वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विषाणूंमुळे होणाऱ्या नागीण या रोगाविषयी समाजात अनेक गैरसमज प्रचलित ाहेत. एका बाजूने सुरू झालेले पुरळ शरीराभोवती संपूर्णपणे दुसऱ्या बाजूपर्यंत पसरून त्याची दोन्ही तोंडे एकमेकांना मिळाली तर आजाराचे स्वरूप गंभीर होते, असा एक गैरसमज आहे; परंतु यात अजिबात तथ्य नाही. चेतासंस्थेला विषाणूंची बाधा होत असल्याकारणाने हा रोग साहजिकच चेतासंस्थेच्या अनुषंगाने वाढत जातो.
June 29, 2023
आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत.
January 8, 2020
कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
July 5, 2020
एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्या पानाच्या टपरीसमोर बर्यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण सिगारेट ओढून झाल्यावर आपल्या उंच टाचेच्या सॅन्डल खाली सिगारेट विजविण्याची कला पाहिल्यावर तर मी स्वतः ही आवाक होतो. एक तरूणी सिगारेट ओढतेय आणि एखादा तरूण लायटरने तिचे सिगारेट पेटवतोय हे चित्रपटात शोभणार दृष्यही हल्ली उगडया डोळ्यांनी पाहताना डोळे अक्षरशः तृप्त होतात खेदाने. आपल्या देशात कॅन्सर रुग्णांच प्रमाण वाढत असतानाही सिगारेट ओढणार्या अधुनिक तरुणी पाहिल्या की मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. चारचौघात आपल्या वडिलधार्यांसमोर सिगारेट ओढताना काही पुरुषांनाही संकोच वाटतो तिथे आजच्या तरुणी चार सिगारेट न ओढणार्या परुषांच्या मधे उभ राहून ऐटीत सिगारेट ओढताना हल्ली सर्रास दिसतात. भर रस्त्यात आरामात सिगारेट ओढणार्या हया तरूणी काही कोणी अशिक्षित तरूणी नसतात त्या असंस्कृत असतील असे ही खात्रीने सांगता येणार नाही. पण बहुदा हया तरुणी नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबापासून दूर राहणार्या असतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी त्या सिगारेट ओढत असाव्यात हे पटण्याजोगे नाही. फक्त एकच प्रश्न पडतो आपल्या देशाचं भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे त्या पिढीला घडविणारी जन्माला घालणारी स्त्रियांची पिढी या पिढीच्या हातात खरंच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे का ?
सिगारेट ओढण्याचे दुषपरिणाम माहित झाल्यावर आपली आई सिगारेट ओढणारी असावी असे कोणत्याही बाळाला वाटणार नाही. तो तर गर्भात असतानाच म्ह्णेल कदाचित अशी आई नको गं बाई ! आमच्या लहानपणी आमच्यावर झोपडपट्टीत राहात असतानाही सिगारेट ओढणे ही वाईट गोष्ट आहे हे आमच्या अशिक्षित आईने आंम्हाला समजावले होते. तिच्या हातात जोपर्यंत होते तिने आमच्यावर कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्याचेच संस्कार केले होते. पण आजची आईच जर व्यसनाधीन असेल तर ती आपल्या मुलांवर काय खाक संस्कार करणार ? पूर्वीच्या स्त्रियांची पुरूषांच्या बरोबरीने कोणतीच व्यसन करण्याची हिंमतच नव्हती. आज स्त्री - पुरुष समानतेमुळे स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने व्यसनही करू लागल्या आहेत. पुरूषांच्या व्यसनाधीनतेचा परिणाम फक्त कुटुंबावर होतो पण स्त्रियांच्या व्यसनाधिनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होतो. अधुनिकता फक्त स्त्रियांच्या अधिकारा पुरती मर्यादित होती तोपर्यंत सारे ठिक होते पण आता स्त्रियांना इतर व्यसनांबरोबर सर्वच बाबतीत पुरुषांची बरोबरी करण्याच एक नवीन व्यसन जडू लागलं आहे जे फारच भयंकर आहे याचे फार भयंकर परिणाम आपल्या देशाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. आजच्या तरूणी उच्चशिक्षित आहेत, पुरुषांच्या तोडीच्या आहेत, सारं जग त्यांनी पादाक्रांतही केलेले आहे, पण आता त्या एक चांगली आई होण्याची क्षमता कदाचित गमावून बसल्यात की काय अशी शंका मनात निर्माण होऊ लागली आहे... स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करण्यात काहीच वावगे नाही पण व्यसनांच्या बाबतीत स्त्रायांनी पुरूषांची बरोबरी करण्याचा मोह टाळायला हवा. फक्त सिगारेट ओढल्यामुळे स्त्रिया असंस्कृत असभ्य अथवा व्यभिचारी ठरत नाही पण जी गोष्ट चुकीच आहे ती गोष्ट स्त्रियां करता आहेत म्ह्णून त्याचे समर्थन नाही ना करता येणार. आजच्या अधुनिक स्त्रियांनीही शक्यतो सिगारेटच्याच नव्हे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून शक्यतो दूरच राहायला हवे. पुरुष कितीही अधुनिक असला तरी त्याला व्यसनी मैत्रिण अथवा प्रेयसी आवडतही असेल पण व्यसनी पत्नी मात्र शक्यतो त्याला नकोच असते हे सत्य बदलणार नाही. व्यसनाने मानसिक ताण कमी होण्याऐवजी हल्ली तो अधिक वाढून काही लोक आत्महत्या करण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत पोहचताना दिसत आहेत. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करता आपल्या देशाला व्यसनी आईची नाही तर निर्व्यसनी आईची जास्त गरज आहे ती गरज आजच्या प्रत्येक तरुणीने ओळखून व्यसनाधिन तरूणींनी आत्मपरिक्षण करायला हवे नाही का ?
लेखक – निलेश बामणे
202, ओमकार, जलधारा एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित, गणेश मंदिरा समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई - 400 065. मो. 8652065375
June 30, 2016
बेचाळीस वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीस व तिने मला लिहिलेली काही पत्रे परवा कपाट आवरताना अचानक पणे सापडली. जुनी झाल्यामुळे पिवळी पडलेली पत्रे …..
August 26, 2014
झांझीबार आहेही तसेच, अगदी मस्त! पण अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवतेतले प्रचंड मोठे आव्हान ध्यानात येत आहे. झांझीबार पर्यटन विकास क्षेत्रात सर्वच ‘आलबेल’ नव्हते. एक खटकणारी गोष्ट म्हणजे विकास कार्यात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्यांना शिरकाव प्राप्त झाला नाही.
January 11, 2025
आमचं सू सेंटर हे छोटं गाव, आयोवा राज्याच्या अगदी वायव्य (north west) कोपर्यात येतं. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्याची हद्द सुरू होते. थोडं वेगळ्या दिशेने उत्तरेला गेलं की मिनेसोटा राज्याची हद्द सुरू होते आणि नैऋत्य दिशेला (southwest) गेलं की तासा दीड तासानी नेब्रास्का राज्याचा काही भाग लागतो. ही सगळी राज्यं तशी भरपूर मोठी आहेत आणि सारीच शेती प्रधान! बहुतेक वस्ती ही छोट्या गावांतून किंवा अगदी छोट्या गावकुसांतून! सू सेंटरहून सव्वा तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्यातलं सू फॉल्स (Sioux Falls) नावाचं दीड दोन लाख लोकवस्तीचं मोठं शहर आहे. साउथ डकोटा, आयोवा, मिनेसोटा आणि नेब्रास्का या चारही राज्यांच्या सीमेलगतचं असं हे सर्वात मोठं शहर. त्यामुळे दोन तीन तासांच्या अंतरावरूनही लोकं ड्राइव्ह करून सू फॉल्सला शॉपिंग करायला येतात.
या सू फॉल्समधे नऊ दहा वर्षांपूर्वी बर्यापैकी भारतीय वस्ती होती. साधारणपणे पन्नास सत्तर भारतीय कुटुंबे असावीत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वगैरे निमित्ताने या भारतीय मंडळींनी एकत्र यावं, यात काही नवल नव्हतं. आसपासच्या छोटया गावांत, चुकून माकून येऊन एकाकी पडलेल्या आमच्यासारख्या थोडयाफार भारतीयांना तर असे पन्नास शंभर भारतीय चेहरे एकत्र पाहूनच भरून यायचं. हळू हळू थोडयाफार ओळखी होऊ लागल्या होत्या. त्यातूनच सू फॉल्समधेच राहणारं गुर्जर नावाचं एक महाराष्ट्रीयन मुंबईकर कुटुंब आमच्या चांगलं ओळखीचं झालं होतं. एकमेकांकडे जाणं येणं सुरू झालं होतं.
अशाच एका भेटीमधे थॅंक्सगिव्हींगच्या सेलचा विषय निघाला होता. आम्ही आमची उत्सुकता दर्शवली आणि गुर्जरांनी आम्हाला आदल्या दिवशीच त्यांच्याकडे येऊन राहायचा प्रस्ताव दिला. पहाटे सहा वाजता, दुकाने उघडण्याच्या आधी, आमच्या सू सेंटरहून नोव्हेंबरच्या कडक थंडीमधे दीड तास ड्राईव्ह करून येण्याच्या कल्पनेने आम्ही आधीच गारठलेले होतो. त्यामुळे आदल्या रात्रीच सू फॉल्सला येऊन गुर्जरांच्या घरी मुक्काम ठोकायचा, ही कल्पना फारच भन्नाट होती. श्रीयुत गुर्जरांना स्वत:ला, पहाटे उठून थंडीत कुडकुडत शॉपिंगला जायचा उत्साह नव्हता. पण सौ. अनुपमा गुर्जर आणि त्यांची अकरा बारा वर्षाची मुलगी रश्मी मात्र एका पायावर तयार होत्या. त्यामुळे रात्रीचा मुक्काम आणि अनुपमाचे अनुभवी मार्गदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा लाभ अचानक पदरात पडला. आंधळ्याने एकाही डोळ्याची अपेक्षा केली नव्हती आणि देवाने अचानक दोन्ही डोळे दिले होते.
आम्ही थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता गुर्जरांच्या घरी पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन स्थिरस्थावर होताच अनुपमाने वर्तमानपत्रांचा गठ्ठा पुढयात टाकला. नशीब आम्ही DVD – VCR player घ्यायचं आधीच ठरवलं होतं. नाहीतर वर्तमानपत्रांमधल्या त्या जाहिराती आणि विविध स्टोअर्सचे fliers पाहून आम्ही चक्रावूनच गेलो असतो.
– डॉ. संजीव चौबळ
March 24, 2016
बरेचजण दैनदिन जीवनात मुखवटे धारण करतात किंवा त्यांना करावे लागतात. अश्याच मुखवटे व चेहेर्यांचे कथन.
September 13, 2011
जीवनात प्राधान्यक्रम चुकला की आयुष्य जसे भरकटतं तसंच अभ्यासक्रमाचं झालंय.अभ्यासक्रमातील अनेक बाबी अनावश्यक व अवजड असल्यामुळे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रम कमी केला गेला. काहीजणांच्या मते वगळलेले भाग आवश्यक होते अशी ओरड झाली.
June 4, 2024
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेला हा लेख
'मनसा चिंतितम् एकं दैवं अन्यत्र चिंतयेत' असं संस्कृतात एक वचन आहे. आपल्या मायमराठीत एक कवन आहे, त्या कवनात स्वच्छ अशी शाहिरी भाषा आहे.
'मनात येती हत्ती घोडे, पालखीत बैसावे, ।
देवाजीच्या मनात आले, पायी चालवावे ।।
मर्जी देवाची...
एकूण देवाची मर्जी म्हणून निःश्वास टाकावा.
आपल्या आयुष्यात हे असं नेहमीच घडत असतं. मनातलं सगळं प्रत्यक्षात घडेलच असं नाही. अपेक्षित घडणं यालाही नशीब लागतं आणि अनपेक्षित पण चांगलं (म्हणजे-मनासारखं) घडणं यालापण नशीबच लागतं. नशीब, दैव इत्यादि शब्द आले की आपण खुशाल त्यावर दैववादी असा शिक्का मारून मोकळे होतो. खरंतर तसं काही नसतं. निखळ बुद्धिवाद हा चांगलं-वाईट, भलंबुरं याच्या पलिकडे असतो. आपण सामान्यजन मध्येच कुठेतरी घोटाळणं. पाऊल स्वतःची वाटचाल विसरणं. असं का होतं? सांगता येत नाही. हे घडतं येवढं मात्र खरं!
आयुष्याचा धांडोळा घेताना अशा काही जागा आढळतात की वाटतं 'हे टाळता आलं असतं' थोडा विचार केला की मग कळतं की 'हे अटळ होतं.' शेवटी असं गाठोडं घेऊनच वाटचाल करावी लागते. यालाच प्रारब्ध, प्राक्तन म्हणावं लागतं. प्राक्तनाचं हे ओझं वाहणं म्हणजे जगणं. उगीच जगण्याला जीवन वगैरे म्हणून त्याचं उदात्तीकरण नको. सिधंसाधं जगणं असावं. मी तर असाच सिधासाधा जगलो.
आज मितीला वयाच्या ८० या वर्षात पाऊल ठेवलं आहे. ऐंशी वर्षे म्हणजे तसे दीर्घायुष्यच. (पूर्ण नऊ महिने नऊ दिवस न भरता सातव्या महिन्यातच जन्मास आलो येवढी घाई जिवाला झालेली! आठव्या महिन्यात जन्मतो तर.... जाऊ द्या.) एकूण दीर्घायुष्य लाभलं हे प्राक्तन ! नकळत्या वयाचं सोडलं तर कळत्या वयापासून विचार करू लागलो की जाणवतं. ते इतकंच आपण अत्यंत सुमार बुद्धीचे आहोत. मॅट्रिक जेमतेम पास. गुणवत्ता पस्तीस चाळीस टक्क्याच्या आसपास. एकवेळ नाही चक्क दोनवेळा बी.ए. परीक्षेत नापास. शाळेत गणित विषयात नि कॉलेजात इंग्रजी विषयात बोंबाबोंब. एकूण सुमार कर्तृत्व. (कर्तृत्व नाहीच. घडले, घडत गेले) एक मात्र खरे की शालेय जीवनापासूनच मला लेखक, कवी वगैरे व्हावसं वाटायचं. का? ते सांगता येणार नाही. अगदी आठवीत असतानाच मी एक कथा लिहिली नि ती चक्क शाळेच्या हस्तलिखित मुखपत्रातून गुरुजींनी प्रसिद्ध केली. मी लेखक असल्याचं शिक्कामोर्तब झालं. आमच्या शाळेत 'वर्गवाचनालय' नावाची एक योजना राबविली जायची. त्यातून पुस्तकं मिळत. खांडेकर, फडके, अत्रे, सानेगुरुजी, यशवंत, माधव ज्युलियन, गिरीश वगैरे नावे अभ्यासक्रमीय पुस्तकातून परिचयाची झाली होतीच.
वाचनालयातील लहान मुलांसाठी ची पुस्तके आणि अभ्यासातील पुस्तके यांचा मेळ जमून आला. वाचायचा नि लिहायचा नाद वाढत गेला. इतर वर्गमित्र मैदानावर खेळत असायचे मी वर्गात वाचत बसायचो. माझे मुख्याध्यापक कृष्णाजी कल्याणकर मला 'पेन्शनर' म्हणायचे. वर्गमित्र ही चिडवायचे. मी मॅट्रीक मध्ये असतानाच माझा एक निबंध 'विज्ञान: शाप की वरदान' हा परभणीच्या 'समर्थ' नावाच्या छापील मासिकातून प्रसिद्ध झाला. आपले छापील नाव पाहताना जो आनंद झाला, तीच कदाचित माझी लेखकीय ऊर्जा असावी. दरम्यान नागपूरच्या 'मुलांचे मासिक' मधून 'शाळा' नावाची कविताही छापून आली. एकूण शालेयजीवनातच माझ्या 'लेखकीय जीवनाची' पेरणी झाली.
मॅट्रिकनंतर मी हैदराबादी पुढील शिक्षणासाठी गेलो. नि मराठी, संस्कृत, भारतीय तत्त्वज्ञान असे विषय घेऊन बी.ए -ची परीक्षा देत गेलो. माध्यम इंग्रजी. इंग्रजांनी देशाला छळले नसेल तेवढे इंग्रजी विषयाने मला छळले. असो.
अिथे. म्हणजे हैदराबादी, उस्मानिया विद्यापीठात शिकताना डॉ. नांदापूरकर, कहाळेकर, श्री. रं. कुळकर्णी, ए. वि. जोशी वगैरे प्राध्यापक मंडळी भेटली. त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा प्रभाव म्हणा की आदर्श म्हणा आयुष्यात प्राध्यापकच व्हायचे हे मनावर पक्के ठसले. कारकुन, मास्तर अशा नोकऱ्या त्याकाळी थोडा प्रयत्न केला तर सहज मिळत. मीही व्हाया मास्तरकी प्राध्यापकीपर्यंत पोहोचलो. १९६० ते ६३ हा काळ तसा धडपडीतच गेला. एकदाचा प्राध्यापक झालो. गंगेत घोडं न्हालं. दरम्यान चांगल्या सरकारी नोकऱ्या मिळण्याच्या संधी आल्या. मीच त्या गमावल्या. मराठवाडी पठडी प्रमाणे वडिलांची इच्छा मी वकील व्हावे अशी होती. मी त्या वाटेनं गेलोच नाही. वडिलोपार्जित पंरपरेने मी वैद्यकी करायला हवी पण तिथेही मी नकार दिला. आयुर्वेद कॉलेजला प्रवेश मिळत असतांनाही मी तो मार्ग टाळला. कारण आंतरिक ओढ कथा, कविता, कादंबरी अशा ललित साहित्याची - ही ऊर्मी सारखी उचंबळत असायची. त्यातून हातून थातुरमातुर लेखन झाले. ते अखंड सुरु राहिले. हयातभरात सतरा पुस्तके निघाली. त्यांना ग्रंथ म्हणण्याची माझी हिंमत होत नाही. लिहून झाले. छापून आले. पाहता पाहता लेखक, कवी वगैरे झालो. काही किरकोळ पुरस्कार प्राप्त झाले. किरकोळ पदे मिळाली. एकूण काय तर एक किरकोळ साहित्यिक म्हणून उरलो. तीनचार पानांचा 'बायोडाटा' तयार झाला; म्हटली तर ही उपलब्धी. साहित्यक्षेत्री क्षेत्रस्थासारखा वावरलो. प्रस्थ निर्माण केले नाही. साहित्याची आवड, लेखनाला सवड मिळते म्हणून प्राध्यापकी पेशाची निवड, असा समसमासंयोग झाला नि मी घडत गेलो. जिद्दीने प्राध्यापक झालो. करिअर म्हणून अध्यापन क्षेत्र निवडले. सेवानिवृत्तीपर्यंत त्यात रमलो. ज्या ठिकाणी नोकरी केली तिथे वातावरण तसे अनुकूल नव्हते. आयुष्यभर अस्वस्थता व अस्थिरता घेरून होती. परिणामी स्वभावात एक वित्रित 'कुढेपणा' आला. एकटा नव्हतो पण एकाकीपण कायम सोबतीस आले. त्यातूनच कदाचित् –
एकटा न मी पण एकाकी, कितनी
जगणे तरीही -
अजून बाकी!
असे लिहून गेलो.
दरम्यान जिथे प्राध्यापक होतो तिथेच प्राचार्यपदही चालून आले. आणि जसे आ तसेच निघून गेले. मीच प्राचार्यपदाचा राजिनामा देऊन मोकळा झालो. हे काम आपले नाही अशी खूणगाठ मनाशी बांधली नि अक्षरश: त्या पदावर लाथ मारली. कुठलाही मोह बाळगला नाही. निर्मम, निरिच्छ असा सगळा प्रकार. (पुढे अन्यत्र प्राचार्यपदाचे दशावतारी खेळ पाहात मस्त जगत राहिलो.) प्राचार्यपद गेल्याचे तीळमात्र दुःख आज नाही. जे काही दुःख आहे ते हे की प्राचार्यपदामुळे माझे लेखन मंदावले नि काहीकाळ लेखन चक्क थांबले. अधिकार, व्यवस्थापन, सत्ता आणि स्वच्छंद, स्वतंत्र वृत्ती यांचा 'मेळ' कधी जुळत नाही हेच खरे. प्राचार्यपद ही कुलगुरूपदाकडे जाण्याची दिशा समजून तशी वाटचाल करणारे माझ्या समकालीनांचे वर्तन मी जवळून पाहिले आहे. यासाठी अंगी नाना कळा व तत्सम बळ लागते. ते माझ्याठायी नव्हते हे कबुल. शिवाय वर्तमान शिक्षण क्षेत्राला राजकारणाची जी लागण झाली आहे तिचाही प्रादुर्भाव मला भोवला. रेल्वे यार्डात इंजिन बिघडल्यामुळे काही गाड्या जशा 'सायडिंग'ला पडतात तशी शिक्षणक्षेत्रातील माझी वाटचाल सायडिंगला पडली. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील सृजनशीलता आजमावताना जाणवले ती स्वत:ची हतबलता, अगतिकता, असहाय्यता आणि असमर्थता.
ज्या महाभागांचा सहवास मला लाभला त्यात नरहर कुरुंदकर, ना. य. डोळे, अनंत भालेराव, वा. ल. कुळकर्णी अशी काही महनीय नावे आहेत. राजकीय अशी कुठलीच पार्श्वभूमी मला नव्हती. एका साध्या भिक्षुकाच्या पोटी जन्मलेला मी एक मुलगा. परंपरेने लोक महाराज म्हणत कारण आमचे घराणे शिष्यपरंपरेने विस्तारलेले. त्या घराण्याच्या आठव्या पिढीतला मी एक वंशज. त्या घराण्याचे दायित्व म्हणून काही गोष्टी करण्याचे राहिलेही खंत तेवढी आहे. महाराज घराणे, म्हणून परांपराप्राप्त कुलधर्म-कुलाचार, यात्रा - उत्सव, व्रत-वैकल्ये, सण-वार, यात मी कधी रमलो नाही. गुंतलो नाही.
वैयक्तिकस्तरावर आचरण कधी बिघडू दिले नाही. भजन, कीर्तन यात्रा- दिंडी यात अडकलो नाही. कायम त्यापासून अलिप्त राहिलो. अंतरी या साऱ्यांचा कल्लोळ होता. (त्यातूनच माझी 'दूर गेलेले घर' ही कादंबरी निर्माण झाली) प्रसंगोपात माझ्या ललितलेखनातून (सयसावल्या, झिरपा) माझी भावविव्हलता प्रगटही झाली. स्फुट आत्मपर लेखनातून आध्यात्मिक अनुभवाचे कवडसे उमटले. मात्र साक्षात्कारी पुरूष म्हणून, संतत्वाची गादी चालवणारा म्हणून विशिष्ट प्रकारच्या आचरणशील व्यक्तिमत्वाची जपणूक करणारी एक विभुती म्हणून मला स्वतःला सिद्ध करता आले नाही. हे खरे तर माझे खुजेपण. सर्व क्षेत्रातील खुजेपणाचा स्वीकार करून जे लाभलं ते पतकरून इथवर आलो. प्रवास सुंदर नसला तरी सुकर झाला. जे चांगले वाटले त्याचा पतकर केला. धिक्कारलं काहीच नाही. आले ते स्वीकारलं.
प्रारब्ध, संचित, क्रियमान याशिवाय आयुष्यात दुसरं काय असणार? आस्तिक-नास्तिक या द्वंद्वात अडकलेल्या मनाला दिलासा देणारं काही असेल तर ते आंतरिक बळ.आंतरिकबळ नसतं तर ऐंशीची उमर गाठणं शक्यच नव्हतं. वाटतं: आपण प्राध्यापक झालो नसतो तर 'ह.भ.प. कांता महाराज जिंतूरकर' म्हणून गावोगाव नाम सप्ताह करीत हिंडलो असतो. 'ॲडव्होकेट लक्ष्मीकांतराव तांबोळी. बी.ए.एल.एल.बी' अशी दारावर पाटी लावून कोर्ट एके कोर्ट करीत काळ्याकोर्टात मिरवलो असतो. किंवा कुठल्यातरी तहसीलमध्ये हयातभर नोकरी करून 'नायब तहसीलदार' म्हणून सेवानिवृत्त झालो असतो. कदाचित् 'डॉ. लक्ष्मीकांत तांबोळी' 'आयुर्वेद विशारद' अशी पाटी दारावर लटकली असती. प्राध्यापक झालो खरा. पण पुढील काळात शिक्षणक्षेत्रातील बाजार पाहण्यात गेला याचा 'सल' अजूनही मनात आहे.
मिळालं ते घेतलं. मागितलं काहीच नाही. अधूनमधून संगीतक्षेत्र खुणवायचं. गळा नसल्यामुळे ते राहून गेलं. एखादं वाद्य वाजवता यावं ही उत्कट इच्छा. विशेष करुन तबला. पण तेही हुकलं. तबला आणि मृदंग आमच्या संस्थानातील भजन-कीर्तनाचं अविभाज्य अंग त्यामुळे वाद्याचं आकर्षण होतं. पण शिकवणाऱ्या तबलजीनं अशी बोटं मोडली की मी तबल्याकडे चुकूनही कधी बोट दाखविलं नाही. तसा वारसा महाराज घराण्याचा. वेदान्त खूप ऐकलेला. पण तो माझ्या धादांतापुढे कधी टिकला नाही. 'शुचितां श्रीमतांगेहे योगभ्रष्टोऽपि जायते’ असं नियतीनं घडवलं. योगभ्रष्ट म्हणून जन्मलो की काय असं आता वाटतंय. 'नतदृष्ट' होण्यापेक्षा योगभ्रष्ट होणं त्यातल्या त्यात बरं!
आयुष्याचा जमाखर्च मांडताना, आढावा घेताना एक गोष्ट नक्की - न मागता खूप काही लाभलं. पुरस्कार मिळाले. अध्यक्षपदे मिळाली. महाराष्ट्रभर कविता ऐकवल्या. चक्क चार विद्यापीठाचे. माझ्या लेखनावरील साहित्य संशोधन करणाऱ्यांला Ph.D. (आचार्य) या पदव्या दिल्या. अभ्यासक्रमातून कविता/ कथा विद्यार्थ्यांसमोर आल्या. मराठवाडाभर मराठवाडी मानध्वजा हे 'मराठवाडागीत' स्तंभावर कोरलं गेलं. कवितेचे स्तंभ उभारले गेले. लिखित, मुद्रित, स्वरांकित, शिल्पांकित असा माझ्या गीतांचा सन्मान झाला. आता याहून काय हवे? (हे सगळे न मागता मिळाले)
ज्या मराठवाडी मातीत माझा जन्म झाला त्या मातीचे पांग फेडण्याची क्षमता माझ्या अक्षरातून उमटली हे मी माझे भाग्य मानतो. निजामी राजवटीत जन्म झाला पण त्या राजवटीतून मुक्त झाल्यास आनंदही लाभला. म्हणून तर 'या मातीच्या पुण्यायीचा टिळा कपाळी लावून मराठवाडी मानध्वजा फडकवत गेलो. आता मागणे तर काही उरले नाही. उरली ती विनवणी. काकुळती. त्यासाठी प्रार्थना.
मागणे आणखी न काही, पाय राहो चालता।
ना कधी कोणापुढेही, हात पसरो मागता ।।
न मागता मिळते ते अंगी लागते; त्यासाठी भुईचे अंग व्हावे लागते. आता इच्छा येवढीच-'दयाळा, येवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे"आणि -'दयाळा, येवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे शेवटी श्वास जाताना, फुलांचे रंग मी व्हावे.” या माझ्या मागण्याने महाराष्ट्रातील ८ व्या इत्ततेत शिकणाऱ्या बाल-बालिकांनी मला जे बळ दिले त्यातून कसा उतराई होऊ? सूर निरागस हो असे गायकाला वाटते 'शब्द निरागस हो' असे कवीला का वाटू नये? अशा निरागस शब्दाचा धनी झालो हे माझे संचित, प्रारब्ध की क्रियमान याची चर्चा वाङ्मयक्षेत्रीच्या मुखंडांनी आपल्या फडावरील गुऱ्हाळगप्पात करावी.
-प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
August 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti