जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
*आज २० ऑक्टोबर *
आज ख्यातनाम मराठी लोकशाहीर मा.अमर शेख यांची जयंती
जन्म:- २० ऑक्टोबर १९१६
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे मा.अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.अमर शेख यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
October 20, 2016
जुन्या काळातील एक मराठी कवी.
November 4, 2016
मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 10, 2017
जयवंत दळवी हे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’मध्ये गेले.
एम.ए.साठी त्यांनी ‘इमोशन अॅअन्ड इमॅजिनेशन अॅठन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९७५ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घेत. त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबर्याळ; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘लोक आणि लौकिक’ हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले.
दळवींची ‘चक्र’ ही पहिलीच कादंबरी मराठी कादंबरीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तेथे वस्ती करणार्यां चे उघडे-नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव दळवींना उपयोगी ठरले. बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्याल तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध दळवी घेतात. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण ते करतात. कादंबरीला कथानक नाही, पण त्यातील व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत आणि ती दळवींनी प्रभावीपणे उभी केली आहेत. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो.
दळवींच्या सर्वच लेखनात विकार-वासनांच्या आवर्तात भोवंडून जाणारी माणसे पदोपदी भेटतात. दळवींचे बालपण तीस-चाळीस माणसांच्या एकत्र कुटुंबात गेले. जुन्या परंपरा प्राणपणाने जपणारे ते कुटुंब होते. कुटुंबाचा लवाजमा मोठा होता. त्यात विकेशा विधवा होत्या, वेडगळ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या वृत्तींची-विकारांची माणसे होती. संस्कारक्षम वयात दळवींचा संपर्क अशा माणसांशी आला. मध्यरात्री माजघरातून बाहेर येणारे दबलेले उसासे आणि हुंदके त्यांनी ऐकले, वेडसर माणसांचा आयुष्यक्रम त्यांनी न्याहाळला. माणसाच्या आयुष्यातील भोगवट्याचे, अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते.
वेडी, अर्धवट पात्रे त्यांच्या साहित्यकृतींतून डोकावतात. माणसाचे उघडे-नागडे दुःख, व्यावहारिक जीवनाच्या धबडग्यात त्याची होणारी कोंडी आणि त्यातून अपरिहार्यपणे माणसाच्या वाट्याला येणारे एकाकीपण यांचा मन सुन्न करणारा आविष्कार त्यांच्या ‘संध्याछाया’, ‘सूर्यास्त’, यांसारख्या नाटकांत झालेला दिसतो. ‘चक्र’, ‘स्वगत’, ‘धर्मानंद’, ‘अल्बम’ यांसारख्या कादंबर्यां्त आणि ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘महासागर’, ‘लग्न’ यांसारखा नाटकांत त्यांनी लैंगिक वासनेतून निर्माण होणार्याय विकृतीच्या, वासनेच्या तळाशी असलेल्या क्रूर प्रवृत्ती यांची धगधगती चित्रे रंगविलेली आहेत.
दळवींच्या सर्वच लेखनात सहजपणा आहे, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. वाट्याला आलेल्या विलक्षण, व्यामिश्र अनुभवांनी अंतर्यामी उदास असणार्याच माणसांच्या व्यथा-वेदनांचे खिन्न करणारे चित्रण करणार्या या प्रतिभावंताने एक मुखवटा धारण केला होता. त्याचे नाव ‘ठणठणपाळ’! लौकिक जगात दिसणारे दळवींचे रूप प्रसन्न, विनोदी, मिस्कील बोलणारे, चेष्टा करणारे, दुसर्यां च्या विनोदाला खळखळून हसून दाद देणारे असे होते. ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये अस्सल कोकणी माणसांची व्यक्तिचित्रे दळवींनी रंगवली. वरून भोळीभाबडी वाटणारी पण मोठी बिलंदर माणसे दळवींनी या पुस्तकात उभी केली आहेत.
‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. मराठी वाङ्मयातील, वाङ्मयसमीक्षेतील आणि एकंदर वाङ्मयव्यवहारातील अनिष्ट, अर्थशून्य आणि वाङ्मयविकासाला मारक ठरणार्यात अनेकविध प्रवृत्तींचे फुगे त्यांनी हसत-हसत फोडून टाकले. ‘ठणठणपाळ’-विषयी ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे, ‘ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.’
गंभीर कथालेखनाबरोबर दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र ‘विनोदी लेखक’ म्हणून आपल्यावर शिक्का पडावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले. जयवंत दळवी माणसांत रमणारे असले, तरी वृत्तीने एकाकी होते. महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण गर्दीपासून ते दूर राहिले. सार्वजनिक सभांत त्यांनी सक्रिय भाग घेतला नाही.
सभा संमेलने टाळली. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी नाकारले. दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिवंगत ज्येष्ठ जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
डॉ. सुभाष भेण्डे
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा.
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
August 14, 2021
पारखी, प्रमोद
जेव्हा औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत नव्हते, मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी या नावाची व्यक्ती आवश्यक वाटत नव्हती, तेव्हा प्रमोद पारखी यांनी एक उत्तम कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. उद्योगांच्या विकासात आवश्यक असणाऱ्या या पदावरील व्यक्तीचे महत्त्व त्यांच्यामुळे लक्षात येऊ लागले.
पारखी यांनी आपल्या व्यवसायात जी सचोटी आणि कार्यक्षमता दाखवली, त्यामुळेच तर त्यांना द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकौंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद १९८८ मध्ये भूषवता आले. कंपनी सेक्रेटरी म्हणून देशातील अनेक नामांकित कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करण्यापूर्वी पारखी यांनी भारत फोर्जसारख्या कंपनीत काही काळ याच पदावर नोकरीही केली. त्यांचा मूळचा पिंड अभ्यासकाचा असल्याने पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी सुरुवातीला काही काळ कामही केले. परंतु त्यानंतरच्या काळात आपली ही भूमिका निभावण्यासाठी त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले. व्यवस्थापनशास्त्राच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विषय समजावून सांगण्याची त्यांची पद्धत आणि तंत्र यामुळे पारखी हे एक लोकप्रिय ‘सर’ झाले. कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकौंन्टसी, फायनान्स मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी अभ्यासवर्ग घेतले. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही प्रमोद पारखी यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. कॉसमॉस सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये पारखी यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील एक महत्त्वाची बँक म्हणून तिला नावारूपाला आणण्यासाठी पारखी यांनी खूप कष्ट घेतले. १९७८ पासून शेवटपर्यंत ते या बँकेच्या संचालक मंडळावर होते आणि या काळात आठ वेळा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. सामान्यांच्या मनात या बँकेविषयी विश्वास निर्माण होईल, इतकी पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून या बँकेला आज जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामागे पारखी यांचे कष्ट कारणीभूत आहेत. या बँकेचे संगणकीकरण आणि विकास यासाठी त्यांनी आपली सारी बौद्धिक क्षमता उपयोगात आणली. बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेकांना विश्वासाने सल्ला दिला आणि मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्रातील सहकारी बँकिंगच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे, यात शंका नाही. पुणे स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यकारी समितीचे सदस्य, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नियामक मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. जगातील २९ देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कॉन्फिडरेशन ऑफ पॅसिफिक अॅण्ड एशियन अकौंटन्टस या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य होण्याचा बहुमानही पारखी यांनी मिळवला. त्यामुळे जगातील अनेक देशांत होणाऱ्या विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. पारखी यांच्या निधनाने एक अभ्यासू बँकर आणि तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.
August 5, 2017
नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.
अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु त्यांचा मुख्य लौकिक झाला तो नारदाच्या भूमिकेमुळे.
'नारद म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद' असं समीकरणच होऊन बसलं. रंगभूमीवर ३००० पेक्षा ज्यास्तवेळा नारदाची भूमिका साकारण्याचा उच्चांक अनंत दामले यांनी केलेला होता. १९३९ साली न.चि.केळकर अनंत दामले यांचे 'कृष्णार्जुन युद्ध' या नाटकाचा प्रयोग पहायला आले होते. त्यांना मनापासून असे वाटले की अनंत बापू पेंढारकरांसारखाच बोलतो व गातो. बापू पेंढारकर हे अनंत दामले यांचे गुरू होते.
१९४० ला ऑपेरा हाऊसला 'सत्तेचे गुलाम' या नाटकाचा प्रयोग एका संस्थेच्या मदतीसाठी धर्मार्थ प्रयोग म्हणून लावला होता.अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. या प्रयोगाच्या वेळी अ.ह.गद्रे यानी स्वा.सावरकरांच्या हस्ते अनंत दामले यांना "नूतन पेंढारकर"ही पदवी देऊ केली आणि सावरकर अनंत दामले यांच्या कानात हळूच म्हणालेही, "पदवी मिळविणे सोपे असते पण टिकविणे कठीण असते बर!". पुण्यातील 'भारत गायन समाज' हे अनंत दामले यांचे श्रद्धास्थान होते.
अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. अनंत दामले यांचे ९ ऑक्टोबर १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 9, 2017
प्रवीण तरडे व प्रणित हे दोघं खूप वर्षापासूनचे मित्र आहेत. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होते. देऊळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीरराव, आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण, हबीर तु खंबीर तु अशी अनेक सुपरहिट गाणी लिहिली होती.
June 20, 2022
लोकमान्य टिळक म्हणायचे, पंचांग हे आकाशाचा आरसा असला पाहिजे, लोकमान्यांचं हे विधान नानाशास्त्रींना प्रेरणा देऊन गेले. नानाशास्त्री यांनी १९१६-१७ या वर्षासाठीचं पंचांग काढलं, ते कोल्हापुरातल्या आर्यभूषण प्रेसमधून छापून घेतलं.
September 29, 2021
भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.
March 15, 2022
पी.सी अलेक्झांडर यांना भारतीय राजकारणात गांधी घराण्याचे विश्वाकसू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म २० मार्च १९२१ रोजी झाला.
संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून १९८१ ते ८५ या काळात त्यांनी त्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.
एक सनदी अधिकारी असलेले डॉ. अलेक्झांडर १९८८ मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. १९९३ ते २००२ असा प्रदीर्घकाळ ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तसेच १९९६ ते १९९८ या काळात त्यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रशी जुळलेले त्यांचे संबंध सर्वाधिक जवळचे राहिले. त्यामुळेच त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधींच्या पंतप्रधानकाळात त्यांचे सचिव म्हणून काम करीत असतांना आलेल्या अनुभवावर इंदिरा : अंतिम पर्व हे डॉ. अलेक्झांडर यांनी लिहिलेले पुस्तकही प्रसिद्ध आहे. डॉ.अलेक्झांडर यांचे १० ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले. डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे स्वांतत्र्योत्तर कालखंडातील विख्यात व आदरणीय लोकसेवकांपैकी एक होते. विख्यात व आदरणीय अशासाठी की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये उच्चप्रतीची कार्यक्षमता, नि:पक्षपातीपणा व सचोटी हे गुण जोपासलेले होते. एक कुशल, मुसद्दी व प्रशासक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक जीवनामध्ये अर्धशतकाहून अधिक काळ विविध प्रकारची उच्च पदे भूषवलेली होती, ते लंडन येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून तीन वर्षे होते, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार येथे सचिव म्हणून तीन वर्षे काम केले, डॉ.अलेक्झांडर यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांच्या दिवसांत वक्तृत्व व वाद-विवाद यांमध्ये आंतरशालेय व आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सातत्याने पहिले बक्षिस जिंकून आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले होते. त्रावणकोर विद्यापीठात शिकत असताना ते त्रावणकोर विद्यापीठ वादविवाद संघाचे प्रमुख होते. आंतर-विद्यापीठ वादविवाद स्पर्धांसाठी इतर विद्यापीठांना भेट देण्याकरिता या संघास पाठविण्यात आले होते. १९४०-४१ मध्ये ते त्रावणकोर विद्यापीठ युनियनचे अध्यक्ष होते. डॉ.अलेक्झांडर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू होण्याअगोदर त्रावणकोर विद्यापीठातून इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी आणि अण्णामलाई विद्यापीठातून संशोधनाद्वारे एम.लिट. व डी.लिट. या पदव्या संपादन केल्या होत्या. तेव्हाच्या मद्रास व त्रावणकोर-कोचीन राज्यांतील जिल्ह्यांमध्ये काम केल्यानंतर ते १९५५ मध्ये केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल झाले. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय अधिकारी संकोषासाठी निवड झाली तेथपासून त्यांच्या नियत सेवावधीपर्यंत ते भारत सरकारच्या सेवेत विविध हुद्यांवर काम करत राहिले. डॉ.अलेक्झांडर यांनी नूफिल्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत युनायटेड किंग्डम व्यापार मंडळ येथे प्रशिक्षण घेतले होते आणि फोर्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत कॅलिफोर्नीया यु.एस.ए. येथील स्टॅनफोर्ड संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले होते. डॉ.अलेक्झांडर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये, राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर भाष्य करणारा ईश्वरी देणगी असलेला व विद्वान वक्ता म्हणून आपल्या श्रोतृसमाजाची स्तुती व प्रशंसा लाभली. त्यांना १९९९ मध्ये प्रतिष्ठित अशा लोक प्रशासनामधील अग्रगण्य कांची परमाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. डॉ. अलेक्झांडर हे जगभर पसरलेल्या भारतीय विद्याभवनच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे एक दशकाहून अधिक काळ सदस्य राहिलेले होते. ते जून १९८९ पासून केंब्रिज विद्यापीठाच्या नेहरू न्यासाचे अध्यक्ष होते.
पी.सी.अलेक्झांडर यांचे १० ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti