(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वरिष्ठ नागरिक बचत योजना – २००४

    बऱ्याच वर्षांपासून काही मंडळी पैश्याच्या हव्यासापोटी रक्कम दुप्पट, तिप्पट होण्याच्या फसव्या जाहिरातीच्या आमिषांना बळी पडून कुठेही आपली कष्टार्जित पुंजी भविष्यातील सुरक्षितेचा विचार न करता गुंतवणूक करतांना आढळतात. तरी मित्रांनो पैशाची गुंतवणूक करतांना जरा जपून !

      March 31, 2016


  • काश्मिर

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांचा काश्मिर प्रश्नावरील हा लेख शेअर करत आहे...


    गेल्या दहाबारा वर्षात हळुहळू काश्मिरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीसपंचवीस वर्षापुर्वीचे पॅलेस्टाईनचे फ़ोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापुर्वी निदान काश्मिरमध्ये हुर्रीयत व फ़ुटीरवादी निवडणूकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफ़ेक झाली, असे प्रसंग चारपाच वर्षापुर्वीही आपल्याला बघायला ऐकायला मिळत नव्हते. पण आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकापुर्वी इंतेफ़ादा असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे, की काही पॅलेस्टाईनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्त्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकुळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे, की अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्त्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्चीम किनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्त्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरूण किरकोळ बॉम्ब वा दगडफ़ेकीने इस्त्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक मोडस ऑपरेन्डी बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मिरातूल फ़ुटीरवादी तशीच काहीशी रणानिती संयुक्तपणे राबवित आहेत.

    या संदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर इंतेफ़ादा शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दाम वाचले पाहिजेत. काही फ़ुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मिरातही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तीच रणनिती योजनाबद्ध रितीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले, की भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार. किंवा काश्मिरात सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार. फ़ारूख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफ़त यांची भाषा किती जुळतीमिळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मिरात काय चालले आहे, त्याची ओळख इंतेफ़ादा समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. इंतेफ़ादा ही रणनिती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनिती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दिर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफ़त, यांच्याशी इस्त्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मिरात यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर आराफ़त यांनी, आडोश्याने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. आराफ़त त्यात सक्रीय नव्हते. पण जे कोणी घातपात करीत होते, त्या हमास संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण आराफ़तच करीत होते. आज फ़ारूख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय?

    फ़रक इतकाच आहे, की इस्त्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्त्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफ़ेके समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्‍यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर आराफ़त यांचे वास्तव्य असलेल्या कंपाऊंडवरही बॉम्बफ़ेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेनेनॉन कधी इस्त्रायलशी लढाईत उतरत नाही. पण तिथे हिजबुल्ला नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फ़त इस्त्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मिरात तोयबा वा मुजाहिदीन नावाने तसेच हल्ले पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण असे प्रतिहल्ले इस्त्रायल इतके खोलवर करते, की त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या हिजबुल्ला संघटनेला डोकेही वर काढता येत नाही. हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्त्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्त्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?

    इस्त्रायलची ही रणनिती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा इंतेफ़ादा सुरू झाला, मग इस्त्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकते. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एकदोन आठवड्याचा कालावधी निघून जातो. परिणाम असा होतो, की इस्त्रायलच्या सीमेपलिकडचा प्रदेश पुर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमिनदोस्त होऊन जातात. सहाजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या हिजबुल्ला वा अरबी सेनेचा कणा पुर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपुर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उध्वस्त करून टाकली जाते, की इस्त्रायल कितीही गाफ़ील राहिला तरी पुढले कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते. जिहादी लढवय्ये सोडाच. त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा पुन्हा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्त्रायलची कुरापत काढण्याचा विचार इंतेफ़ादा पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. सहाजिकच वर्ष दिडवर्ष इस्त्रायलला शांततापुर्ण जीवन जगत येते. मग तो कालावधी उलटला, की पुन्हा पॅलेस्टाईनी व लेबेनॉनच्या हिजबुल्लाला लढायची खुमखुमी येते. पुन्हा इंतेफ़ादा सुरू होतो. पुन्हा इस्त्रायल आधीच्याच रणनितीचा अवलंब करते. हा घटनाक्रम आता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळुहळू भारतालाही काश्मिर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी इस्त्रायली युद्धनितीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मिरातील पॅलेस्टाईनी इंतेफ़ादाच आहे.

    --- भाऊ तोरसेकर

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम.

      June 8, 2017


  • हॉटेलींग…. एक विचार करण्याचा मुद्दा

    हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे. मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते. मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. १-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते. तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन ’पाणी साधे का बिसलेरी’ असे विचारतो. दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो.

    मग बराच वेळ ताटकळत ठेऊन, ८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", शितपेये ई. गोष्टी येतात. या सर्व गोष्टी आल्यावर, हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही, पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो. सहाजिकच स्टार्टर्स ची क्वांटीटी कमी असल्याने, जेमेतेमे एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो...पण आम्ही एकदम मस्त मुडमधे !

    मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटर कडे आपण आशाळभुतासारखे पाहून थोडासा अवधी मागुन घेतो. कोणी व्हेज, कोणी नॉन व्हेज असे ठरत ठरत आपण शेवटी, वेटर नी ’सजेस्ट’ केलेले पदार्थ ऑर्डर करतो. त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेश मधे राहीलेले स्टार्टर्स चे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस ई. पदार्थांचे सेवन, सो कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते. तो पर्यंत आजुबाजुला असलेल्या एखाद्या ग्रुप मधे जोरदार हाश्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो. त्यातच एखादे अगम्य "म्युझीक" ’बॅग्राउंडला’ लावलेले असते. थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतय, पण ए.सी. तर चालू असतो. मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला’ सांगतो, तो ’वाढवल्यासारखे’ करून निघून जातो, थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही. मग खूपच गर्दी आहेना, ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्स च्या वाटणीच्या मागे लागतो.

    काही चांगल्या, काही अपेक्षाभंगीत, काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मुड मधे जेवण सुरू करतो. मग सुरूवातीला काही विनोद, मग एस.एम.एस, मग ’नेबर्स’ बद्द्ल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्कींग प्रॉब्लेम... इ इ इ विषय ’डिस्कस’ करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणी वातट रोटी अजून शिल्लक आहे. मग ती रोटी कशीबशी संपवून न-वाफाळणारा ’स्टीम राईस’ समोर येतो. आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल’ सांगीतली जाते जी डाल, राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा कींवा दह्या बरोबर ढकलला जातो.

    लगेच फिंगर ’बोल’ ची आज्ञा सुटते आणी नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बोल येतात. कसे तरी बुचकळून हात ’साफ’ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो कॉल्ड ’डेझर्ट’ आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.

    एका पापडाचे १० -१५ रू; एका रोटीचे १५-२० रू; एका सुपचे ७५-८० रू; एका भाजीचे ८० -१०० रु; नॉन व्हेज डीश चे प्रत्येकि २००-४०० रू: व जर मत्स्याहार केला असेल तर तर एका डीश चे ६००-८०० रू; असे एकुण १८०० ते २२०० रू. चे बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो. मग त्या बिलाचा राग म्हणा कींवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा, पण आपण सुगंधीत बडीशोप, चवळ्या मटक्या व टूथपिक, भरभरून घेतो. बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्या सारखा, आपण १०-२० रू. टिप ठेवतो आणि बाहेर पडतो. मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत’ करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.

    जरा विचार करा की आपण खालेल्या पदार्थांचे मुल्यांकन पटण्यासारखे असते ? कितपत स्वादिष्ट व आरामदायक होते ते जेवण ? किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ? हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी, जेमेतेमे २०-२५ मिनीटांच्या गप्पा, आणी निम्याहुन अधिक खिसा रिकामा.

    मला हे अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठीकाणी नसेल सुध्दा पण बहुसंख्य ठीकाणी आहेच. त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरतो ? का नेहमी स्वत:चीच समजुत घालत बसतो ?

    आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे पण म्हणून असे पैसे उडवायचे

    त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ करून आणून घराच्या हॉल मधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा ?

    तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितितरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर जेमतेम निम्मा होतो. बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते....

    "रिलॅक्सेशन" हे कारण असते हॉटेलिंग करण्यामागे, पण मलातरी वाटत नाही की प्रत्येक वेळेस ते साध्य होते !

    -- वसंत चरमळ
    फेसबुक वॉलवरुन

      January 26, 2018


  • महंमद रफी

    तो दिवस असाच ढगाळलेला होता आणि संध्याकाळी बातमी आली महंमद रफी गेले, सुन्न झाले होते.

      August 9, 2021


  • दोन रहस्यमय आकाशगंगा !

    सुमारे 8 अब्ज वर्षांपूर्वी, संशोधकांनी मांडले की, दोन बटू आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. त्या वैश्विक अपघातामुळे त्या दोन आकाशगंगांमधील वायूचे विभाजन होऊन अनेक नवीन बटू आकाशगंगा तयार झाल्या, ज्यात दोन गडद पदार्थ-मुक्त आकाशगंगा आहेत.

      July 16, 2022


  • “हनुमान आणि आयुर्वेद”

    पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली असल्याचे आयुर्वेद मानतो. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.

    शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्व तर शिकवत नसेल?!

    हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय; तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच नव्हेत काय?

    आणखी एक महत्वाची गोष्ट; हनुमान लंकेला जात असताना त्यांचा स्वेद हा समुद्रातील एका मगरीने प्राशन केला अशी कथा आहे. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदीय रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून; वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात; या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारदेखील करू नये!). पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही काय?

    आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देत नाहीत काय?

    आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची!! ‘नाही रे’ असे म्हणणे खूप सोपे असते. ‘आहे रे’ असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि आपली संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.

    © वैद्य परीक्षित स. शेवडे.
    'श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय'; डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      April 14, 2015


  • मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ४

    मराठ्यांच्‍या अर्थकारणाचा विचार केल्‍याशिवाय तत्‍कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्‍या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्‍ली झालेला आहे. परंतु १८व्‍या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्‍य आपण लक्षात घ्‍यायला हवे

      March 11, 2019


  • काळी इंधने

    काही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’ (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उर्ध्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उर्ध्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ (Light Diesel Oil) म्हणतात.

      March 8, 2023


  • आता उरलो गोंधळापुरता !

    मैं तेरा साल से अंदर हूं। इस दौरान मेरे मां – बाप चल बसे। मैं अंदर आया तब मेरा बच्चा केवल दो महिने का था। बहूत भुगत चुका, अब सीधी साधी जिंदगी बिताना चाहता हूं जजसाब, अल्लाह के बाद सिर्फ आप पर ही भरोसा है। आशा करता हूं आप नाउम्मीद नही करेंगे!’ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीने गुन्हा सिद्ध झाल्यावर आपली कैफियत न्यायाधीशांसमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित झालेल्या आरोपीचे ते वत्त*व्य होते.

      September 10, 2006


  • आखरी खत’

    एक वर्ष,सव्वा वर्षाचे मूल...मुंबई शहरात एकटं फिरतय..गर्दीतून..गाड्यांच्या मधून..रेल्वे ट्रॕक वरुन...मधेच कुठल्यातरी बाकावर झोपतय...भूक लागते म्हणून एक पडलेली गोळी खातो तर ती झोपेची गोळी असल्याने गाढ झोपी जातय..पुन्हा उठतय...आपल्या आईला शोधत फिरतय…
    कुणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा अर्धाअधीक भाग असा एखाद्या एक वर्षाच्या मुलावर चित्रीत झालाय हे सांगितले तर पटेल का?

    माणसाचे आयुष्य अकल्पनीय आहे. 'Truth is stranger than fiction' असे मार्क ट्वेनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. सिनेमाच्या पडद्यावर ज्या गोष्टी आपण काल्पनिक म्हणून पाहतो त्यात माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचेच प्रतिबिंब असते का, हा एक जुना वादाचा विषय. सिनेमॕटीक इलेमेंट म्हणून काही वेळी कल्पनेची फोडणी द्यावी लागते. तरीही सिनेमा पाहून बाहेर पडणा-या प्रेक्षकांना जे आपण पाहिलं तसे खरेच घडले असणार हे वाटत रहावे, त्यांना त्या विचाराने अस्वस्थ करावे, अशी ताकत काहीच सिनेमांमधे असते. 'आखरी खत' हा त्यापैकी एक.
    माझ्यावर 'आखरी खत' या चित्रपटाची एक अजब मोहिनी आहे. याचे कारण जेंव्हा केबल टिव्हीने नुकतेच डोके बाहेर काढले होते तेंव्हा त्यावर येणारी काही मोजक्या चॕनेल्समधे एक होते ATN. या चॕनेलवर दुपारी हा सिनेमा नियमीत लागायचा. मी तेंव्हा काॕलेजमधे होतो. काॕलेजला सुट्टी असायची तेंव्हा केबलवर 'पडीक' असायचो. त्यामुळे चॕनेल बदलता बदलता या चॕनेलवर असेन व हा सिनेमा लागलेला असेल तर बोटं आपसूक स्थिरावायची. मग तो सिनेमा तिथून पुढे पाहिला जायचा.

    आखरी खत हा चेतन आनंद यांचा चित्रपट. हकीकत, हिर रांझा यासारखे दर्जेदार सिनेमे देणारा हा आवलिया एक दिवस अचानक साधारण सव्वा वर्षाच्या एका मुलाला मुंबईत फिरायला सोडतो व सिनेमॕटोग्राफर जाल मिस्त्री यांना घेउन त्याच्या मागे त्याचे शुटींग करत फिरतोय अशी बातमी बाॕलीवूड मधे पसरली व काही जणांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. राजेश खन्ना नावाचा एक नवा कलाकार व इंद्राणी मुखर्जी सारखी तितकी प्रसिद्ध नसलेल्या आभिनेत्री घेउन चेतन आनंद काय हा वेडेपणा करताहेत असेही लोक म्हणू लागले होते. पण अर्थातच चेतन आनंद यांना आपण काय करतोय व आपल्याला काय बनवायचय याची पूर्ण जाणीव होती.

    कथा तशी नेहमीच्याच धाटणीची.. एक तरुण शिल्पकार गोवींद काश्मिरमधे आलेला आहे. ज्या गावात तो आहे तिथल्या एका साध्याभोळ्या मुलीवर लज्जोवर त्याचा जीव जडतो. तिलाही तो पसंत आहे. दोघे गुपचूप मंदिरात लग्न करतात. काही दिवसांनी तो शहरात परत येतो, त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करायला. नंतर तिला कळते की तिला दिवस गेले आहेत. तिची सावत्र आई लज्जोला विकून टाकते. लज्जो तिथून कशीबशी सुटते. एका मुलाला जन्म देते. आपल्या मुलाला कष्ट करुन सांभाळू लागते. पण तिची तब्येत खूप खराब होते आणि आपला अंत जवळ आलाय हे पाहून आपल्या मुलाला, बंटूला, घेउन शहरात येते व गोवींदला शोधत फिरु लागते. ब-याच प्रयत्नांनी गोवींदचा पत्ता मिळतो पण गोवींद तिच्यावर शंका घेतो व तिला स्विकारत नाही. म्हणून ती त्याला एक पत्र लिहीते व जेंव्हा तो घरी नसतो त्यावेळी त्याच्या दाराशी सोडते..हेच ते 'आखरी खत'.

    गोवींदला ते पत्र मिळते पण तोवर खूप उशीर झालेला असतो. लज्जो हे जग सोडून निघून गेलेली असते..त्याचे मूल शहरात हरवलेले असते. पश्चातापदग्ध गोवींद पोलीसांच्या मदतीने बंटूचा शोध घेउ लागतो. बंटू फिरत फिरत एका अनाथ आश्रमातल्या माणसाला सापडतो. तो त्याला घेउन येतो..खायला घालतो. रात्री आई स्वप्नात येते...तिच्या आठवणीत तो उठतो व त्या अनाथ आश्रमातून बाहेर पडतो. रात्रभर फिरत राहतो. त्याचा ट्रेस लागल्याने पोलीस व गोवींद शहरभर त्याला शोधत फिरत असतात. पहाटे पहाटे बंटू गोवींदच्या घराजवळ पोहोचतो. तिथे गोवींदने बनवलेला लज्जोचा पुतळा पाहतो..आईचा पुतळा बंटू ओळखतो व पुतळ्याला जाउन मिठी मारतो..तिचा पान्हा शोधू लागतो.

    गोवींद दोन रात्र झोपलेला नसतो. तो व पोलीस परत येतात तेंव्हा बंटू त्यांना घरीच सापडतो..तो लज्जोच्या पुतळ्याला धरुन झोपी गेलेला असतो.
    हा सिनेमा पाहताना तुम्हाला रडू आले नाही तर तुम्ही स्वतःला चेक करुन घेउ शकता. कारण कोणीही असो, डोळ्यात पाणी येणार नाही असे हा चित्रपट पाहताना होत नाही.

    मुलांवर आलेले खूप चित्रपट आपण पाहिले आहेत. या चित्रपटातील मुले जराशी तरी कळत्या वयातील असतात. त्यांच्याकडून भूमीका करुन घेणं तसंही अवघडच असतं..इथे तर जेमतेम एक वर्षाचं मूल. मग चेतन आनंद या महाभागाने आख्खा चित्रपट (जवळ जवळ सत्तर टक्के भाग) त्याच्यावर कसा चित्रीत केला असेल? चेतन आनंद आणि जाल मिस्त्री या दोघांनाही यासाठी 'लवून कुर्नीसात'. त्याकाळी त्यांनी आउटडोअर चित्रीकरणासाठी (मुख्यतः बंटूच्या मागे मागे फिरताना) हँडहेल्ड कॕमेरा वापरला. चित्रपटात निओ-रिॲलिझम चा इफेक्ट आणण्यासाठी कदाचित हा चित्रपट कृष्णधवल बनला. कारण १९६६ साली रंगीत पडदा भारतात अवतरला होता.

    चित्रपटातील गाणी एकदम उच्च दर्जाची. रफीनी गायलेले 'और कुछ देर न जा और कुछ देर ठहर' हे अतिशय तरल गीत खास खय्याम टच असलेलं. मन्ना डे यांनी म्हंटलेले एक पार्टी साँग 'ओह माय डार्लिंग' हे तितके प्रसिद्ध नाही पण छान आहे. असेच एक क्लब साँग भूपिंदर सिंग यांनी पडद्यामागे व पडद्यावर देखील गायलय..'रुत जवाँ..जवाँ..रात मेहेरबाँ..' खूप साॕफ्ट व छान लयीतलं हे गाणं तस खय्याम पठडीतलं नाही पण तरीही श्रवणीय.
    पण या चित्रपटातील कळसाध्याय अर्थातच लता दिदींच्या आवाजातील दोन गाणी..

    पहिलं अर्थात सदाबहार गीत 'बहारों..मेरा जीवन भी संवारो..कोई आयें कहींसे..यूं पूकारो..बहारो..' गोवींद भेटण्याआधी लज्जो तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला साद घालते तेंव्हाचं हे कमालीचे सुंदर गीत..माझ्या स्वतःच्या टाॕप टेन मधील एक.

    दुसरं गाणं आहे एक अंगाई..'मेरे चंदा..मेरे नन्हे..तुझे अपने सिनेसे कैसे लगांउ..' लज्जो मृत्युनंतर बंटूच्या स्वप्नात येउन ही अंगाई गातेय..गोवींद रस्तो-रस्ती झोपलेल्या लोकांमधे त्याच्या मुलाला शोधतोय. बंटू एक चर्चच्या आवारात झोपलाय..सकाळ होताच तो पुन्हा उठून रस्त्यावरुन फिरायला लागलाय..अशी या गाण्याची पार्श्वभूमी. लताजींनी या गाण्यात प्राण ओतलाय..

    कैफी आझमी व खय्याम ही बाप माणसं का होती हे तुम्हाला ही गाणी ऐकून पटतंच.

    असो. चित्रपटाने रिलीजच्या वेळी फारशी कमाई केली नाही. राजेश खन्नाचा हा पहिलाच चित्रपट. पण त्याकाळी तो स्टार नव्हता. पण नंतर राजेश खन्ना सुपर स्टार झाला. त्यानंतर या चित्रपटाने रिपीट रिलीज मधे कमाई करीत खर्च वसूल केला.

    चित्रपट विलक्षण होता..व त्याच्या आख्यायिका त्याहून विलक्षण.

    मार्क ट्वेनचे वाक्य म्हणूनच इथे चपखल लागू होते..

    Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.

    कोण जाणे असे किती बंटू रस्त्यांवर आजही फिरत असतील..

    -- सुनील गोबुरे.

    सांगली.

      July 9, 2022