(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सुक्ष्मात अनंत

    एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत

    करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,

    दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके

    केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे...२,

    जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं

    साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती....३,

    वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी

    सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी....४,

    तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी

    ब्रह्माडांची व्यापकता, बिंदूत एका सगळी....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • सावरकरांच्या कविता आणि लीलाताई जोशीबाई !!!

    जोशीबाई आम्हाला इंग्रजी खूप समरस होवून शिकवत असत. त्याच्या शिकवण्याच्या हातोटी वर आम्ही सारे खुष होतो. एकदिवशी आम्ही काही मुले जोशीबाई यांना भेटलो आणि तुम्ही आम्हाला मराठी कविता शिकवा ही विनंती त्यांना केली. जोशीबाई थोड्याश्या तापट होत्या त्यांनी मला वेळ मिळणार नाही म्हणून आम्हाला परत पाठवून दिले. आम्ही हिरमुसले झालो. काही दिवसांनी जोशीबाई स्वतःहून म्हणाल्या तुम्ही काही जण रविवारी दुपारी माझ्या कडे या. मी तुम्हाला मराठी शिकवीन. आम्हाला खूप आनंद झाला. मी आणि माझ्या बरोबर १० जण आम्ही त्यांच्या कडे मराठी कविता शिकायला गेलो. स्वातंत्रवीर सावरकरांच्या दोन कविता त्यांनी आम्हाला शिकवल्या. जवळ जवळ ६ रविवार या दोन कवितांसाठी लागले. कविता शिकवताना बाई स्वातंत्रवीर सावरकरांवर बोलत असत. बाई शिकवताना स्वतः रडत आणि आम्हालाही रडवत.

    स्वातंत्रवीर सावरकरांच्या मोठ्या बंधूस गणेशपंत सावरकर यांना इंग्रज सरकारनी जन्मठेपेची शिक्षा दिली आणि त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू बाळ यांनाही पोलिसांनी अटक केली .गणेशपंत सावरकरांच्या पत्नी सौ.यशोदाबाई यांनी लंडन मध्ये असलेल्या आपल्या धाकट्या दिरास पत्र पाठवून हि बातमी कळवली. वाहिनीची मनाची अवस्था स्वातंत्रवीर सावरकरांच्या लक्षात आली त्यांनी वाहिनीस एक सांत्वन करणारे पत्र लंडनहून पाठवले.ते हे पत्र..........!

    जयासी तुवां प्रतीपाळले । मातेचे स्मरण होऊ न दिले ।
    श्रीमती वाहिनी वत्सले । बंधू तुझा तो तुज नमीं ॥
    आशीर्वाद पत्र पावलें। जे लिहिले ते ध्यानी आलें ।
    मानस प्रमुदित झाले । धन्यता वाटली उदंड ॥
    धन्य धन्य आपुला वंश । सु निश्चये ईश्वरी अंश ।
    कि राम सेवा पुण्य लेश । आपुल्या भाग्यी लाधला॥
    अनेक फुलें फुलती । फुलोनिया सुकोनी जाती ।
    कोणी त्यांची महती गणती । ठेवली असें ? ॥
    परी जे गजेंद्र शुन्डेने उपटीले । श्री हरी साठी मेलें ।
    कमल फूल ते अमर ठेलें । मोक्ष दाते पावन ।।
    त्या पुण्य गजेंद्रासमची । मुमुक्षु स्थिती भारतीची ।
    करुणारवें ती याची । इंदीवरश्यामा श्रीरामा ॥
    स्वोउद्यानी तिने यावे । आपल्या फुलास भुलावे ।
    खुडोनिया अर्पण करावे । श्री राम चरणा ॥
    धन्य धन्य आपुला वंश । सु निश्चये ईश्वरी अंश ।
    कि राम सेवा पुण्य लेश । आपुल्या भाग्यी लाधला ॥
    अशीच सर्व फुलें खुडावी । श्री रामचरणी अर्पण व्हावी ।
    काही सार्थकता घडावी । या नश्वर देहाची ॥
    अमर होय ती वंश लता । निर्वंश जिचा देवा करिता ।
    दिगंती पसरे सुगंधता । लोकहित परिमलाची ।।
    सुकुमार आमुच्या अनंत फुला ।गुंफोनी करहो सुमन माला ।
    नवरात्रीच्या नवकाला ।मातृ भूमि वत्सले ॥
    एकदा नव रात्र संपली ।नवमाला पूर्ण झाली ।
    कुलदेवी प्रगटेल काली ।विजयालक्ष्मी पावन ॥
    तू धैर्याची असशी मुर्ति ।माझे वाहिनी माझे स्फूर्ती ।
    रामसेवा व्रताची पुर्ति ।ब्रीद तुझे आधीच ॥
    महत्कार्याचे कंकण धरिले ।आता महत्तमत्व पाहिजे वाणले ।
    ऐसें वर्तन पाहिजे केलें ।कि जे पसंत पडले संतांना ॥
    अनेक पूर्वज ऋषीश्वर ।अजात वंशाजाचे संभार ।
    साधु साधु गर्जतील ।ऐसें वर्तणे ह्या काला ॥

    या पत्रात स्वातंत्रवीर सावरकर वाहिनीला सांगतात कि अशीच सर्व फुलें खुडावी आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांवर मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला?

    चिंतामणी कारखानीस --

  • व्हॅलेंटाईन डे

    Valantine Day is essentially the concept & part & Parcel of western culture. In the present Era of ''Global Village'' The cultural Trails of cultures Eastern and Western - ''Go hand in hand''. It is to say that the ''Blending of Cultural Traits is on fast track.

    “व्हॅलेंटाईन डे” अर्थात प्रीती-दिन, प्रेम-दिवस ही संकल्पना पश्चिमेकडून आपल्याकडे आली प्रेम, आत्मीयता अंत:करणापासून आतुन मनापासुन असावं लागतं त्याच्या प्रकटीकरणासाठी या अभिव्यक्तीसाठी ठराविक दिवसांत नियोजन करणं ही गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीत न सामावणारी आहे. तथापि वैश्विक व्यापकतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडेदेखील “व्हॅलेंटाईन डे” ही संकल्पना रुजत चालली आहे. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा सुरेल संगम दर्शविणारी ही प्रथा आहे.

    प्रेम! पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मित्र-मित्र, आई मुलगा, पिता-पुत्री, आई वडील आणि मुले अशा नानाविध व्यक्तींमध्ये व्यक्त होणारी ही मृदु सुकोमल भावना !! या सर्व स्नेह-बंधामधून आई-वडिल आणि मुले यांच्या मधील स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, आत्मियता, ममता, प्रेमाचा उमाळा व्यक्त करणारी संकल्पना सर्वांत स्तुत्य आणि लौकिकार्थानं व्यापक
    अशा अभिजात संकल्पनेला उचलून धरण्याची किमया आपल्या आदरणीय प्रसाद सरांनी करुन दाखविली. मुलांमध्ये आई वडिलांविषयी नि:सीम प्रेम जोपासण्याची प्रसाद सरांची ही कल्पक झेप खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे.

    “मातृदेवोभव-पितृदेवो भव”

    या आपल्या परंपरेला आदरणीय प्रसाद सरांनी एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहे त्यांची ही विचारसरणी, कृती-शीलता आणि वर्तनशैली नि:संशय स्पृहणीय, अनुसरणीय, अनुकरनीय आहे यांत तीळमात्र शंका नाही. मला वाटते, अशा तर्‍हेचे “सांस्कृतिक व्हॅलेंटाईन डे” प्रत्येक पाठशाळेत रुजल्यास ते एक, क्रांतिकारक सामाजिक कार्य ठरेल, तरुण पिढी घडविल्यास निश्चितच हातभार लागेल.

    माता पित्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय, याचे दाखले आपल्या हिंदू संस्कृतीत ठायी ठायी अढळून येतात. श्री गजानन अखिल विश्वाचं आराध्य दैवत त्याच्या प्रथम पूजना विषयी कोणतेही शुभ कार्य सुरु होत नाही. त्या विघ्नहर्त्या गजाननाची कथा सर्वकृत आहे. आई-वडिल-शंकर-पार्वती हेच एकमेव आपले विश्व, हेच आपले ब्रम्हांड हे सत्य आई-वडिलांना एक प्रदक्षिणा घालुन सिद्ध करणारा सिद्धिविनायक म्हणूनच जगात वंद्य ठरला. ही कथा सर्वश्रुत आहे, याविषयी जास्त सांगणे न लागे.

    श्रावण-बाळ! आपल्या अंध आणि वृद्ध माता-पित्याच्या सेवेसाठी त्यानं जिवाचं रान केलं. माता-पित्यांच्या श्रांत, तुझ देहाला आराम देण्यासाठी कावडी मधून आपल्या खांद्यावरुन त्यांना रानावनांतुन घेऊन जातांना त्याला परमानंद होत असे, कृतार्थता वाटत असे. आई-वडिलांचे त्याला कधीच ओझे वाटले नाही. त्यांच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर होता त्यांची तहान भागविण्यासाठी त्याला आपल्या जीवनांच मोलद्याव लागलं! असा आदर्शबाळ - श्रावणबळ पुन्हा होणे नाही !!

    मर्यादा पुरुषोत्तम दशरथी राग ! प्रभुरामचंद्रांनी आपल्या पित्याच्या राजा दशरथाच्या वचनपूर्तीसाठी आणि कैकयी मातेच्या इच्छापूर्तीसाठी ----- आज्ञा शब्द शिरोतार्थ ठेवुन बारा वर्षे वनवास स्विकारला! आई-वडिलांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारं असं पुरुषोत्तम व्यक्तीमत्व होणे नाही. मला कैकयी जरी सावत्र माता असली तरी माताही माताच असते, ती कधीच सावत्र नसते! माय- पित्याच्या आज्ञेचा, सेवेचा उचुंग अन् उल्लेखनीय मापदंड प्रभु रामरायानं जगासमोर ठेवला.

    भक्त पुंडलिक ! आई-वडिलांची मनोभावे सेवा हीच ईश्वर सेवा हीच प्रभुसेवा - या शाश्रत संकल्पनेचा सर्वोत्तम उदाहरण. असा भक्त होणे नाही.

    आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करण्यांत तो रममाण होत असे, तल्लीन होत असे, एकचित्त होत असे, आई-वडिलांची सेवा करीत असतांना त्याच्या मुखांतुन विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरु होता. देहभान विसरुन सेवावृत्ती अवस्थेत नामस्मरण सुरु होते भगवंताला आपल्या भक्तीची परीक्षा घेण्याची लहर येते ------ साक्षांत विठ्ठ्ल पुंडलिकाच्या दारासमोर येऊन उभा ठाकला. क्षणभर थांबून विठ्ठल माऊली म्हणाली.

    “पुंडलिका, बाळा ये, तुझ्या भक्तीभावानं मी तुजवर प्रसन्न झालो आहे. ये माझ्या भेटीला ये!”
    त्यावर भक्त पुंडलिक विनम्रपणे वदला
    “पायचेपितो माय-पित्याचे,
    करु द्या ही चाकरी।
    विठ्ठला, उभे रहा तोवरी ।।

    असं म्हणून जवळच असलेली वीट, पांडुरंगाकडे सरकवली,
    भगवंत तेव्हा पासुन उभे आहेत.

    युगे अठ्ठावीस
    कर ठेवुनि कटिवरी,
    उभा विठ्ठल विटेवरी।

    अज्ञा नानाविध कथांमधून आणि दाखल्यांतून आई-वडिलांची महती वर्णन करण्यास शब्द थिटे पडतात, वाणी अपुरी पडते माता पित्यांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. मनापासून आई-वडिलांची सेवा केल्यास, आपल्या हातून घडल्यास वेगळी भगवत् प्रसाद हीच ईश्वर सेवा होय, आई-वडिलांची सुयोग्य सेवा हीच ईश्वर प्राप्तीची गुरु किल्ली.

    मुलांच्या मनांत, अंतरंगांत उत्तमोत्तम विचार रुजविण्याचे बिंबवण्याचे काम आई-वडिल निश्चितपणे करीत असतात. मनापासून केलेल्या गोष्टीला, उशिरा का होईना प्रतिसाद मिळतोच असा माझा अनुभव आहे.

    वडीलधार्‍यांविषयी आदर, आई-वडिलांविषयी आपुलकी, प्रेम, थोरामोठ्यांची कदर, मानसन्मान आणि संतांविषयी पूज्यभाव आधि पैलुंची जाण देण्याचे काम आई वडिलांनीच करावयाचे असते. नैतिक अधिष्ठानचा उगम माय-पित्यापासून होतो हे सत्य आहे, नाहीतर संत कबीराच्या ओव्या प्रमाणे

    “बोया पेड बाबुल का, आम कहॉ से आया ”

    अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही, उत्तमपेरा, उत्तम उगवेल यांत शंकाच नाही. सर्वांभूती ईश्वर पाहण्याची दृष्टी थोडीफार का होईना देतां आली तरी खूप झाले अशा तर्‍हेचे “सामाजिक व्हॅलेंटाईन डे” वरचेवर साजरे झाल्यास बातमी निर्माण होण्यास -------- हातभार लागले.

    मुलुंड (पूर्व)
    १३-०२-२०११

    -- गुरुदास / सुरेश नाईक

  • विंदांच्या १५ व १९ शब्दांच्या बालकविता..

    विंदाच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. या बालकविता मोठ्या माणसांना अधिक प्रगल्भ करतात.

    मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची सर्कसवाला ही दीर्घ कविता तर मास्टरपीस आहे. या कवितेची शैली इतकी चित्रमय आहे की वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोरून एक चित्रपटच सरकू लागतो. या कवितेतून विंदांनी मुलांचं भावविश्व अलवारपणे उलगडलं आहे. दोस्ती, प्रेम, असूया,जिव्हाळा आणि असाह्यता या भावभावनांचा गोफ या कवितेत असा घट्ट विणला आहे की कवितेचा शेवट जसजसा जवळ येऊ लगतो तेव्हा व्याकूळ होणारी मुले मी पाहिली आहेत.

    विंदाच्या बालकविता मुलांसोबत वाचताना मी अनेकवेळा मुलांशी त्याबाबत बोलत असे. मुले कविता ऐकल्यानंतर त्यांना खास भावलेल्या त्यातल्या गोष्टी सांगत,'हे असं का असेल' असा विचार करुन आपलं वेगळं मत मांडत असत पण खरं म्हणजे मला मुलांकडून त्यावेळी एक 'मास्टर की' मिळत असे. त्या मास्टर की ने मी विंदांच्या बालकवितेतली अनेक कुलुपं उघडली आहेत.

    'अजबखाना' या कविता संग्रहातील दोन अगदी लहान कवितांमधल्या महान गमती मी तुम्हाला सांगणार आहे. या कविता आहेत फक्त १५ व १९ शब्दांच्या. पण या कवितांमधले अर्थ जेव्हा मला उलगडले तेव्हा मी पार बदलून गेलो. या दोन कवितांसाठी मी विंदंचा आजन्म ऋणी आहे.

    सही

    विठोबापुढे
    ठेवून वही
    उदयने मागितली
    त्याची सही.

    विठोबा म्हणाला
    त्याला मजेत,
    “देवांना नसतें
    लिहायला येत!”

    ही कविता ऐकताना मुले खळखळून हसतात. पण 'देवांना का लिहायला येत नसेल?' या प्रश्नावर मुलांशी बोलताना मजा येऊ लागली. मुलांसाठी देव हा देवबाप्पा असल्याने ती

    त्याच्या विषयी एकेरीतच बोलत होती. अचानक एका मुलाने मला प्रश्न विचारला, “पण आपण का लिहितो?” मी त्यावेळी त्या मुलाला काहीबाही उत्तर दिलं. पण त्या प्रश्नाचा भुंगा माझ्यामागे लागला. मी कविता पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. आणि असं वाटलं, आपण हिशोबी असतो म्हणून लिहितो. काही हिशोब ठेवण्यासाठी म्हणून लिहितो. मग पुढचा प्रश्न ओघाने आलाच. 'देव का लिहित नाही?' आणि या कवितेच्या संदर्भात त्याचं उत्तर ही मिळालं.

    'देवाचं मुलांवर बेहिशोबी प्रेम असतं, अपार प्रेम असतं म्हणून देवाला 'किती प्रेम आहे' हे लिहिता येत नाही. आपलं प्रेम ही व्यक्त करण्याची गोष्ट आहे, प्रेम ही अविरत सुरू असणारी कृती आहे. आणि प्रेमाचा हिशोब ही ठेवता येत नाही. खरं म्हणजे, प्रेम ही काही फक्त लिहिण्याची गोष्ट नाही. म्हणूनच विठोबा उदयला हे सारं 'मजेत' म्हणाला आहे, गंभीरपणे नव्हे, हे ही लक्षात घेतलं पाहिजे.

    मी मुलांवर अपार, अमर्याद प्रेम करायला पाहिजे. माझं मन मोठं करुन मी समोरच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे. माझ्या प्रेमाची जाणीव मी मुलांना मजेत करुन दिली पाहिजे, असं मला ही 'सही' कविता सतत सांगत असते.

    विंदांची दुसरी अगदी इटुकली कविता आहे, मावशी.”

    जेव्हा प्रथम ही कविता वाचली तेव्हा या कवितेत काही खास आहे असं जाणवलंच नाही. या कवितेत प्रचंड ऊर्जा दडली आहे हे आतपर्यंत भिडलंच नाही. या कवितेतला नाद आणि नातेवाईक मुलांना आवडत असावेत असंच वाटायंच मला. मुले ही भरभरुन दाद द्यायची या कवितेला. या कवितेत काकू आहे, आत्या आहे व मावशी आहे. कविता वाचल्यानंतर सहज एकदा मुलांना विचारलं,'या कवितेतली तुम्हाला काकू आवडते, आत्या आवडते की मावशी आवडते?ठ मी हा प्रश्न विचारला तेव्हा समोर किमान हजार मुलं दाटीवाटीने बसलेली होती. बाजूला दोन तीनशे मोठी माणसं. प्रश्न ऐकताच सगळी मुले एका सुरात ओरडली, `मावशी... मावशी....मावशी.. आवडली आम्हाला!'

    त्यावेळी मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं मोठं प्रश्नचिन्हं वाचता येत होतं. मुलांच्या चेहऱ्यावरून अपरंपार आनंद ओसंडून वाहात होता! मी तर अवाक झालो होतो!!

    ही १९ शब्दांची कवीता मी पुन्हा पुन्हा वाचली. मुलांसोबत अनुभवली आणि एकाक्षणी मला ते कोडं सुटलं! आपण आजपर्यंत काय चूक करत होतो, हे स्वच्छंपणे समजलं. आणि आता या क्षणापासून आपण काय करायला पाहिजे ते लख्खंपणे उलगडलं. ही कविता मला सदैव धीर देते. मला धाकात ठेवते. मूल समजून घेण्याचि माझी प्रेरणा सतत तीव्र करत राहाते.

    मावशी

    सोलापूरहून
    येते काकू;
    माझ्यासाठी
    आणते चाकू.

    कोल्हापूरहून
    येते आते;
    माझ्यासाठी
    आणते पत्ते.

    राजापूरहून
    मावशी येते;
    माझा एक
    पापा घेते.!

    'मुलांना मावशी का आवडत असावी?' या प्रश्नाचा अक्षरश: ध्यास घेतला. कधी मुलांशी तर कधी मोठ्यांशी पण याबाबत बोलत राहिलो. पण कोडं सुटत नव्हतं. पण जेव्हा हाच प्रश्न मी मलाच विचारला तेव्हा साक्षात्कार झाल्यासारखा तो प्रश्न सुटला.

    या कवितेतील काकू मुलासाठी चाकू आणते.या कवितेतली आत्ते मुलासाठी पत्ते आणते. पण या कवितेतली मावशी मुलासाठी काहीच आणत नाही. तरी हि सगळ्या सगळ्या मुलांना ही मावशीच आवडते!! कारण मोठ्या माणसांना असं वाटतं की आपण मुलांना काही दिलं तर आपण मुलांना आवडू. मुलांना खाऊ दिला, खेळणी दिली किंवा महाग वस्तू दिल्या तर आपण त्यांना नक्कीच आवडू. पण नाही!

    काकू चाकु आणते. आत्ते पत्ते आणते. पण या दोघी जणी मुलाशी बोलत नाहीत. त्याला जवळ घेत नाहीत. मुलाचा आत्मसन्मान जपत नाहीत९

    मावशी काही आणत नाही तर ती मुलाकडून घेते. मुलाचा मायेने, प्रेमाने पापा घेते. त्याला जवळ घेते. मावशी तिचं प्रेम तिच्या कृतीतून तिच्या स्पर्शातून व्यक्त करते. मुलाचा आत्मसन्मान ऊंचावते. मुले महागड्या वस्तूंची, खेळण्यांची किंवा खाऊची भुकेलेली नसतात तर प्रेमाचि भुकेली असतात. 'आपणाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून किंमत असावी' इतकीच माफक अपेक्षा मुलांची असते.

    आपण मुलांना 'देणारे' नव्हे तर मुलांकडून 'घेणारे' व्हायला पाहिजे तरच आपण मुलांचे होऊ, असं मला ही कविता सांगत असते. आपण मुलांची मावशी व्हायला पाहिजे, अशा धाकात ही कविता मला ठेवते.

    'ओळखीच्या किंवा अनोळखी मुलांना भेटल्यावर आपली कृती ही प्रेममयच असली पाहिजे, मी अधिकाधिक मन मोठं करुन समोरच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे' असं मला हे विंदांचे 15 व 19 शब्द सतत बजावत असतात,माझ्या भोवती फेर धरुनच असतात.

    आता सांगा, मी कसं म्हणू की विंदा गेले..? ते तर माझ्या सोबतच आहेत. मला मुलं कधीच एकटी भेटत नाहीत, त्यांच्यात दडलेले विंदा मला भेटतात ना! हा अजबखाना आहे!!

    - राजीव तांबे.

  • चारोळ्या

    काळी बायको (वात्रटिका)

    काळी तिरळी बायको लाभून,

    मिळाले खूप समाधान.

    कसे काय बुआ ? असे विचाराल

    तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून

    सारेच चोर (वात्रटिका)

    हासतात तुला वेड्या ते,

    पकडला गेलास समजून

    परि सहानूभूती आहे त्यांच्यात,

    चोर आहेस म्हणून

    माझी नोकरी (वात्रटिका)

    नकार देत होती माझ्या प्रेमाला,

    बघून, मी आहे एक बेकार

    जळत होते, जळत होते

    तिच्या विणा माझे शरीर

    सर्व शांत झाले आता,

    फायर ब्रिगेड नोकरी मिळता

    गर्दी पांगवीण्याची कला (वात्रटिका)

    गर्दी गर्दी गर्दी,

    सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी.

    गर्दीला पांगविण्याची,

    कला मला सापडली

    वही घेवून

    संग्रहातील कविता मी वाचू ला

    सिनेमाला चला (वात्रटिका)

    नको जाणे सिनेमाला,

    गर्दीचा आहे पहिलाच दिवस

    याच विचाराने थिएटर पडले ओस

    चला जावू सिनेमाला,

    आजच्या दिवशी शेवटी.

    निराशली मंडळी,

    बघूनी हाऊस फूल पाटी

    असंबधता (वात्रटिका)

    त्याला तपासण्यासाठी,

    नेले मेंटल हॉस्पीटलला

    की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला

    पण डॉक्टर संतापून म्हणाले

    तुम्हाला त्याची समज असावी,

    की तो आहे एक ‘नवकवी’

    चिठ्ठीवरला मजकूर (वात्रटिका)

    टेबलावर ठेवले होते

    बॉसने काहीतरी लिहून

    हाताखालच्या लोकांनी

    निरनिराळे अर्थ काढले त्यातून

    कुणास काहीच समजेना,

    म्हणून असिस्टटने केली विचारणा

    चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले

    मला काय म्हणावयाच होत तेव्हा,

    समजत नाही आता,

    ती आहे एक नवकविता

    मॉर्डन तरूण (वात्रटिका)

    अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे

    बसले एक टोळके गाडीत समोर

    हासत होते, खिदळत होते,

    गप्पा मारीत होते,

    ऐकण्यासारखे होते

    परंतु सांगण्यासारखे नव्हते.

    स्टेशन येताच सारे उतरले

    तेव्हा मी एकास विचारले

    “आपल नाव सांगता ?”

    उतरता उतरता ऐकू आले

    “ मी आहे मिस निता ”

    एक सुंदरी (वात्रटिका)

    बस मधून चाललो होतो मी,

    शेजारी होती जागा रिकामी

    येवून बसली जवळ एक सुंदर,

    चंचल तरूण बालीका

    तिला बघून मनाची खुलली कलीका

    तरीही मी एका क्षणांत

    माझी जागा बदलली बरका

    कारण ती हासत मुरकत म्हणाली

    “ थोडस, सरकत का तिकडे काका ? ”

    १० चिंगीचे ज्ञान (वात्रटिका)

    बाई शिकवी चिंगीला ‘त’ ला काना ‘ता’

    चिंगीचे सामान्य ज्ञान तीक्ष्ण,

    म्हणते कशी ‘तांबीतला ता’ न बाई

    ११ बाबाची आई

    एक होती म्हातारी,

    ती सर्वांना धारेवर धरी

    उपास तापास नी सोवळ ओवळ

    त्रस्त केल तीन घर सगळ

    तिच्यापुढे चालेना कुणाच काही

    कारण ती बाबांची होती आई.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • साहित्याचा जनमानसावर परिणाम

    साहित्याचा जनमानसावर परिणाम ‘जो वाचेल तो वाचेल’ ही म्ह्ण आपल्या मराठीत वारंवार वाचायला ऐकायला मिळते. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील का असेना जनमानसावर त्याचा परिणाम हा दिसतच असतो. अगदी अशिक्षीत माणसावरही त्याचा परिणाम होत असतो कारण अज्ञानी निरक्षर माणूसही सल्ला मागायला कोणाकडे जातो ? ज्याला साहित्याची जाण आहे ज्याचा प्रचंड अभ्यास आणि वाचन आहे अशा माणसाकडे. पूर्वी आपल्याकडे सुशिक्षीत माणसाला चार बुके शिकलेला माणूस म्ह्णून संबोधले जायचे. चार पुस्तके वाचलेला माणूस ज्ञानी, सज्ञानी,सुसंस्कृत आणि सभ्य असतो हे काही काळापूर्वी पर्यंत गृहीतच धरलं जायचं. पण आता ते चित्र बदललय कारण आता बाहुसंख्य लोक सुशिक्षीत झालेत त्यामुळे आता कोण काय वाचतो यावरून तो कसा आहे हे ठरत असत.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते आपल्या देशाला शिकलेल्या लोकांपेक्षाही शीलवान लोकांची जास्त आवश्यकता आहे. आजचे साहित्य आजच्या पिढीत ते शील निर्माण करण्यास सक्षम आहे का ? या प्रश्नाच्या उत्तरातच बरंच काही दडलेले आहे. साहित्याचा जनमाणसावर परिणाम होतच असतो पण तो एक सारखा नसतो. कधी तो चांगला वा वाईट असतो, तात्पूरता, दीर्घकाल टिकणारा अथवा अनंत काळापर्यंत टिकणारा ही असू शकतो.

    जोपर्यंत मानव या पृथ्वीच्या पाटीवर आहे तोपर्यंत आता साहित्य निर्मिती होत राहणारच हा ! साहित्याची भाषा त्याचे विषय आणि ते माणसापर्यंत पोहचविणारे माध्यमे मात्र बदलणार पूर्वी फक्त पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य पोहचायचे त्यानंतर संगणकाच्या आणि आता मोबाईलच्या आणि भविष्यात आणखी कशाच्या माध्यमातून माध्यमे बदलत राहतील पण साहित्याचा जनमानसावर परिणाम होतच राह्णार.

    साहित्य हे समाजमनाचं प्रतिबिंब असतं. प्रत्येक माणूस त्यातूनच त्याला हवा तो, त्याला हवा तसा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगला वाईट बोध घेत असतो. आपला देश पारतंत्र्यात असताना जनमानसाच्या मनात स्वातंत्र्या बाबतची आस्था कोणी निर्माण केली, साहित्यानेच ना ? जगातील कोणतीही मोठी क्रांती साहित्याच्या माध्यमातूनच होत असते. फक्त लिखित साहित्य नाही तर अलिखित साहित्य ही कधी कधी जनमानसाठी प्रेरणादायी ठरत असते. आजही आपल्या देशात पौरणिक साहित्य लोकांना पापकर्मापासून दूर ठेवण्यास पुरक ठरत आहे. साहित्यच आहे जे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडून ठेवत असत. जर साहित्य नसत तर जनमानसाला भूतकाळ फक्त फुसटसा आणि तुटक तुकडया तुकडयात कळला असता.

    साहित्य निर्मिती कोणत्या मूल्याची होत आहे यावर वर्तमान समाजाच भविष्य ठरत असत अर्थात मानसाच भविष्य ठरत असत अर्थात मानसाच भविष्य वर्तमानातील साहित्यावर अवलंबून असत. साहित्य कित्येक पिढया घडवू ही शकत आणि बिघडवू ही शकत. साहित्याचा जनमानसावर होणारा परिणाम हा कधीही नसंपणारा विषय आहे हे नक्की...

    -- निलेश बामणे

  • तर्कतीर्थ

    विद्वत्ता माणसाला प्रतिभेसारखीच उपजत मिळत असते, तो एक सहज गुण आहे. विद्वत्तेला अध्ययनाने आणि अभ्यासाने विकसित करता येते आणि विद्वान व्यक्ती ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अध्ययनरतच रहात असते. त्या व्यक्तीच्या अवती भोवती विद्वत्तेचे प्रखर तेज प्रकाशत असते, पण तो विद्वत्सूर्य मात्र चंद्रासारखा शीतल आणि पिकलेल्या फळांनी फलभारित झालेल्या झाडाप्रमाणे अवनत रहातो.

  • जिवंत चित्र

    चित्रकला, आणि निबंधाच्या दरवर्षी आंतरशालेय स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडला जाई. यावर्षी रैनाच्या शाळेतून तिची निवड निबंध स्पर्धेसाठी झाली होती.
    रैनाला वाचनाची आवड आहे. तिच्याकडे गोष्टीची आणि वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं आहेत. तिचे आई बाब तिला वाढदिवशी खूप पुस्तकं भेट देतात. तिला चित्र काढण्यापेक्षा वाचायला, लिहायला अधिक आवडतं. रैनाने शाळेच्या मासिकात पण गोष्टी लिहिल्या होत्या.
    रैनाच्या शाळेने तिचे नाव दिल्लीला पाठवून दिले.
    रैना स्पर्धेच्या तयारीला लागली. निरनिराळ्या विषयांवर लिहिण्याचा सराव रैना करू लागली. वाचनालयात अधिक वेळ घालवू लागली.
    ही स्पर्धा दिल्लीत होणार होती. या स्पर्धेत भारतातील काही वेगवेगळ्या शाळांतील निवडक मुलेच भाग घेणार होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ देशातील प्रमुख चॅनल्सवर दाखवला जाणार होता.
    जोशी सरांबरोबर रैना दिल्लीला आली. 18 मजली काचेच्या प्रचंड मोठ्या इमारतीत ६०० मुलांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीतील ६ मजले चित्रकला स्पर्धेसाठ व ६ मजले निबंध स्पर्धेसाठी खास राखून ठेवले होते.
    स्पर्धेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत होती. त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार होता.
    स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता सर्व मुलं हॉल मधे जमली. मुलांच्या नावाची घोषणा होत होती व मुले आपापल्या मजल्यावर जात होती.
    त्याचवेळी एक घोटाळा झला.
    रैनाचं नाव चित्रकला स्पर्धेत जाहीर झालं. रैनाची तर घाबरगुंडी उडाली.
    जोशी सरांनी आयोजकांना विनंती केली पण त्याचा काही फायदा झाला नाही.

    अशावेळी कोण मदत करणार?
    आता प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने विचार केला.
    रैनाने डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला. मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत” त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“बोल रैना काय मदत कर? या सगळ्या मुलांची माकडं करुन टाकू? का हि काचेची इमारत वेडीवाकडी करुन टाकू?”
    रैना म्हणाली “असं काही नको रे.” मग रैनाने मनातल्या मनात त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली आता तूच मला मदत कर.

    “ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
    जोशी सर फारच भडकले होते. त्यांची समजूत काढत रैना म्हणाली,“सर काळजी करू नका. मी खूप चांगलं चित्र काढीन. आता पाहालंच तुम्ही!”
    सर्वमुले आपापल्या मजल्यावर पोहोचली. प्रत्येकासाठी जागा राखून ठेवलेली होती.
    रैनाने मोठा पांढरा कागद घेतला. तिला विषय मिळाला होता “पावसाळ्यातील गमती जमती.” काय करावं बरं? असा विचार करत असतानाच पेन्सिलीने टुणकन उडी मारली, तिच्या बोटात जाऊन बसली. तिचा हात हलू लागला. पेन्सिल कागदावर फिरू लागली. चित्रं कागदावर दिसू लागलं. अजून काही मुलं खाडाखोड करत होती, तर काही विचारच करत होती. अकरा मिनिटात रैनाचं चित्र काढून पूर्ण झालं.

    “रस्त्यावर पाणी तुंबल्याने गाड्या व बसेस पाण्यावर तरंगत होत्या. मुले मस्त खेळत होती. पोहत होती. गाडीवर चढून पाण्यात उड्या मारत होती. मुलांनी कुठल्यारी वेगळ्याच फॅशनचे कपडे घातले होते. पाण्यात एक छत्री उलटी झाल्याने तिची होडी झाली होती. त्या छत्रीच्या होडीत मांजरीची दोन पिल्लं आइस्क्रीम चा कोन खात बसली होती. त्या होडीच्या दांड्यावर चष्मा घातलेला एक हिरवा बेडूक चॉकोबार खात बसला होता.” इतक्या कमी वेळात इतके सुंदर चित्र काढलेले पाहून तेथील शिक्षक खूश झाले. त्यांनी रैनाची पाठ थोपटली.
    आता हे चित्र रंगवायचं होतं. तिथेच एका मोठ्या टेबलावर वेगवेगळे रंग, लहान मोठे ब्रश, पॅलेटस्, पाण्याच्या बाटल्या, बाउल्स असं सर्व सामान ठेवलेलं होतं.

    रैनाने बसल्या जागेवरुनच तिथे पाहिलं. आणि तिला हवं असणारं सर्व सामान तिच्या टेबलावर आलं. रैनाच्या टेबलावर आपोआप सामान प्रकट होताच तिच्या बाजूच्या टेबलावरचा मुलगा क्षणभर दचकलाच! रैनाला कळत नव्हतं.. कसं रंगवावं? कुठल्या रंगात कुठला रंग मिसळावा?कशासाठी कुठला ब्रश वापरावा? काय करावं? रैना विचार करत बसून होती. तिला काही सूचत नव्हतं. तिला पण हे कळेना, की आपलं प्रेमळ भूत गेलं कुठे? ते का नाही रंगवत आपलं चित्रं? खूप वेळ नुसतं बसून तिला कंटाळा आला. तिने ब्रश घेतला रंगांत बुडवला आणि तो चित्रावर घासायला सुरुवात केली. पण कमालच झाली. चित्रावर रंगच लागेना. तिने पुन्हा प्रयत्न केला. रंगात पाणी मिसळलं. ब्रशवर भरपूर रंग घेतला आणि तो ब्रश कागदावर फिरवला.

    पण ब्रशवरचा रंग कागदावर उतरलाच नाही. कागदावरचे चित्र रंगेच ना..! आता मात्र रैना चांगलीच घाबरली. तिला वाटलं आता आपण फेल! तिने मनातल्या मनात प्रेमळ भुताला हाक मारली. त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“अगं मी चित्रं रंगवूनच ठेवलंय. हे आमच्या भुतांचे स्पेशल रंग आहेत.”
    “म्हणजे?”
    “अगं आम्ही हे रंग जीवंत घुबडाची बुबुळं, गरुडाचं रक्त, वाघाची चरबी, सापाची जीभ आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे डोळे एकत्र कुटून तयार करतो. हे जीवंत रंग आहेत!! यांना सुकायला थोडा वेळ लागतो. तासाभरात हे रंग सुकले की पाहा काय चमत्कार होतो ते..?! या रंगांनी चित्र रंगवलं तर चित्रसुध्दा जीवंत होतं!! खरंच!!
    अपना तो, ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
    रैनाने चित्रं झाकून ठेवलं आणि ती इतरांची चित्र पाहात हॉलमधे फिरू लागली. बाकिचि मुले माणसांनी तयार केलेले पचपचीत रंग वापरुन चित्र रंगवत होती.
    तासाभरात रैना परत आली. झाकून ठेवलेलं चित्रं तिने सावकाश उघडलं.. तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आता ते चित्र काही वेगळंच दिसत होतं.
    त्य चित्रातलं पाणी खरं होतं. त्या चित्रातलं आइम खरं होतं. त्या चित्रातली मुलं खरोखर पाण्यात उड्या मारत होती. आणि मुलांनी पाण्यात उड्या मारल्यावर चित्रातून पाण्याचे तुषार बाहेर उडत होते. त्या तुंबलेल्या पाण्यात खरोखरीच गाड्या व बसेस तरंगत होत्या!!!
    रैना अवाक झाली! तोंडावर हात ठेवून ती म्हणाली,“ओऽऽह ऑसम!!”
    इतक्यात बेल वाजली. स्पर्धेचा वेळ संपला होता!
    परदेशातील तीन मोठे चित्रकार परीक्षक म्हणून आले होते. मिस्टर जॉन टँगोटा, मायकेल फेरी व मिसेस अॅना क्रू. त्यांच्या समोर देशातल्या निवडक ३०० मुलांनी काढलेली चित्रे ठेवली होती. हे सगले थक्क होऊन चित्रं पाहात होते.
    इतक्यात जॉन यांचं लक्ष रैनाच्या चित्राकडे गेलं. त्यांनी चित्र हातात घेतलं व सहज गंमत म्हणून त्या बेडकाला हात लावला. त्याक्षणी ते बेडूक चिरक्या आवाजात म्हणालं,“आय वाँट डराँव डराँव, चॉकोबार चॉकोबार, डराँव डराँव”
    मायकेल व अॅना जॉनकडे पाहून जोरजोरात हसू लागले.
    जॉन ने ते चित्र घाबरुन अॅनाकडे दिलं. अॅनाला त्या चित्रातली मांजरं खूप आवडली. तिने मांजरांना हात लावताच ती मांजर लाडात येऊन म्हणाल,“हॅलो चोर चिम चिम, गिव्ह मी मोर आईस्क्रीम.”
    अॅनाने घाबरुन चित्र खालीच ठेवलं. तिचा चेहरा घाबरुन लाल-निळा झाला.
    अॅनाचा हा आवाज ऐकून, आता सगळेच हसायला लागले.
    “ही मुलांची चित्र पाहताना कोण कुठले आवाज काढेल काही सांगता येत नाही” असं म्हणत मायकेल यांनी रैनाचं चित्र हातात घेतलं.“काय सुंदर रंग आहेत. पाणी तर खरं वाटतंय.या चित्रात खरा जीवंतपणा आहे.”

    इतक्यात त्यांना जॉन चा धक्का लागला. त्यामुळे चित्रातली तरंगणारी बस थोडी पुढे सरकताना मायकेलने पाहिली. मायकेलचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना.
    “या देशातली मुले ग्रेटच आहेत” असं मायकेलने म्हणताच बाकी दोघांनी टाळ्या वाजवल्या.
    संध्याकाळी रिझल्ट जाहीर झाला, तेव्हा रैनाच्या समोर देशभरातल्या टि व्ही चॅनल्सनी, फोटोग्राफर्सनी एकच गर्दी केली. जगातल्या सगळ्या लोकांनी तिचं चित्रं पाहिलं.

    तुम्हाला काय वाटतं, रैनाला बक्षीस मिळालं असेल? का? कुणामुळे?
    प्रेमळ भुताला न भिता कळवा. त्याला इमेल करा. प्रेमळ भूत तुम्हाला नक्की उत्तर देईल. प्रेमळ भूत तुमच्या इमेलची नहमी वाट पाहात असतं

    -राजीव तांबे

  • आनंदाचा क्षण आणि ….

    त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.

    त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. असे हसता काय, बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्या सारखी. आता तुला मैत्रीण मिळाली, तुम्ही दोघी मिळून माझ्या डोक्यावर किती मिरे वाटणार या कल्पनेनेच मला हसू आले. बायको म्हणाली, तुमच्या जिभेला काही हाड... 'नाहीच आहे, हो न परी', म्हणत तो जोरात खळखळून हसला. त्याचा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण.

    तो बेंच वर वार्डच्या बाहेर बसला होता. एक वयस्क बाई त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याला विचारले, क्या हुआ 'काके'. 'लक्ष्मी आई है घर में', तो उतरला. ते ऐकून तिचा चेहरा काळवंडला, त्याच्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करत म्हणाली, चिंता मत कर काके, अगली बार लड़का होगा. तिचे सांत्वन करणारे शब्द ऐकून त्याचे डोके सटकले 'मला मुलगी झाली, मी खुश आहे, हिला कशाचे दुःख'. चांगले सुनावले पाहिजे हिला. पण तो थबकला. दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती. अद्याप हि सासरहून कुणी ही भेटायला आले नव्हते, तिचा नवरा सुद्धा.. ..

    (काके = पोरा (मुलगा))

  • लेखकांची व्यथा…

    लेखकांची व्यथा एक लेखकच बर्‍यापैकी मांडू शकतो पण त्यासाठी तो हाडाचा लेखक आणि किंचित साहित्य वेडाच असायला ह्वा ! श्रीमंतीत जन्माला येऊन चांदिच्या ताटात सोन्याच्या चमच्याने पंच पक्वान खाऊन लेखक झालेला लेखक लेखकांची व्यथा कशी मांडू शकणार ? लेखक म्ह्णून जन्माला आलेला आणि प्रसिद्धीसाठी लेखक झालेला यांची व्यथा वेगवेगळी असते. लेखकांच्या घरातील लोकांच्या नजरेत दारुड्या आणि तो लेखक यांच्यात काही फरक नसतो ही लेखकाची सर्वात मोठी व्यथा असते. बहुसंख्य लेखकांना आपण लेखक का झालो ? या प्रश्नाचे जगाल पटेल असे उत्तर देणे अवघड जाते ही दुसरी व्यथा. आजही तू काय करतोस ? हा प्रश्न आपल्या देशातील लेखकाला विचारला तर तो छाती फुगवून सांगत नाही की मी लेखक आहे, मग तो मी चित्रपटासाठी, नाटकासाठी, वर्तमानपत्रासाठी अथवा टेलिव्हिजनसाठी लिहतो असं उगाचच मनात नसतानाही जोडून सांगत असतो म्ह्णजे त्यांच्या लेखक असण्याला वजन प्राप्त होते. ही आणखी एक व्यथा.

    एखादा तरूण लेखक आहे म्ह्णून त्याच्याशी लग्न करायला तयार असणारी स्त्री एक तर लेखक असायला हवी नाहीतर वेडी ! ही पुरूष लेखकांची आणखी एक व्यथा आहे. आपल्या देशात अनेक नामवंत लेखक आहेत ज्यांना आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित होण्यासाठी दहा- बारा वर्षे वाट पाहावी लागली इतकी वाट पाहायला लागणे ही ही एक व्यथाच आहे. या व्यथे पासून सुटका करून घेण्यासाठी काही लेखक पै-पै गोळा करून, इतरांची मदत घेऊन प्रसंगी कर्ज काढून स्वःखर्चाने आपली पुस्तके प्रकाशित करून घेतात. त्यांचे आयुष्य संपले तरी त्या पुस्तकांच्या ह्जार प्रती काही संपत नाहीत आणि संपल्या तरी त्या फुकट वाटून संपलेल्या असतात. या सगळ्यात आपला वेळ आणि पैसा तर वाया गेलाच पण प्रसिद्धी ही मिळाली नाही ही व्यथा आयुष्यभर त्यांचा पिच्छा सोडत नाही. कित्येक लेखकांना आपण इतके चांगले लेखक असूनही आपल्याला प्रसिद्धी, मानसन्मान, पुरस्कार का मिळाले नाही ही व्यथा सतावत असते. प्रत्येक लेखकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी हा प्रश्न पडतोच की आपण लेखक होऊन काही चूक तर केली नाही ना ?

    लेखकाची सर्वात मोठी व्यथा ही असते की प्रत्येक वेळी त्याला फक्त मानधनच स्वीकारावे लागते त्याचे मूल्य तो नाही तर इतर ठरवतात. लेखकांची ही बोली लागेल असा दिवस कधीतरी या देशात उजाडेल का ? हा प्रश्न प्रत्येक लेखक स्वतःला विचारत असतो आणि अधिक व्यथीत होत असतो. लेखकाचे मूल्य अमूल्य असते आणि ते अमूल्यच राहते देर्दैवाने ही एक व्यथाच आहे.

    -- निलेश बामणे