(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • उपेन्द्र लिमये

    उपेन्द्र लिमये हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • अजित भुरे

    वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत.

  • सुभाष मेंढापूरकर

    हिमाचल प्रदेशातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहनिर्श झटणार्‍या 'सुत्र' संस्थेचे संस्थापक सुभाष मेंढापुरकर.

    हिमाचल प्रदेशातील निराधार, अविवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध महिलांच्या पुनर्वसनासाठी 'सोशल अपलिफ्टमेंट थ्रू रुरल अॅक्शन' अर्थात 'सुत्र' या संस्थेची स्थापना करणारे मेंढापूरकर हे मूळचे सोलापूरचे. पुण्यात राहून त्यांनी मराठीत एमए आणि त्यानंतर टीआयएसएस मधून एमएसडब्ल्यू केल्यानंतर १९७७ साली एका प्रकल्पाच्या निमित्ताने ते हिमाचल प्रदेशात गेले. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसा, दारू पिऊन महिलांना मारहाण असे प्रकार तेथे सर्रास सुरू होते. त्या परिस्थितीत गरज होती ती तेथील महिलांच्या सक्षमीकरणाची तसेच त्यांना संघटित करण्याची. मेंढापूरकरांनी हे आव्हान उचलले आणि वंचित महिलांना 'सुभाष भय्या'चा मोठा आधार मिळाला. सुरूवातीच्या काळात मेंढापूरकरांना गावकर्‍यांचा बराच रोष पत्कारावा लागला, पण ते मागे हटले नाहीत. महिला सक्षमीकरण, आथिर्क स्वावलंबन, बचतगट, आरोग्य सुविधा, विधवांच्या मुलांना शिष्यवृत्या अशा विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरू राहिले.

    स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवणारी पहिली संस्था म्हणून 'सुत्र'कडे पाहिले जाते. आज मात्र सामाजिक आणि आथिर्क संदर्भ बदलले असल्याचे मेंढापूरकरांना प्रकर्षाने जाणवते आहे. आजच्या राजकारण्यांना सभ्यतेचा आदर करण्याची सवय राहिलेली नाही. पूर्वी विरोधकांनाही इज्जत होती, पण आता सगळे चित्रच बदललेय असे ते सांगतात.
    महाराष्ट्रात संस्था-संघटना खूप आहेत. पण मनापासून काम करण्याची त्यांची तयारी नाही. एकीकडे व्यावसायिक संस्था तर दुसरीकडे राजकारणाबाबत जागृती नसणार्‍या संघटना भरपूर झाल्या आहेत, हेही त्यांचे एक निरीक्षण. आत्ताच्या लोकांना राजकारणाचे मर्म कळत नसल्यामुळे त्यांना आपल्या कामाचे राजकारण करता येत नाही म्हणूनही ते मागे पडतात किंवा दुर्लक्षित राहतात असे त्यांचे मत बनले आहे. याला कारण म्हणजे १९८० नंतर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा किंवा युवकांचा कोणताच लढा उभा राहिलेला नाही. त्यामुळे आत्ताची पिढी प्रगल्भ असली तरी राजकारणाचे भान, जाण त्यांना नाही असे ते सांगतात. पूर्वीच्या लोकशाहीत सर्वसामान्यांमध्ये संघर्ष करण्याची ताकद होती. आता लढ्यांमध्ये मध्यमवर्ग कुठेच दिसत नाही. लोकशाहीच्या लढ्यांची जागा हिंसेने, दंडुकेशाहीने घेतली आहे आणि लोकशाहीला ते सर्वात घातक ठरू शकते याची चिंता मेंढापूरकरांना सतावते आहे.

    शेती करू इच्छिणार्‍या महिलांना जमीन द्या यासाठी सध्या त्यांचा लढा सुरू आहे. शेती करून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात असा विश्वास मेंढापूरकरांना असून त्यासाठी ते लढताहेत.

    त्यांना 'सारडा समान संधी पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • सदाशिव आत्माराम जोगळेकर

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.

  • डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे

    पाच संतकवी, महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, लीळाचरित्र, मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड – १, प्राचीन मराठी शब्दकोश, गुरुदेव रानडे – चरित्र व तत्त्वज्ञान, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

  • कृष्णाजी वासुदेव पुरंदरे

    कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.

  • माधव भंडारी

    एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • डॉ. मोहन आगाशे

    मोहन आगाशे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटात काम करणारे लोकप्रिय अभिनेते आहेत.

  • उषा मंगेशकर

    ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.

  • कविता राऊत

    आंतरराष्ट्रीय पातळीवर भरवल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धा असोत, या स्पर्धामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा आणि थरारकतेचा कोणता भाग असेल तर तो अ‍ॅथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्सचा! अ‍ॅथलेटिक्समध्ये तर अगदी ‘पळा पळा कोण पळे पुढे तो’ अशी चुरस आणि त्यामागे असणारी जिद्द यांचे प्रदर्शन असते. गुआँगझूमध्ये सध्या चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत या दोघींनी पाठोपाठ येऊन अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले.

    प्रीजा श्रीधरन हिने ही स्पर्धा ३१ मिनिटे आणि ५०.४७ सेकंदांमध्ये जिंकली. तिच्यामागे अगदी सूतभरावरच असणारी कविता दुसरी आली आणि ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. तिने हे अंतर ३१ मिनिटे आणि ५१.४४ सेकंदांत पार केले. म्हणजेच एका सेकंदापेक्षाही कमी वेळाने ती मागे पडली. कविताचा ही सर्वोत्तम वेळ आहे, असे म्हटले पाहिजे. गेल्याच महिन्यामध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत तिला एवढय़ाच अंतरासाठी ३३ मिनिटे आणि ५.२८ सेकंद एवढा वेळ लागला होता. त्या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. त्या तिच्या यशाविषयी ‘लोकसत्ता’ने ‘सावरपाडय़ाची कविता’ हा अग्रलेख (११ ऑक्टोबर) लिहिला होता. प्रीजा आणि कविता यांच्यात पहिला आणि दुसरा क्रमांक हा अक्षरश: ‘फोटोफिनिश’ने ठरवण्यात आला. प्रीजाला सुवर्णपदक मिळाले आणि आपल्याला ते मिळाले नाही म्हणून कविताला नक्कीच वाईट वाटलेले नाही. प्रीजा श्रीधरन ही केरळची मुलगी. तिचा जन्म १३ मार्च १९८२ रोजी इडुक्की जिल्हय़ात मुल्लकाणममध्ये झाला. २००६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती पाच हजार आणि दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पाचवी आली होती. थोडक्यात तिचे पदक हुकले होते. २००७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मात्र तिने रौप्यपदक मिळवले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत ती पात्र ठरली, पण प्रत्यक्ष तिचा क्रमांक पंचविसावा आला होता. गुआँगझूमध्ये तिचा धावण्याचा वेग हा तिचा विक्रमी आहे, असे म्हटले तरी चालेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यासाठी तिने ३२ मिनिटे आणि ४९.४७ सेकंद एवढा वेळ घेतला होता. ती तिची सर्वोत्तम वेळ होय. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रीजा तापाने फणफणली होती. त्यामुळे तिला स्पर्धेपासून दूर राहावे लागले होते. आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आईला देते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिला तिच्या आईने अगदी तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपले होते. तिला एक भाऊ आहे आणि आई हे तिचे सर्वस्व आहे. तिने आपले पदक आई आणि तिचा भाऊ यांना अर्पण केले आहे. तिची आई आजही दुसऱ्यांच्या घरी काम करून आपला संसार चालवते. सुधा सिंग ही दुसरी सुवर्णपदक विजेती! अडथळय़ांच्या स्पर्धेत तिने तीन हजार मीटरसाठी नऊ मिनिटे आणि ५५.६७ सेकंद एवढा वेळ घेतला. गुआँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला मिळालेले यश हे अनपेक्षित आहे, असे तिनेच म्हटले आहे. या स्पर्धेतल्या चिनी स्पर्धकांमुळे आपल्या मनावर प्रचंड दडपण होते, असे ती म्हणाली आहे. सुधा ही उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीची कन्या होय. तिने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असले तरी आपल्याबद्दल खेळाडूंची उपेक्षा वृत्ती आपल्याला बोचत होती, असे तिचे म्हणणे आहे. कदाचित त्यामुळेच तिला या यशाचे अप्रूप वाटत असले पाहिजे. शेवटच्या चारशे मीटरमध्ये तिने ही बाजी मारली, अन्यथा तिचे पदक हुकण्याचीच शक्यता होती. कविता राऊत ही महाराष्ट्राची कन्या. तिचे वडील वनखात्यात कामाला आहेत. ती आदिवासी भागातून आलेली आहे. तीही गरिबाघरची लेक आहे. घराची जमीन शेणाने सारवण्यापासूनची सर्व कामे तिने केलेली आहेत आणि आताही ती करताना तिला ओशाळवाणे वाटणार नाही. नाशिक जिल्हय़ात हरसूल तालुक्यातील सावरपाडा या गावची ही कन्या. दहावीस किलोमीटर पाण्यासाठी वणवण करायची सवय असलेली ही मुलगी एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत यशस्वी होईल, अशी महिन्याभरापूर्वी कुणी अपेक्षाही केली नसती. पण तिच्या पदरी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचे यश होते. तिला मिळालेले कांस्यपदक तिला अधिक उंची गाठण्यासाठी खुणावत होते! ५ मे १९८५ रोजी जन्मलेली कविता लागोपाठच्या दोन महिन्यांत दोन पदकांची मानकरी ठरली आहे आणि याच क्रमाने पाहिले तर या तिघी २०१२ मध्ये लंडनला होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी होतील, अशी आशा करायला हरकत नाही. या तिघींमधला एक समान दुवा हा, की त्या सामान्य परिस्थितीतून पुढे आल्या आणि त्या ग्रामीण भागात वाढल्या आहेत. त्या जिंकतील आणि त्यांनी जिंकावे यासाठी अर्थातच समाजाने आणि सरकारने त्यांची जिद्द टिकावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारने त्यांना आतापासूनच धावण्यायोग्य वातावरण निर्माण केले तरी खूपच साहय़ होईल.

    -----------------------------------------------

    राऊत, कविता

    सावरपाडा एक्स्प्रेस अर्थात कविता राऊत. भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर रोवणा-या कविताने हे सारं अल्पावधीत कमावलेलं नाही. कित्येक वर्षांची तपश्चर्या यामागे आहे. धावणं तिच्या नसानसात आहे. तिने लहानपणासूनच काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या होत्या. त्याप्रमाणेच तिची पावलं पडताहेत. पायाला भिंगरी लावून पळणारी कविता घरात मात्र अतिशय शांत आहे... सांगताहेत रामदास काशिनाथ राऊत.

    मला आजही ते दिवस लख्खपणे आठवताहेत. तेव्हा कविता ठाणापाडा आश्रमशाळेत होती. सणाच्या दिवशीही तिचं दर्शन आम्हाला दुर्लभ होतं. एकुलत्या एका मुलीसाठी मी डब्यात काही गोडधोड घेऊन जात असे. मी पोहोचलो की ती डबा उघडण्याआधी सुमित्राची, तिच्या आईची चौकशी करीत असे. त्यावेळी डोळे भरून यायचे. घरी असल्यावर कविता हाताला धरून शेतात जात असे. तिने लहानपणी कधीही उचलून घेण्याचा हट्ट केला नाही की तालुक्याच्या गावी बाजारला जाताना पायी चालण्याचा कंटाळा केला नाही. त्यातूनच की काय तिला भविष्य खुणावताना दिसलं असावं. झोळीतून उतरल्यावर बोट धरून चालायला ती शिकली असेल, पण आज सगळ्या जगाच्या पुढे पळूनही तिने माझं बोट सोडलेलं नाही. खेळता खेळता कविता कधी मोठी झाली ते कळलंच नाही. शाळेसाठी स्वत: तयारी करताना ना दप्तर ना खाऊसाठी पैसे. तिला परिस्थितीची जाणीव होती. सात किलोमीटर अनवाणी शाळेत जाणं, लहान भावांचा सांभाळ करून घरातील सर्व कामं करणं हे सारं ती प्रेमानं करायची. तिने कोणत्याही कामाला कधी नाक मुरडलं नाही. ठाणापाडा आश्रमात दाखल झाल्यावर तिचं जग आश्रमापुरतंच मर्यादित राहिलं. तिने हरसुल किंवा इतर तालुक्याचं ठिकाण कधी पाहिलं नाही. या आश्रमशाळेत प्रवेश घेतल्यानंतर ननाशी येथे प्रथमच १०० मीटरमध्ये विभागीय पातळीवर तिने प्रथम क्रमांक पटकावला. हे तिचं पहिलंवहिलं घसघशीत यश, त्यानंतर मात्र आयुष्यात तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

    ठाणापाडा आश्रमशाळेत मुख्याध्यापक खंडु भोये यांनी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. पुढे कविताने सातवीसाठी हरसूल केबीएच विद्यालयात प्रवेश घेतला. येथे तिने पुन्हा प्रशिक्षक केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदकाची कमाई करून शाळेचं नाव उंचावलं. सुटीमध्ये घरी आल्यावर कविता विहिरीवर पाणी आणण्यास स्वत: जात असे. यशाची हवा तिच्या डोक्यात कधीच गेली नाही. तिचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. ती सुमित्राला स्वयंपाकातही मदत करत असे. घरकामाला तिने कधी नाही म्हटलं नाही. यावरून मला एक आठवण झाली, कविताला स्वयंपाकाचं खूप वेड आहे. स्वयंपाकघरात लुडबुड करायलाही तिला आवडत असे. एकदा तिच्यावर जबाबदारी सोपवून सुमित्रा बाहेर गेली होती. चुलीवर डाळ शिजत ठेवलेली, पण लक्षात न राहून कविता खेळायला निघून गेली. इकडे डाळीचा कोळसा झाला. घरी आल्यावर सुमित्राने तिला खुप सुनावलं परंतु कविताने हूं की चू न करता सर्व ऐकून घेतलं. चूक झाल्यावर ती स्वीकाराणं हा तिचा गुण आहे. त्यानंतर मात्र कविताने पुन्हा अशी चूक कधीच केली नाही. एका वेळी एकच काम हा खाक्या तेव्हापासून तिने स्वीकारला.

    विश्व हिंदु परिषदेच्या वसतीगृहात प्रवेश घेतल्यावर तिथल्या महिला व्यवस्थापक त्रैलोक्य यांनी कविताला पुढे जाण्यास मदत केली. या शाळेतर्फे कविता एका विभागीय स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, योग्य प्रशिक्षण नसल्याने तिला या स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया(साई)च्या नाशिक केंद्रात आणलं गेलं. त्या स्पर्धेत कविताने एक पदक तर मिळवलंच पण तिला या केंद्राचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्या रूपाने गुरूही लाभले. तत्पूर्वी पुरेसं प्रशिक्षण नसतानाही तिने बंगलोरला झालेल्या शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पधेर्त एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली होती. कविता मला नेहमी विचारायची की, बाबा मला मोठ्या स्पर्धेत कधी भाग घ्यायला मिळेल. तिची ही आकांक्षा लवकरच पूर्ण होणार होती.

    भोसला मिलिटरी कॉलेजला गेल्यावर तेथे शहराच्या चमचमत्या विश्वात ही हरवून जाईल असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही. तिला तिथे विजेंदर सिंग यांच्यासारखे प्रशिक्षक भेटले आणि तिचं आयुष्यच उजळून गेलं. विजेंदर तिचे प्रशिक्षकच नाही तर तिचे पालकही झाले. कविताच्या धावण्यात दम आहे, हे लक्षात आल्यावर विजेंदसिंग यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केलं. प्रारंभीच्या काळात शनिवार सायंकाळ ते सोमवार सकाळ या काळात प्रशिक्षणासाठी कविता हरसूलहून नाशिक गाठत असे, पण हे अवघड होऊ लागल्यावर तिला नाशिकच्या 'भोसला'मध्ये प्रवेश देऊन विजेंदरसिंग यांनी स्वत:च्या घरीच कविताच्या राहण्याची सोय केली. ती आज यशस्वीतेच्या शिखरावर आहे, त्यामागे विजेंदर यांचा हा पाठिंबा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गाजवण्यासाठी गेलेली कविता आम्हाला तब्बल तीन वर्षांनी दिसली. सरावासाठी ती बेंगलोरला होती त्यावेळी आम्ही केवळ मोबाइलवर संपर्क साधायचो. सुमित्राचे डोळे नेहमी तिच्या आठवणीने ओले व्हायचे. मी तिची समजू्त काढायचो. आपली मुलगी देशासाठी खेळतेय, तिला असं भावनेत अडकवू नको, असं तिला सांगायचो. मात्र एकांतात असल्यावर मलाही तिची फार आठवण यायची. लहानपणचे सारे दिवस डोळ्यात गोळा व्हायचे. त्यावेळी कधी वाटायचं, तिला म्हणावं 'कविता सारं सोडून दे बेटा अन् निघून ये परत', पण मग माझ्यातील पित्यापेक्षा माझ्यातील समाजसेवक प्रभावी ठरायचा. सुमित्राचा जीव मात्र वरखाली होत असे. मी तिला म्हणायचो की, हे दिवस लवकरच जातील. राष्ट्रकुलच्या वेळी कविताला खेळताना पाहण्याची हरसूलच्या ग्रामस्थांची फार इच्छा होती. त्यासाठी नितीन देवरगावकर यांनी लाइव्ह सोय करून दिली. तिचं यश पाहून गावकर्‍यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मी भरून पावलो. कविताच्या यशामागे तिच्या मेहनतीबरोबरच तिच्या आईचा त्यागही आहे. सावरपाडा येथे आई एकटीच राहते. लहान भाऊ शिक्षणासाठी बाहेर, वडील नोकरीनिमित बाहेर. आई शेतामध्ये एकटीच राबते म्हणून मला तिने राजीनामा देण्यास सांगितलं. तिचा तो हट्टाचा निर्णय ऐकून ती माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे असं वाटलं. वाटलं, आता कविता खर्‍या अर्थाने मोठी झाली आहे. जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा वाटतं की तिनं लग्न तर करायला हवं, पण आम्ही तो निर्णय तिच्यावर सोपवला आहे. आम्ही तिच्या भावना समजू शकतो. ती म्हणते की, 'भारतासाठी मला मेडल आणायचंय. लग्न वगैरे नंतर करू. मी राष्ट्रकुलनंतर ऑलम्पिकमध्ये तिरंगा फडकवला तर मला लग्नापेक्षा अधिक आनंद होईल.' कविताच्या या विचारांचा मला अभिमान वाटतो.