नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते.
त्या दोन जिल्ह्यात आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की 'शिक्षकांच्या अध्ययन आणि अध्यापनातील अडचणींचा त्यात समावेशच नाही.' त्यामुळे प्रशिक्षणानंतर ही शिक्षकांच्या अडचणी कायमच राहात. आणि विशेष म्हणजे फारच कमी शिक्षकांना याबाबत खंत वाटत होती. असले प्रशिक्षण काय कामाचे?
दोन्ही जिल्ह्यातील विशेष गती असणाऱ्या 100 शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांना अध्ययनात व अध्यापनात येणाऱ्या विषय निहाय व इयत्ता निहाय अडचणींची यादी तयार केली. अशी यादी तयार करताना शिक्षकांनी यादीवर त्यांचे नाव लिहिणे अपेक्षित नसल्याने शिक्षकांनी आपले काम निर्भयपणे केले. गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास व भूगोल अशा सर्व विषयांच्या इयत्तानिहाय अडचणींच्या याद्या तयार झाल्या. या 100 याद्यांपैकी अडचणींची वारंवारिता आणि प्राथमिकता ठरवून प्रत्येक विषयाच्या 20 अडचणींची अंतीम यादी तयार केली. उदा.गणितातल्या अडचणी होत्या : मुलांना '3003' लिहायला सांगितल्यास काही मुले '30003 किंवा 300003' असेही लिहितात. (कारण आपण लिहितो डावीकडून उजवीकडे व मोजतो मात्र उजवीकडून डावीकडे! त्यामुळे मुलांचा गोंधळ होतो.) तसेच, 36 आणि 63 किंवा 49 व 59 हे अंक लिहिताना मुलांचा गोंधळ होतो. अर्धा,पाव,पाऊण या संकल्पना समजणे, त्याचा व्यवहारात उपयोग करणे या बाबत मुलांचा गोंधळ होतो. पाढे पाठ कसे करावेत. वगैरे.
भाषेतल्या अडचणी : जोडाक्षरं आणि रफार शिकविताना गोंधळ. 'बैल' असे न लिहिता काही मुले 'बइल' असे लिहितात. मुलांचे अक्षर वळणदार होण्यासाठी व लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी काय करावे? मुलांना बोली भाषेकडून प्रमाणित भाषेकडे कसे आणावे? इत्यादीं
यानुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला.
शिक्षकांना सक्षम करण्याअगोदर शिक्षकाचे मूल्यमापन होणे ही गरजेचे होते. कारण शिक्षकाला जर अध्ययन व अध्यापनातील स्वत:ची अडचण ओळखता आली व ती निर्भयपणे मांडता आली तरच त्याला त्याचे उपयोजन करणे सोपे होईल. पर्यायाने मुलांसोबत शिकण्याची गती ही वाढेल. त्यासाठी तीन पायऱ्या तयार केल्या. एक,शिक्षकाला मुलाची अडचण ओळखता येते का? दोन,मुलाची अडचण ओळखता आल्यानंतर, ती सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजतंय का? तीन, मुलाचा प्रश्न सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजले आहे.पण आता, ही अडचण सोडविण्यासाठी त्या शिक्षकाने कोणत्या संसाधन व्यक्तीची, अधिकाऱ्याची, संस्थेची मदत घ्यायची हे त्याला माहित आहे का? आणि माहित असल्यास तो त्यासाठी उपयोजन करतो आहे का? या साखळीतील कुठलाही एक दुवा जरी निखळला तरी त्या मुलाच्या शिक्षणातला व्यत्यय कायमच राहतो.
या साऱ्या गोष्टींचा विचार करुन, जे 'मास्टर टिचर्स' इतर शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार त्यांच्यासाठी आधी 'व्हिजनिंग कार्यशाळा' आयोजित केल्या. आणि एकदा व्हिजनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यातूनच तयार झाली दोन दिवशीय 'अध्यापन कौशल्य कार्यशाळा.'
शिक्षकांनीच मांडलेल्या अध्यापनातील अडचणी सुटू शकतील असे गरजाभिमूख 'शून्य खर्चाचे खेळ' तयार केले. असे हे सुमारे 89 खेळ. यातला प्रत्येक खेळ किमान दहा प्रकारे खेळता येतो. यातील काही खेळ भाषेचे आहेत पण विशिष्ट भाषेचे नाहीत. त्यामुळे ते खेळ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेसाठी खेळता येतात. त्याचप्रमाणे अनेक खेळ हे युनिव्हर्सल आहेत. ते कुठल्याही विषयासाठी खेळता येतात. या खेळांचे तीन प्रकार आहेत. एक,संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही खेळ. दोन, उजळणी करण्यासाठी खेळ. तीन, मूल्यांकनासाठी खेळ. याचप्रमाणे भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी काही प्रयोग केले. निबंध लेखनाच्या किमान सहा पध्दती विकसित केल्या. उदा. : पावसाळ्यात मुले त्यांच्या शालेय परंपरेनुसार 'पावसाळ्यातील एक दिवस'हा निबंध लिहित असत. आम्ही मग पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा. वर्तमान पत्रातील फोटो, बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती, शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले. एका मुलाने निबंधात लिहिले होते, 'माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात. हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!' 'वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!'ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते.
खेळता खेळता मुलांचे पाढे पाठ होऊ लागले. तोंडी गणितं, सम विषम संख्यांची उजळणी, शब्दांचा वाक्यात उपयोग करण्यासाठी खेळ, जोडाक्षरासाठी खेळ, शब्दांचे खेळ, वाक्यांचे खेळ, संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी खेळ, आलेखाचा खेळ, नकाशाचा खेळ, पूर्णांक अपूर्णांकाचा धमाल मस्ती खेळ असे अनेक खेळ रोज शाळेत खेळले जाऊ लागले. शाळेत खेळ खेळायला मिळतात यामुळे मुलांमधे उत्साह संचारला. आणि या खेळांमुळे मुलांच्या गणिताच्या, भाषेच्या अडचणी सुटतात म्हणून शिक्षकांचा हुरुप वाढला. बालभारतीवर फार अवलंबून राहायचं नाही अस ठरवलं होतं. कारण बालभारती मधील धड्यांचा मुलांच्या भावविश्चाशी काडिमात्र संबंध नाही. मुलांच्या बुध्दीला चालना व आव्हान मिळेल असे त्यात काही नाही. कल्पकता शून्य पुस्तकाचे नाव 'बालभारती.' यातील भाषा, आणि धड्याखालील स्वाध्याय हा तर इतका रटाळ प्रकार आहे की मुलांमधे मातृभाषेविषयी अरुची निर्माण करण्यात बालभारतीचाच सिंहाचा वाटा आहे! रवींद्रनाथांचे बालसाहित्य आणि आजचे आपले 'बालभारतीय बालसाहित्य' (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे.
आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा 'अडाणी किंवा मातीचा गोळा' आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला. शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र 'मुलांना काहीतरी शिकवणं!' बिचारी मुले 'त्या शरीराला' फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील 'आत्मा' मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते. रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!! 'मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही' ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती. मुले गोष्टी वाचत, कविता- गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या 'सहज पाठ' ह्या तीन पुस्तिका लिहिल्या, त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!!
'करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे' असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.
स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्त:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे. म्हणूनच, अध्यापन कौशल्य कार्यशाळांच्या यशस्वीतेनंतर मात्र 'बहुआायामी स्वाध्याय निर्मिती' कार्यशाळांचं आयोजन सुरू केलं. आणि शाळेतल्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुपच बदललं.
मी शाळेत असताना कधीच प्रयोग केले नव्हते. आणि प्रयोग न करताच पुस्तकात पाहून प्रयोगाचे निष्कर्ष लिहिले होते. किमान या मुलांवर तरी अशी पाळी येऊ नये यासाठी प्राथमिक शाळांतून 'शून्य खर्चाच्या प्रयोग शाळा' सुरू केल्या.
दैनंदिन जीवन व विज्ञान याचा सहसंबंध मुलांना उलगडावा, त्यांना स्वत: प्रयोग करुन पाहाता यावा हा त्यामागचा हेतू होता. शून्य खर्चाचे किमान 49 प्रयोग तयार केले. मुले चुकतील पण त्यातूनच शिकतील अशी पॉलीसी ठेवली. पहिलीतली मुले सुध्दा प्रयोग करू लागली. त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि वेगवेगळ्या प्रयोगातून ती नवं काही शोधू लागली!! वानगी दाखल एक छोटा प्रयोग सांगतो. (आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत हा प्रयोग तुम्हीसुध्दा कधी केला नसेल.) इयत्ता तिसरीला विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे व त्याखाली बालभारतीय स्वाध्याय आहेत. नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो असे एक वाक्य आहे. हे नेमकेपणानं उमजण्यासाठी व विज्ञान आणि दैनंदिन जीवन यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी एका प्रयोगाचे आयोजन केलं. एक जुना सुती रुमाल आणला त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली.
एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं,हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? मुलांनी काहीही उत्तरे दिली. 'एक तास,अर्धा तास, दहा मिनिटं वगैरे'. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने कापड जळण्यासाठी किती वेळ लागेल हे मुलांन सांगणे अपेक्षितच नव्हते. तो तुकडा अकरा सेकंदात जळला.
मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाला सगळ्या मुलांनी आता 'सेकंदात' उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले. आम्ही सर्वांनी मिळून पाण्यात भिजून जळलेल्या कापडाचा वास घेतला. तो पहिल्यापेक्षा वेगळा होता.
तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला. हा तुकडा जळायला बत्तीस सेकंद लागली. कारण तेल आधी जळले मग कापड. हा वास ही वेगळाच होता.
मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली जे सुके,ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो. त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली की, पदार्थ एकच पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा. ऊतू जाणारं दूध, लागलेलं दूध, आटणारं दूध इ. त्याचप्रमाणे डोळे बंद करुन ओळखता येणारे वास. मुलांनी सुमारे 82 वासांची यादी तयार केली. नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजू शकते, आणि तीच खरी महत्वपूर्ण असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं हे आपलं खरं साध्य आहे. आपण मुलांवर विश्वास ठेवायला घाबरतो, त्यांना कमी लेखतो म्हणून मुले शिकत नाहीत असंच मला वाटतं.
पण हे सारं काही इतक्या सहजतेने घडलेलं नाही. पैसे खर्च करुन तर नाहीच नाही! वर्ग खोल्या बांधून, शैक्षणिक साधनांचा पुरवठा करुन किंवा दुपारी जेवायला देऊन प्रश्न सुटत नाही तर तो क्षणिक सुटल्यासारखा वाटतो. खरा प्रश्न हा मानसिकता आणि दृष्टीकोन याच्याशी निगडित आहे! शिक्षकांची मानसिकता बदलवणं,त्यांना शाळा, शिक्षण आणि शिकणं याबाबत नवा दृष्टीकोन देणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि बदललेल्या दृष्टीकोनानुसार त्याचे उपयोजन करण्यासाठी त्यांना सक्षम करणं म्हणजे मूल शिकण्याच्या प्रक्रीयेला गती देणं. (यासाठी आम्ही व्हिजनिंग कार्यशाळा व अध्यापन कौशल्य कार्यशाळा यांचं एकत्रिकरण करुन तीन दिवसांच्या 'कार्यवेध कार्यशाळा' सुरू केल्या.) त्यासाठी तुम्हाला दोन किस्से सांगणं आवश्यक आहरी एक. सर्व शाळांतून मुलींसाठी लंगडीच्या व रांगोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. याचे कारण काय असं विचारल्यावर शिक्षक म्हणाले,'शासनाचे पत्रकच आहे की मुलींच्या लंगडीच्या स्पर्धा घ्या. 'पण त्या पत्रकाखाली असं तर लिहिलेलं नाही ना, जर का शिक्षकांनी मुलांच्या पण लंगडीच्या स्पर्धा घेतल्या तर त्याला निलंबित करण्यात येईल? मी विचारलं.
त्यावर शिक्षक म्हणाले : “पण पत्रकाप्रमाणे वागलं तर काय झालं?”
“पण आमच्या इथे तर अशीच पध्दत आहे!”
“मुलं कशापायी लंगडी घालणार”
“मुलांनी रांगोळ्या काढल्या तर सारा गाव त्यांना हसेल ते?”
“ग्रामीण भागात मुलीच लंगडी घालतात. रांगोळी काढतात.”
“तुम्हा शहरी लोकांना काय कळणार? इकडे असं चालत नाय!”
आता मी बोलायला सुरुवात केली, “तुमचं मत आणि तुमचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! महात्मा फुलेंच्या वेळी बायका शिकत नव्हत्या हे वास्तव होतं. पण फुलेंचं मत होतं की बायकांनी शिकलं पाहिजे आणि त्यांचा विश्वास होता की त्या शिकू शकतील. आणि त्यांनी वास्तव बदललं! मुले पण लंगडी घालू शकतात आणि सुंदर रांगोळी पण काढू शकतात.याबाबत तुमचं मत काय? आणि तुमचा विश्वास काय? हे आधी ठरवा. मला खात्री आहे आजपासून आपण वास्तव बदलू शकतो. सर्व खेळ आणि सर्व स्पर्धा सर्वांसाठी ठेवू शकतो.” असं सांगितल्यावर किमान 15 टक्के शाळांतून काही वेगळं करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दोन. एका प्रशिक्षण कार्यक्रमात मी पिशवीतून पत्यांचा जोड बाहेर काढला आणि शिक्षकांना विचारलं, “हे शैक्षणिक साधन तुम्ही वर्गात वापरता का?” जीवंत भूत पाहिल्याप्रमाणे शिक्षक माझ्याकडे पाहू लागले. काही शिक्षिकांचा चेहरा तर लकवा भरल्याप्रमाणे वेडावाकडा झाला. एका शिक्षिकेच्या हातात मी पत्ते देऊ लागलो तेव्हा दोन पावलं मागे सरत ती म्हणाली, “म..माफ करा! मी पत्यांना हात लावत नाही. माझ्यावर लहानपणीच चांगले संस्कार झाले आहेत!” शिक्षक वर्गात पत्ते वापरत नाहीत कारण 'पत्ते म्हणजे जुगार' याविषयी सर्व शिक्षकांचं एकमत होतं.
जुगार ही वृत्ती आहे किंवा जुगार हा डोक्यात असतो आणि तो पत्ते नसताना ही खेळता येतो. आपण पत्यांचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते. ही वरवर साधी वाटणारी गोष्ट कुणालाच माहित नव्हती. बदाम म्हणजे एकक,किलवर म्हणजे दशक व चौकट म्हणजे शतक असं जर आपण गृहित धरलं तर..815 ही संख्या कशी सांगता येईल? सोपं आहे,चौकट अठ्ठी,किलवर एक्का व बदाम पंजी ज्यांच्याकडे आहे ती मुले उभी राहतील. पत्ते हे अंकपत्ते आहेत असं समजलं तर त्यातून शिकवणं सोपं होईल. प्रत्येक गोष्ट हेच शैक्षणिक साधन आहे. त्यामुळे पैसे खर्च करून नवीन काही करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आजूबाजूला जे काही उपलब्ध आहे त्याचा कल्पकपणे वापर करणं आणि त्याचा वापर करुन मुलांना शिकवणं नाही तर ते स्वत:हून शिकू शकतील यासाठी प्रोग्रॅम तयार करणं हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे! विश्वास ठेवा, त्याप्रशिक्षणात आम्ही सर्वांनी मिळून गणिताचे नवीन 19 खेळ तयार केले. हे खेळ सर्वजण मिळून आणि पत्ते वापरून खेळलो. त्यावेळी आमच्या बरोबर त्या 'सुसंस्कारी शिक्षिका' पण सहभागी झाल्या होत्या.
'शिक्षण-विचार' या विनोबांच्या पुस्तकात 'गुरुचा अधिकार : मार्गदर्शन' असा एक परिच्छेद आहे. तोच इथे मांडतो. 'एका प्राचीन वचनात असे सांगितले आहे की, प्रसंगी ज्याचा सल्ला आपण घेऊ असा सर्वात जवळचा माणूस म्हणजे गुरू. जीवनात कधी एखादी समस्या उद्भवली, कठीण प्रश्न समोर उभा राहिला, तर सल्ला कोणाचा घ्यावा? शास्त्रकारांनी सांगितले आहे की तटस्थ गुरुजनांचा घ्या. आज आपली स्थिती काय आहे? संपूर्ण नोकरीच्या काळात हजारो विद्यार्थी आपल्या हातातून पार होतात.आपण त्यांना शिक्षण दिले,संस्कार दिले यात शंका नाही. परंतु त्यातले किती विद्यार्थी त्यांच्या जीवनातील समस्या घेऊन तुमचा सल्ला मागण्यासाठी आले? ते आईचा सल्ला घेतात, वडिलांचा घेतात, पत्नीचा किंवा पतीचा घेतात. भावाचा किंवा मित्राचा सल्ला घेतात; परंतु शिक्षकाला मात्र दूर ठेवतात. हा, शिक्षक म्हणून आपला केव्हढा मोठा पराभव आहे! वास्तविक शिक्षकाचा सल्ला हा सर्वात श्रेष्ट मानला गेला पाहिजे. परंतु आज ही स्थिती नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे शिक्षकाला सामान्य नोकरापेक्षा आज वेगळे स्थान नाही.' काही प्रमाणात हे आजचे वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण शिक्षकांचे म्हणजेच पर्यायाने समाजाचे मत आणि त्यांचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि तुमचा विश्वास जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. मी तुमच्या ध्यास पत्रांची वाट पाहतोय.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
- राजीव तांबे.
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.
रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.
पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते
कशानेही भरत नाही.
संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये.
तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच.
एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या.
सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या.
मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि ते काय करतात?” हेच दिवसभर पाहात बसायचं... टाइमपास करत.
कुणी येवो न येवो, याचं लक्ष सतत रस्त्याकडे!
कधी कधी यांच्या डोक्यावर कावळे,चिमण्या किंवा कबुतरं येऊन बसत. पण त्यांना याची पर्वाच नाही. त्या ढीम्मच!
काहीवेळा चिमण्या जाता-जाता त्यांच्या डोक्यावर दोन गरम-गरम मऊ-मऊ ठिफ टाकून जात. पण त्या दोघी बहिणी त्या चिमण्यांशी कधीही भांडल्या नाहीत. किंवा डोकं हलवून त्यांना उडवलं पण नाही. त्यांचे आपले परिसर निरीक्षण सुरूच!
संध्याकाळ झाली. अंधारुन आलं की, त्या दोघी जणी आपापल्या खोल्यात स्वत:ला बंद करुन घेत.
सकाळ झाली की पुन्हा या दोघींचा बाहेर डोकावून टाइमपास सुरू.
पण अचानक एके दवशी.. .. एक बहिण बोलेच ना. एकदम खीन्न! उदास!
दुसऱ्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली. तिला कळेना हिला झालं काय?
इतक्यात ती पहिली म्हणाली,“ताई, उद्यापासून मी बाहेर डोकावणार नाही.
तुला पाहणार नाही.
तुझ्याशी एक शब्द ही बोलणार नाही.
आपण आता पुन्हा कधी-कधी भेटणार नाही ग.
आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस!! ”
हे बोलताना तिला खूप भरुन आलं.
तिच्या काचा थंड पडल्या.
काळजीने धुरकट झाल्या.
हे पहिलीचं बोलणं सताड उघड्या तोंडाने दुसरी ऐकत होती.
भीतीने तिच्या काचा तापल्या.
कसबंसं स्वत:ला सावरत दुसरीने स्वत:ची कडी घट्ट केली.
उघड्या तोंडातून भरपूर हवा आत घेतली.
आणि.. ..धीर करुन तिने विचारलं,“मला नीट सांग, उद्या नक्की काय होणार आहे?”
“उद्या माझा मेकओव्हर आहे!
यू नो, पूर्वीची ती दिवाणखाना ही कनसेप्ट आता गेली. आता त्याचं लिाव्हिंग रुम मधे रुपांतर झालं! एव्हरीथींग इज नाऊ अल्ट्रा मॉडर्न!!..”
“काय ग, ही कुठली भाषा? काल पर्यंत तर तू ठीक होतीस! आणि हे मेक ओव्हर म्हणजे काय?”
“गेले आठ दिवस मी रोज हीच भाषा ऐकतेय.
अगं मेकओव्हर म्हणजे, सोप्या सुटसुटीत गोष्टी मोडून टाकून विचित्र अवजड गोष्टी आणायच्या!
आता त्या फोल्डींगच्या खूर्च्या किती छान आहेत! ती छोटी मुलं त्यावर उभं राहून आपल्यातून डोकावतात आणि आई बाबांना टाटा करतात तेव्हा किती बरं वाटतं ना? आता त्या मोडून त्याच्या बदली म्हणे “बीन बॅग्ज” आणणार आहेत!
ट्यूब लाइटशी गप्पा मारताना संध्याकाळ कशी निघून जायची ते कळायचं पण नाही.
पण आता म्हणे भिंतीत फिट्ट बसणाऱ्या काचेमागे दिवे लावणार आहेत.”
“अगं ताई, हे तर भयानकच बाई!! या दिव्यांची तोंडच अशी भितींत लिंपून टाकली तर घरात बोलायचं कुणी कुणाशी? आपले पंखेराव तरी आहेत ना?”
“नाही ग. माझ्या तोंडात एसी लावणार आहेत म्हणे. त्यातच असतो पंखा!”
“म्हणजे आता आयुष्यभर तू तोंडात एसी धरुन बसणार? कमाल आहे!! आमच्या तोंडात वाटेल त्या गोष्टी कोंबणारे हे कोण शहाणे?”
“रागावू नकोस ताई. उद्यापासून माझी लाइफस्टाइलच चेंज होणार आहे.”
“अगं मला नीट समजेल असं सांग गं..”
“उद्यापासून उघडणं, बाहेर डोकावणं, बिजागऱ्यांनी किरकिरणं हे सारं बंद!
आता फक्त गरगरत एका रेषेत सरकणं.
उद्यापासून मी स्लायडिंग होणारे ना!”
“व्वा! आणखी काय-काय होणारे?”
“तुला माहितंच आहे की.. या पांढऱ्या स्वच्छं काचांमुळे आपल्याला दुपारी त्या उन्हाचा किती त्रास होतो! पण उद्या मला रंगीत काचा लावणार आहेत. मस्त डार्क चॉकलेटी काचा!
आता उद्यापासून सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळं! नो दुपार!!
एकदम कू।़।़ल!! ”
“मला सांग हे सगळं तुला आवडतंय?
अगं त्या चॉकलेटी काचांमुळे रंगांधळी होशील तू!
आणि त्या एसीमुळे घरातली माणसं जरी थंड झाली तरी तुझं डोकं नेहमीच तापलेलं असेल!
काळजी घे स्वत:ची..”
“ताई तू म्हणतेस ते खरंय!
मला बाहेरुन कुणीही कसंही बदलवलं तरी मी आतून तशीच राहीन! सकाळी सकाळी स्वत:तून बाहेर डोकावणारी! आणि संध्याकाळी अंतर्मूख होणारी!!”
हे ऐकल्यार ताई स्वच्छं काचेने हसली आणि म्हणाली,“उघडा,मिटा किंवा सरका पण स्वत:तून बाहेर डोकवा, हे ज्यांना जमलं त्यांनाच खरं जग दिसलं” ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील की?”
हे ऐकताच पहिली समाधानाने हसली.
यातूनच दुसरी काय ते समजली!
-राजीव तांबे.
सुटीची चाहुल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं? दोन,व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करुया. यातले 'पालक वारे' कुठले व 'मूल वारे' कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल. 'सुटीत करायचं काय?' असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा असो वा नसो त्याला कुठल्यातरी शिबिरात किंवा छंदवर्गात डांबून ठेवलं जातं. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात. आपलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आाशा, आकांक्षा किंवा त्याच्या आवडी निवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे व त्याचा आत्मसन्मान जपला पाहिजे. सुटी ही एक संधी आहे,मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करुन देण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची पण सक्तीने शिकविण्याची नव्हे. विनोबांनी म्हंटलं आहे,'शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे.' मुलांच्या शिकण्यासाठी आपण हेच सूत्ररुपात वापरणार आहोत. मुलांना चाळीस दिवस सुटी आहे असं समजून मुलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उफमांची आखणी करणे शक्य आहे ते पाहुया. पण एक लक्षात ठेवा, यासाठी आपण ही मुलांना आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि तो ही न चिडचिडता. हे सगळे उफम मुलांना शिकविण्यासाठी नाहीत तर त्यांना त्यातून काही नवं शिकायला मिळावं म्हणून आहेत. मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ देत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करु दे. यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ दे. आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो हा विश्वास ही त्यांच्या मनात रुजू दे. तुमच्या मुलांना नवीन चुका करण्याची संधी तर द्याच पण चुकांतून शिकण्याची उमेद ही त्याच्या मनात चेतवा. पण कृपया.. .. तुमच्या इच्छे खातर व तुम्ही ठरवले आहे तेच तुमच्या मुलांना 'शिकविण्याचा प्रयत्न' करू नका किंबहुना तसा अट्टाहास ही करू नका.
1. आपण स्वयंपाकघरापासून सुरुवात करुया. स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा असतो. यातील प्रत्येक पदार्थाचे नाव मुलांना माहित असू शकते पण ते कधी व का वापरायचे याची त्यांना ओळख करुन द्यायला हवी. उदा. फोडणी करताना मोहरी व जिरे कधी घालायचे? का? भाजी शिजताना तिखट घालायचे? की शिजल्यावर? की त्याआधीच? फोडणीचे प्रकार किती? तडका म्हणजे काय?
2. कोणकोणत्या पदार्थांसाठी फोडणी करताना हळद वापरतात? का? ताकाची कढी करताना एकदा फोडणीसाठी हळद वापरून व एकदा न वापरता केली तर चवीत काय फरक पडतो?
3. भाज्यांचे मुख्य चार प्रकार आपण वापरतो. फळभाजी, फूलभाजी, पालेभाजी व कंदमुळे. हे प्रकार मुलांना ओळखता येतात का? त्याचा एखादा तक्ता तयार करता येईल का? त्या तक्त्यात कोणकोणत्या प्रकारची माहिती भरता येईल?
4. आपण ज्या भाज्या घरात आणतो 'त्या ताज्या आहेत व चांगल्या पण आहेत' हे ओळखण्यासाठी आपल्या अनुभवावर आधारित आपण काही कसोट्या तयार केलेल्या असतात. त्या कशा केल्या? का केल्या? त्यात काही सुधारणा कराविशी वाटते का? यासाठी मुलांना त्या कसोट्या दाखवा. त्यांना त्याचा अनुभव घेऊ दे. त्यात त्यांना काही सुधारणा सुचवाव्यासा वाटतात का? याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचं म्हणणं जरी चुकत असेल तरी लगेच त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना समजून घ्या. त्यांना पुन्हा पुन्हा सुधारण्याची संधी द्या. उदा.ताजी पालेभाजी कशी ओळखावी? नारळ घेताना तो हलवून व वाजवून ही पाहतात? यापैकी कुठलीही एकच ा*ीया करुन चालेल का?का? बाजारात ताजी भाजी महाग असते व शिळी भाजी स्वस्त असते. पण नवीन बटाटे स्वस्त असतात व जुने बटाटे महाग असतात,असे का? (नविनच्या मानाने जुने बटाटे लवकर शिजतात.)
5. निरनिराळ्या फळांची वेगवेगळ्या तऱ्हेने ओळख करुन देणे. उदा. प्रत्येक फळ कापण्याच्या विशीष्ट पध्दती असतात. पपई, कलिंगड, फणस, पपनस, अननस, टरबूज अशी फळे मुलांना आवर्जून कापायला द्या. त्यांच्या चुका होतील ही ,पण त्यातूनच त्यांना शिकायला प्रोत्साहित करा.
6. वेगवेगळ्या फळांच्या बिया जमवा. त्या साफ करून ठेवा. त्याचं वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बिया डोंगरावर रुजवण्याचा प्रयत्न करा.
7. फळ ताजे च चांगले कसे ओळखावे? याबाबत मुलांशी चर्चा करा. संत्र व आंबा हातात घेतल्या नंतर त्याचा ताजेपणा व चांगलेपणा ओळखण्यासाठी काय काय कसोट्या असू शकतात याची एक तौलनिक यादीच तयार करा. वेगवेगळ्या फळांसंदर्भात अशा याद्या करणं सहज शक्य आहे.
8. काही फळांची चव ओळखण्यासाठी त्यांचा आधी वास घ्यावा लागतो. अशी फळे कोणती? त्याची सूची बनवा. वास नेमका कुठे घ्यायचा असतो? फळाच्या सर्वच ठिकाणी सारखाच वास येतो का? उदा. आंब्याच्या डेखाजवळ, मध्यभागी व त्याच्या टोकाजवळ सारखाच वास येतो का? अजिबात वास न येणारी फळे कोणती याची पण एक यादी तयार करा.
9. फळांचा एक तक्ता तयार करा. यातील रकाने असे ही असू शकतील : 1.फळाचे चित्र. 2.फळाचा रंग.. बाहेरुन. 3.फळाचा रंग.. आतून. 4.चव. 5.खाताना सालीसकट खाता येते का? 6.फळात बी दिसत नाही असे फळ. 7.एकच बी असणारे फळ. 8.अनेक बिया असणारे फळ. 9.फळाबाहेर बी असणारे फळ. 10.वर्षभर सहजी उपलब्ध असणारे फळ. 11.फळाचा हंगाम. 12.फळाचा ताजेपणा ओळखण्यासाठीच्या कसोट्या. 13.फळाचा चांगलेपणा ओळखण्याच्या कसोट्या. 14.फळाचे पान. 15.फळाचे अंदाजे वजन. 16.फळाचा औषधी उपयोग. 17.फळापासून तयार होणारे विविध गोड पदार्थ. 18.फळाचा रस काढून तो पितात का? 19.फळाचा उपयोग लोणची किंवा चटणी अशांसाठी होतो का? 20.घरातल्या कुणाकुणाला हे फळ आवडतं? इत्यादी. यापुढील रकाने तुमचे.
10. निरनिराळी फळे, भाज्या व कंदमुळे यांच्या पासून आपणास वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करता येतात.उदा. आंबा, जांभूळ, बीट, पालक, कोथिंबीर,चिंच इत्यादी. या संदर्भातला एक सुंदर रंगीत तक्ता तयार करता येईल.
11. नैसर्गिक रंग वापरुन वेगवेगळी चित्रे रंगविता येतील.
12. सकाळपासून ते रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रक्रीया घडत असतात. अशा प्रक्रीयांची एक यादी तयार करायला हवी. उदा. कापणे, चिरणे, मळणे, तिंबणे, उकडणे, वाटणे, कुटणे, उलथणे, परतणे, घोळवणे, भिजवणे, उपसणे इत्यादी.
13. स्वयंपाकघरातील विविध प्रक्रीयांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळालाच पाहिजे. हे अनुभव मिळत असताना जशा मुलांच्या काही चुका होतील तशाच काही गोष्टी वाया जाण्याची पण शक्यता आहे. पण आपले मूल शिकण्यासाठी हे आवश्यकच आहे याची कृपया नोंद घ्यावी. कणिक मळणे,पोळी लाटून बघणे, पापड भाजणे, कच्चा व उकडलेला बीट किसणे, नारळ खवणणे, तव्यावरचे ऑम्लेट, पोळी किंवा घावन उलथणे इत्यादी.
14. मुलांसोबत गप्पा मारत भाजी निवडणे, भाजी चिरणे सहज शक्य आहे. गप्पा मारताना हळू-हळू मुलांनाही भाजी निवडण्यासाठी/चिरण्यासाठी सहभागी करुन घेता येईल. आई/बाबां सोबत हा अनुभव घेताना त्यांना ही आनंद होईल,
15. कुठलाही एक पदार्थ जर तयार करायचा असेल तर त्यावेळी किती प्रक्रीया घडत असतील याची एक यादी तयार करायला हवी. उदा. भेंडीची भाजी करायची आहे किंवा चहा करायचा आहे तर क्रमवार घडणाऱ्या प्रक्रीया कोणत्या? याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घ्यावा आणि मगच लिहावे.
16. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मुलांनी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पदार्थ तायर करावा. उदा. भेळ, गाजराची कोशिंबीर, कांदा पोहे, दही पोहे, चिकी इत्यादी.
17. आपल्या घरात एका महिन्यासाठी किती किराणा सामान लागते याची यादी मुलांनी करावी. शक्य असल्यास, मुलांनी घरातल्या कुणा मोठ्या माणसासोबत बाजारात जाऊन ते खरेदी करावे. सर्व सामानांचे बाजारभाव टिपून ठेवावेत.
18. आई/बाबांच्या मदतीने 'आमच्या रेसिपी' नावाचे छोटे रेसिपी पॉकेट बुक तयार करावे. त्याचप्रमाणे काका/काकू किंवा मामा/मामी यांच्या मदतीने 'मामाज् रेसिपी बुक' किंवा 'अंकल्स रेसिपी' अशी पुस्तकांची मालिका पण तयार करता येईल.
19. घरातला फ्रीज स्वच्छं करणे. त्यातील शेल्फची रचना बदलून पाहाणे. (अशावेळी घरातल्या मोठ्या माणसांची मदत अपेक्षित आहे. 'मदत याचा अर्थ सहवास'; सहभाग नव्हे.)
20. घरातील कुठल्याही कामाबद्दल घृणा किंवा तिटकारा वाटणे योग्य नाही. श्रममूल्य व श्रमानंद याची जाणीव असणे गरजेचे आहे. एखाद दिवशी आई/बाबांसोबत घरातील भांडी घासण्याचा / कपडे धुण्याचा अनुभव सुध्दा मुलांनी घ्यायला हवा.
21. थोडेफार सामान इकडे तिकडे हलवून स्वयंपाकघरातील किंवा घरातील रचना बदला येईल का? जर अशी रचना बदलायची असेल तर, ती का बदलायची? याबाबत चर्चा करता येईल. ही रचना बदलण्याअगोदर ज्या वस्तू सरकवायच्या असतील त्यांची मापं घ्यावी लागतील. मापं घेण्यासाठी काही वेळा दोऱ्याचा, काठीचा किंवा पट्टीचा उपयोग करावा लागेल. मुलांच्या सल्ल्यानुसार रचना एकवेळ बदलून पाहायला काहीच हरकत नाही.
22. घरातील सर्वांनी मिळून सर्वांचे कपड्यांचे,पुस्तकांचे खण आवरणे.
23. खण आवरत असताना बटण शिवणे, हुक शिवणे, फाटलेला कपडा शिवणे, उसवलेल्या ठिकाणी टिप घालणे यासाठी मुलांची मदत घ्यावी.
24. कपड्याचा खण आवरत असताना प्रत्येक कपड्याचा पोत कसा वेगळा असतो याची मुलांना ओळख करुन द्यावी. उदा. सिल्क साडी, कॉटन साडी, टी शर्ट, टॉवेल या गोष्टी आपण डोळे बंद करुन केवळ स्पर्शाने ओळखू शकतो कारण या कपड्यांचा पोत आपल्याला स्पर्शाने समजतो. घरातच असणारे वेगवेगळे 80 पोत ओळखायला मुलांना मदत करा. त्यांची एक यादी बनवा. उदा. सनमायका, लाकूड.खिडकीची काच, बाथरुमच्या दरवाज्यावरची काच, ओटा, सिंक, आरसा, जमीन, भिंत इ.
25. तसेच कपड्यांचे वेगवेगळे रंग व डिझाइन्स याबाबत ही मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. प्रत्येक घरात किमान वेगवेगळ्या प्रकारच्या चार ते पाच साड्या असू शकतात. हे प्रकार नेमके कशामुळे पडले? त्यांची खासियत काय आहे? हा प्रकार कुणापेक्षा स्वस्त व कुणापेक्षा महाग असू शकतो? आणखी कुठले प्रकार असू शकतात? याबाबत मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा.
26. एखाद्या संध्याकाळी मुलांना साडीच्या दुकानात घेऊन जा. तेथील निरनिराळ्या साड्या,त्यांचे रंग, काठ, पोत, डिझाइन्स, त्यांची अनोखी खासियत याची मुलांना ओळख करुन द्या. (यासाठी त्यावेळी नवीन साडी विकत घेण्याची गरज नाही. हे तुम्ही ओळखले असेलच.)
27. त्याचप्रमाणे पॅण्ट,शर्ट व ब्लाउज यांना कशाप्रकारे इस्त्री करावी लागते याचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे. प्रत्येक कपड्याची घडी करण्याची पध्दत वेगवेगळी असते याची त्यांना जाणीव करुन द्यावी. घड्या करण्याचा सराव द्यावा. त्यातील बारकावे दाखवावेत. उदा. साडीची घडी करताना आधी हातात फॉल धरावा लागतो. साडीच्या निऱ्या कशा करतात? याबाबतची त्यांची उत्सुकता चाळवावी. त्यांना प्रयत्न करू द्यावा.
28. कपडे धुतल्यानंतर हँगरवर लावायची पध्दत व कपड्यांना इस्त्री केल्यावर ते हँगरवर लावायची पध्दत वेगवेगळी आहे,याबाबत त्यांना सजग करणं.
29. दोन मोठे ड्रॉइंग पेपर एकमेकांना चिकटवावेत. घरातल्या सर्वांनी मिळून त्यावर एक चित्र काढावे व सर्वांनी मिळूनच ते रंगवावे. भिंतीवर किंवा कपाटावर हे चित्र लावून ठेवावे. चित्राचा विषय हा निसर्गचित्र,डिझाइन किंवा सर्वांना आवडेल व सोपा वाटेल असा असावा.
30. '100 टक्के कॉपी चित्रांचे प्रदर्शन.' सुटीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांच्या समोर बसून त्यांचे चित्र काढावे. त्यानंतर मोठ्या माणसांनी लहान मुलांसमोर बसून त्यांचे चित्र काढावे. चित्र कुणाचे आहे याचे चित्राखाली नाव लिहू नये;पण चित्रकाराच नाव अवश्य लिहावे. अशा 100 टक्के कॉपी चित्रांचे घरातच प्रदर्शन लावावे.
31. वेगवेगळ्या प्रकारची शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी या सुटीचा उपयोग करता येईल. उदा. रंगात भिजवलेला दोरा वापरुन, ठसेकाम करुन, पाकळ्या किंवा पेन्सिलीची सालं चिकटवून, कोलाज, सुलेखन, स्प्रे पेंटिंग, जलरंग इत्यादी.
32. रविवारचे दोन तास भटकंती व शोधाशोध. आजपर्यंत आपण आपल्याच गावातल्या किंवा जवळच्या गावातल्या ज्या रस्त्यावरुन गेलो नाही किंवा जो रस्ता वा जो विभागच आपल्याला माहित नाही अशा ठिकाणी जाणे. नवीन रस्त्याचा/विभागाचा मुलांच्या सोबत शोध घेणे. मुलांसोबत शिकण्याची/शोधण्याची प्रक्रीया सुरू ठेवणे.
33. आपल्या घरापासून स्टेशन पर्यंत / घरापासून शाळेपर्यंत / घरापासून एस टी डेपो पर्यंत चालत जाण्यास उपयुक्त ठरेल असा नकाशा काढणे. वाटेत बँक, लोहमार्ग, देऊळ, मशीद, चर्च, मेडिकलचे दुकान, हापशी अशा आणि इतर गोष्टी असू शकतात. यासाठी विशिष्ट खुणांचा वापर करणे. शक्य असल्यास प्रमाणित स्केलचा वापर करणे. (पावलांनी अंतर मोजणे. पन्नास पावले म्हणजे एक सें.मी. यापध्दतीने स्केल घेऊन नकाशा काढणे.)
34. फक्त एक महिना घरातल्या सर्वांनी रोज झोपण्याच्या आधी 'रोजनिशी' लिहिणे. किमान एक ओळ तरी रोज लिहिलीच पाहिजे असा संकल्प करुन तो तडीस नेणे. (आपण आपल्या कामाची व आपण जे काही नवीन शिकलो त्याची नोंद ठेवता येणे गरजेचे आहे. रोजनिशी हा त्यासाठी उत्तम सराव आहे.)
35. आपल्याला पत्त्यांचे वेगवेगळे खेळ येत असतात. हे खेळ मुलांसोबत खेळावेत. आजी आजोबांच्या किंवा इतर कुणाच्या मदतीनेसुध्दा मुलांना पत्त्यांचे नवनवीन खेळ शिकवावेत. उदा.बदाम सात, गुलाम चोर, नॉ ऍट होम, लॅडीज, झब्बूचे वेगवेगले प्रकार, मुंबरी, मेंढीकोट, तीनशे चार, पाच तीन दोन, सात आठ इ.
36. मनोरंजक पण तरीही डोक्याला चालना देणारे अनेक खेळ बाजारात मिळतात. बाजारातून नुसते खेळ विकत आणून ते मुलांसमोर टाकले (म्हणजे गुरांसमोर चारा टाकतात तसे) तर मुले अशा खेळांशी फारवेळ खेळत नाहीत. आपणाला मुलांसोबत खेळावे लागते. वेळप्रसंगी हरावे लागते. तेव्हांच आवडीने मुले त्या खेळाशी खेळू लागतात. उनो, स्पेलो फन, ब्रेनव्हिटा, चायनीज टॅनग्राम असे काही खेळ चांगले आहेत.
37. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके आता उपलब्ध आहेत. मुलांच्या मदतीने जर का त्याचे वाचन केले तर त्यातील सोपे प्रयोग मुले स्वत:हून करू शकतील.
38. एखादा खेळाडू किंवा आपली आवडती व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अनुशंगाने सर्व माहिती गोळा करून त्याचीच एक स्वतंत्र चिकट वही तयार करता येईल. उदा. सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, राष्ट्रपती कलाम, आंबेडकर, गांधी, डॉ.अभय व राणी बंग, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, जे.के.रोलींग इत्यादी.
39. काही समारंभाच्या निमित्ताने किंवा सहल, वाढदिवस अशावेळी काढलेले खूप फोटो घरात असतात. काहीवेळा ते नुसतेच पाकीटात कोंबलेले असतात. सगळे फोटो अल्बम मधे लावणे.प्रत्येक फोटोच्या मागे तारीख घालणे. तारीख आठवत नसल्यास शोधून काढणे. व प्रत्येक फोटोच्या खाली,सर्वांनी मिळून एक गोड गोड, किंवा चमचमित वा झणझणित कॉमेंट लिहिणे.
40. गणितातल्या अपूर्णांकाविषयी काही मुलांना भीती असते. किंवा त्याचा मुलांनी धसका घेतलेला असतो. सुटीचा उपयोग अपूर्णांकाची भीती पूर्णपणे घालविण्यासाठी करता येईल. आपल्या घरातच कितीतरी पूर्णांक अपूर्णांक असतात. त्यापासूनच खेळायला सुरुवात करता येईल. हाफ पॅण्ट व फूल पॅण्ट. खिडकीचा पडदा हा दाराच्या पडद्याच्या अर्धा असतो. खिडकी व दरवाजा. मुख्या दाराची कडी व बाथरुमची कडी यातील फरक. हाफ बनियन व फुल बनियन. टी पॉय,छोटे टेबल व मोठे टेबल. पाण्याची अर्धा लिटरची व एक लिटरची बाटली. एक किलोची व अर्ध्या किलोची बरणी. छोटी बादली व मोठी बादली अशी उदाहरणे घेऊन मुलांना पूर्णांक व अपूर्णांकाचा प्रत्यक्ष अनुभव देता येईल. प्रयोगातूनच मुले शिकतील,समजून घेतील.
41. घरात (व शेजाऱ्यांकडे) येणाऱ्या वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका त्यांचे काम झाल्यावर फेकून न देता साठवून ठेवाव्यात. सुटीत त्यापासून विविध आकारांचे बुकमार्कस् करता येतील.
42. काही निमंत्रण पत्रिकांचा कल्पकपणे वापर करुन सुंदर शुभेच्छा पत्रे तयार करता येतील.
43. एका पोस्टकार्डच किंमत पन्नास पैसे आहे. चाळीस दिवस सुटी आहे असे जर गृहित धरले तर आपणास चाळीस पोस्टकार्ड लागतील. म्हणजे खर्च फक्त वीस रुपये. मुलांनी रोज एक पोस्टकार्ड लिहायचे आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना. एखादी बातमी किंवा लेख वाचून वर्तमानपत्राला, साप्ताहिकाला, मासिकाला. पुस्तके वाचून आपल्या आवडत्या लेखक/लेखिकेला. मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षकांना.
44. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मस् मुलांकडून भरून घेतले पाहिजेत.मनीऑर्डरचा फॉर्म. रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्याचा फॉर्म. बँकेत पैसे कसे भरावे, चेक कसा भरावा, पैसे कसे काढावेत यासाठी भराव्या लागणाऱ्या स्लीपस् .
45. घराजवळच्या बँकेत मुलाच्या नावाने खाते सुरू करता येते. त्यासाठी मोठ्या माणसांनी त्याच्या सोबत बँकेत जावे. खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी प्रा*या मुलानेच पार पाडावी. अगदी आवश्यकच असेल अशा ठिकाणी पालकांनी मुलांना मदत करावी. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून प्रत्येक महिन्याला थोडीफार बचत करावी.
46. घरातील टेलीफोनच्या जवळ एका रफ वहीची गरज असते.पटकन पत्ता लिहून घ्यायला किंवा एखादा नंबर टिपून ठेवायला त्याचा उपयोग होतो. शाळेतल्या वापरलेल्या वह्यांमधील कोरे कागद काढून, ते एकत्रितपणे शिवून रफ वही तयार करता येईल. थोड्याशा सरावाने चांगली वही पण तयार करता येईल.
47. घराजवळ जर एखादा ओळखीचा व्यावसायिक असेल तर त्याच्या दुकानात जाऊन काही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि काही गोष्टी स्वत:हून शिकणे. यासाठि त्या व्यावसायिकाची परवानगी घेणे, त्याच्या सोयीनुसार आपली वेळ जुळवून घेणे गरजेचे आहे. उदा. शिंपी कपड्यांची मापे कशाप्रकारे घेतो. कापड कसे बेततो. शिलाई मशीन, काजे मशीन व ओव्हरलॉक मशीन यातील नेमका फरक काय. एखादे जुने कापड घेऊन कुठल्याही मापाचा एखादा शर्ट शिवण्याचा घरी प्रयत्न करणे. (हा प्रयत्न म्हणजेच भूमिती व अंकगणिताचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.)
48. त्याचप्रमाणे घराजवळील किराणामालाचे दुकान, लॉन्ड्री, बेकरी, डेअरी, औषधाचे दुकान, दवाखाना अशा ठिकाणी रोज दिवसांतून एक तास मुलांनी मदत करण्यासाठी जावे. अशावेळी परवानगी मिळविण्यासाठी,कामाचे स्वरुप ठरविण्यासाठी, वेळ निश्चित करण्यासाठी घरातील मोठ्या माणसांनी मुलांना मदत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी घरी आल्यावर 'आज काय नवीन शिकलास?' असे त्यांनी मुलांना विचारणे ही अपेक्षित आहे. (कृपया एक गोष्ट लक्षात घ्या. 'दुकानात एक तास जाणे म्हणजे पुड्या बांधायला जाणे' असा गैरसमज करुन घेऊ नका. काहीही काम न करता सुध्दा मुलाने एक तास दुकानात बसणे हे ही शिकणे आहे.)
49. गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, आकार, त्यावरील चित्रे इ. याचे मुलांनी कालजीपूर्वक निरीक्षण करावे. त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शीर्षके पण काळजीपूर्वक पाहावित. विशिष्ट वस्तूचा किंवा गोष्टिंचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सुलेखन. मुलांनी एक सुलेखन वही तयार करावी. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले, निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पध्दतीने लिहावित. म्हणजेच 'जीराफ' ज्या प्रकारे लिहिले असेल त्यापेक्षा 'ससा' वेगळ्याप्रकारे लिहिलेले असेल.
50. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी शक्यतो टाकाऊ वस्तूंचाच वापर करायचा आहे. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही चित्र काढावे / आकृती काढावी / ठिपक्यांची रांगोळी काढावी व त्यात रंग न भरता त्याऐवजी रंगीत टाकाऊ वस्तूंचा उपयोग करावा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, गवत, सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, प्लास्टीकचे तुकडे, लाकडाचा रंगीत भुसा, शेंगांची टरफले, पालेभाज्या निवडून झाल्यावर उरणारी मुळे बारीक चिरुन, चहाचा चोथा इत्यादी.
51. तुमच्या परिसरातील काही दुकानदारांकडे तुमच्या ओळखी असतील. दुकानदाराच्या आणि तुमच्या मुलाच्या सोयीने, दिवसातील दोन तास मुलाने दुकानात काम करायला हरकत नाही. मुलाने त्याला आवडेल ते काम करावे व नवीन काम ही शिकावे.
52. आपल्या घरात पंखा, इस्त्री, मिक्सर, टेपरेकॉर्डर अशा वस्तू असतात. या वस्तूंच्या आत काय असतं? त्या कशा काम करतात? याबाबत मुलांना प्रचंड कुतुहल असतं. ज्या दुकानात अशा वस्तू रिपेअर केल्या जातात अशा दुकानात मुलांना घेउन जावं. दुकानदाराच्या परवानगीने मुलांना निरीक्षण करण्याची व प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.
53. याचप्रकारे मुलांना जवळच्याच गॅरेज मधे घेऊन जाता येईल.
54. आंबा, फणस, अननस, पपई, कलिंगड, सिताफळ, रामफळ ही फळं कापण्याची पध्दत वेगवेगळी आहे. मुलांना त्याचा अनुभव मिळणे जरुरीचे आहे. मुलांसोबत फळं कापण्याचा अनुभव घ्या.
55. गाजर, मुळा, काकडी, टॉमेटो किंवा बीट यांची कोशिंबीर करणे मुलांना जमू शकते. आठवड्यातून दोन दिवस मुलांनी कोशिंबीर करावी यासाठी पालक मुलांना मदत करतील. (मुलांनी केलेली कोशिंबीर,पालक आनंदाने खातील)
56. महिन्यातल्या एखाद्या संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून भेळ तयार करावी. कुणी कुठले काम करायचे याचे नियोजन मुलांनी करावे.
57. 'चटकदार भेळेची रंगीत तालीम' झाल्यावर, पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावे व त्यांना भेळ खिलवावी.
58. मुलांना गोष्टीची पुस्तके किंवा वर्तमानपत्रातील वेगळ्या बातम्या, पुरवणी मधील एखादा लेख अवश्य वाचून दाखवा.
59. या सुटीत खाल्लेल्या फळांच्या बिया जमवा. सुटी संपल्यावर पावसाळ्यातल्या पहिल्या रविवरी मुलांसोबत गावाबाहेर जा. मुलांच्या मदतीने छोटे-छोटे खड्डे खणून या बिया त्यात पसरुन टाका.
60. गावाबाहेर जंगल करण्यासाठी आपल्या नातेवाइकांकडून, शेजाऱ्यांकडून, बाजारातून किंवा जिथून मिळतील तिथून बिया गोळा करा. मुलांच्या मदतिने घरात 'बी बँक' तयार करा.
61. सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सर्वांनी 'आपले कपडे आपणच धुवायचे' असं ठरवा. कपडे धुण्याचं तंत्र व मंत्र मुलांसोबत शिका. मुलांसोबत पाण्यात थोडा दंगा पण करा.
62. महिन्यातून एक दिवस मुलाने आईसोबत स्वयंपाकघरात काम करायचे आहे.
63. फक्त सुटी पुरती घरातली काही रचना बदलता येईल का? कॉट, कपाट किंवा शोकेस सरकवून घराची रचना बदलता येते. याबाबत मुलांकडे काही कल्पना असू शकतात. त्याचा विचार करा. मुलांच्या मदतीने घराला वेगळा चेहरा द्या.
64. घरातील लाकडी स्टूल किंवा दरवाजा घासून ते रंगवणे मुलांना आवडते. तसे करण्याची मुलांना मुभा द्या. काम सुरू करण्याअगोदर ते काम मुलांना नीट समजावून सांगा. पण मुले काम करत असताना त्यांना हज्जारवेळा सूचना देऊ नका. (नाहीतर मुले वैतागुन काम अर्धवटच सोडतील) त्यापेक्षा त्यांच्या सोबत काम करा. रंगवताना मुलांसोबत रंगून जा.
65. आपले नातेवाईक व ओळखीचे यांचे पत्ते व फोन नंबर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वह्या मुलांच्या मदतीने तयार करा. या वहीत मुलांच्या मित्रांचे पत्ते व फोन नंबर असतील याची काळजी घ्या
66. घरातील शिवणाचा डबा यासाठी एक दिवस राखून ठेवा. बटण लावणे, हूक लावणे, शिवणे, टीप घालणे, धावदोरा घालणे याचा अनुभव मुलांना घेऊ दे.
67. आपल्या परिसरात काही खास वेगळी मुले असतात. अंध, अपंग मुले असतात. शाळा सुरू असताना या मुलांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. सुटीच्या दिवसात त्यांच्यासाठी थोडावेळ देता येईल. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं किंवा त्यांना बागेत घेऊन जाणं अस करता येईल.
68. मुलांनी आणि पालकांनी मिळून एक गट तयार करावा. या गटाने मिळून एखाद्या रविवारी गावातील बाग स्वच्छं करावी. किंवा नगर वाचनालयातील पुस्तके आवरुन, साफ करुन द्यावीत.
69. मुलांच्या वहीतील कोरे कागद फाडून घ्यावेत. मुलांच्या मदतीने हे कागद शिवून त्याची वही करावी. रफ वही म्हणून ही वापरता येते.
70. घरी येणाऱ्या निमंत्रण पत्रीका, किंवा काही जाहिराती जमवाव्यात. हे पाठकोरे कागद एका आकारात कापावेत. वरच्या बाजुने शिवावेत किंवा स्टेपल करावेत. पटकन काही लिहिण्यासाठी या पॅडचा चांगला उपयोग होतो.
ही यादी आणखी पण वाढविता येईल, पण त्यासाठी मुलांची सुटी वाढविता येणे शक्य नसल्याने आता इथेच थांबावे म्हणतो. मी जरी तुम्हाला सत्तर गोष्टी सुचविल्या असल्या तरी यातूनच तुम्हाला आणखी शंभर गोष्टी सुचतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि यासाठी काहीही मदत हवी असल्यास मला अवश्य कळवा. मी तुमच्या सोबतच आहे.
मी तुमच्या शंबर नंबरी पत्रांची वाट पाहतोय. कळावे.
मुलांवर लोभ असावा हीच एक विनंती.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
राजीव तांबे.
`झांझीबार’ या आफ्रिकेतील एका छोट्याशा देशातील दोन वर्षांच्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर श्री अरुण मोकाशी यांनी लिहिलेल्या `झांझीबार डायरी’ या पुस्तकातील एक लेख.
कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती. ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या अपराध्यांना हुडकून काठायचा. "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले." तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली. आता काय उत्तर देणार तिच्या मावशी आणि काकांचे मार्क्स मिळून हि तेवढे आले नसतील. मला धर्म संकटात पाहून सौ. लगेच माझ्या मदतीला देवाप्रमाणे धावून आली. तिने चिंकीला
विचारले, चिंकी तुला कुठकुठल्या भाज्या आवडतात, एकदाचे सांगून दे, म्हणजे मला तुला आवडणार्या भाज्या बनविता येईल. चिंकी सुरु झाली, मला किनई, गाजर, दुधी, लाल भोपळा, वांग....... . तात्पर्य तिला बटाटा, गोभी, शिमला मिरची, भेंडी सोडून कुठल्याच भाज्या आवडत नव्हत्या. शेवटी, माझ्या कडे बघत म्हणाली, काका, मला मला माहित आहे, तुम्हाला भाज्या चांगल्या करता येतात, शक्कल लढवून नावडत्या भाज्या मुलांच्या गळ्यात मारतात. पण लक्ष्यात ठेवा मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, अस्सल मुंबईकर आहे मी. मुंबईकराने आव्हान दिल्यावर दिल्लीकर मागे का राहणार? च्यायला तिच्या नावडत्या भाज्या तिच्या गळ्यात मारण्याची तैयारी सुरु केली. तसे म्हणाल तर दिल्लीकर दरवर्षीच्या बजेटमध्ये नेहमीच मुंबईकरांना मूर्ख बनवितातच.
संध्याकाळी सौ. दारावर भाजी विकत घेत होती. ठेल्यावर मस्त लाल टमाटर होते. हिवाळ्यात दिल्लीत लालसुर्ख मस्त टमाटर मिळतात. मला मौका मिळाला. मी विचारले, चिंकी तुला टमाटर सूप आवडते का? हो, ती म्हणाली. माझ्या डोक्यात त्या क्षणी चिंकीला कसे मूर्ख बनविता येईल याची आयडिया आली.
दुसर्या दिवशी रविवार होता. सर्व ताणून झोपले होते. मी नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. स्वैपाक घरात गेलो. थोडे भोपळा, दोन गाजर, २-३ टमाटर, आल्याचा एक छोटा तुकडा, ४-५ लसुणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि हुकमाचा इक्का म्हणून बीट्सचा एक तुकडा. सर्व साहित्य कापून थोड पाणी टाकून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन एक शिट्टी दिली. सर्व सबूत नष्ट करण्यासाठी भाज्यांचा कचरा एका कागदात गुंडाळून कचरा पेटीत टाकला.
कुकर थोडा थंड झाल्यावर, थोडे पाणी टाकून सर्व शिजलेल्या मिक्सितून पातळ करून सूप एका भांड्यात काढून घेतले. एक दुसरे भांडे गॅस वर ठेवले. दोन चमचे देसी तूप टाकून, त्यात जिरे घातले. नंतर पातळ झालेले सूप त्यात टाकले. थोडी काळी मिरीची पूड आणि स्वादानुसार मीठ त्यात घातले.
सकाळी सौ.ने नाश्त्या साठी उपमा केला. अर्थातच चिंकीला उपम्यात टाकलेले गाजराचे तुकडे काढून उपमा वाढला. पण टमाटरचे लालसुर्ख सूप, बीट्स टाकल्यामुळे सूपचा लाल रंग काही जास्तीस उठून आलेला. होता चिंकीने मिटक्या मारत त्या स्वादिष्ट टोमाटो सूपाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवशीतर चक्क दुधीभोपळाचे सूप फक्त २-३ टमाटर अणि बीट्सचा एक तुकडा टाकून बनविले आणि तिच्या गळ्यात मारले. अश्या रीतीने अस्मादिकांनी चिंकीच्या सर्व नावडत्या भाज्या तिच्या घश्यात ओतल्या.
मुंबईला परतल्यावर चिंकीच्या आईने एकेदिवशी दुधीची भाजी केली. नेहमीप्रमाणे चिंकीने नाक मुरडले. तिची आई तिच्यावर डाफरली, च्यायला, काकांनी बनविलेले दुधीचे सूप तर तू मिटक्या मारीत पीत होती, आता काय झाले, गुपचूप ताटात वाढलेली दुधीची भाजी संपव मुकाट्याने. बेचारी चिंकी.
-- विवेक पटाईत
उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य उगवला रे उगवला की लगेच गरम व्हायला लागायचं. दुपारची वेळ होती. गाढवाच्या छोट्या मुलाला खूप गरम व्हायला लागलं.
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....
हा लेख ऐकण्यासाठी खाली क्लिक करा...
काहीतरी भव्य दिव्य केले तर नामरूपी कीर्ति युगानुयुगे जिवंत राहते. श्रीरामांपासून ते गांधीजी पर्यंतच्या महान विभूतींची त्यांच्या कार्यांमुळे त्यांची नामरूपी कीर्ति अजूनही जिवंत आहे. आता निम्नवर्गीय परिवारात जन्मलेला, अभ्यासात बेताचा, बामुश्किले सरकारी कारकून झालेल्या माझ्या सारख्याला आयुष्यात आपण काही भव्य-दिव्य करू असे कधीच वाटले नाही. बाबा आमटे इत्यादी लोकांसारखी समाजसेवा करण्याची इच्छाशक्ती ही नव्हती. सारांश काही भव्य-दिव्य करणे मला शक्य नव्हते.
समाजात दुष्ट लोकांनाही प्रतिष्ठा मिळते. श्रीरामा बरोबर रावण ही अमर झाला आणि गांधी सोबत गोडसे ही. तुकाराम महाराजांनी म्हंटले आहेच पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. आता माझ्या सारख्या सिंगल हड्डीच्या व्यक्तीकडून गुंडगिरी ही करणे शक्य नव्हते. शिवाय भित्रेपणाचे बाळकडूच मध्यम वर्गीय मराठी माणसाला जन्मापासून पाजले जातेच. ह्या मार्गावर जाणे ही शक्य नव्हते.
आता मेल्यानंतर कीर्तिरूपे उरणे शक्यच नव्हते. डॉक्टर, इंजिनीअर, इत्यादींचे नावे ही काही काळापर्यंत लोकांच्या लक्ष्यात राहतात. पण ज्या वेळी अभ्यास करायचा होता, केला नाही. ती वेळ केंव्हाच निघून गेली होती. आता संसारात राहत असताना थोडेफार समाज कार्य केले किंवा त्याचा दिखावा केला तर कमीत-कमी जिवंत असताना तरी आपले नाव काही लोकांच्या लक्ष्यात राहते. पण इथे ही लोचा झाला. एक तर सरकारी नौकरी आणि ती ही स्टेनोग्राफर,पीए आणि पीएस. येस येस करण्यात ३३ वर्षे निघून गेली. त्यात ही १८ वर्षे पंतप्रधान कार्यालयात. सकाळी सातला घरून निघाल्यावर रात्री ९-११च्या दरम्यान घरी पोहचणे. गली-मोहल्ला आणि मंडळाचे दिखाऊ समाज कार्य तर सोडा घरची सर्वकामे सौ.च्या डोक्यावर टाकावी लागली. सद्य परिस्थिती अशी आहे गली-मोहल्यात ही मला माझ्या सौ.च्या नावाने किंवा मुलाच्या नावाने ओळखतात.
आता एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे लेखकू बनणे. लेखक बनण्यासाठी काही भव्य-दिव्य करावे लागत नाही, मेहनत आणि अभ्यास ही करावा लागत नाही. फक्त मनातील कल्पना कागदावर उतरव्याच्या असतात. वयाच्या पंचविसित लेखक बनण्याचा एक प्रयत्न केला होता. काही हिंदी/मराठी कविता, काही प्रतिष्ठित मासिकांमध्ये पाठविल्या होत्या. पण कोणीही तय छापल्या नहीं किंवा परत ही पाठविल्या नाही. फक्त पोष्ट्खात्याची शंभर एक रुपयांची कमाई झाली. अखेर थकून-भागून कवी/ लेखक बनण्याचा नाद सोडून दिल्या. आपले काही नाव होऊ शकत नाही, हे सत्य स्वीकार केले.
पण म्हणतातन एक मार्ग बंद झाला कि दुसरा उघडतोच. असेच पंचवीस वर्षे निघून गेले. २०१० मध्ये घरात इंटरनेट लावला. कदाचित् माझ्या सारख्या लोकांच्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच इंटरनेटचा जन्म झाला असावा. या वेळेपर्यंत माझ्या मनात आपण मराठी आहोत, याचा स्वाभिमान ही जागृत झाला होता. इंटरनेटवर मी पाहिलेली पहिलीच साईट मराठी सृष्टी ही होती. या साईटमध्ये चक्क ‘आपल्यातला सुप्त लेखक जागवा’ असे आव्हान होते. आंधळा एक डोळा मागतो इथेतर दोन दोन डोळे ते ही मुफ्त में. प्रथम विश्वास झाला नाही, भीत-भीत पहिला लेख गुगल देवाच्या मदतीने टंकून टाकला. आश्चर्य म्हणजे पहिला टाकलेला लेख दुसर्याच दिवशी साईटवर दिसला. मग काय, मनातील दडलेली अमर होण्याची/ प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली. स्वत:चा ब्लॉग ही स्वतच्या नावानेच बनविला. जे जे मनात आले आणि टंकू लागलो. अंतर्जालावर भाषेची, व्याकरणाची, कसला ही विचार कारण्याची आवश्यकता भासली नाही. काही चूक असेल तर वाचणारे लगेच प्रतिसाद देऊन ती चूक दुरुस्त करतातच. चिंता करण्याची गरजच भासली नाही. काही महिन्यातच मराठीच्या इतर उदा. मिसळपाव, ऐसीअक्षरे, आणि नुकतीच ग्लोबल मराठी बाबत कळले. अश्यारितीने मी ही अंतर्जालावर लिहिणाऱ्या हजारोंच्या संख्येत असलेल्या लेखकांच्या श्रेणीत समाविष्ट झालो.
आजकाल तर दर आठवड्यात एक लेख/ कविता लिहिण्याचा संकल्प केलेला आहे. पाककृतीपासून ते न कळणाऱ्या गंभीर प्रश्नांवर ही लिहायला सुरुवात केली आहे. काहीही लिहिले तरी निदान ५००-१००० लोक वेगवेगळ्या मराठी साईटस् वर वाचतीलच. (मराठी लिहिलेली अधिकांश छापील पुस्तके ३०० लोक ही वाचत नाही). एक मात्र खंर, निदान जेवढे दिवस आपण अंतर्जालावर लिहित आहोत, तेवढे दिवस तरी काही लोकांना आपले नाव लक्ष्यात राहील. निदान सध्यातरी कीर्तिरूपे उरण्याची दुधाची तहान ताकावर तरी भागते आहे. तरीही प्रतिष्ठित लेखक समाज कधीतरी अंतरजाली लेखकांची दखल घेईल अशी आशा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti