(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य

    एकीकडे अगदी नाचणं जीवावर येत असलेल्या सन्नी देओल, आणि अजय देवगणसारखे हिरो गणेशकडून धडे घेणं पसंत करतात; तर दुसरीकडे हृतिक रोशन सारखे नृत्यनैपुण्य असलेले लोकही त्याला पसंती देतात. माधुरीपासून ते कतरीना पर्यंत सगळ्यांसाठी तो नृत्य बसवतो. आपल्या सव्वाशे किलोच्या शरिराचा कसलाच अडथळा न होऊ देता नृत्य, अगदी एकेक स्टेप करून दाखवतो आणि आपल्या मुंबईय्या भाषेत समजावूनही सांगतो!

  • प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व

    कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली.

    १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच मा.कुमार जींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमार जींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी मा.भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर मा.कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता. १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमार जींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या.

    कुमार जी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. मा.कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमार जींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या.

    चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमार जींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा मा.जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मा.मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक मा.विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून मा.कुमारजींना आश्चर्य वाटले.

    पंडितजींनी जब्बारना विचारले, कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले, पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. १९९० साली कुमार गंधर्व यांचा पद्म विभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला. कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    कुमार गंधर्व यांचे ऋणानु बंधाच्या
    https://www.youtube.com/watch?v=K0CXNZyGVeU

    कुमार गंधर्व यांचे रागदारी
    https://www.youtube.com/watch?v=PCpMcvWkNy4

    कुमार गंधर्व यांची निरगुणी भजन
    https://www.youtube.com/watch?v=6CAFRYsNXXM

  • तबला वादक पं. विभव नागेशकर

    पं.विभव नागेशकरांनी श्रीमती झरीन दारुवाला शर्मा, पं. डी. के. दातार, श्री.रोहिणी भाटे, पं. बुद्धादित्य मुखर्जी, पं. शिवकुमार शर्मा, पं.जसराज, पं. भिमसेन जोशी, पं.विश्वमोहन भट, प.हरीप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आणि संगीतक्षेत्रात श्रोत्यांच्या मनात नाव कमाविले. त्यांनी प्रतिष्ठीत अशा श्रीमती गिरीजाबाई केळकर समारोह (फोंडा, गोवा), केसरबाई केरकर महोत्सव (भोपाळ), उ.अल्लादिया खान स्मृती दिन समारोह(चेंबुर), पंडीत ओंकारनाथ फेस्टिवल (जामनगर), लक्ष्मीबाई जाधव समारोह (चेंबुर) स्वरानंद (दहीसर-मुंबई), पेशकर फाऊंडेशन (मुंबई),सप्तक (नाशीक) अनेक कार्यक्रमात तबला वादन केले आहे.

  • एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन

    "महान" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०६ रोजी झाला. एस.डी. बर्मन सर्वार्थाने दादाच होते. खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या प्रतिभेची कल्पना असावी, म्हणूनच राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे शिकण्याचे धाडस त्यांनी दाखवले. १९३० च्या दशकात त्यांनी रेडिओ आणि बंगाली संगीतात भरपूर मुसाफ़िरी केली आणि १९४४ मध्ये अशोक कुमारांच्या काही चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई गाठली. पुढील काही वर्षात त्यांना यश मिळालेही पण हळव्या मनाच्या बर्मन दादांना मुंबईची स्पर्धा रुचली नाही आणि ते .कलकत्त्याला परत जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये बसलेही होते पण तसे होणे नव्हते, त्याना मनधरणी करून परत नेण्यात आले आणि पुढचा इतिहास आहे!

    देव आनंदच्या नवकेतन बॅनर साठी सचिनदांनी पहिल्यांदा 'अफसर' ला संगीत दिले आणि पुढची चोवीस वर्षे नवकेतनचा चित्रपट आणि बर्मनदांचे संगीत हे समीकरण बनले. बाजी, जाल, टॅक्सी ड्रायवर, मुनिमजी, पेयिंग गेस्ट, सोलवा साल, काला बाजार, बात एक रात की, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी.. पन्नास आणि साठच्या दशकामधले हे सुमधुर संगीत असलेले चित्रपट, एका पेक्षा एक सुंदर सांगीतिक अनुभव आहेत! सचिनदांचे संगीत काळाच्या चौकटीत कधीच बसणारे नव्हते. जितका त्यांची शास्त्रीय संगीतावर आणि बंगाली लोकसंगीतावर पकड होती, तितकेच त्यांचे वेस्टर्न वरती प्रेम होते, त्यांचे संगीत प्रवाही होते म्हणून आजही ते आउटडेटेड वाटत नाही. त्यांच्या संगीतामध्ये मूड्स दडलेले असतात, एकाच चित्रपटात ते विविध .जॉनर वेगवेगळ्या मूड्स मध्ये वेगवेगळ्या गायकांकडून गाउन घेत, त्यामुळे त्यांचे संगीत कधीच एकसुरी झाले नाही.

    हरहुन्नरी किशोर कुमारला त्यानी देवचा आवाज बनवला. किशोर कुमारला आराधना मधून त्यांनीच शिखरावर नेऊन बसवले पण ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवरचा देव आणि त्याला किशोरचा आवाज - अतुलनीय! पेईंग गेस्ट मधले खट्याळ 'छोड दो आंचल' असो किंवा तीन देवीया मधले चार्मिंग 'ख्वाब हो या कोई हकिकत', देवचा नायिकेभोवती पिंगा घालणारा नायक किशोरने अचूक टीपला!
    मोहम्मद रफी हा देवाने केवळ स्वतः गाता येत नसावे म्हणून आपल्यासाठी पाठवलेला देवदूत होता. सचिनदानी जर देवच्या हॅपी गो लकी इमेज साठी किशोरला वापरले असेल तर 'अपसेट' देव साठी रफी साहेबांइतका तरल आवाज स्वाभाविक होता. गाईड मधले अजरामर गायकीचा नमुना असलेले 'दिन ढल जाए' असो की आशा भोसले सोबतचे 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' असो, रफी साहेबानी त्यांच्या गळ्यातली नशीली तार देव साठीच राखून ठेवली होती! हिंदी सिनेसंगीतामधली काही अजरामर डुयेट्स 'दिल पुकारे आरे आरे', 'तेरे मेरे सपने' असो किंवा बेधुन्द 'खोया खोया चांद' असो पडद्यावरचा देव आणि दैवी आवाजात गाणारे रफी - आजही 'सिनॉनिमस' आहेत. हेमंतकुमारांना हिंदीत आणण्याचे श्रेयही सचिनदांना जाते - देव साठी!

    सोलवा साल मधले 'हैं अपना दिल तो आवारा' आणि ती हारमॉनिका किंवा 'बात एक रात की' मधले हॉँटिंग 'ना तुम हमे जानो', हेमंतदाच्या खर्जातल्या आवाजाला बर्मदानी देवआनंद साठी अचूक वापरले. जरी रफी आणि किशोर देव आनंदसाठी ठरलेले आवाज होते तरी सचिनदानी गाण्याला भाव देणारे गायकच नेहमी वापरले. 'टॅक्सी ड्रायवर' मधले तलत मेहमूदच्या तरल गळ्यातले 'जाए तो जाए कहाँ' दुसर्या कुणी इतक्या उत्कटतेने कदाचितच गायले असते. सचिनदा आणि देव आनंद यांची गाणी म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्सचा रंगीबेरंगी कॅनव्हास आहे. बाजी साठी साहिर लुधियानवि ने एक सुंदर गजल लीहली होती - सचिनदानी तिला क्लब सॉँग बनवले, पण काय बनवले .. 'तद्बीर से बिगडी हुई तक्दीर बना ले, अपने पे भरोसा है तो यह दाव लगा ले' . पदार्पणापासून अखेरपर्यंत आघाडीवर राहिलेले एस.डी.बर्मन एकमेव संगीतकार असावेत. किशोरकुमार यांना सर्वप्रथम पार्श्वीगायनाची संधी दादा बर्मन यांनीच दिली. ते किशोरदांना आपला दुसरा पुत्र मानत. किशोरदा व महमद रफी या अत्युच्च शिखरावरील पार्श्वंगायकांना जवळजवळ समान संख्येत गीते देणारेही ते एकमेव संगीतकार होत. देव आनंद हे त्याचे ठळक उदाहरण होय. ‘मिली’ चित्रपटातील ‘बडी सुनी सुनी है’ हे सचिनदा रुग्णालयात असताना ध्वनिमुद्रित झालेले गीत किशोरदांच्या काही सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. सचिनदांनी १४ हिंदी आणि १३ बंगाली चित्रपटांसाठी पार्श्वागायन केले. एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / Ganesh Shelke

    एस.डी.यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=q21zbX-NHy0

  • जेष्ठ गीतकार एस.एच.बिहारी

    एस.एच.बिहारी यांचे पूर्ण नाव शमशूल हुदा बिहारी. आपल्या या रोमँटिक गीतलेखनाने तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे एस. एच. बिहारी यांचा जन्म बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील अरा येथे. लहानपणापासूनच त्यांना भाषेचे प्रचंड वेड. त्या वेडातून त्यांनी हिंदी, उर्दू आणि बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. पण भाषेइतकेच एस. एच. बिहारी यांना फुटबॉलचेही वेड होते. कोलकात्याच्या मोहन बगानकडून तरुणपणी ते फुटबॉल खेळायचे. फुटबॉल खेळत असताना पायांच्या लयबद्ध हालचालीबरोबरच बिहारी यांच्या मनात शब्दांचा मेळा भरायचा. पुढे या काव्यप्रतिभेला गीतांचा आयाम लाभला आणि एस. एच. बिहारी नामक गीतकार जन्माला आला. पोटापाण्यासाठी मुंबईला आल्यानंतर बिहारी यांनी काही काळ रबराच्या कारखान्यात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहिले, परंतु गीतलेखनाचे वेड काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच राजा मेहंदी अली खान यांच्याशी बिहारी यांची मैत्री झाली. खान साहेबांनी त्यांना निर्माते-दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याकडे पाठवले. मुखर्जींनी बिहारी यांच्याकडे साशंकतेने पाहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला, ‘क्या बेचते हो?’ या पठ्ठ्याने तत्काळ उत्तर दिले, ‘दिल के टुकडे बेचता हूँ।’ बिहारींच्या उत्तराने मुखर्जी प्रभावित झाले. त्या वेळी मुखर्जी ‘शर्त’ चित्रपट बनवत होते. त्यांनी विनाशर्त ‘शर्त’च्या गीतलेखनाची जबाबदारी बिहारींवर टाकली. ना ये चाँद होगा, मोहब्बत में मेरी तरह, देखो वो चाँद चुपके या त्यांच्या गाण्याला हेमंतकुमार यांच्या संगीताचा साज लाभला आणि ‘शर्त’मुळे एस. एच. बिहारी हे नाव रसिकांच्या कानात रुजले. ‘शर्त’च्या आधी संगीतकार अनिल विश्वास यांनी बिहारी यांना संधी दिली होती. मात्र शर्तमधल्या मधाळ व प्रेमरसयुक्त गाण्यांनी बिहारींना नाव मिळवून दिले. त्यानंतर मात्र बिहारी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर बिहारी यांच्या गीतांची लय आणि ओपी यांचा ठेका यांचे सूर जुळले आणि रसिकांच्या भेटीला आली रसाळ, रोमँटिक अविस्मरणीय गाणी. काश्मीर की कली, ये रात फिर ना आयेगी, सावन की घटा, मोहब्बत जिंदगी है, किस्मत, प्राण जाए पर वचन ना जाए, एक मुसाफिर एक हसीना आदी चित्रपटांतील गाणी ओपी-बिहारी कॉम्बिनेशनची काही उदाहरणे. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकाराबरोबरही बिहारींचे सूर चांगले जुळले. कौन है जो सपनों मे आया, कहाँ चल दिये इधर तो आओ, उनसे मिली नजर (झुक गया आसमान) ही काही गाणी. ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आँखे, कोई राज है इनमें गहरा... काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्यातही उठून दिसणारी शर्मिला टागोर आणि तिच्या सौंदर्याने भारावलेला शम्मी कपूर. जोडीला ओ. पी. नय्यरचे ठेकेबाज संगीत. या गाण्याने एका पिढीला अक्षरश: वेड लावले. शर्मिला टागोरच्या त्या काळच्या सौंदर्याचे एवढे अचूक आणि लयबद्ध वर्णन करणार्यान या गाण्याचे शब्द होते गीतकार एस.एच.बिहारी यांचे. रोमान्स, इश्क, मोहब्बत या प्रेमाच्या भावनांना शब्दरूपी उपमा आणि अलंकाराने सजवून त्याचे लयबद्ध काव्य तयार करणे, ही मा.बिहारी यांची खासियत होती. इशारो इशारों मे दिल देनेवाले (काश्मीर की कली) मधून येणारा प्रेमाविष्कार ये चाँद सा रोशन चेहरा अशा स्तुतीवर येऊन बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (एक मुसाफिर एक हसीना) या वळणावर कसा स्थिरावतो, हे बिहारींच्या मधाळ शब्दांत ऐकण्याचा आनंद विरळाच. मै शायद आप के लिए अजनबी हूँ (ये रात फिर ना आयेगी)मधला अनोळखी भाव, किसी ना किसी से कभी ना कभी(काश्मीर की कली)मधला दुर्दम्य आशावाद, जरा होले होले चलो मेरे साजना (सावन की घटा)मधले आर्जव, उनसे मिली नजर के मेरे होश उड गये (झुक गया आसमान)मधली सर्वस्व हरपल्याची भावना, चाहे लाख तूफान आये (प्यार झुकता नही)मधला वज्रनिर्धार, हैरान हूँ आपकी झुल्फों को देखकर (जबाब हम देंगे)मधले कौतुक, चैन से हमको कभी आपने जीने ना दिया (प्राण जाए पर वचन ना जाए)मधला विरक्त भाव, लाखो है यहाँ दिलवाले (किस्मत)मधले नैराश्य, कजरा मोहब्बतवाला अखियों मे किसने डाला (किस्मत)मधला प्रफुल्लित भाव, यही वो जगह है (ये रात फिर ना आयेगी)मधला आठवणींचा धांडोळा, कौन है जो सपनों मे आया (झुक गया आसमान)मधला स्वप्नवाद, तुमसे मिलकर ना जाने क्यो (प्यार झुकता नही)मधला स्मृतिगंध आणि प्यार हमारा अमर रहेगा (मुद्दत)मधला आशावाद, असा विविध नवरसांनी युक्त शब्दांचा मळा एस. एच. बिहारी यांनी फुलवला होता. एस.एच.बिहारी यांचे निधन २५ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / http://www.shbihari.com
    मा.एस.एच.बिहारी यांची वेब साईट. http://www.shbihari.com

  • ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे

    माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.

  • मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

    मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला.आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत.

    आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.

    त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.

    आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.

    ‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते.

    तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.

    नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते. चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या.

    त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    माहेरची माणसे चित्रपट.
    https://www.youtube.com/watch?v=VqdxHNHxRDA
    संसार चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=pbKOK2XH-R8

  • नितीन माधव पायतोडे

    नितीन पायतोडे हे मूळचे नागपूरचे पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर. चित्रपट, नाटकं यामध्ये विशेष आवड असणार्‍या नितीन यांनी अविष्कार या हौशी नाट्य संस्थेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

  • हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे

    हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला.

    वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’ प्रवेश मिळून खर्यात अर्थाने त्यांच्या ‘शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला’ सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते…

    साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला ‘शास्त्रीय संगीत’ शिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’मध्ये प्रवेश मिळवून ‘शास्त्रीय संगीत’ हा त्यांचा ’ऐतिहासिक प्रवास’ खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    वसंतराव देशपांडे यांनी ‘हिंदी चित्रपट संगीत’ फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची ‘गायनकला’ जाणून ‘भालजी पेंढारकर’ यांनी ‘कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात ‘कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण’ करण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकार’ म्हणून ते गाजले.

    बेगम अख्तर त्यांना आदराने ‘गुरुजी’ संबोधित करत, यातच त्यांची ‘यशस्वी कारकीर्द’ दिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत ‘गझल व ठुमरी’ या संगीत प्रकारातील ‘एक प्रस्थापित गायक’ ही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ‘ख्याल गायकीची संधी’ त्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!

    ‘ग्वालियर घराण्याचे’ अधिकृत शिक्षण घेत असतानाच ‘किराणा व भेंडीबजार’ या घराण्याच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण चीजा’ वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, पु.ल. देशपांडे यांनीच ‘अनेक उस्ताद’ असणार्या. या ‘शागीर्द’ला ‘एकलव्य’ ही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायक’ हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या ‘उस्तादांच्या कृपेने’ त्या प्रत्येकाच्या ‘घराण्याच्या गायकीतील सत्व’ आपल्या गळ्यात उतरवून ‘स्वत:च्या खास अशा गायकीला’ जन्म दिला. ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ यांच्या ‘संगीत नाटकांचा’ तो काळ होता. त्यांची ‘स्टाईल’ वसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळत’ त्यांनी आपल्या गायकीमध्ये ‘दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना ‘सार्थ अभिमान’ होता, हेही विशेषच!
    वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले.

    लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी ‘आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळा’ या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात ‘अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना’ यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे ‘गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं’ या बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ‘ठुमरी व गझल’ या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना ‘असद अली खॉं’ नामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात ‘पतियाळा घराण्याचे गायक’ असल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ ‘मारवॉं’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले.

    १९४२ मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात ‘मिलिटरी अकौंटस’ खात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी ‘पंडित सुरेशबाबू माने’ यांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना ‘भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खान’ यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी जवळपास ‘८० मराठी व २ हिंदी’ चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले. पुण्यातील वास्तव्यात त्यांना ‘पु.ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर’ या दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं ‘अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळ’ राहिलं! ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने ‘पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीत’ यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना ‘अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रय’ लाभला.

    १९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि ‘नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीत’ रसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील ‘खानसाहेब ही व्यक्तिरेखा’ रसिकांच्या मनात इतकी ‘भरली, ठसली व सामावली’ की त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली ‘वसंतखॉं देशपांडे’ ही पदवी ‘खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! या नाटकातील ‘खानसाहेब’ या व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ यांच्या मनात ‘पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाईल’ होती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच.

    ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं! १०६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या ‘शास्त्रीय संगीत साधना’ याचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ सोबतच त्यांच्या या त्यांच्या ‘ऑडिओ सीडी व डीव्हीडी’ बंदिस्त ‘रागदारी मैफली’ रसिकांच्या संग्रही असून त्यांची ‘अभिजात संगीताची’ भूक, मन व कान’ तृप्त करत आहे.

    १९८३ मध्ये वसंतराव देशपांडे यांना संगीत कला अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. वसंतराव देशपांडे यांचे नातू ‘राहुल देशपांडे’ यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे, त्या मुळे पुन्हा संगीत नाटकांना पुनश्चय चांगले दिवस येत आहेत. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ नितीन देशपांडे

    वसंतराव देशपांडे यांचे गायन.
    https://youtu.be/qI7jSLNBnrs
    https://www.youtube.com/watch?v=qI7jSLNBnrs&feature=youtube
    https://www.youtube.com/watch?v=TcfyGLSYjRw&feature=youtube
    https://www.youtube.com/watch?v=27T21Vy9zTY
    https://www.youtube.com/watch?v=tUcXQ39yD5c&t=818s

  • नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

    श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत.