(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • कावळे (कथा) – भाग 1

    उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला ‘वासंती’ची साथ आहे तो पर्यंत तरी मी या कावळ्यांना अजिबात भीक घालणार नाही, घालतही नाही.

  • सूर्यास्त

    आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला निवांतपणा मिळतो. मग जरा मागे वळून बघावसं वाटतं आणि तेव्हा हळूहळू सुरवातीचा काळ आठवतो. आयुष्याची परंपरागत विभागणी चार भागात आश्रमात केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तशीच ही सुद्धा एक व्यवस्था आहे. बालपण, किशोरवय, प्रौढपण आणि मग हळूहळू म्हातारपण.

  • उक्ती आणि कृतीतील अंतर

    कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक - उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ' 'ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. '' भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की '' या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. '' सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.

  • पंगत

    पंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय. याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते त्याला पार्टी म्हणतात.

  • हुक्का पार्लर

    नाम्या शेट बाहेरून लॉक लावलेल्या खोलीच्या दरवाजाला असलेल्या ग्रील पलीकडे बोंबलणाऱ्या स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाकडे असहायपणे बघत होता. त्याच्याकडे बघता बघता त्याला हुंदका अनावर झाला.

  • वेडा मगर आणि हुशार कोल्हा

    समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.

  • मिसेस पॅकलटाईडचा वाघ (संक्षिप्त व रूपांतरीत कथा १७)

    साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते.

  • लोकधाराची दंगलगाणी

    महाराष्ट्राची लोकधारा’चा पहिला कार्यक्रम मी पाहिला, तो चारुदत्त आफळेने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेला. त्या कार्यक्रमात प्रवीण सूर्यवंशी नावाचा एक उत्साही कलाकार, वासुदेवाची भूमिका करायचा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्याशी आमचा परिचय झाला.

  • चंद्रावरील मुलगी

    कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी)

  • वरदहस्त: पंडित विनायक काळे सरांचा

    १९७८ साली दहावीची परीक्षा मी ८३.१४ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. त्यावेळी हे मार्क खूपच चांगले होते. कारण या मार्कांवर मला कोणत्याही उत्तम कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकणार होती. आमच्याच शिक्षण संस्थेचे बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मी अॅडमिशन घेतली. मला विज्ञानापेक्षा कला शाखेची जास्त आवड होती. पण कला आणि वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेत अॅडमिशन घेऊन मी पुढे इंजिनिअर व्हावे, असे घरच्या वडिलधाऱ्यांचे मत पडले आणि त्याप्रमाणेच वागायचे असा तेव्हा प्रघात होता. म्हणून मी विज्ञान शाखेत अॅडमिशन घेतली. त्याचबरोबर माझ्या गाण्याच्या शिक्षणाचा प्रवासही सुरू कसा राहील याबाबत मी प्रयत्नशील होतो. पद्धतशीरपणे गाणे शिकण्यासाठी कोणी तरी मला काळे सरांचे नाव सुचवले. माझा आवाजही आता पुरुषांच्या पट्टीत स्थिरावला होता. एके दिवशी माझा मित्र सुबोध दाबके याच्याबरोबर मी संगीततीर्थ पं. विनायकराव काळे यांच्या घरी गेलो. नारायण भुवन या त्यांच्या घरातच संगीताची जादू होती. एका बाजूला कपाटात अनेक सुरांचे तबले व्यवस्थित मांडून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला अनेक सुरांचे तंबोरे होते. दोन हार्मोनियम होत्या. एक सुरपेटी होती आणि मध्यभागी सरांचे आसन होते. सर तक्क्याला टेकून बसले होते. आम्हा दोघांना सरांनी बसायला सांगितले. सुबोधला गाण्याची आवड खूप! पण तो काही गाणारा नाही. माझ्यावरचे दडपण वाढले. सरांनी हार्मोनियमवर काही सूर वाजवून मला ओळखायला सांगितले. गाण्याबद्दल इतरही काही माहिती विचारून माझी परीक्षा घेतली. हे काळे सर खूपच कडक आहेत, असे ऐकून मी थोडा घाबरलो होतो. पण आता मात्र त्यांच्याकडेच गाणे शिकायला मिळावे असे मला वाटायला लागले. काही गोष्टी घडायला फक्त प्रयत्न उपयोगी पडत नाहीत तर त्याला नशिबाची जोडच लागते. तो योगच यावा लागतो. ती एक घटना तुमच्या आयुष्याला काही वेगळे वळण देण्याइतकी समर्थ असते. मी मनोमन प्रार्थना करत होतो आणि काळेसरांनी मला गाणे शिकवण्यास होकार दिला. माझ्या संगीताच्या प्रवासाच्या वाटेवरला एक मोठा टप्पा मी आज गाठल्याचा आनंद मला झाला होता. त्या आनंदात मी सुबोधबरोबर बाहेर पडलो. “ते हार्मोनियमवर वाजवलेले वेगवेगळे सूर तू कसे ओळखलेस रे?” सुबोध मला विचारत होता. पण मी एव्हाना गाण्याच्या एका वेगळ्याच जगात पोहोचलो होतो. आम्ही दोघांनी तो आनंद भेळ खाऊन साजरा केला.

    10 सप्टेंबर 1978, या दिवशी संध्याकाळी मी काळे सरांकडे गाणे शिकायला सुरुवात केली. हा पहिला दिवस माझ्या चांगलाच स्मरणात राहिला आहे. गुरूपूजन झाल्यावर सरांनी मला बर्फीचा तुकडा प्रसाद म्हणून दिला. इतरही अनेक विषयांवर माझ्याशी गप्पा मारल्या. पण गाणे काही शिकवले नाही. शेवटी मी त्याबद्दल विचारले. सर ठासून म्हणाले, अरे, किती हालतो आहेस तू? शांतपणे बसायला तर शिक. गाणे नंतर शिकू या. मी चांगलाच वरमलो. पण मला समजावत सर म्हणाले, "अरे, याला आसन स्थिर करणे असे म्हणतात. याला थोडा वेळ लागतो. काळजी करू नकोस."

    गाणे शिकण्यापूर्वीच एक खूपच मोठी गोष्ट सरांनी मला शिकवली होती. खरंच आपण जोपर्यंत स्थिर बसू शकत नाही, तोपर्यंत काही शिकणे शक्य नाही. गाणे तर पुढे राहिले. लवकरच सरांकडे नियमितपणे गाणे शिकायला मी सुरवात केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या दुनियेत मी सरांबरोबर प्रवेश केला. मला सुगम संगीतात पार्श्वगायन आणि हिंदी गजल यात काम करण्याची इच्छा आहे असे मी सरांना गाणे शिकायला सुरुवात करण्यापूर्वीच सांगितले. काही जणांचे मत होते की, मी असे सांगितल्याने सर खूप रागावतील. पण तसे काहीच घडले नाही. माझा गाण्याबद्दलचा दृष्टीकोन मी सांगितल्याबद्दल आणि मला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना मला असल्याबद्दल त्यांनी कौतुकच केले. त्यांचे सांगणे असे होते की संगीत कोणत्याही प्रकारचे असो, त्यात सूर आणि ताल यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. तेव्हा रागांच्या माध्यमातून सुरांचा आणि तालाचा रियाज करायला सरांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रारंभ केला. वेगवेगळ्या रागात रचलेल्या सरांच्या जवळजवळ साडेसहाशे स्वरचित बंदिशी आहेत. त्या शिकायला सुरुवात केली. रागदारी संगीत हे देखील सुगम संगीताइतकेच मनोरंजकरित्या सादर करता येते हे काळे सरांनी मला शिकविले. रागदारी संगीताबरोबरच सुगम संगीत ते ऐकत असत. इतकेच काय पण पाश्चात्त्य संगीताशी देखील त्यांचा चांगला परिचय होता. त्यांनी बांधलेल्या वेगवेगळ्या रागातील बंदिशी जर तालात अचूकपणे सादर केल्या तर एखाद्या गीतासारख्या त्या परिणाम साधू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला भावगीते, चित्रपटगीते आणि प्रामुख्याने गझल गायची असल्याने त्यांनी माझा आवाज या गायकीसाठी 'हलका' राहिल असाच रागदारी संगीताचा रियाज माझ्याकडून करून घेतला. माझ्या आवाजात 'फिरत' तर येईल, पण त्यामुळे माझा आवाज एकाच साच्यात फिरणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. गाण्याचा नियमित रियाज मी सुरू केला. काही महिन्यांतच त्या रियाजाचा चांगला परिणाम माझ्या आवाजात कळून येऊ लागला.

    - अनिरुद्ध जोशी