नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
बासरी - चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी.
कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा,
कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका,
कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी
तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार.
जलतरंग - मूर्तीमंत आशावाद.
जीवनरसाने ओथंबलेला.
सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा.
हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा.
ह्याच्या सहवासात आल्यावर नैराश्य आपोआप दूर पळून जाते आणि मन आशावादी बनते.
व्हायोलीन - जलतरंगाच्या विरुद्ध स्वभाव.
जणू दु:खाचे आकर्षण असल्यागत वागणारा. दु:ख स्वत:चे असो वा दुस-याचे.
हा स्वतःच आर्त होणार.
गिटार - चिरतरूण. कुठल्याही गॅदरींगचा केंद्रबिंदू.
पार्टीत स्वत: नाचून दुस-यांचे पायही थिरकवणार. तितक्याच सहजतेने एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणार.
सतार - अतिशय भावनाशील.
कुठलीही भावना उत्कटपणे, भरभरून, झरझरून बाहेर येणार असा स्वभाव.
मग तो आनंद असो, गहिवर असो ,
दु:ख असो - किंवा भावनांचा महापूर.
तबला - डग्गा -
जणू दोन मित्र गप्पा मारायला बसलेत. विषयांचा आवाका अफाट -
आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण, क्रिकेट , सिनेमा, नट नट्या , प्रवास , ऑफीस - काहीही असो .
विषय व मूड आणि भावनांची तीव्रता ह्यावर अवलंबून असलेले बोल.
नगारा - एकच मूड - मस्तीचा .
कायम कशाचे तरी सेलीब्रेशन आणि त्यासाठी नाचायची नी नाचवायची तयारी.
ढोलक - अवलिया व्यक्तिमत्व.
आसक्ती आणि विरक्ती या दोन परस्पर विरोधी धृवांवर सारख्याच तन्मयतेनी व रसिकतेनी वागणारा -
म्हणून , लावणी आणि भजन !
कुठेही फिट्ट होतो.
पेटी - ही आहे मित्रमैत्रीणींची मैफिल. त्यातल्या काळ्या पांढ-या पट्ट्यांप्रमाणेच विभिन्न स्वभावाच्या मित्र मैत्रीणींची मैफिल.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, क्षेत्र वेगळे पण एकत्र आले की खूप सुखद असा सुसंवाद ..!
स्वत:चे स्वतंत्रपण जपता जपता दुस-याला साथ देणारे मित्र मैत्रिणी म्हणजेच ही सुरेल वाद्य ...!
WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरील श्री राजन सहस्त्रबुद्धे यांनी केलेले पोस्ट
आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःसाठी जगणं गरजेचे असते. आपला आनंद आपल्या हाती..
किशोरीताई गेल्या..... यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले..... अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ?
अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात..... रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो , दुपारी माध्यान्ह समयी कुमार गंधर्व झुळुक बनून येतात , माहौल विशिष्ट असेल तर पंकज उधास असतो , अाणि २४ तासांत कधीही तानपुर्याचा रेंगाळणारा सूर अाणि किशोरीसारखा कुणाहि शास्त्रीय संगीताशी निगडित अावाज अापल्याला अंतर्मुख करून जातो.....
असं म्हणतात की चौर्यांऐंशी लक्ष योनीपैकी शेवटचा जन्म माणसाचा अाणि तेंव्हा ईश्वराकडून मोक्ष मागून घ्यावा..... पण अापण सारेच इतके भाग्यवान अाहोत की अारक्षणामुळे बरबटलेला असला , कितीहि समस्या असल्या तरी अापण भारतात जन्मलो याचा कुणीहि हेवा करावा ! अगदी अंगावरच्या कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत अाणि अायुष्य व्यापून उरलेल्या अभिजात भारतीय गाण्यापर्यंत अापण किती भाग्यवान अाहोत याची जाणीव होते !
१४ जानेवारी २००८ ला अाम्हि मित्र शिवरायगडवर होतो अाणि काहि मित्रांनी खवचटपणे "तू कवी अाहेस ना , मग अात्ता एक कविता करुन दाखव बघू!" असं म्हटलं , तेंव्हा मी म्हटलं अरे कविता सुचणं हे त्याची किमया अाहे , मी कविता *पाडंत नाहि!पण प्रयत्न करतो !" असं म्हणून केलेली एक चारोळि ऐकवतो :
शिवरायगड.....
तुमच्या ३६० किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ला सर होताना मला पहायला अावडलं असतं ,
पण त्याहिपेक्षा जास्त , रायगडाच्या पायरीचा चिरा होऊन रहायला मला अावडलं असतं !
माझ्या मनुष्य जन्मावर मग मी हत हसंत पाणी सोड असतं ,
कारण येता जाता शिवराय , तुमचं पाऊल माझ्यावर पडलं असतं!
याच धर्तीवर अाज असं वाटतंय ,
किशोरीताईंच्या तानपुर्याची खिट्टी म्हणून जरी जन्म मिळाला असता ना , तरी अायुष्य सफल झालं असतं , गानसरस्वतींनी हाताळणं अाणि मग त्यांच्या गळ्यातून येणार्या अविरत सुमधूर स्वरांनी चिंब होणं यापरतं मोठं भाग्य कुठलं महाराजा !
किशोरीताई , माझ्यासारख्या { शास्त्रीय संगीतातील ठोंब्या } तमाम संगीतप्रेमींना सुरांनी चिंब भिजवलंत अाणि अाज जाता जाता डोळे तुडुंब पाण्याने भरून अामच्याच अासवांनी अाम्हाला भिजवलंत ! दाटलेल्या कंठानी एवढंच म्हणतो : अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग.....
उदय गंगाधर सप्रे(म)
ठाणे
पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता. या कवितेचा अनुवादक माहित नाही.
तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर
शाबासकीची थाप.
याचा अर्थ,
तुम्ही मरताय हळूहळू.
स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही
नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी
वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही
बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न
वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत
आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत
पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही
मरताय हळूहळू.
या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही
चिकटून बसता
त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी
तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या
स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही
स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ
तुम्ही मरताय...
हळूहळू...
- पाब्लो नेरुदा
" ऐ , ऐक ना " " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " " ओके " . " पाठवला . " " बघितला . " " Delete केलास " " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " " प्लीज़ सांग ना . delete केलास . " " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे ! ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " " खरंच आवडला ? " " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं . पण तू delete का करायला सांगितले ? मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली मला आवडले नसते . चाललेही नसते . " " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ? झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने . " " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला गेलाय . " " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा ! जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता कामा मागे . " " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . . मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले आणखी छान आले असते फोटोत . नाहीतरी एकच साइड आहे ना " " अजून नाही का काही " " रागावनार नसशील तर सांगतो . " " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " " तू म्हणजे ना . . " " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी . ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत पटकन भरेल अशी . " " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " " चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " " आता हे काय ? " " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो ग . " " सॉलिड आहे हे . " " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो पाहताना मला ते सारखे आठवत होते . " "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " " अलग होंगे ; मगर गलत नही " " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला काय म्हणायचे ते सांग . " " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज , स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित होत जाणारे . एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे . गाण्यात कसे प्रत्येक कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . . . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " " अगदी खरं आहे रे हे " " तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " " पटलं मला " " ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत . सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात . ते सदैव सुरातच हवेत . इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " " क्या बात हैं ? " " अजून एक सांगू ? " " विचारू नकोस . सांगत राहा . " " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन . " " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " " मी हे delete करणार नाही . " " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " " मग ? " " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते . पण या फोटोची निदान एक तरी Black - white अशी प्रत काढ . " " का रे ? " " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण - धवल च फोटो हवा " " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही पहिल्यापासून प्राजक्त आणि मोगरा ही तुझी नम्बर एकची आवड का ? आणि मी एकदा तुला वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत . भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो . हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते . त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही . " " किती वेडा आहेस रे " " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते . आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते . म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " " हा फोटो नाही विसरू शकणार " " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो " " तूच एक . . . " -- चंद्रशेखर टिळक २ डिसेंबर २०१६
9820292376
Email: tilakc@nsdl.co.in
आपल्याला मिळालेली नाती हि अनमोल देणगी असते. हि नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यांसारखा पण कोरडा उरलास का रे ?
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
राग - बागेश्री
"तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे...."
हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भटांच्या अनेक गझलांचे रुपांतर सुंदर गाण्यात केले, या अप्रतिम गझलांपैकीच एक, "तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?" ही श्रवणीय गझल आहे.
हेच गाणं आशाजींच्या कर्णमधुर आवाजात ऐकलं की डोळ्यात पाणी येते. या गझलेमागे एक करुण कथा आहे असं जर मनात गृहीत धरून हे गाणं ऐकलं तर या गझलेचे भाव पूर्णतः बदलून जातात. ती केवळ शृंगारिक रचना न राहता एक आर्त करूण शोकगाथा बनून जाते, जी आपले हृदय पिळवटून टाकते…खरंच ही करूण, दुःखद घटनेवरची गझल आहे का ? नक्की काहीच सांगता येत नाही,
युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या एका वीर जवानाचा मृतदेह घरी आणलेला आहे. त्याच्या पाठीमागे आता फक्त त्याची तरूण पत्नी व चिमुरडे मूल राहिले आहे. आपल्या पतीच्या निष्प्राण देहाकडे विमनस्क अवस्थेत शांत बसलेली पत्नी. तिने तिचा अश्रुंचा बांध थांबवलेला आहे, ती ओठ मिटून बसली आहे काहीच बोलत नाहीये. तिने आपल्या भावनांचा बांध खुला करावा, मनातलं आभाळ रितं करावं म्हणून तिचे सगळे स्नेहीजन एका वेगळ्या भ्रांतेत आहेत. पण ती काही केल्या निश्चल अवस्थेतून बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर एक वृद्धा उठते आणि तिच्या तान्हुल्या बाळाला तिच्या मांडीवर ठेवते. त्या बाळाच्या हुंदक्याने तिची समाधीतल्लीनता भंगते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची वाट मोकळी होते… अशी ही कविता..
आयुष्यातल्या एका अल्वार वळणावर तो तिची साथ सोडून गेला आहे आणि त्याचे कलेवर घरी आणलेलं आहे.ते दृश्य बघून तिला काही कळतच नाहीये, ती दिग्मूढ होऊन गेलीय आणि नुसते त्याच्याकडे बघत बसलीय. रात्र उलटत चाललीय आणि हा सहवास कुठे तरी संपुष्टात येणार याची पुसटशी जाणीव तिला झालेली आहे. तिच्या मनात अशा वेळेस भावभावनांचे कोणते कल्लोळ उमटत असतील यांचे एक अप्रतिम काव्यचित्र म्हणजे ही गझल होय.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
रात्र नुकतीच झाली आहे, ती तरुण आहे (आणि तो देखील ) प्रेमाच्या या हृदयीचे त्या हृदयी होण्याची ही वेळ आहे. तरीही तु असा निजलेला आहेस. खरे तर आपलं फुलासारखं नाजूक प्रेम तु माझ्या केसात माळण्याचं सोडून तु इतक्यातच त्या कुशीवर वळला आहेस. तु असं का केलं आहेस. ही काय जाण्याची वेळ आहे का असं तिला सुचवायचं आहे.
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
मला आठवतं की, तुझं प्रदीप्त धगधगतं मन तु असंच माझ्या डोळ्याच्या पारयात तु हलकेच रितं करायचास अन चंद्रासारखा शीतल होऊन जायचास. एक शब्दही न बोलता सारं माझ्या कानात हळूच ओठांनी स्पर्शून सांगून जायचास. आपल्या उत्कट प्रेमाला साक्ष असणारया या भव्य अंधारलेल्या दिगंतातल्या तारकांच्या त्या दीपमाला अजूनही तेवत आहेत, त्यांनाही अजून आपल्या मिलनाची ओढ आहे. एव्हढेच नव्हे तर मी देखील अजून तुझ्यावरील आसक्त भावनेत तग धरून आहे. ( नाहीतर मी देखील विझले असते ) पण तूच असा दगा का दिलास बरं ? का तू माझ्याशी प्रतारणा करून निघून गेला आहेस ?तुझ्या हृदयातला प्रेमाचा ध्रुवतारा असा कसा निमाला?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
तू हे जे काही केलं आहेस ते एकवेळ मी मनाच्या समजूतीसाठी स्वतःला काहीतरी सांगेन पण आपल्या प्रेमाला सोबती असेलेल हे कोजागिरीचं टिपूर चांदणं जे मोठ्या आशेनं माझ्याकडे बघतंय त्याला आता काय सांगू हा प्रश्न पडलाय. त्यांना पाहून सवयीने आपसूक माझ्या मनातल्या गुलबक्षीच्या फुलाच्या पाकळ्या आपसूकच उमलतात त्यांचं मी काय करू आणि तु तर असं स्वतःला मिटून घेऊन ( अज्ञाताच्या अनंत प्रवासाला ) निघून गेला आहेस. अगदी हृदय पिळवटून जाईल असं हे हळवे रुदन आहे.….
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
आसमंतातल्या तारकाना मी डोळ्याच्या पापण्याआड करून त्याकडे डोळेझाक करू शकते पण तुझ्यामाझ्या सवयीचा झालेला पश्चिमेचा हा अवखळ वारा जो आपल्या देहाला थरथरता स्पर्श करूनच पुढं जातो. त्याला या स्पर्शाचा आभाळभर कैफ चढला आहे, तो देखील तुझ्याबद्दल विचारतोय त्याला काय सांगावे काही कळत नाही. आपण दोघे एकमेकाच्या पाशात विसावलो की खिडकीतून येणारा रातराणीचा बेधुंद करणारा गंध आपल्या भोवती नजाकतीने पिंगा घालत बसायचा. त्याला आपली सवय झाली होती आणि मला त्याच्या त्या नशील्या गंधाची ! पण तु आता जाताना रातराणीचा गंध तुझ्यासवे नेला आहेस की काय असे वाटावे इतके त्या रातराणीने स्वतःला गंधबंधित करून मिटवून टाकले आहे, ती आता खिडकीतून डोकावत नाही. मला तर काहीच सुचत नाही ( आता तूच ते काय सांग ) असं विचारत ती तिची कैफियत सुरु ठेवते…
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यातसारखा पण कोरडा उरलास का रे ?
शेवटच्या पंक्तीत कवी सुरेश भटांनी कमाल केलीय. अमृत म्हणजे अमर होण्यासाठी देवतांनी प्राशन केलेले पेय होय.तो जरी असा ( निश्चल ) बनून राहिला असला म्हणून काय झालं, तिच्या हृदयात प्रेमाच्या लाटा या उसळत आहेत त्या सदैव अखंडितपणे उसळत राहतील याची तिला खात्री आहे. पण तिला खंत आहे की या धुंद प्रेमाच्या लाटा उसळत असताना त्याची अनुभूती घेण्यासाठी तो मात्र सचेत नाही. तो किनारया सारखा कोरडा झालाय. पण म्हणून काय झालं, लाट ही शेवटपर्यंत त्या किनारयाकडे येतच राहणार अन त्याच्या पायाला स्पर्शून आपले अमर प्रेमगीत त्याच धुंदीने गात राहणार. इतकी ती तिच्या प्रेमावर फिदा आहे आणि त्यावर जगत राहणार आहे. पण त्यानं असं का वागावं, त्यानं असं ( अकाली ) विझून जावं ? याची तिच्या मनाला पोखरणारी खंत आहे ती तिला काही केल्या गप्प बसू देत नाहीये….
या कवितेमागील नेमकी पार्श्वभूमी अशीच आहे का याला मात्र त्यांनी कधी दुजोरा दिला नाही मात्र त्याबरोबरच त्यांनी या गझलेमागील नक्की भावबिंदू कोणते हे देखील सांगितले नाही. पण त्यांच्या जिवलगाला म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना मात्र याविषयी सांगतले असावे त्यामुळेच की काय त्यांनी बागेश्री रागात ही गझल आर्त अशा सुरात गुंफली असावी.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- समीर गायकवाड.
"तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे...." हे गाणे.
मा.आरती अंकलीकर
https://www.youtube.com/y1j3nP1E6cc&list=PL99D9CC5EA52821B8&index=7
मा.आशा भोसले
https://www.youtube.com/7YaMnvWnYBI
मा.पद्मजा फेणाणी
https://www.youtube.com/94Y5UUkPY6Q
शंकर महादेवन
https://www.youtube.com/EH4TuZq0YOI
अनुजा पडसलगीकर यांचा हा लेख व्हॉटसऍपवरुन व्हायरल होतोय. अतिशय सुंदर लेख.. विचार करायला लावणारा..
चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते.
काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे 150 पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. दिंडीचे भव्य स्वागत कार्यक्रम स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच या महाकाव्यसम्मेलनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नयना आपटे यांनी केले. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, मनसे नेते सदाशिव मते, मनसे प्रमुख संघटक सुनील बसाखेत्रे, माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलंकर, पुण्यनगरीचे राधाकृष्ण नार्वेकर, संपादिका राही भिडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील विविध लेखक, पत्रकार, कवी व कवयित्री देखील आवर्जून उपस्थित होते.
एकदिवसीय असलेल्या या महासंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी संयोजक प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या सहयोगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन जयवंत बामणे व सौ. संगिता शांताराम कारंडे यांनी केले होते. या महाकाव्यसम्मेलनामध्ये प्रत्येकास काव्यवाचनाची संधी देण्यात आली. प्रत्येकास सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti