(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • चेहऱ्याची जादू – स्मिता शेवाळे

    स्मिता शेवाळे… विलक्षण बोलका, भावदर्शी चेहरा ही तिची ओळख…

    केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा मिळाला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच या सिनेमाचं यश सांगता येईल. यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. अनेक मराठी सिनेमे, मालिका यातील अभिनयातून तिने रसिकमन जिंकलं…

    रुपेरी पडदा आणि छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयातून रसिकमन जिंकलेल्या स्मिताला काहीकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं ते तिच्या वैयक्तिक कारणामुळे. लग्नानंतर बराच काळ तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आई, पत्नी, सून, मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपांना न्याय देता देता स्मिताची दमछाक झाल्याचं ती सांगत असतानाच हा ब्रेक अवघ्या अडीज ते तीन वर्षांत संपवून तिने नव्या जोमाने आणि ताकदीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. ‘कनिका’ या हॉरर चित्रपटातून तिने साकारलेल्या छोटय़ा मात्र ठळक भूमिकेमुळे तिच्या अभिनयातले वेगळे पैलू पाहायला मिळाले.

    स्मिताने इंडस्ट्रीत ब्रेक घेण्यापूर्वी म्हणजेच २०१४ साली तिचे फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. शूट नेमकं काय असेल, त्याचा लूक कसा असेल हे स्मिताशी बोलून शूटची तारीख नक्की करण्यात आली. स्मिताचा सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा लक्षात घेऊन तिच्यासाठी वेशभूषा, त्यातील रंगसंगती, दागिने, मेकअप, हेअर हे सारं काही ठरवण्यात आलं होतं. स्मिताशी माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरने त्यासंबंधित संपर्क करून नेमका तिला कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल याचा अंदाज दिला होता. शूटच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि शूटला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा, कलाकुसरीने सजलेले दागिने, त्यावरचा मराठमोळा साज आणि नयनरम्य शृंगार यातून स्मिताचा मोहक चेहरा अधिकच उठून दिसत होता. स्मिताच हे लोभस रुपडं मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं.

    वृत्तपत्रासाठी हवे असलेल्या फोटोंचा साचा ठरलेला होता त्यानुसार सुरुवातीला वृत्तपत्राची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच मराठमोळ्या पेहरावात फुल लेन्थ, मिड लेन्थ, हेडशॉटस असे काही फोटो घेतले. फ्लॅट लायटिंग करून फोटो टिपल्यानंतर स्मिताच्या चेहऱयाचे वेगळ्या लायटिंगमध्ये काही फोटो मला टिपता आले. यावेळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो टिपण्याचा मोह मला आवारात आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाईट पोट्रेट्समध्ये स्मिता अधिक खुललेली दिसली. शूट सुरू होऊन साधारणपणे तीन तास झाले असावेत. स्मिताचे पारंपरिक वेषभूषेतले फोटो टिपल्यानंतर तिचे मॉडर्न लूकमधले फोटो टिपण्यासंबंधित तिच्याशी मी बोललो. स्मिताला संकल्पना आवडली आणि आम्ही लगेच छोटा ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीला लागलो.

    माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरशी बोलून आम्ही लगेचच तिच्यासाठीचा नवा मॉडर्न लूक ठरवला. लाल रंगावर काळ्या रंगाची डिझाईन असलेला वनपीस स्मितासाठी यावेळी आम्ही निवडला. आधीच्या पारंपरिक वेशभूषेला संपूर्णपणे तडा देणारा हा तिचा लूक होता. यासाठी तिला मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं काही नव्याने करायला साधारणपणे दीड तास गेला. स्मिता या मॉर्डन लूकमध्येही अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या बोलक्या चेहऱयाने हा लूकदेखील तितकाच खुलवून आणला होता.

    स्मिता शूटच्यावेळी मदतशीर होती. तिला सांगितलेले पोजेस ती देत होतीच शिवाय त्यात वेगळेपणा कसा आणता येईल यासाठीही तिची धडपड सुरू होती. सुरुवातीला तिचे काही रंगीत फोटो टिपल्यानंतर लायटिंग बदलून ड्रमॅटिक म्हणजे प्रकाश आणि सावलीचा खेळ करून केलेल्या लायटिंगमध्ये तिचे काही ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो मी टिपले. यापूर्वीच्या शूटच्यावेळी स्मिताच्या पेहरावाला अनुसरून तिचा शृंगार केला होता. कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली, गळ्यात भव्य हार, दागिने, नाकात नथ असा सारा शृंगार असलेल्या स्मिताचा चेहरा मी आधी टिपला होता. यानंतरच्या मॉर्डन लूकमध्ये मात्र तिने काहीच शृंगार केला नव्हता. तरीहीदेखील तिचा हा चेहरा आधीच्या चेहऱयाएवढा किंबहुना त्याहून अधिक खुललेला दिसत होता, हे विशेष. तिच्या ही चेहऱयाची जादू यावेळी मला अनुभवता आली.

    स्मिताचं शूट सुरू करण्यापूर्वी मेकअपच्यावेळी स्मिताशी मनमुराद गप्पा झाल्या. केदार शिंदेचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा म्हणजे तिच्यासाठी अभिनयाची कार्यशाळाच ठरल्याचं ती सांगते. मोजके सिनेमे ठरवून करणाऱया कलाकारांपैकी एक अशी स्मिताची ओळख करून देता येईल. कोणताही सिनेमा निवडण्यापूर्वी त्या सिनेमाचा अभ्यास, त्यातील बारकावे लक्षात घेऊन मगच ती सिनेमे निवडते आणि एकदा का सिनेमा निवडला की मेहनत घ्यायची तिची तयारी असते हे तिच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवत होते.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर

    बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली.

  • गझल गायिका पिनाज मसानी

    डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

  • भावकवी गंगाधर महांबरे

    गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. पुढे ते पुण्यास राहू लागले. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे भावगीतकार व चित्रपटगीतकार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

    उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. आजही रसिकांच्या मनात त्या घोळत आहेत. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली होती. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत. त्यांची कित्येक गीते आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके इत्यादी नामवंत गायक- गायिकांनी गाऊन महांबरे यांच्या गीतरचनांना योग्य तो न्याय दिलेला आहे.

    सुप्रसिद्ध नाटककार व बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक मालवणचे नामवंत साहित्यिक भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जीवनपट चितारणारे ‘एक अविस्मरणीय मामा’ हा छोटासा चरित्रग्रंथ महांबरे यांनी लिहिला आहे. याशिवाय ‘चार्ली चॅप्लीन’,‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मॉरिशस’, ‘मराठी गझल’ इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय आकाशवाणीचे एक मान्यवर गीतकार म्हणून त्यांचे आकाशवाणीसाठी योगदान आहे. चित्रपट रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीमुद्रिका, संगीत मैफल, कॅस्टेस् आणि आता सी. डी. इत्यादी माध्यमांनी कवी मा.गंगाधर महांबरे यांच्या गीतांचा अनुरुप उपयोग करून घेतला आहे. ‘रसिका तुझ्याच साठी’ या त्यांच्या गीताची ध्वनिमुद्रिका एका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती.

    नवी दिल्ली येथील नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलने त्यांना १९८३ साली पोएट ऑफ दि इयर हा सन्मान दिलेला असून गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अन्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. मा.गंगाधर महांबरे यांचे २२ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कवी आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर

    गोविंद वासुदेव कानिटकर हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना चित्रकला आणि संगीतातही गती होती.
    त्यांनी काही दीर्घकाव्यं लिहिली होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १८५४ पुणे रोजी झाला. कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६ मध्ये ते बी.ए. झाले.

    एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्‍नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. स्वतः गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.

    अकबर बादशाह, श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध, संमोहलहरी अशी दीर्घकाव्यं आणि कविकूजन हा त्यांच्या कवितांचा संग्रह, तसंच ‘भट्ट मोक्षमुल्लर कृत धर्मविषयक व्याख्याने’ हे व्याख्यानांचं भाषांतर प्रसिद्ध आहे. मॅक्समुल्लरच्या व्याख्यानांचं भाषांतर करताना त्याच्या नावाचे ‘मोक्षमुल्लर’ असं मराठीकरण त्यांनी केले होते.

    शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’, ‘कोरिओलेनस’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे, तसंच जॉन स्ट्युअर्ट मिलच्या ‘सब्जेक्शन ऑफ वूमन’चे त्यांनी केलेले अनुवाद गाजले होते. १९०६ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गोविंद वासुदेव कानिटकर यांचे ४ जून १९१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

    एकनाथ रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत, बंगाली, गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.

  • दादा धर्माधिकारी

    सर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.

  • भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम

    मांगते चुंगनेजंग मेरी कोम उर्फ मेरी कोमचा मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये, असे वाटू लागले.

  • गुलजार

    हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९४३ रोजी झाला.

    गुलजार यांचे खरे नाव संपूर्णासिंह कालरा! चित्रपटसृष्टीत नाव चमकण्यापूर्वी संपूर्णानंद सिंह कालरा हे मोटार मेकॅनिक होते. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर प्रेम केले, जीवतोड केले, शायरीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, रात्ररात्र जागून काढल्या. खाजगी आयुष्यात वादळं आलीत, तरी गुलजार यांनी शायरी कधीच थांबवली नाही. स्वत:च्या बायकोपेक्षाही त्यांनी शायरीवर जास्त प्रेम केलं. उच्च कोटीची, प्रचंड भावनाप्रधान असलेली शायरी त्यांनी लिहिली. लोकजीवनाशी जुळलेल्या वैविध्यांनी नटलेल्या रचना गुलजार यांनी रचल्या.

    लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला खास ठसा मा.गुलजार यांनी चित्रपटसृष्टीत उमटवला. गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या १९६२ सालच्या ‘बंदिनी’ पासून सिनेकारकीर्दीला प्रारंभ केला होता. बिमल रॉय हेच त्यांचे गुरू! संपूर्णानंदाचा गुलजार कसा झाला? याची कहानी रंजकच आहे. ‘मेरे साजनऽ है उस पार...’वाले ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन एकदा मोटार मेकॅनिक असलेल्या संपूर्णानंदाकडे गाडी सुधरविण्यासाठी आले होते. संपूर्णानंदाशी बोलता बोलता त्याच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनदांनी हेरली. सचिनदा तेव्हा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’साठी काम करीत होते. बंदिनीचे गीतकार शैलेंद्र होते. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यावर शैलेंद्र यांचे कोणतेच गीत बिमल रॉय यांना हजम होत नव्हते. अशा स्थितीत सचिनदांना संपूर्णानंदाची आठवण आली आणि संपूर्णानंदाची बिमल रॉय यांच्याशी भेट घालून देण्याचा निश्चतय त्यांनी केला. परंतु, अडचण अशी होती की, बिमलदा कुणाचेही म्हणणे सहजतेने कधीच स्वीकारत नव्हते. सचिनदांनाही आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत असे. ‘‘जे होईल, ते होईल, पाहू पुढची पुढं,’’ म्हणत त्यांनी संपूर्णानंदाची भेट बिमल रॉय यांच्याशी घालून दिली व आश्चनर्य म्हणजे, संपूर्णानंदामधील प्रतिभा पाहून ते देखील प्रभावित झाले आणि ‘बंदिनी’चे गाणे संपूर्णानंदांना मिळाले. ‘मोरा गोरा अंग लई ले... मोहे श्याम रंग देई दे, छुप जाऊंगी रात ही मे, मोहे पी का रंग देई दे...’ हे गाणं संपूर्णानंदानं रचलं आणि हे गाणं एवढं हिट झालं की, ते रसिकांच्या ओठी आजही आहे. लतादीदींनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आणि एस.डींनी चढवलेला संगीतसाज, यामुळं हे गाणं अधिकच नटलं. हे गाणं हिट होताच संपूर्णानंद रातोरात हिट झाले व ‘गुलजार’ हे नाव देशभरात पोहोचलं. यानंतर गुलजार यांना बिमल रॉय यांनी आपला सहायक बनविले. म्हणून गुलजार हे बिमल रॉय यांना आपला गुरू मानतात.

    बिमल रॉय यांच्या मृत्यूनंतर गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम केले. ही जोडी चित्रपटसृष्टीत यशस्वी जोड्यांपैकीच एक महत्त्वाची जोडी आहे. हृषीकेशदांसाठी गुलजार यांनी सर्वप्रथम संवाद ‘आनंद’साठी लिहिलेत. ‘आनंद’साठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर मिळाला होता. या चित्रपटातलं मुकेश यांच्या आवाजातलं राजेश-अमिताभ या दोन सुपरस्टार्सवर चित्रित ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...’ गुलजार यांच्या कलमातूनच रचलं गेलं होतं. हृषीदांसोबत गुलजार यांनी बावर्ची, गुड्डी, मिली, नमक हराम, गोलमाल, अभिमान यांसारखे चित्रपट केलेत. मात्र, या जोडीला नजर लागली. नंतर दोघांमध्ये मतभेद झालेत व ‘यापुढे सोबत काम करायचे नाही,’ असा निर्णय त्यांनी घेतला. गुलजार यांनी स्वतंत्र मार्ग निवडला. त्यांनी स्वत: चित्रपट निर्मिती करायला प्रारंभ केला. स्वत:च्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गुलजार स्वत:च लिहायचे.

    संजीव कुमार आणि जया भादुरी हे दोघेही त्यांचे आवडीचे कलावंत! या दोघांच्या सुंदर अभिनयाने नटलेला ‘कोशिश’ हा गुलजार यांचाच चित्रपट होता. ‘कोशिश’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजीव कुमार यांच्यासोबत गुलजार यांनी ‘आँधी’, ‘मौसम’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘अंगूर’, ‘नमकीन’ असे चित्रपट केले. याशिवाय त्यांनी जितेंद्र, विनोद खन्ना, अमोल पालेकर, नसिरुद्दिन शहा आदी कलांवतांसोबतही चित्रपट बनविले. ‘परिचय’मध्ये ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्रला त्यांनी घेतले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जितेंद्र यांची इमेज पाहता ते गंभीर अभिनय करूच शकणार नाही, असा सर्वांचाच कयास होता. गुलजार यांनी या सर्व कयासांना दूर सारत जितेंद्रला गंभीर भूमिका करायला लावली व जितेंद्र यांनी गंभीर तसेच सुंदर अभिनयाचा ‘परिचय’ देताना भूमिकेचं सोनं करून टाकलं. ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाणा...’ हे गाणे अजूनही तोंडावर आहे.

    ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी यांच्याशी गुलजार यांचं नातं भावनात्मक होतं. मीनाकुमारीने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व डायऱ्या आणि शायरी गुलजार यांना सोपविली होती. गुलजार यांनी त्यावर संपादकीय संस्कार करून तिची शायरी प्रकाशित करण्याचे पुण्याचे काम केले. ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर मीनाकुमारीशी त्यांची भेट झाली होती. तेव्हा गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक होते. गुलजार यांनी मीनाकुमारीला ‘मेरे अपने’मध्ये झळकवले होते. मीनाकुमारीने १९७२ साली जीवनयात्रा संपविली होती. मात्र, मीनाकुमारीच्या आठवणींनी ते आजही व्याकुळच होतात. ‘कोई होता जिसको अपना, हम अपना कहलाते यारो...पास न सही दूर ही होता, लेकिन होता कोई अपना...हे ‘मेरे अपने’तलं गुलजार यांचं गीत भावदर्द जागवतात.

    १९८८ साली ‘मिर्झा गालिब’ व ९३ साली ‘किरदार’ या छोट्या पडद्यावरील मालिका त्यांनीच केल्या होत्या. ‘चौरस रात (लघुकथा संग्रह)’, ‘जानम’ (कवितासंग्रह ) एक बूंद चॉंद (कवितासंग्रह), रावी पार (कथासंग्रह), रात चॉंद और मै, रात पश्मीने की, खराशें आदी त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले गुलजार यांचे योगदान वाघाचे आहे आणि त्यांना ‘भारतीय शायरीचं विद्यापीठ’चं म्हणायला हवं! चित्रपटाकडून ते आता त्याच्या पहिल्या प्रेमाकडे- साहित्याकडे वळले आहेत. केवळ स्वत:च्या लेखनापाशी न थांबता ते आता दुसऱ्यांच्या साहित्यातही लक्ष घालता आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचा अनुवाद केला आहे. ते लेखक म्हणून जगत नसतात आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो.

    सत्तरीच्या आसपास तो कॉम्प्युटर शिकले आणि आता ते रोज इंटरनेट वापरतात. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्यांचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे. त्यांना उत्तमोत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. डायबेटिसमुळे बंगाली मिठाई खाता येत नाही, हे त्यांचे दु:ख आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट
    https://www.youtube.com/watch?v=F3hX-yNPb2E