(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे….

    तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
    एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

    अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
    अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

    सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
    उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

    बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
    रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?

    उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
    तू किनार्यांसारखा पण कोरडा उरलास का रे ?

    गीत - सुरेश भट
    संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
    राग - बागेश्री

    "तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे...."

    हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भटांच्या अनेक गझलांचे रुपांतर सुंदर गाण्यात केले, या अप्रतिम गझलांपैकीच एक, "तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?" ही श्रवणीय गझल आहे.

    हेच गाणं आशाजींच्या कर्णमधुर आवाजात ऐकलं की डोळ्यात पाणी येते. या गझलेमागे एक करुण कथा आहे असं जर मनात गृहीत धरून हे गाणं ऐकलं तर या गझलेचे भाव पूर्णतः बदलून जातात. ती केवळ शृंगारिक रचना न राहता एक आर्त करूण शोकगाथा बनून जाते, जी आपले हृदय पिळवटून टाकते…खरंच ही करूण, दुःखद घटनेवरची गझल आहे का ? नक्की काहीच सांगता येत नाही,

    युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या एका वीर जवानाचा मृतदेह घरी आणलेला आहे. त्याच्या पाठीमागे आता फक्त त्याची तरूण पत्नी व चिमुरडे मूल राहिले आहे. आपल्या पतीच्या निष्प्राण देहाकडे विमनस्क अवस्थेत शांत बसलेली पत्नी. तिने तिचा अश्रुंचा बांध थांबवलेला आहे, ती ओठ मिटून बसली आहे काहीच बोलत नाहीये. तिने आपल्या भावनांचा बांध खुला करावा, मनातलं आभाळ रितं करावं म्हणून तिचे सगळे स्नेहीजन एका वेगळ्या भ्रांतेत आहेत. पण ती काही केल्या निश्चल अवस्थेतून बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर एक वृद्धा उठते आणि तिच्या तान्हुल्या बाळाला तिच्या मांडीवर ठेवते. त्या बाळाच्या हुंदक्याने तिची समाधीतल्लीनता भंगते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची वाट मोकळी होते… अशी ही कविता..

    आयुष्यातल्या एका अल्वार वळणावर तो तिची साथ सोडून गेला आहे आणि त्याचे कलेवर घरी आणलेलं आहे.ते दृश्य बघून तिला काही कळतच नाहीये, ती दिग्मूढ होऊन गेलीय आणि नुसते त्याच्याकडे बघत बसलीय. रात्र उलटत चाललीय आणि हा सहवास कुठे तरी संपुष्टात येणार याची पुसटशी जाणीव तिला झालेली आहे. तिच्या मनात अशा वेळेस भावभावनांचे कोणते कल्लोळ उमटत असतील यांचे एक अप्रतिम काव्यचित्र म्हणजे ही गझल होय.

    तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?
    एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

    रात्र नुकतीच झाली आहे, ती तरुण आहे (आणि तो देखील ) प्रेमाच्या या हृदयीचे त्या हृदयी होण्याची ही वेळ आहे. तरीही तु असा निजलेला आहेस. खरे तर आपलं फुलासारखं नाजूक प्रेम तु माझ्या केसात माळण्याचं सोडून तु इतक्यातच त्या कुशीवर वळला आहेस. तु असं का केलं आहेस. ही काय जाण्याची वेळ आहे का असं तिला सुचवायचं आहे.

    अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
    अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

    मला आठवतं की, तुझं प्रदीप्त धगधगतं मन तु असंच माझ्या डोळ्याच्या पारयात तु हलकेच रितं करायचास अन चंद्रासारखा शीतल होऊन जायचास. एक शब्दही न बोलता सारं माझ्या कानात हळूच ओठांनी स्पर्शून सांगून जायचास. आपल्या उत्कट प्रेमाला साक्ष असणारया या भव्य अंधारलेल्या दिगंतातल्या तारकांच्या त्या दीपमाला अजूनही तेवत आहेत, त्यांनाही अजून आपल्या मिलनाची ओढ आहे. एव्हढेच नव्हे तर मी देखील अजून तुझ्यावरील आसक्त भावनेत तग धरून आहे. ( नाहीतर मी देखील विझले असते ) पण तूच असा दगा का दिलास बरं ? का तू माझ्याशी प्रतारणा करून निघून गेला आहेस ?तुझ्या हृदयातला प्रेमाचा ध्रुवतारा असा कसा निमाला?

    सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
    उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

    तू हे जे काही केलं आहेस ते एकवेळ मी मनाच्या समजूतीसाठी स्वतःला काहीतरी सांगेन पण आपल्या प्रेमाला सोबती असेलेल हे कोजागिरीचं टिपूर चांदणं जे मोठ्या आशेनं माझ्याकडे बघतंय त्याला आता काय सांगू हा प्रश्न पडलाय. त्यांना पाहून सवयीने आपसूक माझ्या मनातल्या गुलबक्षीच्या फुलाच्या पाकळ्या आपसूकच उमलतात त्यांचं मी काय करू आणि तु तर असं स्वतःला मिटून घेऊन ( अज्ञाताच्या अनंत प्रवासाला ) निघून गेला आहेस. अगदी हृदय पिळवटून जाईल असं हे हळवे रुदन आहे.….

    बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
    रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?

    आसमंतातल्या तारकाना मी डोळ्याच्या पापण्याआड करून त्याकडे डोळेझाक करू शकते पण तुझ्यामाझ्या सवयीचा झालेला पश्चिमेचा हा अवखळ वारा जो आपल्या देहाला थरथरता स्पर्श करूनच पुढं जातो. त्याला या स्पर्शाचा आभाळभर कैफ चढला आहे, तो देखील तुझ्याबद्दल विचारतोय त्याला काय सांगावे काही कळत नाही. आपण दोघे एकमेकाच्या पाशात विसावलो की खिडकीतून येणारा रातराणीचा बेधुंद करणारा गंध आपल्या भोवती नजाकतीने पिंगा घालत बसायचा. त्याला आपली सवय झाली होती आणि मला त्याच्या त्या नशील्या गंधाची ! पण तु आता जाताना रातराणीचा गंध तुझ्यासवे नेला आहेस की काय असे वाटावे इतके त्या रातराणीने स्वतःला गंधबंधित करून मिटवून टाकले आहे, ती आता खिडकीतून डोकावत नाही. मला तर काहीच सुचत नाही ( आता तूच ते काय सांग ) असं विचारत ती तिची कैफियत सुरु ठेवते…

    उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
    तू किनार्यातसारखा पण कोरडा उरलास का रे ?

    शेवटच्या पंक्तीत कवी सुरेश भटांनी कमाल केलीय. अमृत म्हणजे अमर होण्यासाठी देवतांनी प्राशन केलेले पेय होय.तो जरी असा ( निश्चल ) बनून राहिला असला म्हणून काय झालं, तिच्या हृदयात प्रेमाच्या लाटा या उसळत आहेत त्या सदैव अखंडितपणे उसळत राहतील याची तिला खात्री आहे. पण तिला खंत आहे की या धुंद प्रेमाच्या लाटा उसळत असताना त्याची अनुभूती घेण्यासाठी तो मात्र सचेत नाही. तो किनारया सारखा कोरडा झालाय. पण म्हणून काय झालं, लाट ही शेवटपर्यंत त्या किनारयाकडे येतच राहणार अन त्याच्या पायाला स्पर्शून आपले अमर प्रेमगीत त्याच धुंदीने गात राहणार. इतकी ती तिच्या प्रेमावर फिदा आहे आणि त्यावर जगत राहणार आहे. पण त्यानं असं का वागावं, त्यानं असं ( अकाली ) विझून जावं ? याची तिच्या मनाला पोखरणारी खंत आहे ती तिला काही केल्या गप्प बसू देत नाहीये….

    या कवितेमागील नेमकी पार्श्वभूमी अशीच आहे का याला मात्र त्यांनी कधी दुजोरा दिला नाही मात्र त्याबरोबरच त्यांनी या गझलेमागील नक्की भावबिंदू कोणते हे देखील सांगितले नाही. पण त्यांच्या जिवलगाला म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना मात्र याविषयी सांगतले असावे त्यामुळेच की काय त्यांनी बागेश्री रागात ही गझल आर्त अशा सुरात गुंफली असावी.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- समीर गायकवाड.

    "तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे...." हे गाणे.
    मा.आरती अंकलीकर

    https://www.youtube.com/y1j3nP1E6cc&list=PL99D9CC5EA52821B8&index=7

    मा.आशा भोसले

    https://www.youtube.com/7YaMnvWnYBI

    मा.पद्मजा फेणाणी

    https://www.youtube.com/94Y5UUkPY6Q

    शंकर महादेवन

    https://www.youtube.com/EH4TuZq0YOI

  • माझ्या आजीच्या गोष्टी

    अनुजा पडसलगीकर यांचा हा लेख व्हॉटसऍपवरुन व्हायरल होतोय. अतिशय सुंदर लेख.. विचार करायला लावणारा..

  • चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६

    चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते.

    काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे 150 पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. दिंडीचे भव्य स्वागत कार्यक्रम स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच या महाकाव्यसम्मेलनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नयना आपटे यांनी केले. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, मनसे नेते सदाशिव मते, मनसे प्रमुख संघटक सुनील बसाखेत्रे, माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलंकर, पुण्यनगरीचे राधाकृष्ण नार्वेकर, संपादिका राही भिडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील विविध लेखक, पत्रकार, कवी व कवयित्री देखील आवर्जून उपस्थित होते.

    एकदिवसीय असलेल्या या महासंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी संयोजक प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या सहयोगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन जयवंत बामणे व सौ. संगिता शांताराम कारंडे यांनी केले होते. या महाकाव्यसम्मेलनामध्ये प्रत्येकास काव्यवाचनाची संधी देण्यात आली. प्रत्येकास सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

  • शेजारधर्म

    प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याने सर्वप्रथम पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरते असा शोध लावला. त्याच्या आधी 'सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो' हाच सार्वत्रिक समज होता. त्यामुळे गॅलिलिओच्या था शोधाला अर्थातच प्रचंड विरोध झाला. त्या काळच्या धर्ममार्तंडांनी तसेच कर्मठ लोकांनी गॅलिलिओविरुद्ध मोहीमच उघडली.

    सामान्य नागरिकही गॅलिलिओला शिव्या देण्यात तसेच त्याची निंदानालस्ती करण्यात आघाडीवर होते. त्यामध्ये गॅलिलिओचा शेजारीही होता. त्याने तर गॅलिलिओवर बहिष्कारच टाकला होता. त्या शेजाऱ्याचा तरुण मुलगा आजारी पडला व दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली. गॅलिलिओला हे कळल्यावर त्याने त्याच्या ओळखीच्या नामांकित डॉक्टरची भेट घेतली व त्याला घेऊन तो शेजाऱ्याच्या घरी आला. दरवाजा ठोठावल्यानंतर त्या शेजाऱ्यानेच दार उघडले व गलिलिओला पाहिल्यावर कसलाही न विचार करता त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली.

    त्याच्या शिव्या संपल्यानंतर गॅलिलिओ शांतपणे त्याला म्हणाले, 'मी तुझ्या मुलाचा गंभीर आजार ऐकून त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक नामांकित डॉक्टर घेऊन आलो आहे.'

    ते ऐकून तो शेजारी वरमला व त्याचवेळी त्याला हीही जाणीव झाली, की आपण त्या नामांकित डॉक्टरचे बिल देण्यास असमर्थ आहोत, शेजाऱ्याने आपणास डॉक्टरची फी परवडणार नाही म्हणून उपचार नकोत असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅलिलिओ त्याला लगेच म्हणाला, 'तुम्ही पैशाची काळजी करू नका कारण तुमचा मुलगा आजारातून वाचणे हे महत्त्वाचे आहे व शेजारधर्म म्हणून माझे ते कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टरांची फीज व औषधाचा खर्च मीच करणार आहे.'

    ते ऐकून तो शेजारी फारच खजिल झाला व गॅलिलिओला म्हणाला, 'मी तुम्हाला रोज शिव्या देऊनही तुम्ही माझ्या मुलाला वाचविण्यासाठी एवढा खर्च करायला कसे तयार झालात?'

    त्यावर गॅलिलिओ म्हणाला, 'सूर्य पृथ्वीभोवती फिरी की पृथ्वी सूर्याभोवती फिरो' हे आपल्या शेजाऱ्यामधील वैर निर्माण होण्याचे कारण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने चांगला शेजारधर्म पाळणे आवश्यक आहे व तो पाळण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही तुमचा शेजारधर्म (शिव्या देण्याचा) पुढेही पाळलात तरी त्याला माझी हरकत नाही. ''

  • सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…

    पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!!

    जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!"( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !! जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !! ७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू "

    बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ". बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरला आणि ट्याक्षि बोलाविली. टॅक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण. बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
    तुझेच मी गीत गात आहे
    अजूनही वाटते मला की
    अजूनही चांद रात् आहे!!

    सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले. पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.

    कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा". ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते...

    कळे न मी पाहते कुणाला
    कळे न हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे
    कुणीतरी आरश्यात आहे

    पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?

    परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो".

    रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते . इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.

    कळे न मी पाहते कुणाला
    कळे न हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे
    तुझे हसू आरश्यात आहे

    एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .

    हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.

    अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!
    https://youtu.be/QyXOuEF8wVw

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठीत “लागण्याची” गंमत बघा

    मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण

  • माझा नववर्ष आणि त्याच्या पुढील वर्षाचाही संकल्प

    …. असा संकल्प मी सांप्रत, नुकत्याच चालू झालेल्या, वर्षासाठी केला आहे.

  • वनवास तिच्या जरी वनीचा !

    जहाल क्रांतिकारक श्री अरविंद यांच्याविरोधात ब्रिटिशांनी कारवाईची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्या अंतर्मनात माणसाच्या आत्मिक स्वातंत्र्याचा विचार प्रकटला. त्याकरिता योगाभ्यासासाठी म्हणून ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडिचेरीला आले. तिथला त्यांचा मुक्काम म्हणजे खरे तर प्रथम अज्ञातवासच होता. तरी त्यांचे वास्तव्य ब्रिटिश गुप्तचरांच्या लक्षात आले आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय असल्याने ब्रिटिश तसेच फ्रेंच गुप्तहेरांची त्यांच्यावर पाळतही होती.

    नंतर अरविंदांनी आपले वास्तव्य उघड केले आणि अनेक मान्यवर त्यांच्या भेटीलाही जाऊ लागले. त्यामुळे अरविंदांविरुध्द काही पुरावा उभा करावा आणि त्यांना ताब्यात घ्यावे, यासाठी ब्रिटिशांनी कट रचला. ब्रिटिश गुप्तहेरांनी काही बनावट छायाचित्रे, नकाशे तसेच काही पत्रे एका पत्र्याच्या डब्यात भरली व तो डबा अरविंदांचे मित्र सी.व्ही.व्ही.एस अय्यर यांच्या घरातील विहिरीत टाकून दिला आणि फ्रेंच पोलिसांना धाड टाकण्यास सांगितले. मात्र त्याआधीच अय्यर यांची मोलकरीण विहिरीतून पाणी काढत असताना तो डबा वर आला. त्या डब्याबाबत अरविंदांनीच फ्रेंच पोलिसांना वर्दी दिली. फ्रेंच पोलीस आले व त्यांनी अरविंदांच्या खोलीची झडती सुरू केली. त्या खोलीत बरीच पुस्तके कागदपत्रे होती. त्यातील काही कागदपत्रांवर ग्रीक तसेच लॅटिन भाषेत लिहिलेले आढळले. अरविंदांना या भाषादेखील येतात, हे पाहून त्या फ्रेंच अधिकार्‍याला आश्चर्य वाटले. योगी अरविंदांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन निघून गेला.

    पण या धाडीमुळे अरविंदांनी अल्जेरियासारख्या देशात जाऊन राहावे, असे काही जणांचे मत पडले. तमीळ राष्ट्रकवी सुब्रह्मण्यम भारती यांनीही तसा आग्रह केला. अरविंदबाबू शांतपणे म्हणाले, कितीही धाडी पडल्या तरी मी येथून क्षणभरही हलणार नाही.

    पॉंडिचेरी फ्रेंचाच्या ताब्यात का असेना पण परक्या अल्जेरियापेक्षा आपल्या मायभूमीतील हा वनवास ही त्यांना प्रिय होता. मातृभूमीवरचे हे प्रेम पाहून सार्‍यांचीच अंत:करणे हेलावली.

  • शोध – रोमहर्षक कादंबरी

    अत्यंत रोमहर्षक, उत्कंठावर्धक कादंबरी...

    उत्कंठावर्धक कादंबरी लिहिण्यासाठी खजिन्याचा शोध हा रुळलेला प्रकार बघावयास मिळतो. हॉलिवुड पटांमधली निकोलस केजची नॅशनल ट्रेजर सिरीज किंवा हैरिसन फोर्डची इंडियाना जोन्स सिरीज अश्याच पठडितल्या कथांची उदाहरणे...

    अशीच एक उत्कंठा लावणारी कथा ती पण मराठी मध्ये नाशिकच्या मुरलीधर खैरणार यांनी लिहिली आहे.

    शोध...राजहंस प्रकाशन..

    या कादंबरीचे मुखपृष्ठच इतके सरस आहे की कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ बघुन वाचकाने ते हाताळले नाही तर नवलच...

    हि कथा आहे छत्रपतींच्या काळातील आणि आजच्या काळातील..

    महाराजांनी सुरतेवर अनुक्रमे १६६४ आणि १६७० अश्या दोन वेळा लूट केली. पैकी पहिली लूट जशीच्या तशी स्वराज्यात आली पण दूसरी लूट आलीच नाही..दुसऱ्या लुटीनंतर माघारी येत असताना गनिमांना हूल देत महाराज खजिन्याचा एक भाग घेऊन स्वराज्यात पोहचले पण दुसरा भाग घेऊन येत असलेले गोंदाजी पोहचलेच नाही. गोंदाजींकडे तब्बल ११०० टन वजनाचा खजिना होता त्याची आजची किंमत २५ लाख कोटी रुपये इतकी..त्यावेळी गोंदाजीच्या मागे गनीम लागले आणि गोंदाजीने ठरलेला रस्ता बदलून खजिना कोठेतरी दडवून ठेवला.

    कुठे ठेवला हा खजिना..?

    बस्स... याच तुम्हाआम्हाला पडलेला प्रश्न केतकीला देखील पडतो..या खजिन्याचा माग तरी कसा काढायचा हा एकच प्रश्न तीला सतावतो...केतकी...गेली तीन शतके तिच्या पिढ्या या खजीन्याच्या शोधात आहे.

    काही करुन हा खजिना तिला मिळवायचा असतो... का?

    त्याचप्रमाणे इतिहास संशोधक शौनक आणि काका.. यांना देखील खजिना शोधयचा असतो यासाठी ते फेसबुक चा इष्टतम वापर करतात.

    एकीकडे हे तिघे....

    आणि दुसरीकडे अजित आणि आबाजी... पैकी अजित देशातील एका मोठ्या कंपनीचा मालक.. तो ही या खजिन्यामागे...आणि विशेष म्हणजे देशातील सर्व सुप्रीमो शक्ती या खजिन्यासाठी वापरतो.

    सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये काय दडलंय. खास करून सप्तशृंगी, धोडप, अहिवंत, रावळ्या- जावळ्या इ. किल्ल्यांची माहिती संशोधन करून लेखकाने लिहिली आहे.यामध्ये येणारी ठिकाणे आपल्याच म्हणजे नाशिकच्या आजुबाजूची आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना समजते की आपल्या आजुबाजूच्या वास्तुंना एवढा मोठा इतिहास आहे.तसेच कळवण आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर, तिथे होणारे आदिवासी लोकांचे सण, उत्सव...भाया, माऊली, डोंगरादेव, देवखळा यांचे वर्णन लेखनाने खुबिने केलेले आहे.

    जवळपास ७५% पुस्तक वाचून होत तरी देखील या कथेचा नायक समजत नाही. प्रचंड उत्सुकता आणि वाचकाला खिळवून ठेवण्याची जबरदस्त क्षमता असलेले हे एक पुस्तक आहे..

    ट्रेकिंग, खजिना शोधण्यासाठी वापरण्यात येणारे सिकोरस्की जातीचे हेलीकॉप्टर व् मेल डिटेक्टर ड्रोन...यांचा वापर लेखकाने केलेला आहे. त्याचबरोबर लेखक फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती फेसबुक सारख्या मिडिया वर पेरल्याने आपण खरच सुरक्षित आहोत का? हा प्रश्न देखील पडतो.

    या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अगदी सोप्या शब्दात साडे तीनशे वर्षपूर्वीची गोष्ट लेखकाने प्रकाशात आणलेली आहे. नुसतीच् प्रकाशात न आणता त्या गोष्टीचा शोध लावला आहे. अर्थात हा शोध वाचकांच्या दृष्टिकोणावर अवलंबून आहे.

    कादंबरीने अनेक जुनाट विचार पुसून काढले..उदा. नाशिकचे तेव्हाचे कलेक्टर जॅक्सन यंबद्दल खरी माहिती या मध्ये सापड़ते. ते कलेच्या बाबतीत किती दर्दी होते. इतिहास जतन करण्यात त्यांचा किती मोठा हात आहे. तेव्हाच्या लेखकांनी त्या परिस्थितीमुळे त्यांच्याबद्दल असे लिहिले...अर्थात तेव्हा आपले प्रथम उद्दिष्ट हे स्वतंत्र मिळविने हेच होते.त्याचप्रमाणे आदिवासींचे सण उत्सव यांची माहिती खजिना शोधताना वाचकाला अडकवून ठेवते..

    केतकी आणि शौनक ही जोड़ी खजिन्यापर्यन्त पोहचते का?

    आबाजी अजित कोणकोणत्या रणनिति आखतात..अखेरीस खजिना कोणाला सापड़तो...?

    या कादंबरीचा नायक कोण? याचे उत्तर पुस्तक एकाग्रतेने वाचल्यावर ते ही अगदी शेवटी समजते...

    शौनक असेल..नाही केतकी...केतकी तर तिच्या पूर्वजांसाठी काम करत होती...आबाजी असावे पण आबाजी तर अजितच्या सांगण्यावरुण काम करत होते...नाही मग इतिहास संशोधक काका असावे....जॅक्सनच्या खाजगी व्यक्तीसंदर्भात इतिहासप्रेमी काकांकडे शौनक आणि केतकी गेले असता केतकीला समजू न देता शौनक काकांसाठी एका कागदावर काहीतरी लिहितो..ते का? आणि असे काय लिहितो...आणि काकांची भूमिका अगदी शेवटी लक्षात येते ती कशी....???

    नक्की वाचा

    नाव -: शोध

    लेखक -: मुरलीधर खैरनार

    प्रकाशक -: राजहंस प्रकाशन

  • ना शिव्या, ना ओव्या!’

    गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा 'ए.क.कवडा' नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की 'ए.क.कवडा' म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.

    पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात

    "पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
    मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"

    गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल

    "चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते

    माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!"

    कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात

    "तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले

    घेऊ धजती इज्जत कैसी 'लिज्जत पापडवाले'"

    दुर्गाबाई भागवतांबद्दल...

    "जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां

    दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता"

    गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर

    "बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली

    गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?"

    राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते 'रा.नि.बढे' आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले 'राजा बढे',पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे 'राधे तुझा सैल अंबाडा' हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले...

    "कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?

    आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?"

    रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत

    "गिरीशांची ही गर्द 'आमराई'

    त्यात उघडी यशवंत पाणपोई"

    स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मिकी' म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

    "कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा

    काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?"

    -- सुमित्र माडगूळकर