जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बबन प्रभू हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले.
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते.
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
१९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.
१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.
१९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
१९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.
तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे.
थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे. धीरूभाई अंबानी यांचे निधन ६ जुलै २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान बनले आहेत. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी झाला.
३८ वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग हे त्यांच्या कर्तृत्वाचे मुख्य ठिकाण. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रिडा हे मंत्रीपद तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रीपदावर त्यांनी प्रभावी काम केले. यामुळेच थेट पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. लिओ यांचे मुळ घर मालवण तालुक्यातील वराड हे होय.
वराडकर कुटुंब हे या गावातील प्रतिष्ठीत मानले जाते. लिओ यांचे वडील अशोक यांचे प्राथमिक शिक्षण वराडलाच झाले. अत्यंत हुशार असलेल्या अशोक यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईत नेले पुढे हे कुटुंब मुंबईतच स्थायिक झाले. अशोक यांनी शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी १९६० मध्ये इंग्लड गाठले. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. यातच त्यांची ओळख नर्स असलेल्या आयरिश वंशाच्या मिरीअम यांच्याशी झाली. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. त्यांना एकूण तीन मुले यातील सानिया आणि सोफिया या लिओ यांच्या मोठ्या बहिणी. ही तिन्ही भावंडे डॉक्टर आहेत. सानिया या तर आयर्लंडमधल्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. लिओ यांना तसा फारसा राजकीय वारसा नाही. मात्र देशभक्तीचा खूप मोठा वारसा या कुटुंबाच्या मागे आहे. लिओ यांच्या वडिलांचे काका मधुकर वराडकर आणि मनोहर वराडकर हे स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर होते. त्यांनी ब्रिटीशांचे राज्य जावे म्हणून तुरुंगवासही भोगला. आयर्लंडमध्ये स्थायिक होवूनही वराडकर कुटुंबाने गावाशी असलेली नाळ तोडलेली नाही.
गावात त्यांचे वडीलोपार्जित घर, जमीन जुमला आहे. चारच वर्षापूर्वी त्यांनी नवे टुमदार घरही बांधले. हे दाम्पत्य दर दोन वर्षांनी धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावाकडे आवर्जुन येते. लिओ हे मात्र अद्याप वराडला आलेले नाहीत. २०११ मध्ये विश्व्चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने तत्कालीन आयर्लंडचे क्रिडामंत्री या नात्याने लिओ हे भारतात आले होते. यावेळी त्यांनी मुंबईला भेट दिली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या गाण्याचा इतिहास
चित्रपट : स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
संगीतकार : वसंत देसाई
पार्श्वरगायक : पं. भीमसेन जोशी
गीत : ग. दि. माडगूळकर
संगीतकार सुधीर फडके यांनी गीत रामायणातील सर्वच्या सर्व ५६ गीतांना अतिशय समर्पक चाली लावल्या होत्या. व त्यांनी गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले, पुण्यातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने बघणारा एक तरुण विद्यार्थी- अरुण पाटणकर! अरुण हा संगीतप्रेमी तर होताच, पण त्याचा "रामायणा'चा चांगला अभ्यासही होता. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने सुधीर फडके यांची भेट घेतली. म्हणाला, "गीत रामायणात अनेकांच्या तोंडी गाणी आहेत आणि ती योग्यही आहेत, पण संगीताविषयी प्रेम असणारा व संगीताचा जाणकार "रावण', याच्या तोंडी एखादे गीत का नाही?' यावर बाबूजी (सुधीर फडके) चतुराईने म्हणाले, "अहो, मी फक्त गीतांना स्वरबद्ध केलंय आणि ती गातोय एवढंच! हा प्रश्नय तुम्ही गीत रामायण लिहिणाऱ्या ग. दि. माडगूळकरांना विचारा.
लवकरच तोही योग आला. गीत रामायणाच्या २५० व्या कार्यक्रमाला ग. दि. माडगूळकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्या ठिकाणी हजर असलेल्या अरुणने पुन्हा तोच प्रश्नम गदिमांना विचारला. ते काही बोलले नाहीत. कदाचित भोवती असलेल्या चाहत्यांच्या गराड्यामुळे त्यांनी उत्तर दिले नसेल!
मात्र अरुणच्या त्या प्रश्ना ने गदिमांना नक्कीच विचार करायला लावलं होतं. कारण त्याच सुमारास होमी वाडिया या हिंदीतील प्रसिद्ध निर्मात्याने "स्वयंवर झाले सीतेचे' नावाचा चित्रपट काढायचं ठरवून त्याची कथा- पटकथा- संवाद व गीतांची जबाबदारी ग. दि. माडगूळकरांवर सोपवली. त्यांनी या चित्रपटात रावणाला गाणे गायला लावले. रावण हा दुष्ट खरा, पण तो कलाशौकिन होता. यासाठी चित्रपटाच्या सुरवातीला रावण वीणा घेऊन एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे त्यांनी दाखवले होते.
पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हिंडोल बहार रागातील "रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गाणे ऐकताना श्रोते तल्लीन होत. या गाण्यातील "या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?' अशा उन्मत्त सवालातून रावणाचा गर्विष्ठ स्वभाव दिसून येतो, तर त्यातील ताना- मुरक्याा व आलापींमुळे त्याची संगीताची जाण लक्षात येते. या गाण्याचे ध्वनिमुद्रण "बॉम्बे लॅब'मध्ये झाले होते. संगीतकार मा.वसंत देसाई यांनी ध्वनिमुद्रणानंतर पंडितजींची गाण्याची मैफल ठेवली होती. त्या दिवशी टेकमध्ये गाणे ओके व अतिशय छान झाल्यामुळे पंडितजींची तबियत खूष होती आणि मग त्या खुशीतच त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी एक तासभर झकास मैफल रंगवली!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
निवृत्त उपसंचालक, इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन
मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.
सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.
त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.
मराठीसृष्टीवरील सचिन पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.
मनात जिद्दीचा अंकुर जपून ठेवून त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड दिली तर अडीअडचणींच्या वादळवार्यांतही यशाचा वटवृक्ष बहरू शकतो, हे धुळ्याच्या रूपाली शिरोडेने दाखवून दिले आहे. एमपीएससीने २०११ मध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत रूपालीने राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते.
पंडित जसराज यांचा यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. मा.पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
पंडित जसराज म्हणतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे ‘मी’ च्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा.
पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडतं ते, जय हो. मा.पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील आहेत. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल कि मा.जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या.
भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.जसराज यांना गौरवले आहे. पं. संजीव अभ्यंकर हे पं. जसराज यांचे शिष्य.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. त्यांचा जन्म १ जून १९२९ रोजी झाला. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-हक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यावेळी त्या सहा वर्षांच्या होत्या. त्यांना बेबी नर्गिस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. १९४३ साली त्यांनी मोतीलाल यांच्यासमवेत वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपट केला. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५ मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरूवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. १९४० आणि १९५० च्या दशकात त्या खूप गाजल्या. बरसात, आवारा, अंदाज, श्री ४२०, दीदार, चोरी चोरी, मदर इंडिया यासारखे चित्रपट केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिस यांचा उल्लेख होतो. तेव्हापासून सालापासून ते १९६० च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गिस यांनी अनेक सिनेमांतून काम केले. त्यातील अनेक त्यांनी सहअभिनेता आणि सिनेनिर्माता राज कपूर यांजबरोबर केले आहेत.
राज कपूर आणि नर्गिस यांची भेट हा खूप वेगळा किस्सा आहे. राज कपूर हे ‘आग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. फेमस स्टुडिओत त्यांना जागा मिळावी म्हणून ते नर्गिस यांच्या आई जद्दनबाई यांना भेटण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील अपार्टमेंटमध्ये गेले. ज्यावेळी त्यांनी डोअरबेल वाजविली, त्यावेळी दरवाजा या जद्दनबाई उघडतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु एक सुंदर मुलगी अर्थात नर्गिस समोर आली. नर्गिसने विचारले कोण आहात आपण? नर्गिसना पाहून ‘आग’ या चित्रपटासाठी आल्याचे राज कपूर विसरून गेले. त्यांनी नर्गिस यांना चित्रपटात घेतले. त्यानंतर त्यांच्यात आकर्षण निर्माण झाले. नर्गिस यांना राज कपूर यांचे लग्न झाल्याचे माहिती होते. आग हा या दोघांचा पहिला चित्रपट. त्यानंतर बरसात (१९४९) या चित्रपटानंतर त्यांच्यातील संबंध आणखी जुळून आले. राज आणि नर्गिस यांनी जवळपास १६ चित्रपट एकत्र केले. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान होती. लोक त्यांना चित्रपटाशिवाय एकत्र पाहू इच्छित होते. राज कपूर यांचा करिष्मा अधिकाधिक वाढला होता. या दोघांनी भारतीय चित्रपटातील प्रेम अधिक दृढ केले. चित्रपटातील यांच्या भूमिका लोकांना आपल्याशा वाटायला लागल्या. श्री ४२० हा चित्रपट सुपरहिट झाला. बॉलिवूड चित्रपटातील सर्वात सुंदर रोमँटिक चित्रपटामध्ये याचे नाव घेतले जाते. चोरी चोरी हा त्यांचा राज कपूरसोबतचा शेवटचा चित्रपट.
जागते रहो मध्ये त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. राज कपूर यांचे लग्न झाले हे माहिती असतानाही नर्गिस यांना त्यांच्याकडून लग्नाची अपेक्षा होती; मात्र नंतर ती फोल ठरताना दिसू लागली. आपल्या पत्नीला घटस्फोट न देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मा.नर्गिस सोबतचे आपले नाते संपुष्टात आणले. त्यांनी राज कपूर यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. बॉबी चित्रपटातून राज कपूर यांनी आपल्या प्रेमाची कथा दर्शविली होती. शेवटी मदर इंडिया या चित्रपटातील आपल्या सहकलाकार मा.सुनील दत्त यांच्याशी लग्न करून मा.नर्गिस यांनी चित्रपट अभिनयातून निवृत्ती घेतली. विवाहानंतर मा.नर्गिस दत्त यांनी मोजक्याच सिनेमांमध्ये कामे केली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादाने अभिनय केला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मदर इंडिया नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा हा चित्रपट. भारतीय महिलेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची कथा फारच दमदार होती. म्हणूनच त्याला ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले. या चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीतून नर्गिस यांना सुनील दत्त यांनी वाचविले. मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. कलाक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही नर्गीस नियमितपणे आपले योगदान देत असे.
सामाजिक जाणिवेचे भान असणारी ती एकमेव अशी संवेदनशील अभिनेत्री होती. पती सुनिल दत्त यांच्या सहयोगाने तिने अजंता आर्ट्स सांस्क्रुतिक मंडळची स्थापना केली. काही आघाडीच्या अभिनेते व गायकांसह देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी या मंडळामार्फत करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. या मार्फत १९७१साली बांगलादेशच्या स्वातंत्र्य युध्दानंतर ढाका येथे प्रथमच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडियाची ती पहिली आश्रयदाता (पॅट्रन) ठरली. नेत्रहिन व विशेष मुलांसाठी नर्गीस कार्यरत होती. या संघटनेतील तिच्या योगदानामुळे ती सामाजिक कार्यकर्ता म्हणुन नावारुपाला आली. समाजसेवा करता यावी यासाठी नर्गीसने नर्सिंगचे प्रशिक्षणही घेतले होते. भारत सरकारमार्फत देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या सिने अभिनेत्री ठरल्या. तर त्यांना पहिल्यांदाच देण्यात आलेल्या राष्ट्रीय सिने पुस्कारांमध्ये रात और दिन या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय सिने पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आधारित सर्वोत्तकृष्ट सिनेमाला द नर्गिस दत्त अवॉर्ड दिला जातो. त्या राज्यसभेच्या खासदारही होत्या. १९८० साली स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्या पछाडली गेल्या.
न्युयॉर्क येथे काहीकाळ त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या निधनानंतर चारच दिवसांनी मुलगा संजय दत्त याचा पदार्पणाचा चित्रपट रॉकी प्रदर्शित झाला. प्रिमियर शोच्या वेळी एक आसन नर्गीससाठी राखीव ठेवण्यात आले होते. हयात असतांनाची तिची समाजकार्याची तळमळ लक्षात घेता नर्गीस यांच्या मृत्युनंतर नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर फौडेंशनची स्थापना करण्यात आली. वार्षिक राष्ट्रीय पुरस्कारांमधे राष्ट्रीय एकात्मतेवरील उत्क्रुष्ट चित्रपटाचा पुरस्कार नर्गीस दत्तच्या नावाने सुरु करण्यात आला. बांद्रा येथील एका रस्त्याचे नर्गीस दत्त रोड असे नामकरण करण्यात आलेले आहे. भारतीय टपाल खात्याने नर्गीसच्या प्रतिमेचे टपाल तिकीट काढुन तिच्या कारकिर्दीचा सन्मान केला. तर सन २००१ साली अमिताभ बच्चन यांचेबरोबरच शतकातील अभिनेत्री म्हणुन नर्गीसला मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नर्गिस दत्त यांचे ३ मे १९८१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नर्गिस दत्त यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=Stm-0e1ZLX4
https://www.youtube.com/watch?v=mX13BFONdyc
https://www.youtube.com/watch?v=vZpJfz6iu5k
https://www.youtube.com/watch?v=GF5ewHO2XqY
https://www.youtube.com/watch?v=3S3EhJRkHs8
https://www.youtube.com/watch?v=2a3LVWTQtyU
Copyright © 2025 | Marathisrushti