जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारतातील चार राज्यांत पसरलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहात १८,००० हून अधिक लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डीझेल एंजिने व सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे ३६, ६५ व ४० टक्के उत्पादन किर्लोस्करांकडून होते. ह्या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन ६३ कोटी रूपयांचे आहे.
September 26, 2021
राजकारणाचा वारसा वडिलांकडून लाभलेले पण स्वकर्तृत्वाच्या आधारे यशाचे शिखर गाठणारे सक्षम नेतृत्व.
September 3, 2010
तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक त्यांना तब्बू म्हणून ओळखतात. तिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी झाला. तब्बूच्या आई वडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं. शबाना आझमींची पुतणी आणि फराहाची बहीण असल्याने तब्बूचे बालपणच ग्लॅमर जगतात गेले. वयाच्या १४ व्या वर्षीच तिने 'हम नौजवान' मधून पदार्पण केले होते. तब्बूने आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये आपल्या लूक्स सोबत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र तब्बूने आपली हेअर स्टाईल कधी बदलली नाही, तब्बू आपले काळेभोर लांब केस आपली संपत्ती मानते. रुक रुक, अरे बाबा रुक’ म्हणत ती या सिनेमासृष्टीत आली. आल्यापासून आपल्या एक एक चित्रपटामधून सुरू झालेली तिची ही यात्रा तिला शब्दश: विजयपथावर घेऊन गेली. एकाहून एक वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका केलेल्या तब्बूने आपले स्वत:चे असे एक स्थान या चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे.
‘माचीस, ‘हुतुतू, ‘बॉर्डर, ‘चांदनी बार, ‘अस्तीत्व’ यासारख्या चित्रपटात सुंदर भूमिका केल्या आहेत. हिंदीत एवढी यशस्वी असलेली तब्बू दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर काम करत असते. विशेषतः साथऊच्या चित्रपटांमध्ये तब्बूचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळतो. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाला डेट केलेल्या तब्बूचे नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत जुळले होते. यांच्या अफेअर खूप चर्चा एकवटली होती. परंतु दोघांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. नागार्जुन विवाहित होते आणि त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. आपल्या नात्याचे काहीच भविष्य नाहीये याची जाणीव झाल्यानंतर तब्बूने नागार्जुनसोबतचे नाते तोडले. तब्बूचं लग्न झालेलं नाही. तब्बूला फोटोग्राफीची आवड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 7, 2017
काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.
"शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.
काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.
एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.
खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.
मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.
- अनिल गोविलकर
August 6, 2018
कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे!
June 22, 2021
आदेश श्रीवास्तव हे अभिनेता बनण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६४ रोजी झाला."अंगारे‘ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. नंतर तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केले. सन १९९३ मध्ये 'कन्यादान' या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर १०० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात 'चलते चलते', 'बाबुल', 'बागबान', 'कभी खुशी कभी गम', 'राजनिती' या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत लक्षवेधी ठरले. त्यांनी 'सना' या लघुपटाचे दिग्दर्शनही केले.
आदेश यांना २०११ मध्ये कॅन्सर झाला होता. मात्र, त्यावर त्यांनी मात केली. आजारपणानंतर पुन्हा संगीतक्षेत्रात कार्यरत होत त्यांनी 'वेलकम बॅक' या सिनेमाला संगीत दिले. हा त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा ठरला. आदेश श्रीवास्तव यांचे निधन ५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 4, 2017
खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजुबत झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समजत असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यान, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.
"हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,
जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मीन चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!
गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.
- अनिल गोविलकर
September 4, 2018
विविध जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर नोव्हेंबर १९८७ मध्ये त्यांची भारताच्या नौसेनेचे प्रमुख म्हणून ‘ॲडमिरल’पदी नियुक्ती करण्यात आली. नौसेना प्रमुखपदाच्या त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत दोन वर्षे ते भारतीय सेनादलांचे संयुक्त प्रमुख (‘चीफ ऑफ जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ’) होेते.
December 11, 2020
वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.
March 9, 2022
मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला.
नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले, पण तत्कालीन व्यावसायिक रंगभूमीवर मात्र काही दिवसातच ते अपयशी ठरले. तरीही, कमतनूकरांनी लिहिलेल्या संवादांचा नूर काही औरच आहे हे समीक्षकांच्या नजरेस आले, आणि कमतनूकर हे नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत लेखक आहेत, हे सिद्ध झाले. नाटकाची संहिता राम गणेश गडकरी यांच्या खटकेबाज संवादांची आठवण करून देणारी आहे.
’श्री’चे ५०-६० प्रयोग झाल्यानंतर 'ललित कलादर्श’ने प्रयोग करणे थांबवले. मात्र, ललित कलादर्शच्या शतक महोत्सवात हे नाटक परत रंगभूमीवर आणायचे असे डोंबिवलीकरांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे ४ जानेवारी २००८ रोजी या नाटकाचा प्रयोग ’डोंबिवली भूषण’ शं.ना. नवरे यांच्या उपस्थितीत झाला.
’श्री’ नाटकाची मूळ संहिता २५० पानांची होती, ती ६० पानांवर आणली गेली. अप्पासाहेब रावबहादुर, त्यांचा जुगारापायी बिघडलेला मुलगा कुसुमाकर, त्यांची तरुण मुलगी श्री व घरजावई श्रीकांत, कुसुमाकर याची पत्नीस कात्यायनी व कुटुंबाला पूर्णपणे बरबाद करणारा अप्पासाहेबांचा मित्र व खलनायक विश्राम आणि रेसचा बुकी सत्यवान सत्यवादी अशी मोजकी सात-आठ पात्रे नाटकात आहेत. नाटकातल्या ’सत्यवान सत्यवादी’ नावाच्या इरसाल पात्राची भूमिका सुहास नवरे यांनी व्यावसायिक अंदाजाने खुलवली होती. श्रीकांतला घोड्याच्या रेसचा नाद सत्यवान आणि विश्राम हे दोघे लावतात; पण गांजेकस असलेला सत्यवान मनाने चांगला आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत.
विश्रामची भूमिका डोंबवलीकर विवेक जोशी यांनी, अप्पासाहेबांची सुरेश ताम्हाने यांनी आणि ’श्री’ची प्रज्ञा देवस्थळे यांनी रंगविली होती नाटकातल्या पदांना विलास हर्षे यांनी चाली बसवून दिल्या होत्या. हे नाटक वेलणकर यांच्या ’सार्थक’ या संस्थेने रंगभूमीवर सादर केले होते. बापूराव पेंढारकार जेव्हा हे ’श्री’ नावाचे नाटक रंगभूमीवर सादर करायचे, तेव्हा पडद्यावर कॅमेराच्या साहाय्याने ते घोड्यांची शर्यत दाखवायचे. लोकांसाठी तो सर्वाधिक आकर्षणाचा मामला होता. २००८ साली डोंबिवलीत झालेया प्रयोगात मात्र पडद्यावर शर्यती दाखवणे शक्य झाले नव्हते. नरहरी गणेश कमतनूरकर यांचे निधन १३ डिसेंबर १९६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti