मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते. घरोघरी वृत्तपत्रे विकणारा, रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस म्हणून काम करणारा, चंद्रपूरसारख्या अतिदुर्गम भागातून आलेला एक सामान्य माणूस उदंड इच्छाशक्ती आणि कठोर परिक्षमाच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही घटना निश्चितच प्रेरणादायी आहे.
मारोतराव कन्नमवार हे समाजातील अगदी तळाच्या वर्गातून स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेतृत्व होते. ते केवळ थोर देशभक्तच नव्हते, तर धुरंधर राजकारणी, हाडाचे पत्रकार, प्रतिभावंत साहित्यिक, उत्तम खेळाडू, व प्रभावी वक्ते होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी महत्वाचे संरक्षण प्रकल्प महाराष्ट्रात आणले. ओझरचा मिग विमान कारखाना, वरणगांव, भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने त्यांच्या अचूक प्रयत्नामुळे महाराष्ट्रात आले. आज क्रांती घडवून आणणार्या वाशी येथील खाडीपुलाची कल्पना ही कन्नमवारांचीच देण आहे. चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले वातावरण राष्ट्रीय प्रवृत्तीने भारुन टाकण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी त्याकाळी संरक्षण निधीसाठी तब्बल ७ कोटी ९१ लाख ५५ हजार रुपये जमा केले होते. एकूणच त्यांची कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमस्वरुपी ठसा उमटवून गेली.
## Marotrao Kannamwar