वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ८॥
या विश्वाची उत्पत्ती आई जगदंबे पासून होते हे सांगितल्यानंतर, ज्यावेळी हे विश्व दृशमान असते त्यावेळी आई जगदंबेचे स्थान नेमके काय? हे स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी ही रचना साकारली आहे.
आई जगदंबे च्या विश्व जननी स्वरूपानंतर विश्वाधिष्ठान स्वरूपाबद्दल बोलताना आचार्यश्री म्हणतात,
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
एखाद्या धाग्यात ओवलेले मणी जसे माळेत असावेत, तसे संपूर्ण चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरलेले आहे अशी.
येथे दिलेला माळेचा दृष्टांत मोठा रमणीय आहे. जसे माळेतील सर्व मणी एका अंतर्गत सूत्राने बांधलेले असतात, तसे या संपूर्ण विश्वाला बांधणारे आणि संचालित करणारे सूत्र म्हणजे आई जगदंबा.
बाहेरून माळ पाहतांना केवळ मणीच दिसतात. आतला धागा दिसत नाही. मात्र असे असले तरी आत तोच धागा आहे म्हणूनच माळ ही माळ आहे. तो धागा नसता तर सर्वत्र विखुरले पण राहिले असते. त्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये जी एक निश्चित नियमानुसार असणारी सुसूत्रता दिसते ती आई जगदंबेची शक्ती आहे. तिचे दिसणे महत्त्वाचे नाहीतर असणे महत्त्वाचे आहे.
एक लहानशी गोष्ट लक्षात घेऊ. या दृष्टांतात धागा आत असतो पण येथे आचार्यश्री म्हणतात ही चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरले आहे. ती आत आहे म्हणायच्या ऐवजी विश्व तिच्यात आहे असे म्हटले आहे. अर्थात विश्वापेक्षा व्यापक आणि श्रेष्ठ आहे, हे सांगण्याची ही किती सुंदर पद्धती आहे.
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां- त्या अध्यात्मज्ञानरूपी पदवीने प्राप्त होणाऱ्या
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि
व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका ।
कल्याणीं तां कल्पलतामानतिभाजां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ९॥
या जगाच्या अंतर्गत प्रवाहित मूलशक्ती स्वरूपात विश्वसंचालन करणाऱ्या आई जगदंबेच्या लीलेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि
व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका ।
विविध आकार धारण करून या विश्वाची केंद्रीभूत असणारी ही आई जगदंबा संपूर्ण विश्वाला व्यापून मुक्तपणे स्वतःच्या इच्छेनुसार एकटीच क्रीडा करीत असते.
भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचे हे वचन ऐकल्यानंतर आदिशक्तीचा महानतम ग्रंथ असणाऱ्या सप्तशती ची आठवण होते. तेथे दशम अध्यायात हा विषय आलेला आहे.
शुंभ आणि निशुंभ यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी आई जगदंबेने आपल्या अनेक रूपांना प्रकट केले. ज्या देवतेचे जसजसे स्वरूप आहे तशा तशा स्वरूपात त्यांची शक्ती प्रगट झाली. अशा त्या सगळ्या शक्तीकडे पाहून शुंभ आदिशक्तीला म्हणतो की तू इतरांच्या भरवशावर पराक्रम करतेस. यावेळी आदीशक्ती आपल्या सर्व रुपांना आपल्यात सामावते आणि त्याला म्हणते येथे मी एकटीच आहे. दुसरे आहेच कोण?
येथे आचार्यश्री नेमकी तीच भूमिका सांगत आहेत. या संपूर्ण विश्वातील चराचर सृष्टीत एकटी जगदंबाच सामावलेली आहे. सर्व रूपात ती एकटीच लीला करीत आहे.
कल्याणीं तां- संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या त्या, कल्पलतामानतिभाजां- आ म्हणजे पूर्णपणे, नत म्हणजे शरणागत, भाज म्हणजे कृपेला पात्र असलेल्या, उपासकांच्या साठी कल्पलतेप्रमाणे सकल सुख प्रदान करणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमला प्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
मानव जन्म पूर्व प्रारब्धाने प्राप्त होतो.जन्म घेतानाच त्याची कुंडली तयार असते. त्याच्या आयुष्य तीन प्रकारच्या संबंधाने बांधलेले असतात.
आशापाशक्लेशविनाशं विदधानां
पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् ।
ईशामीशार्धाङ्गहरां तामभिरामां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १०॥
भगवंताचे, भगवतीचे सगळ्यात मोठे वैभव म्हणजे भक्तवत्सलत्व. आपल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणे हे जणू देवतांचे सर्वाधिक प्रिय कार्य. आई जगदंबेच्या या शरणागतवत्सल स्वरूपाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
आशापाशक्लेशविनाशं विदधानां
पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् ।
पादांभोज म्हणजे चरणकमलांचे, ध्यान करण्यात परायण असणाऱ्या पुरुष म्हणजे जीवांच्या आशारूपी पाशाचा विनाशक करणारी.
भगवंताच्या चरणी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याच्याही पलीकडे जात आचार्यश्री म्हणतात, आई जगदंबेची कृपा झाली की भक्तांना कोणत्या आशाच उरत नाही.
आशा हा माणसाला पडलेला असा अजब पाश आहे की ज्याने जखडलेला धावत राहतो आणि यातून सुटलेला शांत बसून राहतो.
आई जगदंबेच्या चरणकमलांचे ध्यान करणारे जे भक्त असतात, त्यांचे असे आशा पाश जगदंबा खंडित करते. हे पाश गेले की त्यांना सुख शांती प्राप्त होते. आई त्यांना मुक्ती प्रदान करते.
ईशामीशा- ईश म्हणजे स्वामी. संपूर्ण विश्वाचे स्वामी भगवान शंकर. त्यामुळे त्यांना ईश असे म्हणतात. त्या ईशांची देखील ईशा. अर्थात त्यांचीही स्वामिनी. त्यांच्यावरही जिची सत्ता चालते अशी.
अर्धाङ्गहरां- त्यांच्या अर्ध्या अंगाला अर्थात अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या,
तामभिरामां- त्या आत्यंतिक आकर्षक असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या आई जगदंबा गौरीचे मी स्मरण करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे.
प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना-
द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः ।
वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥
या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
प्रातःकाले - या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे.
भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव ठेवून पठन करावे. तो शुद्ध भाव आपण उठल्या उठल्या अधिक प्रबल असतो.
त्यामुळेच सर्व व्रतवैकल्ये, प्रार्थना प्रभातकाली करण्यास सांगितलेल्या आहेत.
प्रणिधानाद्- परिपूर्ण तन्मय होऊन. अर्थात मनामध्ये आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार नसतांना.
भक्त्या- परिपूर्ण भक्तीने युक्त अशा अवस्थेत.
नित्यं जल्पति गौरिदशकं यः - जो या गौरी दशकं स्तोत्राचे नित्य पठण करतो,
त्याला काय काय प्राप्त होते हे सांगताना उत्तरार्धामध्ये आचार्यश्री म्हणतात,
वाचां सिद्धिं- मनात येणारा प्रत्येक संकल्प मनातल्या मनात बोलल्याबरोबर देखील परिपूर्ण करणारी दिव्यशक्ती.
व्यवहारात देखील जे बोलेल ते पूर्ण होण्याची शक्ती.
सम्पदमग्र्यां- अग्र म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती. अध्यात्मशास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना षट्संपत्ती असे म्हणतात. आई जगदंबेच्या कृपेने ही संपत्ती साधकाला प्राप्त होते.
शिवभक्तिं- भगवंताची परमभक्ती. शुद्ध मंगल भक्ती.
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति- पर्वतपुत्री अर्थात आई जगदंबा गौरी त्याला अवश्य प्रदान करते.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
कुचांचितविपंचिकां कुटिलकुंतलालंकृतां ,
कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् |
मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं ,
मतंगमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥५||
पूज्यपाद आचार्यश्रींची प्रतिभा इतकी अलौकिक आहे की ते सहज बोलत जातात आणि अलंकार आपोआप प्रगट होतात. आता याच श्लोकात पहा, प्रथम दोन्ही चरणाच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी क आणि पुढील दोन चरणांच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी म अक्षराने किती सुंदर अनुप्रास साधला आहे?
कुचांचितविपंचिकां- मंडळाच्या मध्यभागी जिने वीणेचा दांडा धरलेला आहे अशी. अर्थात पूर्ण हृदयापासून आणि भक्तांच्या हृदयाला पूर्ण आकर्षित करणारे संगीत ज्यातून निर्माण होत आहे अशी. कुटिलकुंतलालंकृतां - कुटिल म्हणजे कुरळे किंवा गोल गोल गुंडाळलेले आपले केस जिने अत्यंत सुंदर रीतीने अलंकृत केली आहेत अशी.
कुशेशयनिवासिनीं- कुशेशय म्हणजे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. कुटिलचित्तविद्वेषिणीम् - ज्यांचे चित्त कुटील असते अशा दुष्टांचा द्वेष अर्थात राग करणारी. त्या धर्मभ्रष्टांचा विनाश करणारी.
मदारुणविलोचनां- मधु प्राशनाने नेत्र लाल झालेली. मनसिजारिसंमोहिनीं - मनसिज अर्थात मनातून जन्माला येणारा म्हणजे कामदेव मदन. त्याचे अरी म्हणजे शत्रू ते भगवान शंकर. त्यांना संमोहित करणारी.
देवी पार्वती स्वरूपात तपस्यारत असणाऱ्या भगवान शंकरांच्या मनात देखील प्रेमाचा अंकुर जागृत करणारी.
मतंगमुनिकन्यकां- मतंग ऋषींच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली. मधुरभाषिणीमाश्रये- मधूर भाषण असणाऱ्या श्री त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖
भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
भग्नोऽस्मि - मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
खिन्नोऽस्मि चाहम् - मी खिन्न आलो आहे.
आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
अर्थात असे असले तरी,
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
प्रभो रक्ष मां त्वम् - हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां,
गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम् |
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६||
आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक.
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली.
प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे.
रक्ताचा निळा रंग वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतो.
पहिली गोष्ट म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्या तर निळसर रंगाच्या दिसतात.
दुसरी गोष्ट जेव्हा रक्तात प्राणवायूचे प्रमाण कमी होते त्यावेळी त्याचा रंग निळसर होतो.
याच कारणाने फुफ्फुसापासून हृदयापर्यंत प्राणवायू युक्त रक्त नेणाऱ्या नलिकेला धमणी असे म्हणतात तर हृदयापासून फुफ्फुसा पर्यंत प्राणवायूक्षीण रक्ताला नेणाऱ्या रक्तवाहिनीला नीला असेच म्हणतात.
शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायू पुरवल्यामुळे या रक्तातील प्राणवायू कमी झालेला असतो.
अशा नीलवर्णीय रक्ताप्रमाणे रंग असणारे वस्त्र जिने धारण केलेली आहेत अशी.
पूज्य आचार्यश्रींचे दर्शन किती सूक्ष्म आहे ? याचा विचार करावा.
गृहीतमधुपात्रिकां- जिने आपल्या रसग्रहणासाठी हाती मधाचे पात्र धारण केले आहे अशी. मधुविघूर्णनेत्रांचलाम् - मधू प्राशन केल्याने जडावलेले नेत्र असणारी.
घनस्तनभरोन्नतां- उन्नत आणि भरगच्च स्तनमंडल असणारी. गलितचूलिकां- आपल्याच आनंदात मान हलवल्याने वेणी,गजरा गळून पडलेली
श्यामलां- सावळ्या,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये - भगवान शंकरांची सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र
क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते |
किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖
ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या कोणावर ही कृपादृष्टी प्राप्त होते. त्याला,
क्षणं - क्षणात म्हणजे तत्काल. अल्पावधीतच,
क्ष्मा च - पृथ्वी अर्थात पृथ्वीचे साम्राज्य आणि
लक्ष्मीः - अर्थात सर्व प्रकारचे वैभव.
स्वयं तं वृणाते - स्वत:च वरते. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्याकडे आपोआपच चालत येतात. कोणत्याही प्रयासाशिवाय त्याला प्राप्त होतात.
त्या देखील कशा? तर-
किरीट- मुकुट अर्थात शिरोभूषण,
स्फुरच्चामर- लखलखीत रत्नजडित सोन्याच्या दांडीने युक्त चवऱ्या, त्यांनी वारा घालणाऱ्या दासी, अर्थात अनेक प्रकारचे सेवेकरी,
छत्र- मस्तकावरील छत्र. सर्व प्रकारच्या तापापासून, त्रासापासून मुक्ती,
माला- मोत्याच्या माळा, सौंदर्य आणि शीतलता,
कलाची- बाहुभूषणे.
गजक्षौमभूषा- आभूषणांनी सुसज्जित असणारे , अंबारीयुक्त असे हत्ती.
विशेषैः - या सगळ्या विशेष आभूषणांसह.
अर्थात राजवैभवाशी संबंधित सगळ्याच लहान सहान गोष्टी देखील त्याला सहज प्राप्त होतात. परिपूर्ण वैभवाने युक्त असे स्वानंद साम्राज्य त्याला प्राप्त होते. आतला आनंद प्राप्त होतो.
बाहेरून आता त्याला काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti