबुद म्हणजे मेघ, श्यामल म्हणजे सावळी. नवीन तयार झालेल्या अर्थात पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे घन:श्याम असणारी.
    त्रिलोचनकुटुम्बिनीं- त्रिलोचन अर्थात ज्यांना तीन नेत्र आहेत असे म्हणजे भगवान श्रीशंकर. त्यांची कुटुंबिनी अर्थात सहधर्मचारिणी. त्यांच्यासह संपूर्ण ब्रह्मांडाची संचालिका, असणाऱ्या,
    त्रिपुरसुंदरीमाश्रये - श्री जगदंबा त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो. तिच्या चरणकमली शरण जातो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री वेंकटेश प्रपत्ती – मराठी अर्थासहित

    स्वामी प्रतिवादी भयंकरम् अण्णा रचित `श्री वेंकटेश प्रपत्ती’ आणि त्याचा मराठी अनुवाद…

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – २

    कदंबवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं,
    महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणींम् |
    दया विभव कारिणी विशदरोचनाचारिणी,
    त्रिलोचन कुटुम्बिनी त्रिपुर सुंदरी माश्रये ॥२||

    परांबा त्रिपुरसुंदरीच्या अलौकिक वैभवाला विशद करताना आचार्यश्री म्हणतात,
    कदंबवनवासिनीं- कदंब वृक्षाला स्वर्गीय वृक्ष, कल्पवृक्ष असे म्हणतात. अशा वृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी.
    कल्पवृक्षाच्या वनातच निवास केल्यावर कोणतीही इच्छा क्षणात पूर्ण होणार. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तर शास्त्र सांगते साहित्य संगीत आणि कलेमध्ये समय सत्कारणी लावावा. त्यानुसार, कनकवल्लकीधारिणीं- कनक अर्थात सोन्याची. वल्लकी अर्थात वीणा धारण करणारी.
    महार्हमणिहारिणीं- महार्ह अर्थात अत्यंत सुयोग्य. मणि म्हणजे रत्न. हारिणी अर्थात अशा रत्नांच्या माळा धारण करणारी. मुखसमुल्लसद्वारुणींम् - मुखामध्ये आनंदाने वारुणी धारण करणारी. वारूणी शब्दाचा आपल्याला केवळ एकच अर्थ माहिती असतो.
    वारुणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे मध मिश्रित पाणी.
    योगशास्त्रानुसार ब्रह्मरंघ्रामधून पाझरत असणाऱ्या अमृताला वारुणी असे म्हणतात. त्या दिव्यरसाने आत्मानंदात निमग्न.
    दया विभव कारिणी- शरणागत भक्तांवर दया करणारी आणि त्यांना वैभव प्रदान करणारी.
    विशदरोचनाचारिणी- विशद म्हणजे मोठ्या प्रमाणात, विशाल आकारात, रोचना म्हणजे कुंकुम धारण करणारी. भव्य तिलक धारिणी.
    त्रिलोचन कुटुम्बिनी- भगवान शंकरांची पत्नी .
    त्रिपुर सुंदरीमाश्रये- आई त्रिपुरसुंदरीला मी शरण जातो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १३

    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश |
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖

    काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो.
    वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते.
    अशीच काहीशी रचना या श्लोकात आचार्यश्री करतात. ते म्हणतात,
    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश - हे भगवान गिरिजापती ! मी कधीही कोणाचा लेशमात्र देखील द्रोह करू शकत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न व्हाल? हेच मला समजत नाही.
    वास्तविक कुणाचाही द्रोह न करणाऱ्यावरच भगवान प्रसन्न होणार. मात्र येथे आचार्यश्री उलट बोलत आहेत. इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात,
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा - तुम्ही प्रसन्न होता ते पण कोणावर? तर जे पत्नी कन्या किंवा पित्याशी द्रोह करतात.
    पत्नीशी बेईमानी करणारा रावण, कन्येचा अपमान करणारा दक्ष आणि वडिलांची इच्छा नाकारून तप करणारी पार्वती, यांना भगवान प्रसन्न झाले. अशा विविध कथा पुराणांमध्ये आपणास वाचावयास मिळतात.त्या पौराणिक कथांचा आचार्य संदर्भ घेतात. त्यांच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली होती.
    तुम्ही अशा द्रोहींना प्रसन्न होता. यात भगवंताची वरपांगी निंदा वाटते.
    मात्र त्यांना म्हणायचे आहे की अशा सगळ्यांवर, अशा अशास्त्रीय कृती करणाऱ्यांवर देखील आपण कृपा करता ,मग माझ्यासारख्या स्वच्छ व्यक्तीचा अव्हेर कसा कराल?
    यांच्या उद्धारात निंदा नाही तर त्यांचाही उद्धार करण्याइतके आपण उदार आहात अशी स्तुतीच आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • परमेश्वराचे अस्तित्व

    …. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ३

    कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
    कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
    मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||

    श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
    कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
    कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
    गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
    तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
    तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
    मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया - मधुर गीत गुणगुणत असणारी.
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया - घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
    अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १४

    स्तुतिं - हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे?
    ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे?
    अर्चां - आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे?
    यथावद्विधातुं - याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे?
    भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत,
    महेशावलंबे - हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे.
    अर्थात काहीही समजत नसूनदेखील मी आपल्या चरणी शरण आलो आहे. कारण या चरणांनी अनेकांना वाचवल्याचे मी वाचले आहे. जसे,
    त्रसंतं सुतं त्रातुमग्रे
    मृकंडो:- अल्पायुत्वाने त्रस्त झालेल्या, मृकंड ऋषींचे सुत ,महर्षी मार्कंडेय यांचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर झालेल्या,
    यमप्राणनिर्वापणं त्वत्पदाब्जम् - यमराजां पासून प्राण वाचवणार्‍या आपल्या चरणकमलांना, मी शरण येत आहे.
    मृकंड ऋषींना संतती नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. तुझा पुत्र, अल्पायु पण ज्ञानी किंवा दीर्घायू पण मूर्ख होईल असे दोन पर्याय श्रीशंकरांनी त्यांच्यासमोर ठेवले. ऋषींनी पहिला पर्याय निवडला. त्या आशीर्वादाने झालेल्या मार्कंडेय ऋषींनी सप्तर्षी आणि श्रीब्रह्मदेवांच्या कृपाप्रसादाने महामृत्युंजय मंत्र प्राप्त केला. पुढे त्यांनी केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या मृत्यू समयी , प्रसन्न झालेल्या भगवान श्रीशंकरांनी, नियतीच्या नियमाप्रमाणे मार्कंडेय ऋषींचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजांपासून आपल्या या अल्पायुषी भक्ताचे प्राण वाचवून त्यांना चिरंजीव पद दिले. अशी कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. या कथेचा संदर्भ घेत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शरणागतीची कारण मीमांसा करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड