(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे

    सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. तरुण वयात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले.

    १९६५ साला पर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्या १९८५ पर्यत सोशल वर्क फिल्डमध्ये काम करत होत्या. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प- प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या.

    सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नाहीत. त्यांचा पिंड समाजसेवकाचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिक्षणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनिल सुकथनकर त्यांना सहकारी म्हणुन लाभला. त्यांचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते, परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ' दोघी, वास्तूपुरूष' यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले.

    सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु,दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सुनिल सुकथनकर यांनी यातील अनेक चित्रपटांसाठी तसेच इतरही काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. कर्नाटकातील शाश्वकती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला.

    सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातुन मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एम.के.सी.एल. या संस्थेसाठी ‘ माझी शाळा’ ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दुरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी - बलराज सहानी प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.

    सुमित्रा भावे नेहमी म्हणतात माझा सिनेमा गल्ला भरण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल. त्याचे दुःखही मला वाटत नाही. या सिनेमांसाठी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी व्हावी, असेही कधी वाटले नाही. मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भाव-भावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • क्रिकेटपटू वसंत रायजी

    भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला.

    रायजी यांनी १९४० च्या दशतकात ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७७ धावा केल्या होत्या. त्यात ६८ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

    आयुष्याच्या खेळपट्टीवर नाबाद शतक नावावर लावणारे ते केवळ दुसरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी डी.बी. देवधर यांनी वयाची शंभरी पूर्ण केलेली होती.

    वसंत रायजी हे क्रिकेटपटू बनले याचे श्रेय त्यांचे वडील नायसदराय रायजी यांचे. एम.एम. रायजी अँड सन्स ही त्यांची चार्टर्ड अकाऊन्टसीची फर्म होती तरी त्यांनी वसंत व त्यांचे बंधू मदन यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र केवळ हौस म्हणूनच त्यांनी क्रिकेट खेळावे, त्याला आपला व्यवसाय बनवू नये, आपल्या फर्ममध्ये त्यांनी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती.

    त्यांच्या आई जयश्री या गांधीवादी विचाराच्या. मिठाच्या सत्याग्रहासह स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. दोन वेळा तुरुंगवासही सोसला. मात्र मुलांना त्यांनी याची माहिती होऊ न देता त्यांचे लक्ष त्यांनी शिक्षण आणि खेळावरच राहू दिले.
    रायजी यांनी १९३३ मध्ये मुंबई जिमखाना मैदानावर पहिला कसोटी सामना पाहिला तेंव्हा ते फक्त १३ वर्षांचे होते. त्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावांची शतकी खेळी केली होती या खेळीने त्यांचे क्रिकेटकडे आकर्षण वाढवले. विशीत असतांना रायजी यांना दोन रणजी सामन्यांसाठी मुंबईच्या संघात संधी मिळाली पण चांगली कामगिरी न झाल्याने त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा होती. त्यामुळे संघातील स्थान गमावल्याचे आपल्याला फारसे वैषम्य नाही असे ते सांगतात. विजय मर्चंट व एल.पी. जय यांच्यासोबत मैत्रीच्या आठवणीही ते सांगतात.

    पुढे त्यांना बडौदा संघाकडूनही खेळायचे निमंत्रण आले. त्यांचे आजोबा बडोदा संस्थानचे दिवाण होते आणि वसंत यांचा जन्म बडोद्याचा असल्याचे समजले तेंव्हा बडोदा क्रिकेटच्या आयोजकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि वसंत रायजी यांनी बडोद्यासाठी पहिल्याच डावात ६८ आणि ५३ धावांच्या खेळी केल्या.

    दरम्यान त्यांचे चार्टर्ड आकाउन्टन्सीच्या शिक्षणासाठी इंग्लंडलाही जाणे झाले. तिथे इंडियन जिमखानासाठी सलामी फलंदाज म्हणून ते बरेच सामने खेळले. पण मुंबईच्या तुलनेत तेथील क्रिकेट फारसे दर्जेदार नव्हते.

    वसंत यांच्या क्रिकेट वेडाबद्दल पन्ना सांगतात की, क्रिकेट हेच त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या श्वासाश्वासात क्रिकेट होते. प्रत्येक विकेंडला ते क्रिकेट क्लब आॕफ इंडियामध्ये जायचे आणि मित्रांसोबत क्रिकेटवर भरपूर गप्पा व्हायच्या. थिओ ब्रागान्झा यांच्या खेळांशी संबंधीत पुस्तकांच्या दुकानालाही ते नियमीत भेट द्यायचे. एकावेळी वसंत यांच्या संग्रहात तिनशेपेक्षा अधिक क्रिकेटशी संबंधीत पुस्तके होती. मात्र कामाकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. कामाच्या वेळी काम आणि खेळाच्या वेळी खेळ हे त्यांचे तत्व होते असे पन्ना सांगतात.

    वसंत यांचे बंधू मदन हेसुध्दा उपयुक्त अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मदनसह आनंदजी डोसा व उदय मर्चंट या मित्रांसोबत त्यांनी १९३६ मध्ये जॉली क्रिकेटर्स क्लबची स्थापना केली. १९५१ मध्ये या क्लबने कांगा लीग जिंकली. १९५६ मध्ये एका सामन्यात क्रिकेट क्लब आॕफ इंडियासाठी फलंदाजी करतांना त्यांनी ड्राईव्हचा एक फटका एवढ्या ताकदीने मारला की, समोरच्या यष्टींचे तुकडेच पडले होते. या आठवणीत रमताना हसत हसत वसंत सांगतात की यष्टी कशी तुटली ते मला कळलीच नाही पण आठवणीसाठी ती माझ्याकडे देण्याची विनंती आयोजकांना केली होती. अजुनही त्यांच्या घरातील शोकेसमध्ये ती यष्टी ठेवण्यात आली आहे.

    सी. के. नायडू व सर डॉन ब्रॕडमन हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू. सर डॉन यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारसुध्दा होता आणि ती पत्रे त्यांनी आॕस्ट्रेलिया स्थित आपल्या मुलीकडे दिली आहेत. ब्रॕडमन यांना त्यांनी आॕटोग्राफ मागितला होता आणि त्याला त्यांनी प्रतिसादही दिला. त्यातून त्यांची मैत्री झाली. आपल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत ते सर डॉन यांना पाठवत असतात.

    क्रिकेट खेळणे थांबविल्यावर वसंत रायजी यांनी या खेळाचे इतिहासतज्ज्ञ म्हणूनही भूमिका बजावली. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड सचोटीने जोपासत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यात सी. के. नायडू यांच्या चरित्राचाही समावेश आहे. २०१० मध्ये आलेले ‘क्रिकेट मेमाॕयर्स’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते.

    वसंत रायजी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • लोकनेता गोपीनाथ मुंडे

    परिणामकारक, क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, याला फार महत्त्व असते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना गुन्हेगारीविरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांना अधिकार दिले. ‘एन्‌काऊंटर’ हा शब्द त्याच काळात रूढ झाला. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या संगनमताच्या काळात एन्‌काऊंटर हा शब्द रूढ करणे, ही खरी गुणवत्ता होती.पोलीसदलामध्ये सुधारणा, मुंबईतल्या टोळी युद्धाला आळा घालणे, आणि जनसामान्यांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर गोपीनथ मुंडे, हे भाजप-सेना युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. तर निवळण्याचं काम गोपीनाथराव करायचे.

  • प्रा. रमेश तेंडुलकर….सह-अनुभूतीचे किमयागार

    मराठी साहित्यविश्वात संशोधक समीक्षक आणि संवेदनशील कवी म्हणून परिचित असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकरांचा जन्म १८ डिसेंबर १९३० रोजी झाला. एम ए नंतर काही काळ गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी काम केले. कविमनाला रुचेल असे सीआयडीत काय असणार? लवकरच ते सिद्धार्थ महाविद्यालयात आणि मग कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. या कालखंडात त्यांनी रचलेल्या कविता ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. हळुवार मनाचे कवी आणि चतुरस्र समीक्षक म्हणून ते पुढे विख्यात झाले.

    मुंबईतील त्यांच्या घराचे नावच ‘साहित्य सहवास’ असे होते. सचिन देव बर्मन हे त्यांचे आवडते संगीत-दिग्दर्शक. म्हणूनच २४ एप्रिल १९७४ रोजी जन्मलेल्या आपल्या मुलाचे नाव त्यांनी सचिन ठेवले. आपली आवड त्यांनी मुलांवर लादली नाही. क्रिकेटसाठी त्यांनी सचिनला शाळा बदलण्यासही परवानगी दिली होती.

    प्रा. रमेश तेंडुलकरांच्या आईचे माहेर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या परिसरातील (जळगाव) होते अशी माहिती त्यांच्या ‘बालकवींची कविता : तीन संदर्भ’ ह्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतून मिळते.

    मराठी साहित्याच्या देशात, विशेषतः त्यातील कवींच्या प्रांतात दर्जा आणि प्रतिभेची वानवा मुळीच नाही परंतु अनेक कवींना (वाचक तर सोडाच) तथाकथित समीक्षकही न्याय देऊ शकलेले नाहीत. ‘बालकवींच्या आत्माविष्काराचे स्वरूपच मूलतः भिन्न आहे’ असे म्हणत तेंडुलकरांनी बालकवींच्या कवितांचे जे साक्षेपी रसग्रहण केले आहे त्याला तोड नाही. ‘भोगणारा जीव’ आणि ‘सृजनशील मन’ यांच्या द्वंद्वातून कलाकृती परिपूर्णतेकडे जात राहते आणि व्यक्तित्व व भावना असणार्‍या कलामनालाच ह्या द्वंद्वातून सुटका करून घेणे म्हणजे काय हे ‘कळू’ शकते ह्या टी. एस. इलिएटच्या ‘ट्रॅडिशनल अ‍ॅन्ड इंडिव्हिड्युअल टॅलन्ट’ या प्रसिद्ध लेखातील अवतरणांचे उपयोजन त्यांनी बालकवींची कविता खुलविताना केले आहे. समीक्षेपेक्षाही जास्त सौंदर्याभिमुखता आणि शब्दाशब्दावर विचार करणारी त्यांची नजाकतच या पुस्तकाच्या पानापानात दिसून येते.

    ‘फिकट निळीनें रंगविलेला कापुस मेघांचा’ ही बालकवींची ओळ वाचताना त्यांना लॉर्ड बायरनची ‘वन शेड द मोअऽ, वन शेड द लेस / हॅड हाफ इम्पेअर्ड द नेमलेस ग्रेस’ ही ओळ आठवते. ‘यक्षिणी, देवता कुणी, कपारींतुनी घोर घुमतील’ ही ओळ अनुभवताना त्यांना शेक्सपिअरच्या मॅक्बेथ या नाटकातील “फेअऽ इज फाऊल अ‍ॅन्ड फाऊल इज फेअऽ; हॉवअ थ्रू द फॉग अ‍ॅन्ड फिल्दी एअऽ” हे चेटकिणीचे उद्गार आठवतात.

    “कलावंत जितका परिपूर्ण, तितके त्याच्या बाबतीत ‘भोगणारा जीव’ आणि ‘सृजनशील मन’ या दोन गोष्टींमध्ये पूर्णत: अलगत्व निर्माण होते. ते सृजनशील मन तितक्या पूर्णपणे भावनांच्या उद्रेकांना आपले खाद्य मानून ते उद्रेक चांगले पचवून टाकते, आणि त्यांचे ‘निर्मिती’त रूपांतर घडवून आणते.” हे म्हणणे आहे उपरोल्लेखित टी. एस. इलिएटचे (भाषांतर रमेश तेंडुलकरांचे). ब्रिस्टलमध्ये केनियाविरुद्ध सचिनने काढलेल्या नाबाद १४० धावा हे ह्या अवतरणाचे समूर्त प्रत्यक्षीकरण होते. सचिनचा ‘जीव’ भोगत होताच पण त्याच्यातील सृजनशील मनाने आपले अलगत्व निर्माण केलेले होते.

    आताही कळफलकावर बोटांनी कळी दाबून हे वाक्य उमटविताना माझा हात थरथरतो आहे...‘करीब आ तुझे देख लूं, तू वही है या कोई और है’ ही सलीम कौसरच्या ‘मैं ख़याल हूं किसी और का’ या गझलेतील ओळ ‘अनुभवताना’ येणारी अनुभूती आणि सचिनने ब्रिस्टलमधील शतक पूर्ण झाल्यावर उंचावलेली बॅट पुनर्दृष्यात (रिप्ले) पाहताना अंगावर उभे राहणारे रोमांच यांना जोडणारा दुवा कोणता याचे उत्तर प्रा. रमेश तेंडुलकरांनी आधीच देऊन ठेवलेले आहे.

    वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी रमेश तेंडुलकरांनी काळाच्या पडद्याआड जावे एवढी प्रौढता मराठी काव्यसमीक्षेला कधीही आलेली नव्हती (अद्यापही ती आलेली नाही) पण पत्नी रजनी; पुत्र अजित, नितीन व सचिन; प्रीतीश, ग्रीष्मा, रोहन, करिष्मा आणि सारा ही ‘नात-पाखरे’ (हा शब्द त्यांच्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत आहे) आणि कन्या सविता या सर्वांना मागे ठेवून १९ मे १९९९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    पुस्तकसंपदा

    संपादित ग्रंथ

    चौकोनी आकाश (अनंत काणेकरांच्या कविता)
    कविता दशकाची (१९८०च्या दशकातील महत्त्वपूर्ण अशा दहा कवींच्या कवितांचे संपादन)
    मृण्मयी (इंदिरा संत यांच्या निवडक कविता)
    मराठी संशोधन खंड - १३ व १४,
    आठवणीतल्या कविता (भाग १ ते ४, जुन्या काळच्या मराठी पाठ्यपुस्तकांमधील कवितांचा संग्रह)

    स्वतंत्र पुस्तके
    मानस-लहरी (कुसुमाग्रजांचे ‘जीवनलहरी’ वाचून त्यांनी अनुभवलेल्या संवेदना)
    सहवासातील साहित्यिक
    बालकवींची कविता : तीन संदर्भ (केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांच्या परिप्रेक्ष्यातून बालकवींच्या कवितांचे साक्षेपी दर्शन)

    - डॉ. आनंद बोबडे

  • विष्णू दिगंबर पलुसकर

    उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचेच शिष्य होते.

    विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्व होते. त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान केले आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते..

    "गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय.हिन्दुस्तनि रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. विष्णु दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.

    १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे. ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गायक पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत. पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचे निधन २१ ऑगस्ट १९३१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट