(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • पै पै चा हिशेब

    संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी हे गुरू. अगदी लहानपणापासून एकनाथ जनार्दन स्वामींच्या आश्रमात राहत होते. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम ते अतिशय आवडीने, तातडीने आणि लक्ष देऊन करीत असत. त्यामुळे त्यांना दिलेले कोणतेही काम अगदी बिनबोभाट आणि व्यवस्थित होत होते. एकनाथांचे हे कामावरील प्रेम पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना आश्रमातील आर्थिक व्यवहाराचा
    हिशोब ठेवण्याचे काम दिले होते. एकनाथ महाराज न चुकता रोजच्या रोज आर्थिक हिशोब लिहून ठेवत असत. जेणे करून हा हिशोब केव्हाही उपयोगी पडत असे.

    एके दिवशी मात्र एकनाथ असाच खर्चाचा सर्व हिशोब ठेवत असताना त्यांना एक पै ची चूक आढळून आली. त्यांनी पुनः पुन्हा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार केला तरी एका पैचा हिशोब काही केल्या लागेना. त्यामुळे एकनाथ अतिशय अस्वस्थ झाले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. त्यांनी त्या दिवशी भोजनही केले नाही. त्या 'पै'ची चूक शोधण्यासाठी त्यांचा हिशोब चालूच होता. रात्र उलटून गेली तरी त्यांचा हा हिशोब काही लागेना.

    आश्रमात सर्वत्र निजानीज झाली तरी एकनाथ एकटेच एका कोपऱ्यात बसून तो हिशोब पूर्ण करीत होते. रात्री जनार्दन स्वामींना जाग आली. पाहतात तर एकनाथ एकटेच बसून काहीतरी लिहीत आहेत. त्यांनी चौकशी केली तेव्हा एका पैचा हिशोब लागत नसल्याचे एकनाथानी सांगितले.

    तेव्हा जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले ' अरे, एका पै ची किंमत ती काय? जाऊ दे ना हिशोब लागत नसेल तर तिचा नाद सोडून दे. ' परंतु एकनाथांनी त्यांचेही ऐकले नाही. ते रात्रभर पुनः पुन्हा हिशोब करीत होते. शेवटी त्यांना एका पै ची चूक उमगली. तोपर्यंत सकाळ उजाडली होती. एकनाथांनी धावत जाऊन आपल्या गुरूंना पै ची चूक सापडल्याचे सांगितले, तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना जवळ घेऊन त्यांच्या अचूक काम होण्यासाठी केलेल्या धडपडीचे कौतुक केले.

  • माना न माना !

    हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.

  • आठवण संत कान्होपात्रा नाटकाची

    आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर 'संगीत संत कान्होपात्रा' नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं.

    १९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांचं लाभलं.

    नाटकात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित घडलेल्या काही ठळक प्रसंगांना नाट्य लेखक ना. वि. कुलकर्णी यांनी अधोरेखित केलं आहे.

    असं म्हणतात की संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वकर्मानुसार व संचित पूर्वपुण्यानुसार लहानपणापासूनच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या. त्यांची भक्ती इतकी थोर होती की प्रत्यक्षात परब्रम्ह विठू माऊलीला त्यांची तळमळ पहावली नाही आणि खरोखरच त्याने त्यांचा अंत न पहाता त्यांना हृदयात स्थान दिलं.

    सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढ्यात होते. त्या अत्यंत रूपवान होत्या आणि म्हणूनच कर्नाटकातील बेदर बादशहाने त्यांना पळवून आणण्यासाठी त्याच्या सेवकाला धाडलं. कान्होपात्रा नेमाप्रमाणे एका विठ्ठल मंदिरात वीणा आणि चिपळ्या घेऊन भक्तीत तल्लीन झालेल्या असताना तो सेवक त्या घरी जाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना पळवता येईल या दृष्टीने बाहेर उभा राहतो. बराच काळ बाहेर तात्कळल्यानंतर तो आत प्रवेश करतो आणि कान्होपात्रा यांच्या ध्यानात ती गोष्ट येते आणि त्या गर्भगृहात जाऊन पांडुरंगाच्या चरणांना घट्ट मिठी मारून त्याच्यापासून बचाव करण्याची भाक भाकू लागतात आणि इथेच त्या प्राण सोडतात.

    संत कान्होपात्रा नाटकातील गाणी:

    १)अगा वैकुंठीच्या राया

    २)अवघाचि संसार सुखाचा

    ३)अशी नटे ही चारुता

    ४)जोहार मायबाप जोहार

    ५)दीन पतित अन्यायी

    ६)देवा धरिले चरण

    ७)धाव घाली विठू आता

    ८)नुरले मानस उदास

    ९)पति तो का नावडे

    १०)पतित तू पावना

    ११)शर लागला तुझा गे

    यातील 'अगा वैकुंठीच्या राया' या अभंगात त्यांची आर्तता अधिक दिसून येते. वैकुंठीच्या राया तुझ्या चरणाशी मला अखंड थारा दे, सखया विठ्ठला मला या भवनदीतून पार कर, नारायणा मला भक्तीचं दान देऊन माझ्या नरदेहाला गती दे, वासुदेवाच्या नंदना, रखुमाई वल्लभा आता तू मलाही पदरात घे साधारणतः असा भाव संत कान्होपात्रा यांचा त्यावेळी असावा असं मला वाटतं.

    याच अभंगाची व्हिडीओ लिंक खाली देत आहे.

    (किर्ती शिलेदारांच्या आवाजात)

    https://www.youtube.com/watch?v=7qtZbvCNDxc

    (पं. राम मराठे यांच्या स्वरात)

    https://www.youtube.com/watch?v=azhXqtzIrFw

    -- आदित्य दि. संभूस.

    (अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

    व्हिडीओ सौजन्य: मुकुंद मराठे व दीप्ती भोगले यांचे यूट्यूब चॅनेल.

    २०/०७/२०२१.

  • वेबसिरीज : एक रेसिपी 

    वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !

  • मीना व्हर्सेस प्रभात !!

    १९७५ साल खऱ्या अर्थाने गाजवलं दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ! त्याकाळी “कोटी ” कॅटॅगरी नव्हती. सोलापूरच्या मीना टॉकीज ला ” शोले ” आणि रस्ता ओलांडून शंभर फुटांवर प्रभात मध्ये ” जय संतोषी माँ “. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा पण सोलापूर मुळातच चित्रपट प्रेमी शहर असल्याने माझ्या सारख्या भुसावळहून गेलेल्या पांढरा पडदा प्रेमीसाठी ती पर्वणी होती.

  • संकटातही वेळेचा सदुपयोग

    प्रसिद्ध इतिहासकार अर्नार्ड टॉयन्बी एकदा परदेशात व्याख्यान देण्यासाठी गेले होते. आपला दौरा संपवून ते मायभूमीला जाण्यासाठी परत निघाले. बोटीचा प्रवास होता त्यामुळे वेळ लागणार होता. त्याच बोटीतून एक धर्मोपदेशकही प्रवास करीत होते. त्यांना समजले की टॉयम्बीदेखील याच बोटीत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून टॉयन्बीची ओळख करून घेतली. आणि मग उभयतांमध्ये विविध प्रश्रांवर चांगलीच साधकबाधक चर्चा झाली.

  • पक्षाना मेजवानी

    मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.

    मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचऱ्याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, "वेगळा आहार एक ट्रीट" त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • पहिला घास देवाला

    आज खूप दिवसांनी बेसनाची वडी केली, अगदी सहजच आणि अनाहूतपणे पाय देवघरा कडे वळले, देवाला नैवेद्य दाखवायला. खूपच छोटीशी कृती पण इतकं समाधान देऊन गेली आणि पार भूतकाळात घेऊन गेली.

  • हरवलेला मधुचंद्र

    मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला..
    मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा घेतला. माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली. दोन वर्षांतच माझं प्रिंटींगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेस थाटून दिला. माझ्याकडे दोन ट्रेडल मशीन होती. मी रात्रंदिवस काम करुन या व्यवसायात यश प्राप्त केले..
  • जीवन म्हणती याला

    जीवन म्हणती याला

    त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी

    हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।।

    आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी

    तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।।

    दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले

    दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।।

    मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा

    ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो ।।४।।

    राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना

    हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com