निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते ।
दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।।
अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया ।
लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।।
उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल ।
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।।
भरेल भांडे काठोकाठ , केवळ धरता योग्य दिशेने ।
टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची, अशीच केवळ शुद्ध मनानें ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझं-माझं आयुष्य
आहे एक पिंपळपान
वार्धक्याच्या उंबरठ्यावर
शरीर झाले जाळीदार....
भुतकाळात शिरलो की आपण दोघे क्षणार्धात
याच पिंपळ वृक्षाखाली
बसलो होतो तासनतास....
तारुण्यातली रग होती
जगण्यातली धुंदी मोठी
सुखी संसाराच्या सारीपाटावर पडली दानं खोटी होती.
पानगळीच्या ऋतूत पानगळ झाली
जवळ तेवढी फांद्यांची
जाळी तेवढी शिल्लक राहिली
वहीतलं पिंपळपान
तुझं नी माझं
गीत गात हलकेच
पण जाळीतून निसटून जातो
म्हणूनच म्हणतो सखे
तुझं माझं आयुष्य
एक पिंपळ पान ....
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
आला, आला, आला श्रावण
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,
या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई,
तेथ कुणाची कल्पकता १
धगधगणारे अंगारे हे,
जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी,
येईल कधी का समज २
मर्मा वरती घाव बसता,
सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे,
हलके हलके जाती मिटूनी ३
त्या दुःखीताला जाणीव असते,
जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो,
इतर जणांच्या काळजाशी ४
सुख दु:खातील दु:ख आधीक ते,
पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी,
दु:खी अनूभवी धाव घेई ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं
सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,
भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,
काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,
अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा
शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,
खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,
खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रोजच येतो फोन उन्हाचा
पण नंबर अननोन उन्हाचा
घड्याळातल्या काट्यांसोबत
बदलत जातो कोन उन्हाचा
वसंतपंचम वाटत नाही
हा तर काळी दोन उन्हाचा
शोधत आहे घर कौलारू
छोटासा चौकोन उन्हाचा
स्फोटक वातावरण केवढे !
कुणी प्रसवला क्लोन उन्हाचा ?
चटका-चटका वेगवेगळा
जो न उन्हाचा, तो न उन्हाचा
- ॐकार
बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“
पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा .
मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा
दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा .
तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे
तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे .
असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी
पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी .
ठावकी मज, ओढणीची गरज कां तुज पडतसे
जतन मागे निजहृदय अन् हृदय माझेंही असे .
कबुल आहे, घेतलें चुंबन तुझें, झाला गुन्हा
दे सजा, मी सिद्ध आहे चुंबना-आलिंगना .
स्वाद ओठांचा सखीच्या चाखतो गर्दीत मी
ती जिथें बाळास चुंबी, तेथेंच ठेवी ओठ मी .
घायाळ नजरेनें करुन पोटिस स्मिताचें लावसी
इजा-इलाजहि स्वत:च करणें, अजब पॉलिसी तुझी अशी .
स्वयपाकामधि ”दगडफूल” हें नांव ऐकुनी मजाच वाटे
सखि जरि कोमल, हृदय दगडासारखे, मज सजाच वाटे .
तीर निशाणावर लागावा म्हणुन शिकारी मिटतो डोळा
आतां कळलें, युवक आजचे, युवतीही कां ”मारत डोळा” .
बरें असतें जहालें जर तुझा रुमाल मी असतो
कधी तो स्पर्शतो ओठां, कधी हृदयाजवळ बसतो.
सुभाष स. नाईक
असा आहे ना … माझा …
भारत महान, माझा भारत महान … १
माझ्या भारतात ना ….
(काही अपवाद वगळता)
लायक व्यक्ती निवडून येतात … २
माझ्या भारतात ना ….
लायक माणसं नेते बनतात … ३
माझ्या भारतात ना ….
लायक लोक, शिक्षण नसतांना मंत्री बनतात …४
माझ्या भारतात ना ….
लायक लोकांना लठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळतात … ५
माझ्या भारतात ना ….
लायक लोकांना बँकेतून मोठमोठी कर्जे मिळतात … ६
माझ्या भारतात ना ….
लायक लोकांच्या कंपन्यांना, मोठमोठी सरकारी कंत्राटं मिळतात … ७
माझ्या भारतात ना ….
लायक लोकांना सरकारी अनुदानं आणि सुविधा मिळतात … ८
माझ्या भारतात ना ….
लायक लोकांनी आयकर भरला नाही तरी चालतो … ९
माझ्या भारतात ना ….
लायक लोकांना राखीव भूखंडांचं श्रीखंड मिळतं … १०
असा आहे ना … माझा …
भारत महान, माझा भारत महान … ११
-- गजानन वामनाचार्य
कुणी असे कोणी तसे,
कित्येक काही ठरवतात,
मध्येच काय मग बिनसते,
सगळेच डाव मोडतात,--!!!
कोण येते आणिक आपुली,
जादू करुनी जाते,--
नाम तिचे असते नियती,
नियत ते परास्त करते,--!!!
ठरवून गोष्टी बिघडती,
आकस्मिक बसतात धक्के,
एकदम मग कोण कसे,
माणसास कळून चुके, --!!!
राजकारण,अनीतीअन्याय,
किती गोष्टींचे आपण बळी,
सत्तालोलूप मदांधांमुळे,
जनता चिरडली जाई खरी,--!!!
पैसा एक मुख्य कारण,
नाती सडती त्यामुळे,
प्रेमातही कठोर व्यवहार,
केला जातो त्या कारणे,--!!!
नियती गालात हसते,--
जेव्हा सुख एखादे पदरी,
थोडे थांब ती म्हणते, -
दाखवते तुज किमया सारी,-!!!
- व्यक्तिगत, सामाजिक,
आर्थिक अशी किती संकटे, मनुष्यमात्र तिच्यापुढे भोगी,
करत करत सारखी दुष्कर्मे,---!!!
अहंता, स्वार्थ, भांडणे,
किती तिचे सेवक असती, बघता-बघता ताबा घेऊन,
तुम्हाला लोळवून टाकती,--!!!
प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी ज्यांना कधीच कळत नाही,
नियती तिथे फासे टाकी,
कोपर्यात बसून गंमतपाही--!!!
हिमगौरी कर्वे.©
Copyright © 2025 | Marathisrushti