जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला.
वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नण असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले.
कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. ‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’मधून नाटय़रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले.
१० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रजांचे निधन झाले. कुसुमाग्रज यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 10, 2022
या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला आचार्य अत्रे स्वत: उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर अत्र्यांनी केलेल्या भाषणात सदानंद जोशी यांना प्रशस्तिपत्र देताना अत्रे म्हणाले “सदानंद जोशी यांनी मला जिवंतपणी अमर केल आहे.” मी अत्रे बोलतोय!
November 12, 2021
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. ते मॅन्डोलिन वादनात ख्यातनाम. चित्रपट मिळविणे ही त्यांची जबाबदारी. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ट्रम्पपेंटर म्हणून ख्यातनाम. आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडे संगीत वारसा आला. बांधणीत चाल व वाद्यवृंद यांचा मेळ घालणे गरजेचे असते, दोघेही दोन्हींत मातब्बर. बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘चित्रपट संगीता’ला सुरुवात केली तेव्हा शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, रोशन, ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन, सलिल चौधरी, रवी, कल्याणजी-आनंदजी यांचा विलक्षण दबदबा होता. साधा शिरकाव करणे अवघड होते, पण यांनी तर आपली जागा निर्माण केली. पहिल्याच ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. अशा फॅण्टसी चित्रपटाला तेव्हा प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे संगीतकाराला नाव ते काय मिळणार? हरिश्चंद्र तारामती, संत ज्ञानेश्वर अशा चित्रपटांना संगीत देऊन फार काही साध्य होणारे नव्हते. ‘संत ज्ञानेश्वर’मधील ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ हे गाणे गाजले.
१९६४ साली ‘फिल्म फेअर’च्या स्पर्धेत ‘संगम’च्या शंकर-जयकिशनवर मात करून ‘दोस्ती’साठी लक्ष्मीकांत-प्यारेलालनी बाजी मारली आणि चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व प्रसारमाध्यमे या तिन्ही घटकांचे या जोडीकडे लक्ष गेले व ते बराच काळ राहिले. ‘दोस्ती’तील ‘मेरा ज्यो भी कदम है’, ‘राही मनवा दुख की चिंता’, ‘तेरी दोस्ती मेरा प्यार’ अशी सगळीच गाणी हिट ठरली. सिनेमाच्या जगात यशासारखे सुख नाही, पारितोषिकासारखे टॉनिक नाही व वाढत्या मागणीसारखा आनंद नाही. लक्ष्मी-प्यारे यांचा चौफेर संचार सुरू झाला, त्याचे साम्राज्यात कधी रूपांतर झाले हेदेखील समजले नाही. प्यार बाटते चलो, अजनबी तुम जाने पहचाने यह दर्द, भरा अफसाना कैसे रहू चूप की मैने दिल खिल प्यार ब्यार असे करीत करीत मिलन, दो रास्ते, मेरे नसीब अशा चित्रपटांच्या वेळी त्यांनी खूपच मोठी मजल मारली. त्या काळातील त्यांच्या चित्रपटात आये दिन बहार के, कर्ज, पत्थर के सनम, तकदीर, इज्जत, मेरे हमदम, मेरे दोस्त, राजा और रंक, अंजाना, आया सावन झुमके खूप महत्त्वाचे. भारतीय संगीत व विदेशी संगीत यांची युती करताना त्यांनी बऱ्याचदा लोकसंगीतावर भर दिला, तर अनेकदा चित्रपटाचे स्वरूप अर्थात मागणी पाहून ‘चाली’ बांधल्या.
राज कपूर, मनोजकुमार, राज खोसला, मोहनकुमार, चेतन आनंद, विजय आनंद, मोहन सैगल, मनमोहन देसाई, राजकुमार कोहली, जे. ओम प्रकाश, सुभाष घई, के. बालचंदर, बी. आर. चोप्रा, रवी टंडन, दुलाल गुहा, रामानंद सागर, प्रमोद चक्रवर्ती, शक्ती सामंता अशा कितीतरी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत देत आपले आसन बळकट केले, सुभाष घईच्या ‘वैभवा’त लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा वाटा खूप मोठा आहे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम (इडस्ट्रीमधे "येडा करीम" म्हणून ओळखला जाणाऱ्या) हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली होती. या जोडीने बॉलीवुड मध्ये ३५ यशस्वी वर्ष काम केले, ६३५ चित्रपटातील ३५०० च्या वर गाण्यांना संगीत दिले. व तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवली. संगीतकार मा. मा.लक्ष्मीकांत यांचे २५ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 10, 2017
संगीतकार म्हणून तिमिर बरन हे कलकत्ता येथील न्यू थिएटर्सच्या तीन संगीत दिग्दर्शकांपैकी (आरसी बोरल आणि पंकज मलिक) एक होते. त्यांनी १९३५ मध्ये न्यू थिएटर्सच्या देवदास चित्रपटासाठी संगीत दिले. के एल सहगल यांनी गायलेले “बालम आओ बसो मोरे मन में” आणि के सी डे यांनी गायलेले “मत भूल मुसाफिर” ही या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत.
March 29, 2022
तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.
May 19, 2021
आपल्याकडे ज्यूंचे मन आहे, आपल्याकडे ज्यूंची बुद्धिमत्ता आहे आणि आपल्याकडे त्यांची विनोदाची शैलीही आहे, असे स्वतःचे वर्णन करणारे हॉवर्ड जेकबसन हे २०१०चे बुकर पारितोषिकाचे विजेते आहेत. यापूर्वी दोनवेळा ते या पारितोषिकाच्या जवळ आले होते, पण त्यांचे पुस्तक निवडले गेले नाही. 'द फिंक्लर क्वेश्चन' या कादंबरीला २०१०चे बुकर पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यांचे पारितोषिक कदाचित हुकले असते, पण ते त्यांना ३ विरुद्ध २ मतांनी जाहीर झाले. याआधी २००६ मध्ये 'कलुकी नाईट्स' आणि २००२ मध्ये 'हूज सॉरी नाऊ?' या कादंबऱ्यांना ते कदाचित मिळाले असते.
त्यांना हे पारितोषिक मिळत असल्याने ते विल्यम गोल्डिंग यांच्यानंतरचे ज्येष्ठ कादंबरीकार म्हटले पाहिजेत. गोल्डिंग यांना ते मिळाले तेव्हा ते ६९ वर्षांचे होते तर जेकबसन यांचे वय ६८ वर्षांचे आहे. जगभरच्या साहित्यिक वर्तुळामध्ये ५० हजार पौंडांच्या या पारितोषिकाला प्रचंड मान दिला जातो. जेकबसन हे इंग्लंडमध्येच शिकले आणि वाढले. तसे ते मूळचे मँचेस्टरचे. व्हिटफिल्डच्या स्टँड इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.
त्यानंतर ते केंब्रिजच्या डाऊनिंग कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवीधर झाले. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये ते प्राध्यापक या नात्याने तीन वर्षे होते. तिथल्या त्या रहिवासाच्या आधाराने त्यांनी १९८७ मध्ये 'द लँड ऑफ ऑस्ट्रेलिया' हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक लिहिले होते. आपले स्वतःचे वर्णने ते 'ज्यूंचा जेन ऑस्टेन' असे करतात. प्रख्यात कादंबरीकार जेन ऑस्टेन अठराव्या शतकात होऊन गेल्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये 'सेन्स अँड सेन्सिबिलीटी' तसेच 'प्राईड अँड प्रेज्युडिस' या कादंबऱ्यांचा समावेश होतो. काही टीकाकारांकडून त्यांना इंग्रजीचे 'फिलिप रॉथ' असे म्हटले जात असल्याने त्यावर आपले स्वतःचे वर्णन त्यांनी जेन ऑस्टेन असे केले असायची शक्यता आहे. पाच हजार वर्षांच्या काळात ज्यूंच्या वाट्याला आलेल्या हृदयद्रावक अनुभवांमुळे आपल्याला ज्यूंविषयी जिव्हाळा वाटतो असे सांगायलाही ते कमी करत नाहीत. १९९८ पासून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने सुखान्ताचा कल्पनातीत शोध घेण्यात आला आहे. त्यांचे लिखाण हे सरळ मार्गी म्हणून ओळखण्यात येते. स्त्री-पुरुष संबंध आणि इंग्लंडमध्ये ज्यूंना विसाव्या शतकात आलेले अनुभव असा त्यांच्या लिखाणाचा हा प्रवास आहे.
ते अतिशय ओघवत्या भाषेत विनोदी पद्धतीने लिहिणारे लेखक म्हणूनही परिचयाचे आहेत. 'द फ्लिंकर क्वेश्चन' या कादंबरीची मांडणीही त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने केलेली आहे. आजवर जेकबसन यांनी रेडिओवरही काम केले आहे. १९८३ पासून सर्वसाधारणपणे त्यांनी लिहायला प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी 'कमिंग फ्रॉम बिहाईड' ही पहिली कादंबरी लिहिली. त्यापुढल्याच वर्षी त्यांनी 'पीपींग टॉम' ही कादंबरी लिहिली. २००८ मध्ये त्यांनी 'द ॲक्ट ऑफ लव्ह' ही कादंबरी लिहिली होती. 'द फिंक्लर क्वेश्चन'
या कादंबरीमध्ये त्यांनी प्रेम, निराशा आणि पुरुष मैत्रीबंध या विषयावर प्रामुख्याने लिहिले आहे. बुक पारितोषिकाचे वैशिष्ट्य असे, की पारितोषिव समितीमध्ये कोणाचा सहभाग आहे ते जाहीर केले जाते. 'फायनान्शियल टाइम्स'च्या वाङ्मयीन संपादिक रोझी ब्लॉ, निवेदिका, लेखिका आणि रॉयल ऑपेर हाऊसच्या नृत्य दिग्दर्शिका डेबोरा बुल, पत्रकार आणि लेखक टॉम सटक्लिफ, चरित्रकार आणि टीकाका फ्रान्सेस विल्सन यांचा या समितीत समावेश होता. या निवड समितीच्या अध्यक्षपदी कवी सर ॲन्ड्र्यू मोशन हे होते. बुकर पारितोषिकामुळे त्यांच्या कादंबरीची विक्री ४५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे त्यांच्या प्रकाशकांनी म्हटले आहे. बुकर पारितोषिकाच्या इतिहासात अशा तऱ्हेने एका प्रहसनात्मक कथानकाला प्रथमच पारितोषिक देण्यात आले आहे. या पारितोषिकाचे तुम्ही काय करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी आपण या रकमेतून आपल्या पत्नीसाठी बॅग खरेदी करणार आहोत असे गमतीने म्हटले. आपल्याला केव्हा ना केव्हा तरी बुकर पारितोषिक मिळावे असे वाटत असे, ते आता मिळाले, अशीच त्यांची प्रतिक्रिया आहे.
July 27, 2010
जॉन लॉय जे एक BBC प्रोड्युसर होते त्यांनी मि बीन यांचा एक शो बघितल्यांनंतर त्यांना टिव्ही शो मधे काम करायची ऑफर दिली, तेव्हा मि बीन यांचं वय फक्त २२ वर्ष होतं. त्या वेळी मिस्टर बीन यांना खुप विचार करावा लागला कारण एकीकडे त्यांचे मित्रांसोबचे स्वत:चे शो होते आणि दुसरीकडे आलेली ऑफर, शेवटी त्यांनी टिव्ही शो मधे काम करायचं ठरवलं आणि नॉट द नाईन ओ क्लॉक शो मधुन ते टिव्ही विश्वात उतरले.
January 6, 2022
प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरला देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.
June 3, 2015
क्रिकेट या खेळाचा निखळ आनंद त्यांनी सर्वार्थाने क्रिकेट रसिकांना दिला. कसोटीतील त्यांची ९९.९४ ही सरासरीच त्यांच्या नि:स्वार्थी क्रिकेट योगदानाचे प्रतीक आहे.
August 27, 2021
पाटील, दत्ता
विधिमंडळाच्या कामकाजात संसदीय आयुधांचा वापर कोणत्या वेळी आणि कसा करावा, त्यासाठी कोणत्या नियमाचा आधार घ्यावा आणि तो घेताना आपला संदर्भ कोणालाही खोडता येणार नाही याची काळजी घेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांना त्यांची चूक मान्य करायला लावण्याचे कसब दत्ता पाटील यांच्या अंगी होते.
म्हणूनच १९८७ ते १९८९ या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अॅड. दत्ता पाटील यांच्या रूपाने सतत गाजत राहिले. रायगड जिल्ह्य़ामध्ये फुकटे वकील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबांचा कळवळा असलेले व्यक्तिमत्व होते. नारायण नागू पाटील यांच्या या सुपुत्राने वडिलांनी केलेल्या समाजकार्यामध्ये आपल्याही कार्याची ओंजळ ओतली आणि रायगडमधील कष्टकरी आणि शेतकरी यांचे ते तारणहार झाले. वडिलांच्या आग्रहास्तव फौजदारी वकील झालेल्या दत्ता पाटील यांनी गरिबांचे अनेक खटले फुकटात लढविले, म्हणून त्यांना फुकटे वकील म्हणत ते आपुलकीने. रायगडमध्ये एक निष्णात फौजदारी वकील असलेल्या दत्ता पाटील यांनी अनेकांना खटल्यातून सोडविले, याचा उल्लेख शरद पवार यांनी एकदा विधिमंडळात केला होता. दत्ता पाटलांचे वाचन अफाट होते. विधिमंडळाच्या ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांचा अग्रक्रम होता. ज्येष्ठ सदस्य असूनही ते सभागृहात वेळेवर येत आणि सर्वाधिक काळ सभागृहात थांबत. प्रत्येक चर्चेत ते सहभागी होत. त्यांचे वक्तृत्व धारदार, हजरजबाबी होते. त्यांचा आवाज अत्यंत धारदार, मोठा होता. अनेकदा त्यांच्या नुसत्या आवाजानेच समोरच्या मंत्र्याची उत्तर देताना गाळण उडत असे. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एका चर्चेमध्ये उत्तर देण्यासाठी दोन्ही गृहराज्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते आणि मंत्रिमहोदय सभागृहात येईपर्यंत सभागृहाचे कामकाज एकटय़ा दत्ता पाटील यांनी बंद पाडले होते, ते संसदीय आयुधांचा आणि नियमांचा योग्य वापर करीत. स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यामुळे ते फटकळ वाटले तरी मनाने अत्यंत साधे होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा सीमा लढा, त्यांत दत्ता पाटील अग्रेसर होतेच; पण गेल्या वर्षी मुंबई मराठी पत्रकार संघाने केलेल्या सत्कार समारंभात आपण आजही सीमा लढा लढण्यासाठी तुरुंगात जायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. विधिमंडळाच्या सभागृहात असो वा बाहेर लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि तसाच पुढाकार त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे ते संस्थापक होते. मात्र १० वर्षांपूर्वी त्यांना पक्षाने बाहेर काढले तरी त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे टाळले. स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा दबदबा होता. गरीब मुलांसाठी त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटी सुरू केली. संस्थेच्या सर्व पसाऱ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. कुटुंबवत्सल, सार्वजनिक कामाविषयी आस्था असणारा आणि त्यासाठी विधिमंडळाचा योग्य वापर करून गरीब शेतकऱ्यांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा लढवय्या लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने आपण गमावला आहे.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti