(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • पोषण कुणाचे आणि कशाचे?

    2020 पर्यंत भारताला जगातील एक महाशक्ती म्हणून उभे करण्याचे स्वप्न आम्ही बघत आहोत. स्वप्न पाहण्याच्या बाबतीत आमचा हात कुणी धरू शकत नाही. साध्या नाल्यांची, गटारांची व्यवस्था धड नाही, तरीही आम्ही मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न पाहतोच की नाही?

  • मालवून टाक दीप

    परवा खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. शृंगार रस सुद्धा इतका विभोर करणारा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे गाणं. किती हळुवार प्रेमाचे एकएक पदर उलगडत जातात ह्या गाण्यात. लताबाईंचा आवाज आणि हृदयनाथांचे स्वर्गीय संगीत केवळ वर्णनातीत. शृंगार रसाचे हे गाणे आपण अगदी चार चौघात बसून ऐकू शकतो. मी तर हे गाणे माझ्या मुलीबरोबर पण ऐकले आहे. आम्ही बोललो आहे ह्या गाण्यावर. कधीच लाज नाही वाटली ह्या वर बोलतांना.

    हल्ली सगळेच खुल्लमखुल्ला जगण्याचे पुरस्कर्ते झाले आहेत. त्यात काय एवढं? म्हणत हि पिढी आपल्यालाच नाकं मुरडते. पण प्रेम खरच चार लोकांना दाखवण्यासाठी आहे का हो? का चार लोकात करण्यासाठी? अगदी दुसऱ्याच्या भानगडीत आपण कशाला नाक खुपसा म्हंटल तरी मग चार लोकात नसते उद्योग करू नका ना, असं म्हणायची वेळ येते. आमच्या घराच्या मागे नदी आहे, नदी पलीकडे एक छान रस्ता आहे, दुपारी कधीतरी चुकून त्या रस्त्यावर गेलं तर खरंच सांगते तुम्हीच लाजाल इतके प्रेमाचे थेरं चालतात तिथे. थेरच... ते प्रेम नाहीच मुळी. घरा मागेच नदी असल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला जरा टेंशन असतं पाण्याची पातळी वाढली की. मग काय पाण्याची पातळी किती झाली हे पाहण्यासाठी आम्ही दोघे गेलो त्या रस्त्यावर, दोन मिनिटंसुद्धा तिकडे उभे राहता आले नाही. 'कामातुराणां न भयं न लज्जा'. भर रस्त्यावर, अगदी दिवसा-ढवळ्या मिठ्या काय, चुंबन काय आणि काय काय? मला खरंच असं झालं की दोन मिनिटं थांबून त्या प्रेमवीरांना विचारावे, काय करताय बाबांनो? शिकता ? प्रेम म्हणजे काय हे तरी कळतंय का? असे किती दिवस एकमेकांना ओळखता? आणि तुमच्या प्रेमाची ओळख पटायला काय केलंत तुम्ही? का तुम्हला असा एकटा रस्ता निवडावासा वाटला? का एखाद्या कॅफेत गेल्यावर जे परिवार बरोबर येतात त्यांना तिथे बसवत सुद्धा नाही? इतकी कसली घाई आहे तुम्हाला ? प्रेम म्हणजे फक्त असे स्पर्श? बाकी काहीच नाही ? तो स्पर्श सुद्धा इतका वासनेने बरबटलेला? त्या स्पर्शाची सगळी गम्मतच घालवूं बसलात रे तुम्ही, असं ओरडून सांगावस वाटत होतं, पण ह्यातलं काहीच न बोलता आम्ही दोघेही मान खाली घालून तिथून माघारी फिरलो.

    पण डोकं शांत बसे ना. असं वाटलं काय करून आपण ह्या नव्या पिढीशी संवाद साधू शकू? मग लक्षात आलं हा संवाद फक्त नव्या पिढीशीच नाही तर अगदी माझ्या वयाच्या पिढीशी पण तेवढाच गरजेचा आहे. आमच्या पिढीतही हे अनेक प्रकाराने दिसून येतं, विवाह बाह्य संबंध ह्याचेच परिणाम आहेत. आम्ही जसे मोठे होतं गेलो त्यावेळी आमच्या आई-वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, जी गोष्ट करतांना तुम्हाला चार-चौघात सांगायची लाज वाटेल, भीती वाटेल, आमच्या समोर आमच्या नजरेत नजर मिळवून तुम्ही त्या गोष्टीची चर्चा करू शकणार नाही ती गोष्ट नक्कीच वाईट/चुकीची असणार.

    मला सिनेमा बघायला फारच आवडतं. पण सिनेमा बघतांना सुद्धा आपली विवेक बुद्धी जागृत असावी असा माझा अट्टाहास आहे. हल्लीच प्रदर्शित झालेला मुंबई पुणे मुंबई २ बघतांना मला जाणवलं का हा सिनेमा प्री मॅरेज कॉन्सेलिंग साठी एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. नातं हळू हळू उलगडण्यात जी मजा आहे , ती ओरबाडून घेतलेल्या क्षणिक स्पर्शात नक्कीच नाही. ओरबाडून घेतलेल्या म्हणतेय मी कारण अगदी दोघेही समजदार असले आणि समजून घडलेलं असलं तरी ते ओरबाडलेलं एवढ्या साठी की वेळेची गरज नव्हती, ती फक्त शरीराची गरज होती. आणि प्रेम शरीराच्या फार वर आहे.

    स्पर्श किती हिम्मत देतो आपल्या जगण्याला. अगदी मायेने ओथंबलेला आईचा स्पर्श, शाबासकी म्हणून बाबांची पाठीवर थाप, भावा बहिणींचा एकमेकांना होणार मारामारीच्या वेळेचा स्पर्श, मित्रत्वाने भरलेला आश्वासक स्पर्श, बाळाचा आईला होणार गोड स्पर्श आणिकही कितीतरी. प्रत्येक स्पर्श भावानेच परिमाण घेऊन येतात आणि आपलं नातं अणिकच घट्ट विणत जातात. मग ह्या स्पर्शातले बदल आपली नवी पिढी समजू शकली नाही, की आपण पालक म्हणून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकलो नाही, हा प्रश्न उरतोच.

    प्रियकर-प्रियसी, पती-पत्नी ह्या नात्यातले काही स्पर्श तर फार फार सुंदर असतात. प्रेमाची ग्वाही देणारे असतात. त्या स्पर्शात केवढी तरी ताकद असते, येणारे कितीतरी कठीण क्षण पचवण्याची, नात्यात आलेले चढ-उतार सहज पार करण्याची. त्या पहिल्या स्पर्शाच्या आठवणी किती तरल असतात, त्यात एकाच वेळी किती तरी भावना दडलेल्या असतात, ही स्पर्शची एकरूपता आपल्या अध्यात्मातल्या समाधी इतकी खोल आहे. त्याचा असा बाजार मांडून काय मिळणार?

    "काय हा तुझा श्वास, दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग"

    आपल्या बोलण्याने, जे फक्त आपल्या दोघांचेच आहे, ज्याची दखल त्या चांदण्यांनी सुद्धा घेता कामा नये, इतकं हे पर्सनल आहे. इतकं हे त्या दोघांचेच आहे. मी नवीन पिढीला दोष देण्या आधी पालक म्हणून स्वतःला तपासून बघते. आम्ही आमच्या पुढच्या पिढी पर्यंत ह्या स्पर्शाची ताकद पोचवू शकण्यात कुठेतरी कमी पडलो म्हणून आमची मुलं तो स्पर्श आणि त्याचे न समजलेले अर्थ घेऊन वाहवत जातांना दिसतात.

    मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

    © सोनाली तेलंग
    २४/०७/२०१८

  • खंडोबाची थोडी माहिती

    " आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी " ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेउ...

    जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने , खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते . येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी , खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते , सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव . ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला .

    हे झालं तळी भंडार .

    आत्ता खंडोबा विषयी थोडेसे ,

    खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला , वीरशैव पंथातील दैवत . कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा . लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणार्या पत्नी ला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.

    पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला . तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले , खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो , ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत , पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.

    खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी . खंडेराया ला बेल - दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे .
    दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे.

    खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि "मला तुझा वाहन होऊ दे" आणि मल्लाने विनवणी केली "तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे" त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला , आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो "मल्हारी" ठरला .

    खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय . म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे . ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे , ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता . कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर .

    खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे . एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत , त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी , पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी .
    खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते , त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच "जागरण-गोंधळ " ह्या लोक-कलेचा उगम झाला . सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे .

    लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात,, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते .

    मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम "खंड" म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा .

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.

  • वजन कमी करताना तुम्ही या चुका टाळा

    वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न सतत करीतच असते. काही लोक दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण जो उपाय समोरच्या व्यक्तीला लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो तोच आपल्यालाही लागू पडेल असे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे.

  • सैनिकांची मावशी: अनुराधाताई

    “मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.

  • नैवेद्य का दाखवावा ??

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

    गणपतीचा नैवेद्य ठरलेला.

    मोदक. मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे.

    आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे.

    बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो.

    जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर.
    हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते.

    चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ?
    नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती.

    टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता।
    आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता.
    भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.

    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार......

    फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ?
    घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती.

    गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला
    नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते.

    नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

  • श्री भ्रमरांबाष्टकम् – २

    कस्तूरीतिलकाञ्चितेन्दुविलसत्प्रोद्भासिफालस्थलींकर्पूरद्रवमिश्रचूर्णखदिरामोदोल्ल सद्वीटिकाम्।
    लोलापाङ्गतरङ्गितैरधिकृपासारैर्नतानन्दिनीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।२।।

    आई ललितांबेच्या मुख कमलाचे सौंदर्य वर्णन करताना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    कस्तूरीतिलकाञ्चित- कस्तुरी मिश्रित तिलकाद्वारे विलोभनीय असणारे.

    सोळा शृंगारात शेवटचा शृंगार आहे तिलक धारण. त्या तिलका मधील सर्वश्रेष्ठ तिलक कस्तुरीचा. त्याचे वर्णन, अर्थात परिपूर्ण शृंगार केलेली.

    इन्दुविलसत्- इंदू म्हणजे चंद्राप्रमाणे, विलसत् म्हणजे सुंदर दिसणारे. मुखकमल.

    प्रोद्भासि- चमकदार असणारी

    फालस्थलीं- भांग पाडलेली जागा. केसांमध्ये भांग पाडतांना जेथे ते दोन भागात विभागल्या जातात त्या स्थानाला फालस्थली म्हणतात.

    कर्पूरद्रव म्हणजे कापूर.मिश्रचूर्ण त्याचे चूर्ण ज्या मध्ये मिसळले आहे असे.

    विडा अर्थात पान तयार करताना त्यामध्ये भीमसेनी कापराचे चूर्ण घातले जाते. त्याचा येथे संदर्भ आहे.

    खदिर- म्हणजे खैर. त्या झाडापासून काथ निर्माण करतात. येथे विड्याचा संबंध असल्याने खैर शब्दात काथ अपेक्षित आहे.

    आमोदोल्लसद्- त्याचा सुगंध दरवळणारे,

    विटिकाम्- पान, विडा.

    आई जगदंबेच्या अत्यंत आवडत्या नैवेद्या मध्ये विडा सम्मिलित आहे. यांनी आईचे मुख, लालबुंद, रसपूर्ण आणि सुगंधी झाले आहे.

    लोलापाङ्ग- हलणाऱ्या डोळ्याच्या कडा,

    तरङ्गितै:- त्यांचा तरंगांनी

    अधिकृपासारै:- वर्षाव करीत असणाऱ्या कृपेच्या द्वारे.

    नतानन्दिनीं - विनम्र असणाऱ्यांना आनंद देणारी. अर्थात भक्तांना परिपूर्ण आनंद प्रदान करणारी.

    श्रीशैलस्थलवासिनीं- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या, भगवतीं श्रीमातरं- देवी श्री भ्रमराम्बेला भावये- मी ध्यातो. मी अखंड तिचे ध्यान करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • व्वारे सरकार तेरा न्याय!

    ह्ा देश प्रजासत्ताक आहे, याचा अर्थ देशावर कुण्या एका व्यत्त*ीचे नव्हे तर देशातील संपूर्ण जनतेचे राज्य आहे. या देशाची मालक सामान्य जनता आहे. याचा एक अर्थ असाही आहे की सरकारची म्हणून जी तिजोरी आहे ती सरकारची किंवा मंत्रिमंडळाची नसून त्या तिजोरीवर कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे.

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – १

    आई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत.

  • प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे?

    अजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी पक्षी तडफडून मारतील. हरीयाणातून येणार्या कालव्याच्या पाण्याची वाटेतच वाफ होईल. दोन्ही राज्यात पाण्यासाठी भांडणे व पाणी कपात सुरु होईल. पाण्याच्या टेंकर समोर रांगा लागतील. पाण्यासाठी माऱ्यामाऱ्या होतील. काहींचा जीव हि जाईल. एप्रिल मध्ये हि परिस्थिती आहे तर मे जून मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना करवत नाही. असे चालणार नाही, मनात येईल तसे वागणार्या सूर्यदेवाला जाब विचारायलाच पाहिजे.