जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.
काशिनाथ बोडस यांच्या घरातच गायनाची समृद्ध परंपरा होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. तात्या उर्फ पं. काशिनाथ शंकर बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे गायन होते. काशीनाथ बोडस यांचे वडील पं. शंकर श्रीपाद बोडस व काका लक्ष्मणराव बोडस हे विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते.
काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या कडे आकर्षित झाले, पण नंतर त्यांनी गायन शिकण्यास आपल्या वडिलांकडून सुरवात केली. त्यांची गायन करण्याची शैली आपल्या वडिलांसारखेच होते. त्यांचे ख्याल, ताराना आणि भजन यावर प्रभुत्व होते. वीणा सहस्रबुद्धे या त्यांच्या भगीनी. वीणा सहस्रबुद्धे यांनी काशिनाथ बोडस यांना गुरू मानून त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली होती.
पं. कुमार गंधर्व यांच्या गायन शैलीवर काशीनाथ बोडस यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या शिष्यात रंजणी रामचंद्रन, रचना बोडस, सुषमा वाजपेयी आणि मनु श्रीवास्तव यांचा समावेश आहे. काशिनाथ बोडस यांचे २० जुलै १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
काशिनाथ बोडस यांची अधिक माहिती असल्यास सांगावी.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत
त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी चाफळ जिल्हा सातारा येथे झाला.
कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंती ऊत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्वासत समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले. कवी यशवंत यांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास ऊर्फ गो. गो. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कवी यशवंत यांच्यावर पडला. पुढे यशवंत पुण्याला गेले.
अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले.
औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.
उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्व त जीवनमूल्यांचा त्यांनी उद्घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.
"आई' म्हणोनि कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.
आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे
"दैवतें माय-तात' या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. "समर्थांच्या पायांशी', "माण्डवी' व "बाळपण' अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. "लाह्या-फुले' या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्वईर्य अनन्त हेंच आम्हां!
यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. "प्रीतिसंगम', "प्रेमाची दौलत', "चमेलीचे झेले' आणि "एक कहाणी' या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. "एक कहाणी' मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे.
"चमेलीचे झेले'मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. "एका वर्षानंतर' या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते... ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्या मुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्गारतो... सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!
यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. ""आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ""स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) "तुटलेल्या तारा' या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. "सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात.
"गुलामाचे गाऱ्हाणे' आणि "इशारा' या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. "तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी उद्गारतो... वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाही क्षिती भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी
शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे घोष मंत्रांचा गमे या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. "मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.
जीवनाचे विविध पैलू कवी यशवंत यांनी आपल्या कवितेतून उलगडले. त्यांच्या कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणा विषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे.
"मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे. यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर आहे. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते. कवी यशवंत यांचे २६ नोव्हेंबर १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
देशासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी खूप काम केले पण कामाची प्रसिद्धी कधीही केली नाही. गंमतीचा भाग म्हणजे 'प्रसिद्धीविना काम म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे' हे काकासाहेब गाडगीळ यांचे वाक्य प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसच्या अनेक शिबीरातून सांगायचे. पुण्यातील एन.डी.ए. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी ही सुरुवातीला दक्षिण भारतात उभारण्याची कल्पना होती. पण असे म्हणतात की, काकासाहेब गाडगीळ यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पंडित नेहरूंपुढे हुशारीने मांडला व अखेरीस मंत्रिमंडळाने एन.डी.ए. पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुळे एन.डी.ए. पुण्यात आले, ही बाब अनेकांना ठाऊक नसेल.
पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे. गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार हाही काकांमुळेच घडला. लेखक या बरोबरच काकासाहेब गाडगीळ यांची राजकिय कारकिर्द मोठी होती. भारत सरकारने टपाल तिकीट प्रसिध्द केले होते. काकासाहेब गाडगीळ यांचे १२ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
१९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.
प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
देशात ब्रेन ड्रेन सुरु असताना आशुतोष वैद्य यांनी आयटी मध्ये करिअर घडविणार्या तरुणांपुढे आदर्श घालून दिला.
ब्रेन गेन
ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.
बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून मा.जॉर्ज हॅरिसन यांनीआंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बँडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोनमासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले.
बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाद दुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे. १९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला.
हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होते. जॉर्ज हॅरिसन यांचे निधन २९ नोव्हेंबर २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ विकिपीडीया
हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला.
वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’ प्रवेश मिळून खर्यात अर्थाने त्यांच्या ‘शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला’ सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते…
साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला ‘शास्त्रीय संगीत’ शिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’मध्ये प्रवेश मिळवून ‘शास्त्रीय संगीत’ हा त्यांचा ’ऐतिहासिक प्रवास’ खऱ्या अर्थाने सुरू झाला.
वसंतराव देशपांडे यांनी ‘हिंदी चित्रपट संगीत’ फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची ‘गायनकला’ जाणून ‘भालजी पेंढारकर’ यांनी ‘कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात ‘कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण’ करण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकार’ म्हणून ते गाजले.
बेगम अख्तर त्यांना आदराने ‘गुरुजी’ संबोधित करत, यातच त्यांची ‘यशस्वी कारकीर्द’ दिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत ‘गझल व ठुमरी’ या संगीत प्रकारातील ‘एक प्रस्थापित गायक’ ही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ‘ख्याल गायकीची संधी’ त्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!
‘ग्वालियर घराण्याचे’ अधिकृत शिक्षण घेत असतानाच ‘किराणा व भेंडीबजार’ या घराण्याच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण चीजा’ वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, पु.ल. देशपांडे यांनीच ‘अनेक उस्ताद’ असणार्या. या ‘शागीर्द’ला ‘एकलव्य’ ही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायक’ हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या ‘उस्तादांच्या कृपेने’ त्या प्रत्येकाच्या ‘घराण्याच्या गायकीतील सत्व’ आपल्या गळ्यात उतरवून ‘स्वत:च्या खास अशा गायकीला’ जन्म दिला. ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ यांच्या ‘संगीत नाटकांचा’ तो काळ होता. त्यांची ‘स्टाईल’ वसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळत’ त्यांनी आपल्या गायकीमध्ये ‘दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना ‘सार्थ अभिमान’ होता, हेही विशेषच!
वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले.
लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी ‘आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळा’ या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात ‘अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना’ यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे ‘गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं’ या बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ‘ठुमरी व गझल’ या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना ‘असद अली खॉं’ नामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात ‘पतियाळा घराण्याचे गायक’ असल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ ‘मारवॉं’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले.
१९४२ मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात ‘मिलिटरी अकौंटस’ खात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी ‘पंडित सुरेशबाबू माने’ यांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना ‘भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खान’ यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी जवळपास ‘८० मराठी व २ हिंदी’ चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले. पुण्यातील वास्तव्यात त्यांना ‘पु.ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर’ या दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं ‘अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळ’ राहिलं! ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने ‘पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीत’ यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना ‘अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रय’ लाभला.
१९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि ‘नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीत’ रसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील ‘खानसाहेब ही व्यक्तिरेखा’ रसिकांच्या मनात इतकी ‘भरली, ठसली व सामावली’ की त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली ‘वसंतखॉं देशपांडे’ ही पदवी ‘खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! या नाटकातील ‘खानसाहेब’ या व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ यांच्या मनात ‘पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाईल’ होती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच.
‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं! १०६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या ‘शास्त्रीय संगीत साधना’ याचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ सोबतच त्यांच्या या त्यांच्या ‘ऑडिओ सीडी व डीव्हीडी’ बंदिस्त ‘रागदारी मैफली’ रसिकांच्या संग्रही असून त्यांची ‘अभिजात संगीताची’ भूक, मन व कान’ तृप्त करत आहे.
१९८३ मध्ये वसंतराव देशपांडे यांना संगीत कला अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. वसंतराव देशपांडे यांचे नातू ‘राहुल देशपांडे’ यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे, त्या मुळे पुन्हा संगीत नाटकांना पुनश्चय चांगले दिवस येत आहेत. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ नितीन देशपांडे
वसंतराव देशपांडे यांचे गायन.
https://youtu.be/qI7jSLNBnrs
https://www.youtube.com/watch?v=qI7jSLNBnrs&feature=youtube
https://www.youtube.com/watch?v=TcfyGLSYjRw&feature=youtube
https://www.youtube.com/watch?v=27T21Vy9zTY
https://www.youtube.com/watch?v=tUcXQ39yD5c&t=818s
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस' कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये 'फायलॉजिकल सोसायटी'च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून 'ऑक्सफर्ड' या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला.
१८८४ मध्ये 'A New English Dictionary on Historical Principles' या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम अनौपचारिकरीत्या 'The Oxford English Dictionary' हे नाव वापरण्यात आले. १९३३ पासून मात्र या नावानेच हा शब्दकोश प्रकाशित होत आहे.
या शब्दकोशाच्या आजपावोतो असंख्य आवृत्या निघाल्या आहेत. प्रारंभी केवळ इंग्रजी शब्दांचे इंग्रजीतच अर्थ देणारा हा शब्दकोश जग बदलत गेले तसे निरनिराळ्या भाषांतूनही अर्थ समजावून देऊ लागला, त्यात विविध भाषांमधील शब्दही अंतर्भूत होऊ लागले आणि आता तर रोजचा एक शब्द निवडण्यापासून वर्षभरातील एका शब्दाचीही निवड होऊ लावली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा 'शब्द' ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. 'फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन' या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. हा प्रकल्प किती काळ चालेल, किती निधी त्यात गुंतवावा लागेल, वगैरे कसलीच कल्पना कोणालाही आली नाही. पण जेम्स मरे, हेन्री ब्रॅडले, डब्ल्यू. ए. क्रेग, सी.टी. ऑनियन्स, यांसारख्या निष्णात शब्दकोश रचनाकारांनी पुढील सुमारे चाळीस वर्षे जीव ओतून अथक परिश्रम केले आणि इंग्रजी शब्दकोश इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रसिध्द झाली. यासाठी शब्द संकलन कसे केले, अर्थ कसे लावले गेले, मुद्रण कसे झाले, याबद्दलची माहिती रोचक आहे. जिज्ञासूंनी सायमन विन्चास्टर यांच्या 'The Meaning of Everything : The Story of Oxford English Dictionary हा ग्रंथ अवश्य पाहावा.
१९२८ साली प्रकाशित 'बारा' खंडांच्या शब्दकोशामध्ये १९३३ साली पुरवणी खंडाची जोड मिळाली. शब्दकोश अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, त्यामध्ये विसाव्या शतकातील शब्दांची भर घालण्याकरिता चार खंडातील पुरवणी १९७२ ते १९८६ पर्यंत प्रकाशित केली गेली. याच दरम्यान १९८४ साली न्यू ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकल्प सुरू झाला. याच सुमारास कम्प्युटर तंत्रज्ञानाचा विकास झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या माध्यमाचे साधर्म्य ओळखून शब्दकोशाच्या मुद्रित आवृत्तीबरोबरच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये साठवणीला भरपूर वाव असल्याने नवे शब्द सहज समाविष्ट करण्यात येऊ लागले. हा शब्दकोश सी. डी. रूपात मिळू लागला. अनेक नवे शब्द भाषेत येत असताना त्यांचा शब्दकोशात अंतर्भाव करण्याबाबत काही निकष कटाक्षाने पाळले जातात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जगातील भाषाविषयक सर्वात मोठा आणि व्यापक कार्यक्रम राबवते.
नवे शब्द शोधण्याकरता ऑक्सफर्ड इंग्लिश कॉर्प्स (शब्दांची गंगाजळी) आणि ऑक्सफर्ड रीडिंग प्रोग्राम ही मुख्य संसाधने आहेत. अनेक मान्यवान योगादानकर्ते आपण जे वाचले त्यातील नवे शब्द व त्यांचे अर्थ यांचा पद्धतशीर पाठपुरावा करतात. रीडिंग प्रोग्राममध्ये या प्रत्येक प्रकारच्या लिखाणाचा (गाण्यांच्या ओळीपासून शास्त्रीय शोधनिबंधांपर्यंत) संग्रह केला जातो. गंगाजळीत हे दस्तऐवज आणि त्यांचे स्त्रोत यांची नोंदणी होते. असे नवे शब्द मिळाले की तो शब्द किती ठिकाणी, कोणत्या संदर्भात, कोणत्या अर्थाने, या अर्थाला काही विविध छत आहेत काय, किती काळ वापरला जात आहे, याचा आढावा तज्ज्ञांच्या संघाद्वारे घेतला जातो. अपशब्द वर्ज्य नसतात. पण ते वापरू नयेत, असा इशारा दिलेला असतो.
याखेरीज शब्दकोश कोणाकरता आहे, पृष्ठ संख्यांची मर्यादा, व्याख्या देतानाची शब्द मर्यादा, अशा तांत्रिक, वित्तीय मुद्द्यांचा देखील विचार केला जातो. एखादे वेळी एखाद्या शब्दाला जर अनेक वर्षांचा इतिहास नसतो, पण तो समर्पक असला तरी त्याचा अंतर्भाव करण्याचा विचार केला जातो. कम्प्युटरवरील गेममधले एखादे पात्र मेले आणि पुन्हा जिवंत झाले, तर त्याचे वर्णन respwan या क्रियापदाने केले जाते, आणि कायमचे मेले तर permdeath असे वर्णन केले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या शब्दांचा विचार करताना इंग्रजी भाषेतील शब्दांचा विचार होत नाही, अन्य भाषेतील शब्द विचारार्थ घेतले जातात. बंड, धरणे (असे संपाचे प्रकार) याच रूपात इंग्रजी भाषेत प्रवेशले. कधीकधी स्पेलिंगच्या फरकाने वेगळे अर्थ सुचवले जातात. Pundit म्हणजे तज्ज्ञ आणि pandit म्हणजे पदवी.
नव्या शब्दांचे अर्थ देणे, हे देखील आव्हानात्मक काम आहे. यासाठी व्यापक सामान्यज्ञान असणारी तज्ज्ञ मंडळी, संदर्भग्रंथ, माहितीचे अन्य स्त्रोत, विषय तज्ज्ञ, इतर समानार्थी शब्द यांचा आधार घेतला जातो. उद्या अण्णू गोट्या होणे हा वाक्प्रचार मराठी शब्दकोशात समाविष्ट करायचा झाला तर त्या तज्ज्ञाला अंतू बर्वा माहिती हवा. शब्दकोशशास्त्र जसे शब्दकोशांचे स्वरूप बदलेल तसे विकासात होत गेले आणि शब्दकोश जसे बदलत गेले तसे शब्दकोशशास्त्र बदलत गेले. आज शब्द म्हणजे निव्वळ अक्षरांचे समूह राहिलेले नाहीत. कधीतरी आकडे वापरून संकल्पना सादर केली जाते, जसे २६/११ कधी आकडा आणि अक्षर एकत्र नांदतात, २द सारखे शब्द यात मोडतात. कधी A1 असा त्यांचा क्रम असतो. आता तर संकल्पना इमॉटीकॉनद्वारे दर्शवली जाते. अशा सर्वांचा क्रम काय असावा, हेही इंग्रजी शब्दकोशात रूढ होत आहे.
अविनाश पंडित.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, ... अशा अनेक कवितांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य गाजवणारे कवी म्हणजे नारायण सुर्वे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा हा अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. गिरणी कामगारच असलेल्या काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वत:च्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वण दारिद्य्र असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.
मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी ते एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम् या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले. "कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली.
१९६२ मध्ये "ऐसा गा मी ब्रह्म' प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्यार, अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वलरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही पुरस्कार केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला आहे.
सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच् याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईनं नदीकाठी सोडलं. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असं सुर्वे म्हणत.
ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधताय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.' नारायण सुर्वे यांचा पद्मश्री, सोव्हिएत रशियाचं नेहरू ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, नरसिंह मेहता पुरस्कार, कराड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार देऊन गौरव झाला. नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti