नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.
कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.
हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण... अजून...
आज सकाळी पावणेआठचा सुमार.
बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
''तुम्ही वैशाली पंडित का?'' तिने विचारलं.
''हो. आपण? या ना.. '' मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
''प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ''
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
''बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?''
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.
'' मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ''
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.
मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?
-- वैशाली पंडित
जीवन जगताना अनेक अडचणी येत असतात. परंतु अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्या अडचणीतून वाट काढत कसे बाहेर जाता येईल याचा शांतचित्ताने व धीराने विचार केला तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते टॉलस्टॉय यांच्यासंबंधी सांगितली जाणारी हकिकत मोठी मनोरंजक आहे.
टॉलस्टॉय हे स्वभावाने अतिशय मिश्कील व प्रेमळ होते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड होता. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे अनेक लोक त्यांच्या वैयक्तिक अडचणी सांगून त्यातून बाहेर कसे पडता येईल हे विचारण्यासाठीही त्यांच्याकडे येत असत.
एकदा असेच एक गृहस्थ टॉलस्टॉय यांच्याकडे आले व त्यांनी आपल्या अडचणींचा पाढा सुरू केला. त्यावर टॉलस्टॉय शांतपणे त्याला म्हणाले, “जीवनात अशा असंख्य अडचणी येतात. त्यावर शांतपणे विचार केला तरच त्यातून वाट सापडते व अडचणींवर मात करता येऊ शकते.”
टॉलस्टॉयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ चिडला. तो म्हणाला, “तुमचा कोरडा उपदेश काय कामाचा? उद्या तुम्हाला कोणी गावाबाहेरच्या नदीतून चाळणीतून पाणी आणायला सांगितले तर तुम्ही आणणार काय? ते तुम्हाला शक्य तरी होईल काय?”
त्वावर टॉलस्टॉय म्हणाले, “हे का नाही शक्य होणार? त्यासाठी मी जरूर धीर धरेन. वाट पाहीन. कारण आणखी काही दिवसांनी हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे आजूबाजूचे डोंगर बर्फ पडून हिमाच्छादित होतील. तेथील काही हिमखंड घसरत येऊन नदीच्या पाण्यात मिसळतील व तरंगत राहतील. त्याचवेळी मी चाळणी घेऊन नदीवर जाईन व चाळणीत हिमखंड घेऊन येईन. त्याला थोडी ऊब दिली की मग त्याचे पाणी होईल. म्हणजे थोडक्यात मी चाळणीतून पाणी आणल्यासारखेच होईल. ”
टॉलस्टॉय यांचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ ओशाळला व म्हणाला, “मी तुमच्या या उत्तराने आशावादी झालो आहे व खरोखरच कोणत्याही संकटावर युक्तीने व धीराने मात करता येते हे मला आज कळले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.”
संध्याकाळचे सव्वा पाच वाजत आले होते, आज वेळेवर निघावं असा विचार करून आकाश भराभर टेबल आवरत होता. ईतक्यात मोबाईलचा मेसेज टोन वाजला. एका हाताने टेबलचा ड्रॅावर बंद करीत आकाशने मेसेज उघडला, "I want you to do a favor for me. Will you become friend of my wife?" मेसेज अरविंदने पाठवला होता. आकाश थोडा गोंधळला. अरविंद त्याला दोन वर्ष सिनियर होता. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघांनी तीन महिने सोबत काम केलं होतं. दोघांचे विचार जुळले अन् तिथूनच त्यांची गट्टी जमली होती. हा काय प्रकार आहे असा विचार करून आकाशने नंबर डायल केला.
"आकाश, मी थोडा कामात अडकलोय, १५-२० मिनिटे लागतील, थांबतोस?" पलीकडून अरविंदचा आवाज आला.
"अरेsss., घरी काम आहे, मला लवकर जायचं होतं, असा मेसेज का पाठवलास? "
"जमत असेल तर थांब नं प्लीज, बोलायचं आहे काही." अरविंद.
आकाशने क्षणभर विचार केला, "ठीक आहे, थांबतो मी, भेटू आपण."
आकाशने घरी फोन करून यायला उशीर होईल असा निरोप दिला अन अरविंदची वाट पहात तो ऑफिसच्या पोर्चमध्ये फेऱ्या मारू लागला."तुझी संध्याकाळ खराब तर नाही केली मी?" अरविंदचा आवाज ऐकून त्याने मागे पहिले.
"नाही, नक्कीच नाही, काम होतं मला, पण ते उद्याही होऊ शकतं. असा कसा मेसेज पाठवलास? पुढचा बकरा मी तर नाही ना?" आकाश.
अरविंदला थट्टा-मस्करीची भारी हौस, प्रत्येक वेळी एकेकाला गाठून तो त्या व्यक्तीची गंमत करायचा, मनात काही नसायचे पण चाबी भरायला त्याला मजा येई.
"बकरा? नाही यार, तो मेसेज मी सिरीयसली पाठवला होता."
"अच्छा? कि सिरीयसली गंमत करण्यासाठी पाठवला होता?" आकाशने थट्टेने विचारले. अरविंदला पूर्वी कधीही गंभीरपणे बोलतांना ऐकलेले नसल्याने आकाशचे समाधान होत नव्हते. "चल, निघूया का?" अरविंद चालत बस-स्टॅापकडे निघाला, आकाश त्याच्यासोबत चालू लागला.
अरविंद एका प्रसन्न व्यक्तिमत्वाचा धनी होता, हसत-हसवत जगणं हा त्याचा पिंड होता, तो सिरीयस होऊ शकतो हे आकाशसाठी नवीन होतं. अरविंद अजूनहि विचारात दिसत होता. बहुदा शब्द जमवत असावा.
"बोल, काय प्रॉब्लेम आहे?" अरविंदचा अबोला तोडत आकाशने विचारले.चालत-चालत ते दोघं एका गार्डन समोर आले. आतमध्ये लहान मुलं खेळत होती. काही वेळ त्यांना पाहण्यात अरविंद गढून गेला, आकाशची अस्वस्थता ताणली गेली.
"ही लहान मुलं बघतोयस नं? केवढी एनर्जी असते त्यांच्यात?" अरविंद काहीसा हरवलेला वाटत होता.
"खरय, मस्त हुंदडत असतात, एकदम नो-टेन्शन, आपण मोठं व्हायलाच नको होतं असं वाटतं कधी कधी." आकाश.
"त्यांना टेन्शन का नसतं माहितीये?" अरविंद.
"त्यांना उद्याचा विचार नसतो...." आकाश खांदे उडवत बोलला.
"खरं आहे. समोर आहे तेच आणि तेवढंच त्याचं आयुष्य असतं. त्यातच तल्लीन होऊन त्यांचं सर्व काही सुरु असतं, आपोआपच इतर गोष्टी त्यांच्यासाठी गौण ठरतात. मग टेन्शन असं म्हणून काही उरत नाही. जस-जसे आपण मोठे होत जातो, हि तल्लीनता आपण गमाऊन बसतो. इतर गोष्टी, ज्या खरच तितक्या महत्वाच्या नसतात त्या आपल्या मनाचा पगडा घेऊ लागतात. हातात एक असतं अन् डोक्यात एक. मग जीवाची घालमेल सुरु होते आणि प्रत्येक क्षणातलं ते जगणं आपण हरवून बसतो." रस्त्याकडे तोंड करून असलेल्या गार्डनबाहेरच्या एका बाकावर अरविंद बसला. त्याला काही तरी बोचतंय याची एव्हाना आकाशला कल्पना आली होती. ओळख झाल्यापासूनचा अरविंद आणि आजचा अरविंद यांत खूप त्याला फरक जाणवत होता. आकाश शेजारी बसला, अरविंद शांतपणे रस्त्यावरची वर्दळ न्ह्याहाळत होता.
"बघतोयस ना तू? रस्ता घरी जाणाऱ्या लोकांनी कसा भरलेला आहे. सर्वचजण घरी जाण्यासाठी धावपळ करत आहेत." थोडं थांबून अरविंद पुन्हा बोलला," मला रोज संध्याकाळ झाली कि पोटात गोळा येतो रे, घरी जायची भीती वाटते मला."
"अरविंद?" आकाश जवळ-जवळ ओरडलाच, त्याचे डोळे विस्फारले. हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं.
"लग्नाला सहा वर्ष झाली आहेत, बायको दिसायला सुंदर आहे. तीन वर्षांची गोड सई आहे, चार-चौघांसारखा वाटेल असा संसार आहे, तरीही..... .." अरविंद थबकला.
आकाशचा आपल्या कानांवर विश्वासचं बसत नव्हता. क्षणातच त्याच्या डोळ्यासमोरून अरविंदची मागच्या दोन वर्षाची झलक गेली. ती मौज-मस्ती, खळाळून हसणं, इतरांना जगण्याची उमेद देत दिवसभराची काम उरकणं. हा तोच अरविंद आहे? आज हा असं का बोलतो आहे? याची दुखरी बाजू आहे तरी काय? आकाशच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी जमू लागली.
अरविंद पुन्हा बोलू लागला."लग्नाआधी जेंव्हा मी तिला पाहायला गेलो होतो, मी तिला एकचं प्रश्न विचारला होता, "तुला आयुष्यं कसं जगायचं आहे? तसं काही ठरवलं नाही, जसं समोर येईल तसं....” हे तिचं उत्तर होतं आणि ते ऐकून मला खूप आनंद झाला होता. त्या उत्तरात मला समोर खेळत असलेल्या ह्या मुलांची मानसिकता दिसली होती. वाटलं होतं कसलेही पूर्वग्रह मनात नं ठेवता जे समोर येईल त्याचा स्वीकार करत आनंदात जगायचं असं तिचं तत्वज्ञान असेल. माझ्यासारखं .." समोर विजेच्या खांबावर दोन पक्षी बसलेले होते. त्यांच्याकडे हरवलेल्या नजरेने पाहत अरविंद बोलला.
"मग, ती खोटं बोलली होती का?" आकाश.
"नाही... ते खरं होतं, खूप खरं होतं". अरविंदनं एक दीर्घ उसासा टाकला. रस्त्यावरची रहदारी थोडी कमी झाली होती, रिकाम्या रस्त्याकडे पाहतच तो पुन्हा बोलू लागला, "चॅाईस म्हणून काही तिच्या गावीच नाहीये आकाश. ती कुठलाच निर्णय घेऊ नाही शकत. कायम गोंधळलेली असते, त्यापेक्षा निर्णयच घेणं नको म्हणून तिचं उत्तर तसं होतं. मी मात्र उलटं समजलो."
"ठीक आहे अरविंद, त्यात इतकं नाराज होण्यासारखं काय आहे? बऱ्याच मुलीना लग्नाआधी घरी एक्स्पोजर नसतो, त्यामुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतो. तू तिला आत्मविश्वास दे, तिची तिला जबाबदारी घेऊ दे, जमेल तिला निर्णय घेणं." आकाश समजावणीच्या सुरात बोलला.
"ते इतकं सोपं असतं तर तुला मेसेज का करावा लागला असता मित्रा? खरी अडचण तिथेच तर आहे." अरविंद.
“मी नाही समजलो.” आकाश.
“ती post-graduate आहे. पण फक्त डिग्री मिळवायची या हेतूनं शिकलेली. त्यामुळे अभ्यास कशाला म्हणायचं, ज्ञानाच्या साह्याने आपलं व्यक्तिमत्व कसं खुलवायचं याचा काहीच विचार तिच्याकडे नाही. कधीच अवांतर वाचन करणार नाही, वाचलं तरी काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे जगात कुठे काय घडत आहे त्याचा आम्हाला पत्ताच नाही. मी यावर काही बोललो तर माझ्यावरच चिडते. पुस्तकात खोटं लिहीलेलं असतं हे तिचं तत्वज्ञान. घरात येणारी वर्तमानपत्रदेखील वाचत नाही. कोणताच छंद नाही कि काही आवड नाही.” दोन्ही गुढघ्यांवर हाताचे कोपरे टेकवून अरविंदनं आपला चेहरा तळव्यांमध्ये झाकून घेतला . काही क्षण शांततेत गेले.
“तुला वाटत असेल मी जे काही बोलतो आहे ते सगळं सुखी संसारासाठी तितकंसं आवश्यक नाहीये , हो नं ? ” अरविंदनं मान वळवून आकाशच्या डोळ्यात पाहत विचारलं. आकाशच्या ह्रदयातून एक कळ उठली. रोज ऑफिसमध्ये दिसणारी अरविंदच्या डोळ्यातली ती चमक गायब होती. इतरांना आश्वासक वाटणारे , जगण्याची दिशा दाखवणारे डोळे आज मात्र स्वतःमध्येच हरवलेले दिसत होते.
“होss, म्हणजे ….म्हटलं तर आवश्यक नाहीये अन म्हंटल तर खूप काही आहे....हे... सर्व ” आकाश खाकरत बोलला.
“एकदम मान्य आहे. मी हेहि समजू शकतो कि प्रत्येकाची एक उपजत वृत्ती असते. प्रत्येकच जण जगण्याची आपली एक रीत घेऊन जन्माला येतो. त्यामुळे मी जे म्हणतो आहे ते सर्वं तिनं करावं असं मला वाटत असलं, तरी तिच्यावर मी ते कधीच लादलं नाही. खरी अडचण दुसरीच आहे .” संध्याकाळ ओसरू लागली होती, अंधाराने हळूहळू आपलं जाळं विणायला सुरुवात केली होती.
"तिनं घराशी, घरातल्या माणसांशी, माझ्या मित्रांशी आणि तिच्याही मित्रांशी आपली बांधिलकी जपावी, सगळ्यांना लळा लावावा इतकीच माफक अपेक्षा आहे रे माझी. आजपर्यंत ती कोणाशीच नातं जुळवू नाही शकलीय. या अख्या जगात कोणीच नाहीये, ज्याला ती माया लावेल, जीवापाड जपेल, अगदी पोटच्या पोरीलासुद्धा. खूप आत्म -केंद्रित आयुष्यं जगतेय. घरात कोणाशीच तिचं पटत नाही, कोणी समजवायला गेलं तर उलटून बोलते. मी उभ्या आयुष्यात कधीच कोणाशी वाद घातलेला नाही, पण तिच्याशी मात्र माझा यावरून रोज वाद होतो.
तुला तर माहिती आहे कि मला बोलायचा किती सोस आहे. दगडालाही बोलायला लावीन असा अभिमान बाळगून होतो मी; पण माझ्या घरी गेलो कि माझाच दगड होतो. माझी अक्षरश: वाचा बसते. तिला कितीही चांगलं बोला.. कितीहि सरळ बोला, ती त्याचा नेमका उलटा अर्थ घेते अन मग कुर-बुर सुरु होते." अरविंद थोडं थांबला, पुन्हा बोलू लागला, "मी ऑफिसमधून घरी गेलोय, तिनं बॅग माझ्या हातातून घेतली अन कसा होता दिवस असं मला विचारलं हे गेल्या सहा वर्षात एकदाही झालं नाही . उलट दारात बूट काढतो न काढतो तोच तिचा आवाज कानावर येतो, आज आई असं बोलल्या, आज बाबा असं म्हणाले, सई माझं ऐकतच नाही, कधी काही तर कधी काही. सततचे रुसवे -फुगवे , इतरांवर संशय ….. त्यातून होणारी वादा-वादी … मी आता कंटाळलोय रे. खुपवेळा समजून सांगितलं पण तिच्यात काहीच फरक पडत नाही. जसा मनमिळाऊपणा नाही तसंच समर्पणभावही नाही. तिचं समर्पण जसं किचनमध्ये दिसलं नाही तसच ते मला कधी बेडरूममध्येहि जाणवलं नाही. अरविंद हताशपणे बोलला.
“तुम्ही शांतपणे समोरासमोर बसून कधी चर्चा नाही केलीत?” आकाशने विचारले.
“आजवर फक्त चर्चाच तर केली. आपण सुशिक्षित घरात वाढलेलो. त्यामुळे, तिला समजावून सांगण्यापलीकडे दुसरं काही करू शकलो नाही अन् फक्त बोलून तिच्यात फरक काही पडत नाही. स्त्री -अत्याचारावर आवाज उठवणाऱ्या लोकांना माझ्यासारख्या पुरुषाचा कोंडमारा कधी समजेल का रे?” अरविंदच्या आवाजात कंप जाणवू लागला होता. त्याचे डोळे पाणावले.
“शांत हो, अरविंद , मी समजू शकतो तुझी मनस्थिती .” आकाशला खुप वाईट वाटत होते. एका संवेदनशील मनाच्या माणसासोबत नियतीने विचित्र खेळ केला होता.
“तू तो मेसेज पाठवलास त्याचा अर्थ काय होता? मी कशी मदत करू शकतो तुला ?” आकाश.
अरविंदने दोन्ही हातानी आपले डोळे पुसले . “तिच्या मनाचा हा ग्रह आहे कि घरातल्या इतर लोकांचं ऐकून, त्यांना सोयीस्कर असच मी तिला वागायला लावतो. त्यामुळे मी समजावून सांगितलेलं काहीएक तिला ऐकायचं नसतं. लग्नानंतर 2-3 वर्षातच माझ्या लक्षात आलं कि माझ्याकडून तिला समजावणं शक्य नाही . तेंव्हापासून मी तिच्यासाठी एका मित्राच्या शोधात होतो. जो तिच्याशी ह्या गोष्टींवर चर्चा करू शकेल. तिच्या वागण्याने घरातल्या छोट्या छोट्या आनंदावर कसं विरजण पडतंय हे तिला उदाहरणासहीत समजावून सांगेल. तिला हे पटवून देईल कि इतरांवर प्रेम करण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःवर प्रेम करता आला पाहिजे. तिचा खरा प्रॅाब्लेम low self-esteem आहे. स्वतःवरच प्रेम नाही त्यामुळे विश्वास नाही. ती सतत कसली तरी भीती बाळगून असते. काही तरी गमावण्याची ती भीती तिला आनंदाने जगू देत नाही. मग इतरांपासुनही तो आनंद ती हिरावून घेत राहते. आयुष्यातल्या शाश्वततेचा प्रत्यय तिला येणं खूप आवश्यक आहे आकाश. ती शाश्वतताच तिला शांत आणि समाधानी करू शकेल.” अरविंदला थांबवून काही सुचवण्याचा प्रयत्न करावा असा एक विचार आकाशच्या मनात येऊन गेला. परंतु, अरविंदला मोकळं होऊ देणं गरजेचं होतं, म्हणून आकाश शांतच राहिला. अरविंद बोलत होता..
“तिची सुद्धा काही दुःखं असतील, काही वेदना असतील. त्या जाणून घेण्याचा मी खुपदा प्रयत्न केला, पण तिने कधीच माझ्यासमोर स्वतःला उकललं नाही. ती अढी मला कधी सुटलीच नाही. व्यक्त होता आलं तर बहुधा ती थोडी खुलेल. म्हणूनच, मला असं वाटतं कि मन मोकळं करायला तिला एक मित्र असावा. जो तिला डोळसपणे जगाकडे पाहायला शिकवेल. तिला हे पटवून देईल कि जगात चांगल्या माणसांची काही कमी नाही पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्याची भिंग adjust करता आली पाहिजे. सगळ्यांकडे आपण एकाच भिंगातून पहायचं नसतं. तू हे करू शकतोस आकाश." आकाशकडे पाहत अरविंद बोलायचे थांबला
"तू म्हणतोस ते ठीक आहे. पण माझ्यापेक्षाही एक मुलगी हे काम चांगलं करू शकेल असं नाही वाटत तुला? म्हणजे ...त्या दोघी मन-मोकळी चर्चा करू शकतील. आपल्या ऑफिसमध्ये मृणाल आहे. आपण जर हे तिला सांगितलं तर? " आकाशने विचारलं.
"मी पण तोच विचार केला होता आधी. माझ्या एका मित्राच्या लहान बहिणीला फार पूर्वी मी या बाबतीत बोललो होतो. मला मदत करायची ठरवून तिने प्रयत्नहि सुरु केले होते. अधून-मधून घरी यायची, हिच्याशी गप्पा मारायची, तिला घराबाहेर पडायला प्रोत्साहन द्यायची. नाही म्हणायला थोडा-फार परिणामहि दिसू लागला होता. ती घरी आल्यावर साहजिकच आमचहि बोलणं व्हायचं अन नेमका तिथच घात झाला. तिनं आमच्यावरच संशय घेणं सुरु केलं. रोज आदळ-आपट. मनात राग धरायचा आणि समोरच्यावर काढायचा. प्रसंगी रागाच्या भरात सईला मारहाण करायची. शेवटी कंटाळून मीच तिला घरी येऊ नको म्हणून विनंती केली. ती वाटदेखील बंद झाली." अरविंद आपल्या तळ-हातावरच्या रेषांकडे बघत बोलला. जणू नशिबात काय लिहिलं आहे हे शोधायचा तो प्रयत्न करत होता.
आकाशला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोणी इतकं सूड बुद्धीने वागत असेल? इतका चांगला नवरा मिळाला तरी ही बाई असं का वागतेय? आकाश मनाशी विचार करू लागला.
"आकाश, मला माझ्या घरात विसाव्यासाठी एक जागा तेवढी हवी आहे. खरंतर, पती आणि पत्नी या दोघांच्याहि आनंदाच्या जागा जर सारख्याच असतील तर तो संसार आयुष्यभरासाठी एक सोहळा होऊन जातो. असंच काहीसं स्वप्न मनात ठेऊन प्रत्येक जण लग्न करतो, मीदेखील तेच स्वप्न पाहिलं होतं. माझ्या नशिबी तो सोहळा नक्कीच नाही आला. तरी सईसाठी मला हा संसाराचा खेळ सुरु ठेवावाच लागेल. आणि त्यासाठी मला तुझी गरज आहे. माझं रोजचं जगणं थोडं सुसह्य व्हावं यासाठी तिच्यात improvement होणं गरजेचं आहे."
"पण, अरविंद... मी?" आकाश गोंधळला होता.
"आकाश, आपल्या दोघांच्या विचार प्रक्रियेत खूप साम्य आहे. त्यामुळे, आवाज जरी तुझा असला तरी विचार माझे असतील याची मला खात्री आहे. बोलत जा तिच्याशी. तुझ्यारूपाने एक संयमित मित्र अन मार्गदर्शक भेटला तर तिला जगण्याची एक नवी दिशा मिळेल. आणि हा विश्वासपण येईल कि स्त्री-पुरूषाच नातं ती विचार करते तितकं उथळ अन फक्त शारीरिक नसतं. चार दिवस साफ नाही केलं, तर सडणाऱ्या ह्या शरीराच्या जाणीवांईतकं मर्यादित तर मुळीच नसतं. पटू दे तिला की हे नातं निकोप आणि पवित्र सुद्धा असू शकतं.”अरविंदनं आकाशचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला, "बघ प्रयत्न करून. तुला माझ्या संसारातली कटुता थोडी जरी घालवता आली तर. करशील नं माझ्यासाठी इतकं ?" अरविंदने अजीजीने विचारले. आकाश सुन्न होता. भोवतालचा अंधार आता आणखीनच गडद झाला होता.
माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
बासरी - चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी.
कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा,
कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका,
कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी
तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार.
जलतरंग - मूर्तीमंत आशावाद.
जीवनरसाने ओथंबलेला.
सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा.
हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा.
ह्याच्या सहवासात आल्यावर नैराश्य आपोआप दूर पळून जाते आणि मन आशावादी बनते.
व्हायोलीन - जलतरंगाच्या विरुद्ध स्वभाव.
जणू दु:खाचे आकर्षण असल्यागत वागणारा. दु:ख स्वत:चे असो वा दुस-याचे.
हा स्वतःच आर्त होणार.
गिटार - चिरतरूण. कुठल्याही गॅदरींगचा केंद्रबिंदू.
पार्टीत स्वत: नाचून दुस-यांचे पायही थिरकवणार. तितक्याच सहजतेने एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणार.
सतार - अतिशय भावनाशील.
कुठलीही भावना उत्कटपणे, भरभरून, झरझरून बाहेर येणार असा स्वभाव.
मग तो आनंद असो, गहिवर असो ,
दु:ख असो - किंवा भावनांचा महापूर.
तबला - डग्गा -
जणू दोन मित्र गप्पा मारायला बसलेत. विषयांचा आवाका अफाट -
आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण, क्रिकेट , सिनेमा, नट नट्या , प्रवास , ऑफीस - काहीही असो .
विषय व मूड आणि भावनांची तीव्रता ह्यावर अवलंबून असलेले बोल.
नगारा - एकच मूड - मस्तीचा .
कायम कशाचे तरी सेलीब्रेशन आणि त्यासाठी नाचायची नी नाचवायची तयारी.
ढोलक - अवलिया व्यक्तिमत्व.
आसक्ती आणि विरक्ती या दोन परस्पर विरोधी धृवांवर सारख्याच तन्मयतेनी व रसिकतेनी वागणारा -
म्हणून , लावणी आणि भजन !
कुठेही फिट्ट होतो.
पेटी - ही आहे मित्रमैत्रीणींची मैफिल. त्यातल्या काळ्या पांढ-या पट्ट्यांप्रमाणेच विभिन्न स्वभावाच्या मित्र मैत्रीणींची मैफिल.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, क्षेत्र वेगळे पण एकत्र आले की खूप सुखद असा सुसंवाद ..!
स्वत:चे स्वतंत्रपण जपता जपता दुस-याला साथ देणारे मित्र मैत्रिणी म्हणजेच ही सुरेल वाद्य ...!
WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरील श्री राजन सहस्त्रबुद्धे यांनी केलेले पोस्ट
आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःसाठी जगणं गरजेचे असते. आपला आनंद आपल्या हाती..
किशोरीताई गेल्या..... यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले..... अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ?
अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात..... रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो , दुपारी माध्यान्ह समयी कुमार गंधर्व झुळुक बनून येतात , माहौल विशिष्ट असेल तर पंकज उधास असतो , अाणि २४ तासांत कधीही तानपुर्याचा रेंगाळणारा सूर अाणि किशोरीसारखा कुणाहि शास्त्रीय संगीताशी निगडित अावाज अापल्याला अंतर्मुख करून जातो.....
असं म्हणतात की चौर्यांऐंशी लक्ष योनीपैकी शेवटचा जन्म माणसाचा अाणि तेंव्हा ईश्वराकडून मोक्ष मागून घ्यावा..... पण अापण सारेच इतके भाग्यवान अाहोत की अारक्षणामुळे बरबटलेला असला , कितीहि समस्या असल्या तरी अापण भारतात जन्मलो याचा कुणीहि हेवा करावा ! अगदी अंगावरच्या कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत अाणि अायुष्य व्यापून उरलेल्या अभिजात भारतीय गाण्यापर्यंत अापण किती भाग्यवान अाहोत याची जाणीव होते !
१४ जानेवारी २००८ ला अाम्हि मित्र शिवरायगडवर होतो अाणि काहि मित्रांनी खवचटपणे "तू कवी अाहेस ना , मग अात्ता एक कविता करुन दाखव बघू!" असं म्हटलं , तेंव्हा मी म्हटलं अरे कविता सुचणं हे त्याची किमया अाहे , मी कविता *पाडंत नाहि!पण प्रयत्न करतो !" असं म्हणून केलेली एक चारोळि ऐकवतो :
शिवरायगड.....
तुमच्या ३६० किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ला सर होताना मला पहायला अावडलं असतं ,
पण त्याहिपेक्षा जास्त , रायगडाच्या पायरीचा चिरा होऊन रहायला मला अावडलं असतं !
माझ्या मनुष्य जन्मावर मग मी हत हसंत पाणी सोड असतं ,
कारण येता जाता शिवराय , तुमचं पाऊल माझ्यावर पडलं असतं!
याच धर्तीवर अाज असं वाटतंय ,
किशोरीताईंच्या तानपुर्याची खिट्टी म्हणून जरी जन्म मिळाला असता ना , तरी अायुष्य सफल झालं असतं , गानसरस्वतींनी हाताळणं अाणि मग त्यांच्या गळ्यातून येणार्या अविरत सुमधूर स्वरांनी चिंब होणं यापरतं मोठं भाग्य कुठलं महाराजा !
किशोरीताई , माझ्यासारख्या { शास्त्रीय संगीतातील ठोंब्या } तमाम संगीतप्रेमींना सुरांनी चिंब भिजवलंत अाणि अाज जाता जाता डोळे तुडुंब पाण्याने भरून अामच्याच अासवांनी अाम्हाला भिजवलंत ! दाटलेल्या कंठानी एवढंच म्हणतो : अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग.....
उदय गंगाधर सप्रे(म)
ठाणे
पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता. या कवितेचा अनुवादक माहित नाही.
तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर
शाबासकीची थाप.
याचा अर्थ,
तुम्ही मरताय हळूहळू.
स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही
नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी
वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही
बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न
वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत
आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत
पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही
चिकटून बसता
त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी
तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या
स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही
स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ
तुम्ही मरताय...
हळूहळू...
- पाब्लो नेरुदा
" ऐ , ऐक ना " " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " " ओके " . " पाठवला . " " बघितला . " " Delete केलास " " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " " प्लीज़ सांग ना . delete केलास . " " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे ! ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " " खरंच आवडला ? " " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं . पण तू delete का करायला सांगितले ? मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली मला आवडले नसते . चाललेही नसते . " " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ? झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने . " " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला गेलाय . " " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा ! जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता कामा मागे . " " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . . मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले आणखी छान आले असते फोटोत . नाहीतरी एकच साइड आहे ना " " अजून नाही का काही " " रागावनार नसशील तर सांगतो . " " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " " तू म्हणजे ना . . " " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी . ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत पटकन भरेल अशी . " " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " " चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " " आता हे काय ? " " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो ग . " " सॉलिड आहे हे . " " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो पाहताना मला ते सारखे आठवत होते . " "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " " अलग होंगे ; मगर गलत नही " " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला काय म्हणायचे ते सांग . " " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज , स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित होत जाणारे . एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे . गाण्यात कसे प्रत्येक कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . . . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " " अगदी खरं आहे रे हे " " तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " " पटलं मला " " ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत . सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात . ते सदैव सुरातच हवेत . इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " " क्या बात हैं ? " " अजून एक सांगू ? " " विचारू नकोस . सांगत राहा . " " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन . " " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " " मी हे delete करणार नाही . " " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " " मग ? " " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते . पण या फोटोची निदान एक तरी Black - white अशी प्रत काढ . " " का रे ? " " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण - धवल च फोटो हवा " " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही पहिल्यापासून प्राजक्त आणि मोगरा ही तुझी नम्बर एकची आवड का ? आणि मी एकदा तुला वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत . भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो . हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते . त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही . " " किती वेडा आहेस रे " " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते . आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते . म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " " हा फोटो नाही विसरू शकणार " " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो " " तूच एक . . . " -- चंद्रशेखर टिळक २ डिसेंबर २०१६
9820292376
Email: tilakc@nsdl.co.in
आपल्याला मिळालेली नाती हि अनमोल देणगी असते. हि नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.
Copyright © 2025 | Marathisrushti