नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.
या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.
-- निलेश बामणे
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.
आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).
गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.
कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.
नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे.
समत्व बुद्धी
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
मराठी भाषेतील एक अद्भुत गंमत बघा. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची नावे कशी आली आहेत ते बघा....
अगं कमल, उठ, पाय धु, रस, भजॆ, चहा बनव.
अ :- अकोला, अमरावती, अौरंगाबाद, अहमदनगर
ग :- गडचिरोली, गोंदिया
क :- कोल्हापूर
म :- मुंबई
ल :- लातूर
उ :- उस्मानाबाद
ठ :- ठाणे
प :- पालघर, पुणे, परभणी
य :- यवतमाळ
धु :- धुळे
र :- रायगड, रत्नागिरी
स :- सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
भ :- भंडारा
ज :- जळगाव, जालना
च :- चंद्रपूर
ह :- हिंगोली
ब :- बीड, बुलढाणा
न :- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
व :- वर्धा, वाशिम
बासरी - चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी.
कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा,
कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका,
कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी
तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार.
जलतरंग - मूर्तीमंत आशावाद.
जीवनरसाने ओथंबलेला.
सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा.
हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा.
ह्याच्या सहवासात आल्यावर नैराश्य आपोआप दूर पळून जाते आणि मन आशावादी बनते.
व्हायोलीन - जलतरंगाच्या विरुद्ध स्वभाव.
जणू दु:खाचे आकर्षण असल्यागत वागणारा. दु:ख स्वत:चे असो वा दुस-याचे.
हा स्वतःच आर्त होणार.
गिटार - चिरतरूण. कुठल्याही गॅदरींगचा केंद्रबिंदू.
पार्टीत स्वत: नाचून दुस-यांचे पायही थिरकवणार. तितक्याच सहजतेने एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणार.
सतार - अतिशय भावनाशील.
कुठलीही भावना उत्कटपणे, भरभरून, झरझरून बाहेर येणार असा स्वभाव.
मग तो आनंद असो, गहिवर असो ,
दु:ख असो - किंवा भावनांचा महापूर.
तबला - डग्गा -
जणू दोन मित्र गप्पा मारायला बसलेत. विषयांचा आवाका अफाट -
आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण, क्रिकेट , सिनेमा, नट नट्या , प्रवास , ऑफीस - काहीही असो .
विषय व मूड आणि भावनांची तीव्रता ह्यावर अवलंबून असलेले बोल.
नगारा - एकच मूड - मस्तीचा .
कायम कशाचे तरी सेलीब्रेशन आणि त्यासाठी नाचायची नी नाचवायची तयारी.
ढोलक - अवलिया व्यक्तिमत्व.
आसक्ती आणि विरक्ती या दोन परस्पर विरोधी धृवांवर सारख्याच तन्मयतेनी व रसिकतेनी वागणारा -
म्हणून , लावणी आणि भजन !
कुठेही फिट्ट होतो.
पेटी - ही आहे मित्रमैत्रीणींची मैफिल. त्यातल्या काळ्या पांढ-या पट्ट्यांप्रमाणेच विभिन्न स्वभावाच्या मित्र मैत्रीणींची मैफिल.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, क्षेत्र वेगळे पण एकत्र आले की खूप सुखद असा सुसंवाद ..!
स्वत:चे स्वतंत्रपण जपता जपता दुस-याला साथ देणारे मित्र मैत्रिणी म्हणजेच ही सुरेल वाद्य ...!
WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरील श्री राजन सहस्त्रबुद्धे यांनी केलेले पोस्ट
आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःसाठी जगणं गरजेचे असते. आपला आनंद आपल्या हाती..
किशोरीताई गेल्या..... यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले..... अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ?
अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात..... रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो , दुपारी माध्यान्ह समयी कुमार गंधर्व झुळुक बनून येतात , माहौल विशिष्ट असेल तर पंकज उधास असतो , अाणि २४ तासांत कधीही तानपुर्याचा रेंगाळणारा सूर अाणि किशोरीसारखा कुणाहि शास्त्रीय संगीताशी निगडित अावाज अापल्याला अंतर्मुख करून जातो.....
असं म्हणतात की चौर्यांऐंशी लक्ष योनीपैकी शेवटचा जन्म माणसाचा अाणि तेंव्हा ईश्वराकडून मोक्ष मागून घ्यावा..... पण अापण सारेच इतके भाग्यवान अाहोत की अारक्षणामुळे बरबटलेला असला , कितीहि समस्या असल्या तरी अापण भारतात जन्मलो याचा कुणीहि हेवा करावा ! अगदी अंगावरच्या कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत अाणि अायुष्य व्यापून उरलेल्या अभिजात भारतीय गाण्यापर्यंत अापण किती भाग्यवान अाहोत याची जाणीव होते !
१४ जानेवारी २००८ ला अाम्हि मित्र शिवरायगडवर होतो अाणि काहि मित्रांनी खवचटपणे "तू कवी अाहेस ना , मग अात्ता एक कविता करुन दाखव बघू!" असं म्हटलं , तेंव्हा मी म्हटलं अरे कविता सुचणं हे त्याची किमया अाहे , मी कविता *पाडंत नाहि!पण प्रयत्न करतो !" असं म्हणून केलेली एक चारोळि ऐकवतो :
शिवरायगड.....
तुमच्या ३६० किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ला सर होताना मला पहायला अावडलं असतं ,
पण त्याहिपेक्षा जास्त , रायगडाच्या पायरीचा चिरा होऊन रहायला मला अावडलं असतं !
माझ्या मनुष्य जन्मावर मग मी हत हसंत पाणी सोड असतं ,
कारण येता जाता शिवराय , तुमचं पाऊल माझ्यावर पडलं असतं!
याच धर्तीवर अाज असं वाटतंय ,
किशोरीताईंच्या तानपुर्याची खिट्टी म्हणून जरी जन्म मिळाला असता ना , तरी अायुष्य सफल झालं असतं , गानसरस्वतींनी हाताळणं अाणि मग त्यांच्या गळ्यातून येणार्या अविरत सुमधूर स्वरांनी चिंब होणं यापरतं मोठं भाग्य कुठलं महाराजा !
किशोरीताई , माझ्यासारख्या { शास्त्रीय संगीतातील ठोंब्या } तमाम संगीतप्रेमींना सुरांनी चिंब भिजवलंत अाणि अाज जाता जाता डोळे तुडुंब पाण्याने भरून अामच्याच अासवांनी अाम्हाला भिजवलंत ! दाटलेल्या कंठानी एवढंच म्हणतो : अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग.....
उदय गंगाधर सप्रे(म)
ठाणे
पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता. या कवितेचा अनुवादक माहित नाही.
तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर
शाबासकीची थाप.
याचा अर्थ,
तुम्ही मरताय हळूहळू.
स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही
नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी
वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही
बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न
वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत
आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत
पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही
चिकटून बसता
त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी
तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या
स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही
स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ
तुम्ही मरताय...
हळूहळू...
- पाब्लो नेरुदा
" ऐ , ऐक ना " " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " " ओके " . " पाठवला . " " बघितला . " " Delete केलास " " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " " प्लीज़ सांग ना . delete केलास . " " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे ! ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " " खरंच आवडला ? " " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं . पण तू delete का करायला सांगितले ? मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली मला आवडले नसते . चाललेही नसते . " " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ? झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने . " " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला गेलाय . " " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा ! जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता कामा मागे . " " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . . मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले आणखी छान आले असते फोटोत . नाहीतरी एकच साइड आहे ना " " अजून नाही का काही " " रागावनार नसशील तर सांगतो . " " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " " तू म्हणजे ना . . " " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी . ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत पटकन भरेल अशी . " " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " " चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " " आता हे काय ? " " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो ग . " " सॉलिड आहे हे . " " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो पाहताना मला ते सारखे आठवत होते . " "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " " अलग होंगे ; मगर गलत नही " " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला काय म्हणायचे ते सांग . " " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज , स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित होत जाणारे . एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे . गाण्यात कसे प्रत्येक कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . . . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " " अगदी खरं आहे रे हे " " तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " " पटलं मला " " ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत . सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात . ते सदैव सुरातच हवेत . इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " " क्या बात हैं ? " " अजून एक सांगू ? " " विचारू नकोस . सांगत राहा . " " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन . " " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " " मी हे delete करणार नाही . " " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " " मग ? " " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते . पण या फोटोची निदान एक तरी Black - white अशी प्रत काढ . " " का रे ? " " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण - धवल च फोटो हवा " " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही पहिल्यापासून प्राजक्त आणि मोगरा ही तुझी नम्बर एकची आवड का ? आणि मी एकदा तुला वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत . भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो . हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते . त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही . " " किती वेडा आहेस रे " " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते . आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते . म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " " हा फोटो नाही विसरू शकणार " " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो " " तूच एक . . . " -- चंद्रशेखर टिळक २ डिसेंबर २०१६
9820292376
Email: tilakc@nsdl.co.in
Copyright © 2025 | Marathisrushti