(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • निर्माते, दिग्दर्शक कमलाकर तोरणे

    भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

  • मल्हारराव होळकर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.

  • अभिनेत्री मृणाल दुसानिस

    तिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.

  • भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल

    ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी झाला.

    ग्रेग चॅपेल हे ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. ग्रेग चॅपेल यांनी १९७० साली पर्थ येथे ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड या सामन्याने कसोटीत पदार्पण केले. व १९७१ साली वन डे मध्ये पदार्पण केले. ४८ कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावली होती. ७००० धावांचा टप्पा ओलांडणारे ते पहिले ऑस्टेलियन खेळाडू होते. ग्रेग चॅपेल यांनी ८७ कसोटीत ५३.८६च्या सरासरीने ७११० धावा केल्या. ग्रेग चॅपेल यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी त्यांच्या पदार्पणातील व शेवटच्या कसोटीत शतक नोंदवले होते. कर्णधारपद मिळाल्यावरही पहिल्या व दुसर्या डावात शतक नोंदवले.

    भाऊ इयान चॅपेल बरोबर खेळताना दोघांनी एकाच कसोटीत शतक नोंदवले होते. त्यांचा आणखी एक विक्रम म्हणचे प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी १९७५-७६ या वर्षांत १५४७ धावा काढल्या. हा त्यांचा विक्रम २३ वर्षे अबाधित होता. ऑन साईडला त्याने मारलेले फटके आकर्षक असत. क्रिकेटच्या त्यांच्या या योगदानाबद्दल १९७३ मध्ये विस्डेनतर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेमनेही त्यांना गौरविले. १९८४ साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. चॅपेल यांनी २००५ ते २००७ या काळात भारतीय संघाला प्रशिक्षण दिले होते.

    त्यांनी या काळात बरेच प्रयोग केले. मात्र, यात कुठल्याही निष्कर्षाप्रत आले नाहीत. त्यामुळे २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत संघ पहिल्याच फेरीत गारद झाला. त्यानंतर त्यांनी हे पद सोडले. त्या दरम्यान धोनी हा क्रिकेट कारकिर्दीत नव्याने पाऊल ठेवले होते. त्यावेळी चॅपेल यांचे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद होते. यामध्ये तत्कालिन संघाचा कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश होता. ग्रेग चॅपेल यांनी समालोचक म्हणूनही काम पाहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • सोन्या काशिनाथ पाटील

    सोन्या पाटील यांचे नाव आज तळागाळातील लोकांच्या तोंडावर चांगलेच रुळलेले दिसते, कारण आदिवासी वस्त्यांमध्ये काम करून तिथल्या जनतेची होईल ती सेवा करण्याचा व या जनतेचे राहणीमान उंचावण्याचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे जोपासला आहे.

    सोन्या पाटील यांचा जन्म वेहेळे गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आज राजकारणामध्ये ते सक्रिय असले तरी पहिल्यापासून त्यांचा खरा ओढा हा समाजकारणाकडे होता. “समाज कल्याण न्यास” या भारत सरकारच्या उपक्रमामुळे एकत्रित आलेल्या संघटनेने त्यांच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने वळण दिले. या संघटनेच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला पुर्णपणे समाजसेवेमध्ये झोकून दिले. बालकामगारांसाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या असून हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. कापड उद्योगात सर्वाधिक बाल कामगार असतात हे ताडून, त्यांना शिक्षण उपलब्ध करुन पुढे स्वावलंबी बनविण्याचा प्रभावी प्रयत्न सोन्या पाटीलांनी केला.

    “समाज कल्याण न्यास संस्थे”च्या विद्यमाने त्यांनी तत्काळकालीन व मोफत रूग्णवाहिका सेवादेखील सुरू केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वाडा, जव्हार, मोखाडा इत्यादी आदिवासी पाडयांना भेटी देवून त्यांना कपडे, धान्य, मिष्टान्न, औषधे, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य अशा जीवनावश्यक गोष्टींचे ते वाटप करतात. विविध सणांच्या प्रसंगी ते या आदिवासी वस्त्यांमधील मुलांसोबत राहून आनंद द्विगुणित करतात. सरकारच्या कल्याणकारी योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सोन्या पाटील यांच्याकडून झालेला दिसून येतो.

    विद्यार्थ्यांमध्ये खिळाडू वृत्तीचा व विविध कलांचा विकास व्हावा यासाठी मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला, निबंध, नृत्य, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे . एक कुशल व्यावसायिक आणि उद्योगाचे मालक असण्यासोबतच, अनेक सामाजिक, शैक्षणिक तसंच सांस्कृतिक व उद्योग संस्थांचे अध्यक्ष व महत्त्वाची पदं सोन्या पाटील यांनी भुषवली आहे.

  • संस्कृती – संस्कृती बालगुडे

    वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीचं प्रतीक. मोठय़ा उत्साहानं आणि जोशानं साजरा केला जाणारा सण. सणाचं हेच औचित्य साधून मला फोटोशूट करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. शूटसाठीच्या मॉडेलचा माझा शोध सुरू झाला. त्यात मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशा कलावतीच्या मी शोधात होतो. ही शोधमोहीम संपली आणि मी थेट फिल्मसिटीत पोहचलो ते पाडव्याच्या फोटोशूटसाठी. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया संस्कृती बालगुडे हिचं फोटोशूट यानिमित्तानं मी केलं. हिरव्या बॅकग्राऊंडवर बेतलेलं, संस्कृती बालगुडेचा मराठमोळा सात्त्विक चेहरा आणि उभारलेल्या गुढीचं पूजन हे सारं एकीकडे कॅमेराबद्ध करत असतानाच दुसरीकडे शूटच्या वेळच्या अनेक आठवणी तेव्हा माझ्या शिदोरीत जमा होत होत्या.

    संस्कृती बालगुडेची नि माझी ही पहिलीच भेट होती. चंद्रकांत गायकवाड या नामांकित तरुण दिग्दर्शकानं ही भेट खरंतर घडवून आणली होती. अवघ्या एक दिवस आधी हे शूट आम्ही ठरवलं होत. वेळेअभावी फारसं शूटचं नियोजन आम्हाला करता आलं नव्हतं. एरव्ही एखाद्या सणासाठीच शूट करायचं झालं तर त्याची फार जय्यत तयारी करावी लागते. कलावतीचा शृंगार, पेहराव, दागिने, शूटसाठीचा लूक आणि मग हे शूट तडीस नेण्यासाठी रंगभूषा, वेशभूषा साकारण्यासाठी लागणारे आर्टिस्ट, प्रॉपर्टी अशा नानाविध बाबींच पूर्वनियोजन करून मगच शूट आयोजित केलं जातं. मात्र वेळेअभावी भेटून, ठरवून हे शूट काही आम्हाला करता आलं नाही. सारं काही ठरलं ते फोनवर. नेमकं शूट कसं असेल, त्यासाठी काय अपेक्षित आहे, लूक कसा असेल, काय प्रॉपर्टी असेल हे सारं मी आणि संस्कृतीनं फोनवरच ठरवलं होतं. तेव्हा ‘पिंजरा’ या मालिकेत संस्कृतीची मध्यवर्ती भूमिका होती. याच मालिकेच्या सेटवर मी आणि संस्कृती भेटलो. संस्कृतीसोबत तिची आईदेखील होती.

    सेटवर शूट असल्याने मेकअप, हेअर आणि कॉश्च्युम यासाठीची तयारीत आम्हाला फारसं लक्ष घालावं लागलं नाही. या मालिकेत संस्कृतीचा जो पेहराव होता त्याच पेहरावात आम्ही फोटोशूट केलं. सेटच्या आवारात असलेल्या झाडांच्या हिरव्या बॅकग्राऊंडवर आम्ही हे शूट केलं. एकीकडे मालिकेचं शूट सुरू असल्याने आम्हाला या वेळी फार कमी वेळ मिळाला होता. आतून संस्कृतीला सारखा आवाज दिला जात होता. मात्र संस्कृतीचं सगळं लक्ष फोटोशूटकडे होतं. तिचा चेहरा फार बोलका होता. संस्कृती गुढीची पूजा करत असतानाचे हावभाव, तिचा हसरा-मोहक चेहरा मी कॅमेराबद्ध करत होतो. मोजक्या वीस-पंचवीस मिनिटांत हे शूट आम्ही केलं. या वेळी संस्कृतीच्या भावमुद्रा फार महत्त्वाच्या होत्या. अन्यथा हे शूट पूर्ण करणं शक्य झालं नसतं. इतक्या कमी वेळात, एका मालिकेतल्या आपल्या मध्यवर्ती भूमिकेतून बाहेर पडून मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया मराठमोळ्या स्त्रीच्या भूमिकेत जाऊन त्या भूमिकेला न्याय देणं हे संस्कृतीला या वेळी उत्तम जमलं होतं. इथेच एका कसदार कलाकाराचं लक्षण या वेळी संस्कृतीत मला पाहायला मिळालं.

    या शूटनंतर आमची दुसरी भेट झाली ती स्टुडिओ शूटच्या निमित्ताने. मराठमोळा चेहरा अशीच या शूटचीदेखील थीम होती. मात्र या वेळी शूटचं नियोजन उत्तम करता आलं होतं. मला हवा तेवढा वेळ या शूटसाठी मिळणार होता. कोणतेही निर्बंध नव्हते. कसलीही घाई नव्हती. संस्कृतीनेही शूटसाठीचा वेळ राखून ठेवल्याने त्याचा शूटसाठी फायदाच झाला होता. स्टुडिओतलं शूट असल्याने लायटिंगवर ताबा मिळावणं शक्य होत. शूटसाठीची थीम संस्कृतीशी बोलून मग त्यानंतर कॉश्यूम, मेकअप, हेअर आणि दागिने हे सर काही संस्कृतीला शूटच्या आधी माझ्या टीमनं सांगितलं होतं. संस्कृतीलाही ही थीम आवडली होती. त्यामुळे शूट चांगलं होईल अशी आकांक्षा मला होती.

    शूटसंबंधित संस्कृतीशी बोलून आम्ही ठरल्याप्रमाणे शूटला सुरुवात केली. संस्कृतीचा लोभस चेहरा, तिने केलेली पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने हे सारं काही कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं. या वेळी ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाइट पोर्ट्रेट्समध्ये संस्कृती अधिक खुललेली दिसत होती.

    तीन-साडे तीन तासांअंती हे शूट धम्माल मस्तीत संपलं खरं. मात्र या वेळच्या अनेक आठवणी आजही कायम आहेत. वेळेच्या गणितात बांधली गेलेली आणि वेळेच्या साच्यात न अडकलेली अशा दोन्ही भिन्न वेळेची संस्कृती मी कॅमेराबद्ध केली आहे. दोन्ही वेळी मला शूटला न्याय देणारी कलावती हवी होती. आणि ती कलावती साकारण्यात संस्कृती यशस्वी ठरली.

    धनेश पाटील

  • उत्कर्ष प्रकाशन’ चे सु. वा. जोशी

    वर्ष १९५७... वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. होताहोता पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि ही वाटचाल तब्बल पन्नास वर्षे करीत तो आज आघाडीचा पुस्तक प्रकाशक व पुस्तक विक्रेता बनला आहे.

    'उत्कर्ष प्रकाशन'च्या सुधाकर उर्फ सु. वा. जोशी यांची ही कहाणी. प्रकाशन जगतात “सु. वा” या नावाने प्रसिद्ध असलेल्या जोशी यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, तसंच पुस्तकांवरील जिवापाड प्रेम याच्या जोरावर हा महाकाय पसारा उभारला. .

    लक्ष्मी रस्त्यावरील हा संसार कालांतराने त्यानी डेक्कन परिसरात हलवला. त्यांची धडपड पाहून एका पुणेकराने त्यांना खोके भाड्याने दिले. पानशेतच्या पुरात मात्र त्याची दोन-तीन कपाटे भरलेली पुस्तके वाहून गेली. नंतर डेक्कन येथेच त्यांना कायमस्वरूपी जागा मिळाली.

    १९७१ मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित केले ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांचे “कोवळे दिवस”. पुस्तकांची त्यांची आवड पाहून त्यांच्याकडे कवयित्री शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, रविंद्र पिगे वगैर साहित्यिक नियमितपणे येत असत. त्यांचीही काही पुस्तके जोशींनी प्रकाशित केली.

    सुनील गावसकरचे 'सनी डेज', गंगाधर गाडगीळ यांचे 'खडक आणि पाणी', व्यंकटेश माडगूळकरांचे ' काळं आई', वसंत पटवर्धनांचे 'आर्य' अशा अनेक गाजलेल्या पुस्तकाचा त्यात समावेश आहे.

    आतापर्यंत त्यांनी तब्बल पंधराशे पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. सुमारे वीस लाख रुपयांची पुस्तके ते दरवर्षी विकतात.

    -- मराठीसृष्टी टिम

  • मारोतराव कन्नमवार

    मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते.

  • थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर

    थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात.

    केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.

    बा.सी.मर्ढेकर यांची ग्रंथसंपदा: रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्याि आणि ‘सौंदर्य आणि साहित्य’ ‘वाड्मीयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत. बा.सी.मर्ढेकर यांचे २० मार्च १९५६ साली निधन झाले.

    बा.सी. मर्ढेकर
    दवांत आलीस भल्या पहाटी
    शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    तरल पावलांमधली शोभा

    अडलिस आणिक पुढे जराशी
    पुढे जराशी हसलिस; - मागे
    वळुनि पाहणे विसरलीस का?
    विसरलीस का हिरवे धागे?

    लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
    सुंदरतेचा कसा इशारा;
    डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
    सांग धरावा कैसा पारा!

    अनोळख्याने ओळख कैशी
    गतजन्मीची द्यावी सांग;
    कोमल ओल्या आठवणींची
    एथल्याच जर बुजली रांग!

    तळहाताच्या नाजुक रेषा
    कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
    तांबुस निर्मल नखांवरी अन
    शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

    दवांत आलिस भल्या पहाटी
    अभ्राच्या शोभेत एकदा;
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    मंद पावलांमधल्या गंधा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे

    प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.

    इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्‌. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.

    ‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्‌.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.

    १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला.

    ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र ’ एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह. इरावतीबाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी.

    संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते.

    इरावती कर्वे यांनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.

    समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.

    ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.

    ’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.

    मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते – असे त्यांचे पाठांतर होते. इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट