नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते.
१) चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे. ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.
मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.
आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)
१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा
आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?
उलट-सुलट दोन्ही कडून वाचा
१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
29. या सुतार दादा दार तासुया
मेडिकल एयेथिक्स ( Medical Ethics ) अर्थात् वैद्यकिय क्षेत्रातील लोकांची आपापसात वागण्याची पद्धत.
लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.
नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे. काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही. अर्थातच, दातून साठी. बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची. पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या. संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड. आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले. अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही. काही महिन्याचे हे निश्चित असेल. झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे गेले नाही. झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले. काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल. एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले. आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे वाटले. पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.
जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली, बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो. एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी सोबत खेळताना दिसायची. कालचीच गोष्ट, त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट म्हातारीला दाखवत म्हणत होती, दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ). तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया. अचानक पिटुकलीचे लक्ष्य माझ्या कडे गेले, हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि दुडदुड धावत धावत घरात गेली. मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिचे डोळे बंद होते. तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता. काही क्षण मी तिला पाहतच राहिलो. अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं, म्हणत मी तिथून पाय काढला. आज त्या गल्लीतून जाताना सदानकदा घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी घरा बाहेर एका सतरंजीवर पांढऱ्या वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले. काय झाले असावे मला याची कल्पना आली. पण घरात काय घडले याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती. तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे, मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ. तेवढ्यात तिची आई बाहेर आली, तिने तिला उचलले आणि घरात नेले. मी पुढे निघालो. न जाणे का, डोळे पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार. संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.
एका कॉन्फरन्ससाठी मी दिल्लीला गेलो होतो. दुपारचा वेळ मोकळा होता. मी निवांत बसलो होतो. हातात फाइल्स घेतलेला एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला,“सर ओळखलं?” अर्थातच मी ओळखलं नाही. म्हणाला,”चला चहा घेऊ. ”परप्रांतात मराठी माणूस भेटला की बरं वाटतं.
“इथे हॉटेलच्या लिस्टवर मराठी माणसांची नावं शोधली. त्यात नेमकं तुमचंच नाव दिसलं. म्हणून म्हंटलं तुम्हाला भेटूया. मी लहान असताना तुमच्या गोष्टी वाचल्याचं आठवतं.”
मी त्याला नाव विचारलं. पण तो विषय बदलत इतर गोष्टीच बोलत होता. त्याची दिल्लीतली नोकरी. त्याचं घर. इथली मराठी माणसं आणि महाराष्ट्र मंडळ वगैरे.
मला पुन्हा मिटींगला हजर राहणं भागंच होतं. संध्याकाळी थोडा वेळ ठेवा असं म्हणत, तो निघाला.
त्या दिवशी संध्याकाळी त्याला भेटणं मला शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो माझ्या रुमवर आला. ”चला एकत्र ब्रेकफास्ट घेऊ.”
आम्ही ब्रेकफास्ट घ्यायला बसलो, तेव्हा तो म्हणाला, “मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” मी खाता-खाता मानेनेच खूण करता तो बोलू लागला.
“तुम्ही मला ओळखणार नाही याची मला खात्री होती. पण न जाणो ओळखलंत तर? म्हणून मी माझं नाव काल तुम्हाला सांगितलं नाही. खूप वर्षापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची किंवा सूचवायचं मनात होतं. लहान असताना धीर झाला नाही. आताही सांगताना असं वाटतंय की, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय..” तो बोलायचं थांबला.
मला त्याच्या बोलण्यातून काहीच कळेना. काही टोटलच लागेना. मी प्रेमाने त्याला थोपटत म्हणालो,”बोल ना बिनधास बोल. जे तुला सांगावंसं वाटतंय ना, ते अगदी मोकळेपणाने सांग. खरं सांगतो मला नाही राग येत. बोल. कमॉन..”
त्याने माझ्याकडे पाहात, माझा अंदाज घेतला. त्याची बेचैनी वाढली होती. त्याचं खाण्याकडे अजिबात लक्षं नव्हतं. खूर्चीवर बसल्या बसल्या त्याचे पायसुध्दा एका लयीत हलत होते. “आपण आता बोलून तर बसलोय पण हे समोरचे गृहस्थ रागावले तर..?” असा काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
”सर, मी लहान असताना तुम्ही माझ्या शाळेत आला होतात. आम्हा मुलांशी गप्पा मारायला. त्यावेळी मी इयत्ता चवथीत होतो. मुलांनी खूप आग्रह केल्यावर तुम्ही एक कविता म्हणाला होतात..आईची कविता..आठवतं? त्यावेळी आमच्या वर्गातल्या सर्व मुलांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता.. आणि मी एक प्रश्न विचारला होता.
अजूनही 'तो प्रश्न' आणि त्या प्रश्नाच्या गाभ्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न माझ्या डोक्यात ठाण मांडून बसले आहेत.. ..”
त्याला थांबवत मी म्हणालो,'मला आठवतोय तो प्रसंग. आणि तुझा तो प्रश्न सुध्दा. खरंच. पण आपली आज अशी भेट होईल असं मात्र वाटलं नव्हतं.अं.. तुझं नाव मंदार? बरोबर..?”
माझ्याकडे किंचित अविश्वासाने पाहात त्याने मान हलवली.
इतक्यावर्षापूर्वी घडून गेलेला तो प्रसंग मला स्पष्ट दिसू लागला.
'काही वर्षापूर्वी एका शाळेने मला मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं. 'मी मुलांना मार्गदर्शन करत नाही आणि मुलांसमोर भाषण ही करत नाही' असं त्यांना सांगताच ते म्हणाले, 'मग आमच्या शाळेतल्या मुलांशी गप्पा तरी मारायला या.'
प्राथमिक शाळेतल्या मुलांशी गप्पा मारायला मी गेलो. आवडती पुस्तकं, आवडती माणसं, माणसांच्या सवयी, आपल्या नाठाळ सवयी अशा कुठल्याही विषयांवर मुलांशी बोलत होतो. काही मुलांनी आग्रह केला म्हणून मी एक कविता म्हंटली. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, 'गोड गोड खाऊ आणते, माझी आई मला. गोड गोड खाऊ नको, आईच हवी मला.'
कविता ऐकल्यावर सर्व मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. पण माझ्या समोरच बसलेला एक मुलगा एकदम शांत होता. कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात तो रमला होता. मी जवळ जाऊन त्याला थोपटलं. त्याने खांदे उडवून माझा स्पर्श नाकारला. त्याचं नाव मंदार.
आता शाळ सुटायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याला घराची आठवण येत असेल किंवा त्याला भूक लागली असेल असा मी विचार केला.
इतक्यात एका मुलाने हात वर करुन मला विचारलं,'सर लहानपणी तुम्हाला काय आवडायचं.. म्हणजे कोणता खाऊ आवडायचा?”
आत्तापर्यंत मी मुलांच्याच आवडिनिवडि ऐकत होतो. त्याबाबत बोलत होतो. पण मला काय आवडतं, हे मात्र मी सांगितलंच नव्हतं. हे त्या मुलान बरोबर ओळखलं.
मी माझ्या आवडी सांगणारच होतो तोच मला जाणवलं कि मंदारला काहीतरी विचारायचं आहे. मी मंदारकडे सहेतुक पाहिलं आणि भुवया उंचावतच त्याला खूण केली,'विचार..'
माझ्याकडे न पाहताच मंदारने विचारलं,'सर, तुम्हाला तुमच्या आवडीचा खाऊ कोण आणून द्यायचं?”
मी काही उत्तर देण्याआधीच सर्व मुले ओरडली, “आईऽऽऽ आईऽऽऽ”
मुलांनी आईच्या नावने एकच कल्ला केला. त्याचवेळी शाळा सुटली. मग तर आईच्या नावाचा गजर करत मुले उधळली.
त्या कार्यक्रमानंतर मंदारचा चेहरा माझ्या लक्षात राहिला. त्याचा प्रश्नाचा रोख काहीसा वेगळा होता. त्याने माझा स्पर्श नाकारुन नकळत आमच्यात असणारं अंतर, त्याने मला दाखवून दिलं होतं. तो काहीसा वेगळा आहे. किंवा मुलांशी गप्पा मारताना एखादवेळेस तो माझ्याकडून नकळत दुखावला गेला आहे. असं मला सारखं त्यावेळी वाटत होतं. एखाददिवशी वेळ काढून त्या शाळेत जावं. आपण सहजच आलोय असं भासवावं पण मंदारला भेटावं असं मला खूपदा वाटे. आणि असं करणं मला सहजी शक्यं ही होतं. पण मी तसं काहीच केलं नाही.
आणि आज इतक्या वर्षानी, हाच मंदार माझ्यासमोर बसला होता.
त्यावेळी मी त्याला शोधत होतो. पण आज यानेच मला शोधून काढलं होतं.
किंचित बॅकफूटवर जात मंदारने मला विचारलं, “तुमच्या इतकं सारं कसं काय लक्षात?”
“कारण त्यानंतर मी खूप दिवस तुझ्याबद्दल विचार करत होतो.”
'म्हणजे..?'
मंदार, आता माझं ऐक. आधी हा ब्रेकफास्ट संपव. तुला काही सांगायचं होतं, ते मोकळेपणाने सांग. आणि मग भरपूर गप्पा. मी आणखी दोन दिवस आहे दिल्लीत.”
शांतपणे मनातल्या मनात वाक्यं जुळवत, मंदारने खाणं संपवलं. आम्ही चहा पीत बाल्कनीत बसलो.
'सर, मी तुम्हालाच उद्देशून बोलतोय असं कृपया समजू नका. माझं काही चुकत असेल तर मला सांगा.” माझ्याकडे एक क्षण पाहून मंदारचा बोलण्याचा धबधबा सुरू झाला,'लहानपणी पुस्तकातून, शेजाऱ्यांच्या बोलण्यातून,'आई म्हणजेच ग्रेट. मुलांवर माया करावी, प्रेम करावं ते फक्त आईनेच. घरी येणाऱ्या मुलाची वाट पाहावी, आईनेच. गोड गोड खाऊ आणावा तो ही फक्त आईनेच' असंच वाचायला किंवा ऐकायला मिळायचं तेव्हा मी खूप बेचैन व्हायचो. म्हणजे ज्या मुलांना आई नाही, त्या मुलांना असं प्रेम कधी मिळणारच नाही? ती मुलं का आयुष्यभर प्रेमाची भुकेलीच राहतील? आई नाही तर प्रेमच नाही? आई आपल्या मुलावर करते तेच खरं प्रेम? पण असं कसं होईल?
सर, मी माझी आई पाहिली ही नाहि. मी आठ दिवसांचा असताना ती गेली असं मला नंतर कळलं. माझे बाबा, माझी आत्या आणि माझी आजी या माझ्या 'आई'च होत्या. माझ्यावर निरातिशय प्रेम होतं त्यांचं. पण हे मला तेव्हा समजलंच नाही. कारण 'खरं प्रेम म्हणजे आई. आईच फक्त ग्रेट' हे समीकरण तेव्हा माझ्या डोक्यात घट्टं होतं.
'किंवा त्या समीकरणामुळेच माझ्या बाबांचं, आत्याचं माझ्यावर असणारं प्रेम मला शुल्लक वाटत होतं. आणि कधीच न मिळू शकणाऱ्या आईच्या त्या 'ग्रेट प्रेमाची' मला ओढ लागली होती. वर्गातली मुलं आईबाबत बोलत तेव्हा मला कसंनुसं व्हायचं. 'मला आई नाही' म्हणून जर कुणी मला सहानुभुती दाखवलि तर मला रग यायचा.
'सर तुमच्या त्या कवितेतली शेवटची ओळ आहे,'आईच हवी मला.' ही ओळ तुम्ही तेव्हा वेगवेगळ्याप्रकारे म्हंटलीत. बोलक्या चेहऱ्याने आवाजात चढउतार करत म्हंटलीत. त्यावेळी मुलांची मनं आईच्या प्रेमाने ओसंडून वाहू लागली. सर्व मुलांना आईच्या 'त्या ग्रेट प्रेमाची' आठवण येऊन त्यांनी टाळ्या वाजवल्या. पण मी मात्र सुन्न होऊन बसलो होतो कारण आईच्या प्रेमाचं समीकरण मला टोचत होतं.
'आईच्या प्रेमाची किंवा आईची पण महती जरुर सांगावी. पण 'ज्या मुलांना आई नाही, जी मुलं पोरकी आहेत, अनाथ आहेत त्या मुलांना ही इतर कुणाकडून आई इतकंच प्रेम मिळू शकतं' असं एखादं वाक्यं का नाही कधी ऐकायला मिळत, वाचायला मिळत? कारण तुम्हा सगळ्यांना आई आहे म्हणून? की आईच्या प्रेमाने तुम्ही इतके आंधळे झाले आहात की तुमच्या आजुबाजूची अनाथ, पोरकी मुलं तुम्हाला दिसतंच नाहित?
'सर, रागावू नका. आयुष्यात खूप उशीरा हे समीकरण सुटलं, तेव्हा प्रथम तुम्हालाच भेटायचं मी ठरवलं होतं.” अचानक हुंदके देत मंदार बोलायचं थांबला.
आपल्या हातून नकळतच पण किती मोठी चूक झाली हे कळल्याने तर मला शरमल्यासारखं झालं होतं. मी सुन्नं झालो होतो. मला बोलताच येत नव्हतं.
चटकन स्वत:ला सावरत मंदार पुढे म्हणाला,'आपल्याला 'आईचं प्रेम मिळालं नाही' ही बोच कित्येक वर्ष माझ्या मनात होती. आपल्याच नशीबात असं का, आपणच का दुर्भागी? असं ही कधी वाटायचं. मित्रांच्या घरी गेलो आणि त्याची आई माझ्याशी प्रेमाने वागू लागली की माझ्या ह्रुदयात कालवाकालव व्हायची. वेगवेगळ्या प्रकारे अनेक वर्ष ते 'आईच्या प्रेमाचं समीकरण' मला छळत होतं. शाळा संपल्यावर मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि इथे आलो.
'माझी बायको पंजाबी आहे. माझ्या मुलीचं नाव सिमरन. सिमरनला मी माझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचो. एक दिवस ती अचानक मला म्हणाली,'आप कितने लकी है. तुम्हाला तीन-तीन माँ. तुमचे बाबा,आत्या आणि आजी! हो ना?”
'खरं सांगतो सर, त्याक्षणी मला खूप हलकं वाटलं. इतकी वर्ष न सुटलेलं ते 'ग्रेट प्रेमाचं समीकरण' सिमरनने चुटकीसरशी सोडवलं होतं.” मंदारला पुढे बोलता येईना. त्याला खूप भरुन आलं होतं.
मी प्रेमाने त्याचा हात हातात घेतला. त्याला थोपटलं. यावेळी त्याने माझा स्पर्श नाकारला नाही.
मंदारसारख्या मुलांची आपण आता आई व्हायला पाहिजे, असं माझ्या मनात आलं. आणि जणू काही माझ्या मनातलं कळल्याप्रमाणे मंदार माझ्याकडे पाहून हसला.. ओल्या डोळ्याने!
- राजीव तांबे.
आंस लागली मजला,
बघून याव्या त्या शाळा ।।
देहू, आळंदी, परिसर,
जाऊनी तो धुंडाळला ।।१।।
कोठे शिकले तुकोबा,
ज्ञानोबांना ज्ञान मिळे ।।
साधन दिसले नाहीं,
परि तेज भासे आगळे ।।२।।
विचार झेंप बघतां,
आचंबा आम्हां वाटतो ।।
कोठून शिकले सारे,
मनी हा प्रश्न पडतो ।।३।।
त्यांची शाळा अतर्मनीं,
गंगोत्री ज्ञानाची ती ।।
वाहात होती बाहेरी,
पावन करी धरती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात...
मी पण एक स्त्री आहे,
अडगळीत पडलेली
‘वेश्या’ म्ह्णतात मला,
पोटासाठी अडलेली
या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने एक उपभोगाची वस्तू म्ह्णून न पाहता एक स्त्री म्ह्णून पाहायला हवे जसे आपण आपल्या आया - बहिणींकडे पाहात असतो. आणि त्या जे काही व्यवसाय म्ह्णून करत आहेत आहेत ते आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या मनाविरूद्ध करत आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे.
इच्छा मन भावना माझ्या,
सार्या काही मेलेल्या
उरल्या – सुरल्या त्याही,
किंमत मोजून गेलेल्या
या पुढच्या चार ओळीत
या ओळीतून कविने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते. वेश्या होण्यापूर्वी तिने आपल्या मनाला आपल्या भाव-भावनांना आवर घातलेला असतो असं नाही तर तिने त्यांचा गळा घोटून त्यांना ठार मारलेले असते. इतक करूनही जर काही भावना जिवंत राहिल्याच तर त्याही त्या त्यांना पैशाच्या बदल्यात विकाव्या लागलेल्या असतात.
उघड्या डोळ्यांनी अनुभवतो,
स्वतःवरील बलात्कार...
तरीही आशेवर जगतो,
घडेल काही चमत्कार...
या पुढच्या ओळींमध्ये कवितेत दडलेली दाहकता जाणवते. कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते त्यामुळे तिचा जेंव्हा जेव्हा पुरूषांशी शारीरिक संबंध येतो तेंव्हा प्रत्येक वेळी तो तिच्या मनाच्या विरूद्धच असतो त्यामुळे त्या प्रत्येक वेळी तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचाच अनुभव येत असतो. पण ती हे सारं निमूटपणे सहन करत असते. आणि कधी तरी आपली सुटका करणारा कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल या आशेवर जगत असतात. हे कवीने अगदी नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
रोजच होतो मधुचंद्र,
तरीही हक्काचा नसतो कोणी
मंगळसूत्र फक्त शोभेला,
कुंकवाचा नसतो धनी
या ओळीत कवीने वेश्यांच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मधुचंद्र या गोष्टीला प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळे महत्व असते. पण वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रियांना तो अनुभव जीवघेणा वाटत असतो कारण त्यांच्या मनाविरूद्ध त्यांचा रोजच मधुचंद्र होत असतो.
वेश्या व्यवसाय करणार्या काही स्त्रिया विवाहित ही असतात पण त्यांच्या नवर्यांनीच त्यांना या व्यवसायात ढकलेले असते अथवा यांच्या जीवावर ते जगत असतात बांडगुळासारखे. ते त्यांच्या कुंकवाचा आधार फक्त नावाला असतात प्रत्यक्षात त्यांना त्यांचा आधार कधीच मिळत नाही.
पोटच्या आमच्या गोळ्याला,
नावं नसतं बापाचं
जन्माआधीच मरण,
भोगतो आमच्या पापाचं
या चार ओळीत वेश्यांना होणार्या मुलांची बाप म्ह्णून कोणी जबाबदारी घेत नसतो आणि समाज त्यांच्याकडे एक पाप म्ह्णूनच पाहात असतो आणि पुढे जाऊन ते पापीच होणार हे त्यांच्या जन्मा अगोदरच गृहीत धरतो हे कवीने सुचविले आहे.
तारूण्यात आमच्या,
जगण्याला असतो ‘अर्थ’
म्हातारपणात मात्र
जगणंच होतं व्यर्थ
जो पर्यंत वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रिया तरूण असतात तोपर्यत त्यांचा उपभोग घेणार्यांचा राबता असतो पण त्यांचे तारूण्य ओसरले की सारेच त्याच्याकडे पाट फिरवतात आणि त्यांच्या जगण्यालाही काही अर्थ उरत नाही हे कविने या चार ओळींतुन अगदी सहज सुचविले आहे.
लखलखत्या प्रकाशात असताना,
आंम्ही स्वतःच करायचो अंधार
आता रोज सूर्य उगवतो तरी,
आयुष्याचा झालाय अंधार
या कवितेच्या शेवटच्या चार ओळीत कवी
सुचवतो की काही स्त्रियां आपल्या सौंदर्याच्या अभिमानात आणि तारूण्याच्या जोशात आणि पैशाच्या हव्यासापायी स्वतःच्या मर्जीनेही वेश्या व्यवसाय व्यवसाय म्ह्णून स्वीकारतात त्यांच्या वाटयाला ही शेवटी फक्त अंधारच येत असतो हे सत्य मांडलेले आहे.
लेखक – निलेश बामणे
दुपारची वेळ होती, मीच रेखाटलेलं एक सुंदर चित्र मी रंगविण्यात व्यस्थ होतो इतक्यात तेंव्हा दहा वर्षाची असणारी ती माझ्याकडे धावत आली आणि एका फाडलेल्या चित्राचे कही तुकडे मला दाखवत तिने मला प्रश्न केला ‘हे चित्र तू काढलं होतस का ? मी पूर्ण आत्मविश्वासाने नाही ! अस खोटंच उत्तर दिलं. तेंव्हा मी तिच्याशी पहिलं आणि शेवटच खोटं बोलंलो. पण तरीही मी खोटं बोलतोय हे तिच्या लक्षात आलं असावं. पण तिने तस मला दिसू दिलं नाही. तिने त्या तुकडयांच नंतर काय केलं देवास ठावूक ! मी ही विचारणा केली नाही कारण त्यामुळे तिचा माझ्यावराचा संशय अधिक बळकट झाला असता. मी काढलेल्या चित्राच्या काही तुकडयावरून ते चित्र मी काढलेलं असावं हे ओळखण्याइतक तिच माझ्या चित्रांवर प्रेम होतं की खरं कारण आणखी काही होत ? ते मला आज ही कळलेलं नाही. मी ते चित्र उत्सूकतेतून काढलं होतं आणि उत्सूकतेतून रंगविलेलं होतं. रंगवून झाल्यावर ते चित्र मी कोणालाच दाखवू शकत नव्हतो कारण ते चित्र एका पोशाख परिधान न केलेल्या स्त्रीचं होतं म्ह्णूनंच मी ते फाडून कचर्याच्या डब्यात टाकलेले होतं. त्यावेळी आमच्या चाळीतील सारा कचरा एका मोकळ्या जागेत जमा व्हायचा आणि तेंव्हा खेळण्यासाठी लागणारे साहित्य आंम्ही त्या कचर्यातूनच जमा करून आणायचो. ती ही त्या कचर्यात खेळ्ण्यासाठी लागणार्याू रिकाम्या काडीपेटी जमा करायला गेली होती. तिथेच तिला माझ्या चित्रांचे तुकडे सापडले होते. त्यातील काही तुकडे तिने जोडून पाहिले होते. त्यानंतर चित्रकलेत तसे प्रयोग करून पाह्ण्याची हिंमत माझ्याच्याने कधीच झाली नाही. त्यानंतर काही वर्षांनी आमच्या चाळीतील सार्वजनिक शौचालयात काही चित्रकारांचा नव्याने जन्म झाला होता. पण ते माझ्या तोडीचे चित्रकार नव्हते. त्यांनी तेथे दाखविलेली कला अत्यंत तुच्छ दर्जाची होती. तिने त्याबद्दलही मला प्रश्न केला. ती चित्रे तू तर काढली नाहीस ना ? तेंव्हा मात्र माझी सटकली होती आणि तेंव्हा ते चित्र मीच काढलेलं होतं हयाची तिला खात्री होती हे ही माझ्या लक्षात आलं. शौचालयात काढलेली चित्रे तिने फक्त ऐकली होती प्रत्यक्ष पाहिलेली नव्ह्ती, नाहीतर ती मी काढलेली नाहीत हे तिच्या सहज लक्षात आले असते कारण तिला माझ्या चित्रकलेचा दर्जा माहित होता. तेंव्हा मात्र ती चित्रे मी काढलेली नाहीत हे मी खरंच बोललो. पण त्यावरही तिचा विश्वास बसला होता की नाही देव जाणे कारण तिच्या दृष्टीने तेंव्हा मी एकटाच महान चित्रकार होतो. असो ! शौचालयात जन्माला आलेल्या या चित्रकारांची मला आजही किव येते कारण हे महान चित्रकार कधीच जगासमोर येत नाहीत. हे चित्रकार साधारणतः पंदरा ते वीस या वयोगटातील असावेत असा माझा अंदाज आहे. शौचालय हे आपल्या चित्रकलेचं प्रदर्शन मांडण्याचे ठिकाण मानणारे हे चित्रकार आज इतक्या वर्षानंतरही अगदी सध्याच्या संगणकाच्या युगात ही जन्माला यायचे थांबलेले नाहीत याचं मला व्यक्तीशः खूपच आश्चर्य वाटतं आणि हसू ही येतं. मागील कित्येक वर्षात माझी चित्रकलेसोबतच मैत्री तुटली. मला बर्याचदा वाटत राहत आपण स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढावा आणि एखाद छानसं चित्र काढावं ते मस्तपैकी रंगवून फ्रेम करून आपल्या घराच्य भिंतीवर लावावं पण् ! हिंमतच होतं नाही कदाचित माझ्या चित्रांचं कौतुक करणारी ती आता माझ्या जवळ नाही म्ह्णून असेल. ती भौतिक जगातील भौतिक रंगात रंगण्यात गुंग झाली आणि मी भौतिक जगात अस्तित्वातच नसणार्या गोष्टींच्या शोधात आजही एकटाच भटकतोय वेड्यासारखा. तेंव्हा वयाच्या दहाव्या वर्षी ती जितकी निरागस, निर्मळ होती तितक्या आजच्या मुली नाहीत हे मी खात्रीने सांगू शकतो आणि तेंव्हा मी जितका भोळा होतो तितका भोळा आज असणं हे मुर्खपणाचं लक्षण मानल जातं. माझं तिच्यावर प्रेम होतं असं सार्या जगाला वाटत होतं. मला तसं कधीच वाटलं नाही असं तिलाचं वाटत राहिलं. तिनं तिला हवं असणारं प्रेम दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते तिनं मिळवलं ही. त्यानंतर नाईलाजाने मी तिला माझ्या आयुष्यातून वजा केले.
त्यानंतर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्यातील वेगवेगळ्या रंगासारख्या अनेक तरूणी एकापाटोपाट एक अल्या. त्यंनी काही काळ माझ्या आयुष्यात आपला रंग भरला आणि जशा अचानक आल्या तशा माझ्या आयुष्यातून अचानक निघूनही गेल्या. त्यानंतर आकाशात अधूनमधून दिसणार्या इंद्रधनुष्यासारख्या त्या मला दिसत राहिल्या. पण आज त्यांना पाहून माझं मन क्षणभरही विचलीत होतं नाही कारण आता माझं हृद्य पाषाणाचं झालंय. आज मी कोणाच्या प्रेमात पडू शकतो अथवा पडलेलो असेन हे मी स्वतःच्या तोंडाने सांगूनही ते ऐकणार्याचा त्यावर विश्वास बसत नाही. प्रत्येकाला तो मी विनोद करतोय असंच वाटतं राहतं. माझ्या आयुष्यात अनेक तरूणी आल्या आणि गेल्या. जाताना जाणार्या प्रत्येकीने मला काही शाप तर दिला नाही ना ? असा भितीदायक प्रश्न मला आजही सतावतो कारण आजही मला त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयीचं प्रेम स्पष्ट दिसतं. म्हणूनचं मला मी कोणाचा तरी अपराधी असल्याचा भास सतत होत राहतो. कोणा एका स्त्रीचा होऊन राहणं हा नुसता विचारही मला अस्वस्थ करतो. आजही माझ्या आयुष्यातून माझ्या मुर्खपणामुळे निघून गेलेल्या त्यांची, त्यांच्या सौंदर्याची, त्यांच्यातील गुणांची, त्यांच्या चालण्या-बोलण्याची नुसती आठवण जरी आली तरी आता आपल्या सभोवताली त्या तोडीची कोणीच शिल्लक नाही याची मला खात्री वाटते. जी व्यक्ती माझ्या प्रेमात पडते ती व्यक्ती माझ्या प्रेमातून कधीच बाहेर येत नाही. पण् मी मात्र कोणाच्याही प्रेमात पडून राहात नाही. माझा हा चंचल स्वभावच कारणीभूत असावा माझं प्रेम अयश्वी होण्याला. मला माझं प्रेम कोणावरही लादायचं नव्हतं. आपलं प्रेम कोणाला ओझं वाटावं हे मला तेंव्हाही मान्य नव्हतं आणि आजही मान्य नाही.
मी आणि माझ्या मित्रांनी त्या लहान वयातही पोरींना पटविण्यासाठी जे जे उद्योग केले ते नुसते आठवले तरी स्वतःवरच हसू येतं. ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा आमच्या चाळीत नळ नव्हते. पाणी घरापासून पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर असणार्या विहिरीवरून आणावे लागत असे त्याही पन्नास पायर्या चढून. तेंव्हा कोणती ही मुलगी कोठेच सापडली नाही तर विहिरीवर नक्की सापडायची गप्पा मारायला. फक्त एखाद्या मुलीला पाहण्यासाठी आंम्ही कधी-कधी घरातील पाण्याने भरलेले हंडे जबरद्स्ती रिकामे करून कारण नसतानाही विहिरीवर पाणी भरायला जायचो. विहिरीवर गेल्यावर तिला हंडा भरून देणं, हंडा उचलून तिच्या डोक्यावर ठेवणं, तिच्या सोबत चालणं, तिच्या हातातील कळ्शी स्वतःकडे घेऊन काही काळ तिचं ओझं कमी केल्यावर तिच फकत गोड हसणं ही आंम्हाला तेंव्हा स्वर्गीय आनंद देऊन जायचा. मुला-मुलींना एकत्र गप्पा मारताना, हसता-खिदळताना पाहून त्यांच्यावर संशय घेण्याची पध्दत तेंव्हा आमच्या चाळीत नव्हती. त्याचा नंतर काहींनी गैरफायदा घेतला ही गोष्ट निराळी. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची सारी गुपिते ठावूक असणारी एक ना एक व्यक्ती असतेच पण आमच्या चाळीत एक व्यक्ती अशी होती जिला आमच्या सर्वांची गुपिते माहित होती. त्या व्यक्तीकडे सारेच मोकळे व्हायचे पण मी मात्र कधीच मोकळा झालो नाही. त्यामुळे माझी काही गुपिते ही गपितचं राहणार होती. मला स्त्रियांचे सौंदर्य करतं पण तिला आपलंस करायला माझं मन तयार नसतं. मला नेहमी वाटतं राहतं तिचं आपल्यासोबतचं वागणं स्वैर असावं. तिला जगाची अजिबात फिकर नसावी. अशी एक तरूणी माझ्या आयुष्यात आली ही होती पण तेंव्हा माझ्या नशिबाने मला दुसर्यांदा दगा दिला होता. माझं तिच्यावरील प्रेम मी व्यक्त करण्यापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. आजही तिचा हात हातात घेऊन तिच्या दनकट हातावर काढलेली मेहंदी मला आजही आठविते. त्यानंतर मी कोणाच्याही हातावर मेहंदी काढली नाही. ती जेंव्हा माझ्या आयुष्यात आली होती तेंव्हा गरूडाचे जीवन जगत होती. पण जेंव्हा ती पुन्हा भेटली तेंव्हा पिंजर्यातील चिमणी झाली होती. तिची ती अवस्था पाहून मला सुरूवातीला दुःख झालं नंतर मी स्वतःला समजावलं हेच तिच प्रारब्ध असावं. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर एक वेगळी स्त्री माझ्या आयुष्यात आली होती आणि गेली होती. त्या माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग होत्या आहेत आणि भविष्यातही राहतील. त्यांना वजा केल्यावर माझ्या आयुष्याबद्दल कोणाला काही सांगण्यासारखं शिल्लकच राहत नाही. आजही त्या मला भेटतात, माझ्याशी बोलतात पण त्यांच्या डोळ्यात मला नेहमी माझ्यासाठी एक प्रश्न दिसतो तो प्रश्न हा असतो की मला माझ्या आयुष्यात नेमकी कशी स्त्री हवी होती ? मला आजही कोणा एकीची आठवण कधीच येत नाही एकामागून एकीची आठवण येत राहते. मी स्वतःलाच समजवत बसतो त्यापैकी एकीला जरी माझी जोडीदार केली असती तर कदाचित बाकीच्यांवर तो अन्याय झाला असता. त्या आपल्या जोडीदारांसोबत स्थिर झाल्या आहेत याचा मला वाईट वाटत नाही उलट आनंदच होतो कारण त्यांच्या शरिरावर मी कधीच प्रेम केलं नव्हतं आणि हे त्यांना ही चांगलच माहित होतं. माणसाच्या आयुष्यात असंख्य व्यक्ती येतात आणि जातात पण त्यातील काहीच व्यक्ती त्यांची छाप आपल्या जीवनावर सोडून जातात. मी ही त्यांच्या जीवनावर माझी छाप सोडली होती. मला वाटतं नियतीनेच माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया धाडल्या आणि काही काळानंतर माघारी बोलावून घेतल्या. त्यांच माझ्या आयुष्यात येणं आणि अचानक निघून जाणं हे सहज घडलेलं नसावं. फारच अकल्पित परिस्थितीत त्या माझ्या आयुष्यातून वजा झालेल्या होत्या. सारंच सोप्प असतानाही अवघड झालं होतं. सारंच हातातून वाळू निसटून जावी तसं निसटून गेल होतं. जगातील कोणतीच गोष्ट मिळविणे मला अशक्य नाही असा माज मिरविणारा मी बर्याचदा हतबळ ठरलो होतो. त्यानंतर मला खात्रीच पडली मी एक यंत्रमानव आहे आणि माझा रिमोट आणखी कोणाच्यातरी हातात आहे. माझ्या आयुष्यातून काही पैशा अभावी गेल्या पण काही पैशामुळे ही गेल्या तेंव्हा मात्र मझी खात्री पटली त्या माझ्या आयुष्यातून दूर जाण्यासाठीच आल्या होत्या. माझ्याकडे असं काही तरी आहे ज्यामुळे लोक माझ्याकडे आकर्षित होतात, माझ्या अधिन होतात, माझ्या अज्ञेत राहतात. माझ्या आयुष्यातील सर्व घटनांची गोळाबेरीज करून सारासार अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले की माझा रिमोट ज्याच्या हातात आहे त्याची इच्छाच नाही की मी भौतिक जगाच्या प्रेमात पडावं. म्ह्णूनच कदाचित माझ्या जन्मदात्यांनाही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं शक्य होत नसावं. मला प्रत्यक्षात न पाहिलेल्या लोकांच्या मनात माझी फार विचित्र प्रतिमा तयार झालेली असते पण त्याच व्यक्ती मला प्रत्यक्ष भेटल्यावर माझे भक्त होतात. त्यामुळेच मी शक्यतो लोकांना भेटणं टाळ्त असतो. बर्याच लोकांना विनाकारण वाटत राहत की मी स्त्रियांचा तिरस्कार करतो पण हे वास्तव नाही मीच स्त्रियांचा खरा मित्र आहे कारण मी त्यांच्या बाजूचा फक्त त्यांच्याच बाजूने विचार करतो. माझ्या आयुष्यात आलेल्या जवळ-जवळ सर्वच स्त्रियांच्या आयुष्यात फार अनपेक्षीत घटना घडलेल्या होत्या. मी त्या घटनांचा साक्षीदार होतो त्यामुळे त्या घटना मला फार काही शिकवून गेल्या. स्त्रियांच्या आयुष्याकडे एक पुरूष म्ह्णून न पाहता तटस्थपणे पाहण्याची शिकवण त्यांच्यामुळेच मला मिळाली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या तडजोडी मला कधीच पटल्या नव्ह्त्या आणि पटणारही नाहीत. माझ्या मागे माझ्यावर टिका करणारे बरेच आहेत पण् माझ्या डोळ्यात पाहून बोलण्याची हिंमत फक्त एकीतच होती. पण तिलाही परिस्थिती समोर हार मानताना पाहिलं आणि मग माझी खात्री पटली या भौतिक जगाच्या पलिकडे ही एक अकल्पित जग आहे. माझा जन्म कदाचित त्या अकल्पित जगाचा शोध घेण्यासाठीच झाला असावा अथवा त्या अकल्पित जगाच्या शोधात वेड्या सारखं जीवन जगत राह्णं हेच माझं प्रारब्ध असावं.
लेखक – निलेश दत्ताराम बामणे
मो.9029338268 / 8652065375
गोरेगांव (पूर्व) मुंबई-65.
संध्याकाळ झाली.
हवेत मस्त गारवा होता आणि घरात छान उबदार वातावरण.
तो घरात गादीवर आरामात पडला होता.
इतक्यात ती घरात आली.
ही नुसती आली नाही तर गुणगुणत आली. हिला सदानकदा गुणगुणण्याची सवय आहे.
ही हसत हसत गुणगुणली,“एऽऽ, तुला एक सॉलीड जोक सांगते. हा जोक जगातला सगळ्यात लहानात लहान जोक आहे. फक्त एका वाक्याचा जोक!
या जोकची “पॉयझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मधे पण एंट्री झालीए!! सांगू तो जोक?”
गादीवरुन उशीकडे सरकत तो म्हणाला,“आत्ताच सांगायचं काय नडलंय का? गेले तीन दिवस माझ्या पोटात रक्ताचा एक थेंब नाही! भुकेने माझा जीव कासावीस झालाय, आणि तुला
जोक सुचतोय?
तू गावभर फिरत रक्त पितेस तसं माझं नाही म्हंटलं! .. ..
माझं.. या घरातल्या माणसांशी “रक्ताचं नातं” आहे!”
हे एकल्यावर तिची गुणगुण वाढली.
ती रागाने फणफणत फुणफुणली, “पण एक सांगते, या घरातल्यांना तुझी किंमत नाही. जोडून सुटी आली तर गेले तुला गादीवर सोडून!
आपण गेल्यावर तुझं काय होईल, याची त्यांना आहे का चिंता?
“तुझ्यासाठी घरातल्या एकाने तरी मागं रहावं. या गादीवर झोपावं.” असं कुणाला तरी वाटलं?”
तो रागाने खसकून म्हणाला,“हे बघ,उगाचच “उचलली सोंड आणि लावली पंखाला” असं करू नकोस.
तू काय समजतेस काय आम्हाला?
तुझ्यासारखे गावभर हुसहुस करत फिरणारे आणि डबक्यात अंडी घालणारे आम्ही नव्हे!
आम्ही घरंदाज आहोत!
समझे?
उगाच गमजा करू नकोस.
अगं तहानने घसा सुकला तरी आम्ही दुसऱ्या घरी जाऊन रक्त पीत नाही!!
कारण..
कारण.. या घरातल्या माणसांशी मी आणि माझं कुटुंब “रक्तनिष्ठ” आहे!!”
“बरं बाई झाली घाई. मी इतकंसं बोलल्यावर लगेच एव्हढं काही सुनवायची गरज नव्हती. पण जाऊ द्या.
आता मला सांग, ही माणसं कधी परत येणार आहेत?”
“आज संध्याकाळ पर्यंत तरी यायला हवीत. नाहीतर उद्या माझं कठीणंच आहे. पण नाहीतर मागच्या वेळेसारखं झालं तरी बरं!”
ती म्हणाली,“म्हणजे मागच्या वेळी काय झालं होतं?”
तो सांगू लागला,“अगं त्यावेळी तू नव्हतीस म्हणून तुला माहित नाही.
त्या उन्हाळ्याच्या सुटीत ही घरातली सगळी जणं पंधरा दिवसा करता काश्मीरला का कुठेतरी गेली. पण त्यांनी जाताना घराची किल्ली बाजूच्यांकडे देऊन ठेवली.
त्यामुळे आम्हाला रक्त पाजण्यासाठी या बाजूच्या घरातली माणसं अधून मधून येत आणि कॉटवर लोळून जात.
त्यावेळी.. .. परक्या माणसांच्या हाताला, पायाला किंवा पोटरीला तोंड लावताना मला जरा अवघडल्यासारखं व्हायचं. नकोसं वाटायचं. मी खूप गोंधळलो होतो.
मग मला आईने समजावलं.
आई मला म्हणाली,“अरे आपण या घरातलेच आहोत. या घरात जे कुणी येतात ते आपलेच.”
त्यानंतर मात्र माझी भीड चेपली.”
तिने हसत हसत विचारलं,“काय रे, त्या शेजारच्या घरातला तो जाड्या ढेरपोट्या माणूस पण आला होता का तेव्हा? त्याचं रक्त तू टेस्ट केलं आहेस?”
तो आठवत म्हणाला, “बाप रे! तो तर सॉलीडच किस्सा आहे!
माझी आई त्याला गमतीने “दगडी उशी” म्हणते.
तो जेव्हा आमच्याकडे आला होता तेव्हा आई मला म्हणाली,“ढेकणू, त्या दगडी उशीच्या जवळपास पण जायचं नाही. झोपेत त्याचं बोट जरी आपल्या पाठीवर पडलं तर आपण चिरडून
जाऊ.
आणि त्यांचं रक्त पिण्यासाठी तू अजून लहान आहेस!”
मी लहान आहे, असं आई का म्हणाली असेल ग?”
त्याचा प्रश्न ऐकून ती गुणगुण गुणगुण गुणगुणली आणि म्हणाली,“ढेकणू तू तर अगदीच पाचवी फेल आहेस!
अरे रात्री जर त्यांचं रक्त प्यायलं तर आपलं डोकं सुन्नं होतं म्हणे. सॉलीड कीक येते!
माझी मोठी मावशी तर त्यांच्यावर तुटून पडते आणि मग त्यांच्याच कानावर झोपते.
जाऊ दे तुला नाही समजणार ते.”
“मग आता मला समजेल असा तो इटूकला जोक तरी सांग.” ढेकणू म्हणाला.
डासाची आई जोक सांगू लागली,“अरे एका दिवाळी अंकात असं लिहिलंय की,“आम्ही म्हणे माणसांना चावतो!” आता हा मोठा विनोदच नाही का?
चावण्यासाठी “दात” असावे लागतात.
पण आम्हाला तर दातच नाहीत मग आम्ही चावणार कसे?
माणूस भले चंद्रावर गेला असेल पण त्याला जर “आमच्या सारख्या डासांना दात नसतात” हेच जर माहित नसेल तर उपयोग काय?
रक्ताशपथ सांगते,“आम्ही माणसांना कधीच चावत नाही तर फक्त टोचतो.” आमच्या मऊमऊ सोंडेने टोचतो.”
ढेकणू आश्चर्याने म्हणाला,“मग, माणसांना चावतं कोण”
डासाई म्हणाली,“अरे कुत्रे असतात चावरे आणि लाळघोटे. हे कुत्रे माणसांच्या सारखं मागे मागे फिरत असतात.
आपण चावरे नाही तर आपण “टोचरे” कुटुंबातली मंडळी आहोत.
आपण माणसांच्या मागे नाही तर माणसंच आपल्या मागावर असतात!”
इतक्यात डासाईला कुठलासा वेगळा वास आला.
ती सावध झाली.
तिने सोंडेनेच ढेकणूला खूण केली.
ढेकणू गादीत शिरला.
डासाईने कल्टी मारली.
- राजीव तांबे.
बदलते भाव
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते
राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१
देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले
अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२
देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी
केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३
जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून
भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti