(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मिलिंद तुळाणकर

    जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.

  • संगीतकार अशोक पत्की जिंगल्सचा राजा

    पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!

    अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/

    # Patki, Ashok

  • कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया

    त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड ॲ‍टनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा होता.

  • (कॉ.) गंगाधर चिटणीस

    सरंजामशाही आणि जमीनदारशाहीच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारून या दोन्ही शाह्या समूळ संपविण्याचा विडा उचलेल्या सर्वहारा वर्गाचे ते एकनिष्ठ पाईक असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या घरातच दोन पिढय़ा अगोदपर्यंत या दोनही शाह्या सुखनैव नांदत होत्या. वडील राजनिष्ठ सेवक होते आणि विद्यार्थीदशेत अत्यंत आज्ञाधारक असलेला गंगाधर चिटणीस एकदम दुसऱ्या टोकाच्या विचारांचा गिरणी कामगारांच्या सुखदु:खाशी समरस होत गेला. हे अतक्र्य घडविले साने गुरूजींनी.

    ‘समाजासाठी आणि देशासाठी जगा’ हा साने गुरूजींचा संदेश त्यांनी आत्मसात केला आणि एका क्षणात सुखाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी कामगारांशी आपले नाते जुळवले ते अखेपर्यंत! अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे १९२७ मध्ये जन्म झालेल्या कॉ. गंगाधर चिटणीस यांचे शिक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले आहे.

    सावंतवाडी, पुणे, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुण्याला गेले. गंगाधरचे वडील राजापेक्षा राजनिष्ठ असे होते. त्यांना आपल्या मुलानेही तसेच व्हावे असे वाटत होते. विद्रोही वातावरणापासून त्यांनी मुलांना कटाक्षाने दूर ठेवले असले तरी इंग्रजी पाचवीपर्यंत मुंबईत शिक्षण घेत असताना गंगाधरच्या एका शिक्षकामुळे त्याचा रा. स्व. संघाच्या शिवाजी पार्कच्या शाखेशी संबंध आला होता. पण संघाच्या शिकवणुकीविषयी त्यांचा भ्रमनिरास झाला आणि नंतर वडिलांच्या बदलीमुळे त्यांचा संघाशी असलेला संबंध कायमचा तुटला. पुन्हा ते मुंबईत आले पण तेव्हा त्यांच्या विचारांवर मार्क्‍सवाद आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेमध्ये अ‍ॅडव्हान्स बँकींगमध्ये ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांना सरकारी नोकरी मिळाली तीही निर्वासितांचे अश्रू पुसणारी.

    स्वातंत्र मिळाल्यावर देशातल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करताना आपल्या समाजातील विषमता त्यांना सतत डाचत होती आणि त्याचवेळी साने गुरूजींच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत होता. एका क्षणी त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि नोकरी सोडून कम्युनिस्ट पक्षात ते दाखल झाले. मार्क्‍सवादी साहित्य संपूर्णपणे वाचून पूर्ण विचारांती कम्युनिस्ट पक्षात दाखल झालेल्या चिटणीसांची नाळ गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढयाबरोबर अधिक घट्ट होत गेली. १९५२ मध्ये पक्षात आल्यावर त्यांनी कॉ. डांगे यांच्या बरोबर आयटकच्या कामात स्वत:ला झोकून दिले आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली.

    गिरणी कामगारांच्या संपामध्ये गिरणगावातील अनेक गिरण्यांच्या दरवाजावर संपफोडय़ांचे हल्ले झेलत, कामगारांना आपली भूमिका पटवून देण्यात चिटणीसांचा हातखंडा होता. शिवसेनेच्या उदयानंतर त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी गिरणी कामगार युनियन आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे काढण्यात आलेल्या ‘लाल बावटा’ या मुखपत्राचे संपादन चिटणीस यांनी केले होते. गिरणी कामगारांचे बोनसचे लढे असोत किंवा क्षणिक एखाद्या मुद्यावरून एखाद्या गिरणीत अचानक आंदोलन झालेले असो, चिटणीस तेथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असत.

    कमला मिल असो वा मधुसूदन मिल तेथील कामगारांना आजही पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षांत चिटणीसांनी बजावलेली समन्वयाची भूमिका लक्षात आहे. अनेकदा हल्ले झाल्यावरही त्याच नेटाने आपली ‘गेट मिटींग’ पूर्ण करणारे चिटणीस पंक्षातर्गत वादामध्ये कधी पडले नाहीत. पक्षाचा आदेश कायम मानणारे आणि प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालून तो आदेश शेवटपर्यंत पाळणारे, असे ते एकनिष्ठ पदाधिकारी होते. गिरणी कामगार युनियनच्या स्थापनेपासून किंबहुना त्या अगोदरपासून त्यांनी गिरणी कामगारांची लढाई पाहिली होती.

    १९७१ ते २००० पर्यंत तब्बल २९ वर्षे ते मुंबई गिरणी कामगार युनियनचे कार्यवाह होते. पक्षांतर्गत मतभेद असले तरीही त्यांनी भावनिक आणि वैचारिक पातळीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली नाळ कधीही तोडली नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणही जवळून अभ्यासलेल्या साम्यवादी नेते आणि कार्यकर्त्यांच्या पठडीतले ते होते. कामगारांच्या सर्व संघटना एकत्र करून पुन्हा एक मोठी लढाई उभारण्याची त्यांची मनीषा होती, पण ती त्यांची मंझिल दूरच राहिली.

    आठ वर्षे प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना इस्पितळात दाखल केले तेव्हाही ते आपल्या मंझिलबाबत आशावादी होते. इतक्या सरळ मनाचा, इतका नि:स्पृह आणि इतक्या निस्वार्थीपणे आपले जीवन, ध्येयासाठी पूर्णपणे वाहून टाकणारा असा हा कॉम्रेड होता. त्यामुळेच जेव्हा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली तेव्हा आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना पक्षातच टीकेचे लक्ष्य केले गेले, तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या. परंतु ते वैचारिक आणि धोरणात्मक वादामध्ये सहसा पडत नसत आणि आपला लाल ध्रुव तारा कधीतरी अवघ्या जगावरती त्याची प्रभा पसरवेल असा आत्मविश्वास त्यांना अखेपर्यंत होता. त्यामुळेच अनेकदा जागतिक पातळीवरती साम्यवादी देशांना व विचारांना पीछेहाट सहन करावी लागली तरी ते खचून गेले नाहीत.

    भविष्य कामगार आणि कष्टकरी वर्गाच्याच हातात आहे अशी खात्री त्यांना होती आणि ती मनात ठेऊनच ते चिरंतनात विलिन झाले.

  • अनंत जोग

    अनंत जोग – मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेला खलनायक. आतापर्यंत अनंत जोग यांनी  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात कामं केली. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मध्ये त्याने खलनायकाचे वेगवेगळे पैलू त्याच्या अभिनयातून दाखवून दिले.

  • गजानन मुळे

    गजानन मुरलीधर मुळे यांचा जन्म ९ मे १९८३ मध्ये लातुर येथे झाला. ‘कधीच इथे मी’ ह्या त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहाला नुकताच राजकीय स्तरावरील काव्यलेखन सोहळ्यामध्ये, सैला सायनकर यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला.

  • लेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा

    आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

  • आयुष्य पणाला लावणारे संशोधन

    १९०३ साली पदार्थविज्ञानशास्त्रात, तर १९११ साली रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी एरी हिने आपले सारे आयुष्यच संशोधनासाठी पणाला लावले होते. पोलंडमध्ये एका निर्धन परिवारात तिचा जन्म झाला होता. मेरीचे वडील पदार्थ विज्ञानशास्त्राचेच अध्यापक होते व त्यांनी आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उघडली होती. मेरीची आजारी आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे मेरी सर्व घरकाम सांभाळून वडिलांना प्रयोगशाळेत मदत करायची. प्रयोगशाळेत काम करता करताच तिला विज्ञान आणि त्यातील संशोधनाविषयी आवड निर्माण होत गेली. पोलंडमध्ये त्या वेळी असलेल्या जुलमी सत्तेविरुद्ध क्रांतिकारकांनी बंड उभारले होते. देशभक्त मेरी क्रांतिकारकांच्या सभांनाही उपस्थित राहायची. मात्र सरकारला याची कुणकुण लागली व मेरीला अटक होण्याची वेळ आली. मात्र, यामुळे आपल्या विज्ञानाच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मेरी पोलंड सोडून परिसला गेली. सुरुवातीला तेथे तिला अतिशय कष्टात दिवस काढावे लागले. एका प्रयोगशाळेत ती तेथील बाटल्या धुण्याचे काम करीत असतानाच ' पियरे क्युरी ' या वैज्ञानिकाशी तिचा परिचय झाला व पुढे मेरीने त्यांच्याशीच विवाह केला. विवाहानंतर मेरीने पियरे करी यांना संशोधन कार्यात खूप मदत केली. उभयतांनी १८९८ मध्ये ' पोलोनियम ' चा तर त्यानंतर ' रेडियम ' चा शोध लावला. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दलच त्यांना १९०३ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला. पुढे पियरे क्युरी यांच्या अपघाती मृत्यूनंतर मेरी खूरीने पुन्हा एकदा रेडियममधील आरोग्यदायी शक्तीचा शोध लावला व त्वाबद्दल तिला १९११ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९१४ मधील पहिल्या महायुद्धात मेरी क्युरीने आरोग्य सेविका म्हणून युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची सेवाही केली. त्यानंतर काही वर्षांनी तिचा साचू झाला. तिच्या मृत्युच्या कारणाबाबत डॉक्टरांमध्ये मतभेद होते. वास्तविक रेडियमच्या किरणोत्सर्गानी तिचे सारे शरीर पोखरले गेले होते. एका महत्त्वाच्या संशोधनासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले होते.

  • ई. एस. मोडक

    ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.

    त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.

  • एक आठवण ..स्वरभास्कराची…

    पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग… मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी…