वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोणतीही पूर्वसूचना न देता विनायकराव ऊर्फ तात्या भेटायला आले. त्यांच्या अचानक येण्याने मला बऱ्यापैकी आश्चर्य वाटलं. कोणत्या तरी अनामिक कारणामुळे आलेल्या वैफल्याच्या झटक्याने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता. चेहऱ्यावरील विषण्णतेचे भाव त्यांना प्रयत्न करूनही लपवता येत नव्हते. अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत ते खुर्चीत जवळपास कोसळलेच. हातात घेतलेलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून त्यांची समस्या समजावून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तात्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता तोंड उघडले.
‘‘या जगात कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. आपल्याला नावं ठेवणारी एकही व्यक्ती या पृथ्वीवर निर्माण होऊ नये यासाठी मी आयुष्यभर काय नाही केलं? स्वत:च्या मतांना तिलांजली दिली, तत्त्वांना मुरड घातली, प्रसंगी स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, प्रगतीची काळजी केली नाही व अनेकदा आर्थिक झळही सोसली. हे सगळं काही केलं ते केवळ एका गोष्टीसाठी. सर्वांनी मला चांगलं म्हणावं, कोणीही मला नावं ठेवू नये यासाठी. ज्यांच्या भल्यासाठी मी स्वत:चं नुकसान करून घेतलं त्यांच्यापैकीच एकाने आज माझा ‘स्वत:ची मतं नसलेलं बिनबुडाचं भांडं’ असा उल्लेख केलेला ऐकून मला काय वाटलं असेल? या जगात आता जगण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही.’’ तात्या पूर्णपणे खचून गेले होते. त्यांच्याबद्दल कोणाचं वाईट मत असणं ही गोष्ट त्यांच्या कल्पनेपलीकडली होती. ते स्वप्नातही अशा ‘भयंकर’ घटनेचा विचार करू शकत नव्हते. आपल्याबद्दल सभोवतालच्या सर्वांचं मत चांगलंच असलं पाहिजे हा जगावेगळा अट्टाहासच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागला होता.
असे आम्ही कसे? समाजात एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वांचं एकजात चांगलं मत असणं, टीका करणारी एकही व्यक्ती नसणं, उघड किंवा छुपा एकही शत्रू नसणं हे खरोखरच शक्य आहे का? या गोष्टी मानवीय प्रवृत्तीशी सुसंगत आहेत का? ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे व यशस्वी व्हायचं आहे त्यांना सगळी कामं मिशनरी वृत्तीने पार पाडावी लागतात व हे करीत असताना ते सर्वांना एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाहीत. कोणत्याही धडपड्या व यशस्वी व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच जास्त असतात व अशा शत्रूंचं त्या यशस्वी व्यक्तीबद्दल कधीच चांगलं मत नसतं. आपल्याबद्दल शत्रूंचं मत चांगलं नाही म्हणून यशस्वी व्यक्ती प्रगती करणे कधीच थांबवत नसतात.
या जगात सर्वांचं आपल्याबद्दल चांगलंच मत असलं पाहिजे यासाठी अविरत धडपड करणारी तात्यांसारखी माणसं सतत प्रचंड तणावाखाली वावरत असतात व शेवटी अपेक्षाभंगाच्या दु:खाने उद्ध्वस्त होतात. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर लोकांच्या वाईट मतांना भीक घालण्यात अर्थ नसतो. अखेर सगळं जग सलाम करतं ते उगवत्या सूर्याला म्हणजेच यशस्वी व्यक्तीला !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
October 26, 2016
त्वचाविकारावर इतर उपचार चालू असताना सोबत खालील उपचार करावेत.
आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत. यासाठी काही पथ्येही सांगितली आहेत. एक सर्वसाधारण नियम म्हणजे दूध,मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. दूध-खिचडी, दूध-मासे हे पदार्थही एकत्र घेणे वर्ज्य आहे. मीठ व खारट पदार्थांवरही नियंत्रण आवश्यक आहे. लोणचे,खारवलेल्या मिरच्या, सांडगे,शेवया, इत्यादी पदार्थ या दृष्टीने कमी खावेत. अशी काळजी घेतल्यास त्वचारोग लवकर नियंत्रणात येतात असा अनुभव आहे. ठेवल्यावर आपोआप पाणी सुटणा-या दही, गूळ, इत्यादी वस्तूही त्वचारोग वाढवतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. पोटात जंत असणे, कोठा साफ नसणे हा त्रास असेल तर त्यावर लवकर व नियमित उपचार करणे आवश्यक आहे. या विकारामुळे त्वचारोग लवकर आटोक्यात येत नाहीत.
पावसाळयाच्या शेवटी होणारे त्वचाविकार हे शरीरातील थोडे रक्त काढल्यास (रक्तमोक्षण) लवकर बरे होतात. यासाठी जळवांचा वापर करता येईल. त्वचारोगाच्या आजूबाजूला किंवा रोगग्रस्त त्वचेवर जळवा लावल्यास लवकर आराम पडतो असा अनुभव आहे.
आयुर्वेदानुसार साबणाऐवजी बेसनपीठ व तेल वापरल्यास त्वचा निरोगी व स्निग्ध राहण्यास मदत होते. विशेषकरून कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
(अ) आरोग्यवर्धिनी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा
(ब) मंजिष्ठा चूर्ण पोटातून रोज दिल्यास आराम पडतो.
(मात्रा : 1.5 ते 3 ग्रॅ. याप्रमाणे दिवसातून दोन वेळा)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
-- आरोग्यदूत वरुन साभार
August 20, 2016
महाभारतातील कर्णाचे स्थान अद्विती असून
मान जाई उंचावुनी त्यास समजोनी घेता ।।१।।
सुर्यपुत्र कर्ण घनुर्धारी महान
दानशूर तो असून इतिहास घडविला ।।२।।
सुर्य आशिर्वादे जन्मला कवच कुंडले लाभती त्याला
रक्षण वलय शरिराला मिळती कर्णाच्या ।।३।।
अंगातील कर्तृत्व शक्ति माणसाला उंचावती
शक्तीस वाट फुटती शोधूनी त्याची योग्यता ।।४।।
जन्मुनी प्रथम पांडव सहवासांत सारे कौरव
हेच त्याचे खरे दुर्दैव नियतीचा होई खेळ ।।५।।
महाभारत युद्ध प्रसंगी कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं
होता तो विजयाच्या मार्गी हादरुन सोडले पांडवाना ।।६।।
इंद्रासह सर्व देव आकाशी बघती अर्जुन-कर्ण युद्धासी
परी चित्त त्यांचे कृष्णासी बघती त्याची लिला ।।७।।
थोपवून धरिला अर्जून रथ असूनी सारथी भगवंत
बाण शक्तिनें नेला रेटीत कृष्ण परमात्म्यासह ।।८।।
शक्तीचे हे दिव्य दर्शन बघू लागले आकाशांतून
इंद्रादी देव विस्मयित होऊन न्याहळूं लागले कर्णाला ।।९।।
चकीत झाले देवगण यश अर्जुना यावे म्हणून
कवच कुंडले मागावी दान इंद्र करी मनीं विचार ।।१०।।
प्रातः काळची सुर्य किरणे सुचवी कर्णा सावध राहणे
रुप घेतले इंद्राने दान मागण्यासाठीं ।।११।।
कर्ण होता दानशूर मन त्याचे उदार
न घेई तो माघार संकल्प करिता एकदां ।।१२।।
इंद्र देवाचा राजा ठोठती कर्ण दरवाजा
ठेवूनी मनी भाव दुजा रुप घेतले याचकाचे ।।१३।।
देवांचा नृपती दान मागण्या येती
हे माझे भाग्य असती सत्व परिक्षा देण्याचे ।।१४।।
ओळखले याचकाला इंद्राच्या सत्य रुपाला
अभिवादन केले तयाला कवच कुंडले देई दान ।।१५।।
कवच कुंडलाचे दान स्वहत्याचे ठरले कारण
असूनी कर्णा हे ज्ञान इंद्रसी दानधर्म केला ।।१६।।
इंद्रापरी याचक कोण जो मागेल मजसी दान
त्याचा कर्णा अभिमान हीच त्याची श्रेष्ठता ।।१७।।
कर्णाचे हे दान ठरले त्याचे समर्पण
करी त्यासी महान अजरामर करुनी ।।१८।।
डॉ. भगवान नागापूरकर
२०-२१११८३
January 19, 2018
मोबाईल सोबत नसताना तुम्ही अस्वस्थ होतात का? आपल्या घरात काय चाललंय यापेक्षा ऑनलाइन विश्वात काय चाललंय याबद्दल तुम्हाला अधिक रस वाटतो का? सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याचा मोबईल डेटा चालू करतात का?ऑनलाइन बोलणे तुम्हाला आनंदाचा आभास देते का? कुणी तुमच्याशी ऑनलाइन बोलत असताना पलीकडून पटकन reply आला नाही किंवा कोणी ऑनलाइन भेटले नाही तर तुम्हाला वाईट किंवा अस्वस्थ वाटते का? आभासी जगातील तुमचा 'मी' हा वास्तवातल्या 'मी' वर कुरघोडी करतो का? तुमचे शेवटचे प्रत्यक्ष-face to face (facebook वर नव्हे) चांगले बोलणे कुणाशी झाले हे आठवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो का? यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही डिजिटल जगाचे 'गुलाम' आहात आणि ऑनलाइन व्यसनाचे बळी आहात.
तंत्रज्ञान आपले आयुष्य सोपे बनवते; पण आपण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने तणावाला निमंत्रण देतो आणि दुखणे विकत घेतो. मला किती 'Likes' मिळाले? एखादा 'सेल्फी' घेऊन आपण कुठे आहे हे इतरांना दाखवू, त्याने/तिने मला 'Like' का केले नाही? तिचे/त्याचे किती 'Follower' आहेत, Friend आहेत? आणि माझे? हे आताचे प्रश्न, त्यातून येणारा ताण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने निर्माण झाले आहे. ऑनलाइन ताणतणावातून सुटका कशी करायची यासाठी काही उपाय बघूया.
Face to Face-प्रत्यक्ष संवाद:
एक छोटे काम करा. तुमच्या जिवलग मित्र/मैत्रिणीला फोन करा आणि चाय पे चर्चा करत भेट घ्या. तुम्हाला चांगले वाटेल. एकमेकांना न भेटता, ऑनलाइन chatting वर विश्वास ठेवत तुम्ही जर असा विचार कराल की आपण 'connected' आहोत सर्वांशी. तर सावधान! तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला त्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो आणि तो पचवणेही कठीण जाईल. जेव्हा तुम्ही समोरासमोर बोलतात तेव्हा व्यक्तीच्या भावनांचा अंदाज चांगल्याप्रकारे घेता येतो. न बोलताही बऱ्याचदा डोळे, चेहरा, हावभाव यातून मनस्थितीचा वेध घेता येतो. ऑनलाइन chatting हा आभासी जगातील एक आभास असतो. संशोधकांनी सुद्धा मान्य केलंय की आभासी ऑनलाइन संवाद प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊच शकत नाही. तुमच्या वैयक्तिक संवादासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा आणि व्यक्त व्हा.
स्मार्टफोन पासून दिवसातील काही काळ दूर रहा
काहींसाठी ही प्रचंड अवघड गोष्ट असू शकते. पण तुमचा स्मार्टफोन तुम्हाला 'स्मार्ट' बनवत नाही तर तुमचा आत्मविश्वास, उर्मी तुम्हाला स्मार्ट बनवते. स्मार्टफोनमुळे आपली निर्णयक्षमता कमी होत नाहीये ना याकडे लक्ष असू द्या. सतत २४x७ तास सोबत असणारा मोबईल विक्षिप्त वागणुकीबरोबर सायबर सिकनेस, फेसबुक डिप्रेशन इ. ला जन्म देतो.
आभासी जगातून स्वतःला वास्तवात आणा
मोबाईलच्या अतिवापरामुळे एका जागी बसूनही थकल्यासारखे वाटते. कारण तुमचे डोके सतत कशाततरी गुंतलेले असते. मोबईलचे व्यसन लागलेला व्यक्ती वास्तवातील समस्येला भिडताना सैरभैर होण्याची शक्यता असते. वास्तव जगाशी संवाद तुटल्याने 'मी-माझे' याच जगात ते वावरतात, जिथे ते सतत त्यांचे आनंद, दु:ख, प्रतिक्रिया ऑनलाइन मांडत असतात.
संशोधकांच्या मते, जर तुम्ही दिवसातील ७ तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोन, ipad, कॉम्पुटरवर व्यतीत करत असाल तर सामाजिक भावनांचे जाळे असलेल्या मेंदूच्या भागाची हानी होऊ शकते. यातूनच मग तुमच्या आकलनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या थरापर्यंत जाण्यापेक्षा वास्तवात आणि या निसर्गाचा आनंद घ्या.
एकावेळी एकच
जगातील मानसशास्त्रज्ञांचे एकमत आहे की, एकावेळी अनेक कामे – Multitasking मानवासाठी योग्य नाही. मानवाच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत.काही मानसशास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की सतत ऑनलाइन राहणे आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व मेंदूतील रासायनिक अभिक्रिया बदलवते. त्यामुळे आपण चिडखोर, अधीर हेकेखोर होतो.
नव्या युगाचे नवे ‘डिजिटल’ आजार:
तुमच्या मोबईलची battery कमी होते किंवा बंद पडते तेव्हा तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नोमोफोबिया ग्रस्त आहात.
जर तुमच्या खऱ्या किंवा कल्पित आजाराच्या लक्षणांसाठी तुम्ही इंटरनेटवर ‘सर्च’ करत असाल तर तुम्ही Cyberchondria चे बळी आहात.
मोबाईल रिंगटोन वाजत नसतानाही तुम्हाला तसा वारंवार भास होत असल्यास Phantom Vibration Syndrome चे तुम्ही शिकार आहात.
जर तुम्हाला इतरांना ऑनलाइन छळायला मजा येत असेल तर तुम्ही online Disinhibitation Effect ने ग्रस्त आहात.
जर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट, update ऑनलाइन मांडत असाल तर तुम्ही Digital Goldfish च्या जाळ्यात अडकला आहात.
तंत्रज्ञान, नवी साधने वापरुच नये असे नाही पण त्यावर अतिविसंबून राहणे धोक्याचे! सतत गुगल वापरणे आणि माहिती मिळवणे म्हणजे मोठे कर्तृत्व किंवा हुशारी नाही. माहिती आणि ज्ञान यातील फरक समजला तरी धन्य! माहितीच्या प्रचंड महासागरातील लाटेवर स्वार होऊन गटांगळ्या खाण्यापेक्षा त्याचा विधायक वापर करून प्रगतीकडे वाटचाल करणेच योग्य.
-- वसंत चरमळ
संदर्भ : Times Of India
October 10, 2016
डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.
डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
१. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
२. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटिऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
३. फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
४. पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
५. डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
६. वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
७. खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
८. डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
९. मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
१०. डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
११. कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
१२. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
१३. कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
१४. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
April 7, 2017
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै-
रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः |
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै-
रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖
भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात,
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून अग्नीच्या लाटा उसळत नाहीत, प्ररोहैरवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः - ज्यांच्या डाव्या अंगावर अद्वितीय सौंदर्यवती शक्ती विराजित नाही,
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै:- ज्यांच्या अंगावर भूषण स्वरूपात सर्प रुळत नाहीत,
अचंद्रार्धचूडै:- ज्यांच्या मस्तकावर चंद्रकोर विलसत नाही
अलं दैवतैर्नः - असे कोणतेही माझे दैवत नाही.
अर्थात अशी गुणवैशिष्ट्ये ज्यांच्या ठिकाणी नाहीत अशा कोणत्याही दैवतेला मी शरण जात नाही. हे सांगण्याच्या निमित्ताने आचार्य श्री वेगळ्या शब्दात भगवान श्री शंकराची वैभव मालिका आपल्यासमोर सादर करीत आहेत.
तृतीय नेत्रातून निघणारा अग्नी, मांडीवर बसलेली देवी पार्वती अंगावर रुळणारे सर्प आणि मस्तकावरील चंद्र या भगवान शंकराच्या सगळ्या गोष्टी वंदनीय आहेत. त्यांच्याशिवाय भगवान शंकरांची कल्पनाही करवत नाही.
या सगळ्या गोष्टींचे वैशिष्ट्य सांगण्याच्या निमित्ताने आचार्यश्री पूजना मध्ये असणाऱ्या ' सांगं सपरिवारं सशक्तिकम्' या दृष्टीचा विचार आपल्या समोर ठेवत आहेत. त्यासोबतच भगवान शंकरांच्या ठायी असणारी एकनिष्ठता अधोरेखित करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 13, 2020
कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे.
August 8, 2018
आमचा…….? महाराष्ट्र !!! आणि आमची मराठी …..
September 13, 2010
सरकारकृपेने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि त्याच प्रमाणात उत्पन्न कमी झाले आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला. आता सरकारने शेती फायद्याची कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारने तसे लक्ष दिले तर शेतीसोबतच इतर अनेक प्रश्न आपोआप सुटतील.
July 5, 2009
या विधानसभा निवडणुकीने विरोधकांच्याच नव्हे तर सत्ताधार्यांच्या ही डोळ्यात अंजन घातले आहे. तुम्ही जनतेला गृहीत धरून त्यांच्या प्रश्नांची हेळसांड करणार असाल तर जनता तुम्हाला घरी बसू शकते, हा संदेश जनतेने मतपेटीतून दिलाय. त्यातील मतितार्थ राजकारण्यांनी समजून घेतला पाहिजे.
October 29, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti