जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं
विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।
बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना
देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।
काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती
परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।
प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी
पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विसरून गेलो सारे कांहीं,
आठवत नाही मला,
रचली होती एक कविता,
त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं,
दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं,
शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गावूनी खाणेंपिणें,
सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें,
कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होवून गेले काव्य,
अमर राहिले आतां ते,
प्रसंग जरी तो मरून गेला,
कविता जिवंत राहते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला
प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला.....१,
जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती
धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती...२,
हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी
ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी....३,
वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे
उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे....४.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
का असे जगणे होते,
भलतेच कधी जीवघेणे,
वेदनांचे उठती टाहो,
आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे,
सहावे कुठवर, सोडून द्यावे,
जखमी घायाळपण लपवावे,
कोण त्राता, कोण करविता,
संभ्रमी सारे जीव पडावे,
अगदी अनाकलनीय ना,
आपल्या आयुष्याचे कोडे ,
त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,--!!!
संयम, नि संतुलन किती,
जागोजागी का दाखवावे,
माणूस म्हणून जगणे मग,
शेवट यंत्रवतच"" बनावे, ---
कुठे जातात सगळ्या,
भावना,अन् संवेदना,
जसे या जीवनारण्यी,
ठेचकाळतच फक्त हिंडावे,
माया ममता प्रेम आस्था,
वागणे का असे नसावे,
उथळ, स्वार्थी वरपांगी,
पुरते आयुष्य असेच जावे,--?
लावावा जीव कुणाला,
पदरी येते फक्त फसवणे, तोंडावरती गोड बोलती,
प्रत्यक्षात काही वेगळे,--!!!
ताणतणांवा सीमा नसे ,
दुनिया कशी वेगळे टोचे,
जखमा आणखी खोलत,
वर मीठ चोळण्यां काहीसे, समस्यांना सीमा नसतां,
दोष तरी कुणाला द्यावा,-?
हेच आपले प्राक्तन म्हणत,
--- आहे तेच स्वीकारावे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी ।
अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।।
शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास ।
ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।।
पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची ।
शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।।
देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर ।
समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।।
शोधामध्यें चिंतन करतां, ध्यान परी लागते ।
समाधी स्थितीत येतां प्राण, अनंतात मिसळते ।।
नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे ।
विश्वमंडळ तोच असतां, शोधू तयास कोठे ? ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
"अर्थ"
चांदण्याही विझलेल्या
चंद्रही जणू निजलेला
सावळले नभ सारे
गाती वाहते वारे
------------------तू कुठे?!!१
थेंब थेंब शिडकावा
कुठूनसा हळु व्हावा
वाऱ्याच्या कुणी पाठी
झाडे का झिंगताती
---------------------तू कुठे?!!२
कसली ही झाली नशा
धुंद जशा दाही दिशा
पंखाविन तरल तनु
अवकाशी झेप जणु
---------------------तू कुठे?!!३
जिवनाचा अर्थ नवा
चराचरा उमगावा
या हळव्या क्षणी जरा
स्पर्श हवा प्रेमभरा
--------------------तू कुठे?!!४
-- ..... मी मानसी
ठाऊक नव्हते कालपावतो
नांव तुझे आणि गांवही
क्षणांत जुळले अचानक परि
नाते आपुले जीवनप्रवाही
उकल करितो जेंव्हां ह्याची
ओळख पटते माझ्या मनां
तेच रुप अन तीच मूर्ती
पूर्व जन्मीच्या खाणाखुणा
असेल हे जर ऋणानुबंद
आणेल एका छायेखालीं
साथ देऊन अनुभऊ
सुख दुःखे ही जीवनातली
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हा न्याय आंधळा, ती प्रीत आंधळी
धन सत्य न्यायदा, धन सत्य प्रीती।।धृ।।
या युगी धनी ज्येष्ठ वडीलधारी
जगी गुणी,निर्धन कनिष्ठ होई
मंदिरात, धनिका दर्शन आधी
निर्धनास, दर्शनही दुर्लभ होई ।।१।।
कलियुगाची हीच रित असली
कुठली नाती अन कुठली प्रीती
कोण ते जन्मदाते, बंधुभगिनी
सखी, संतती कर्तव्याची नाती ।।२।।
जो तो हवा तसा धावत सुटला
विवेक सारा धनसंचयी गुंतला
प्रेमभाव सारे, मातीमोल झाले
भोगवाद, भोगूनी तोषली वृत्ती ।।३।।
दानपात्रे बेगड्या दातृत्वी भरली
कल्पना वृद्धाश्रमाचीच रुजली
प्रेम सोडुनी,सारेसारे इथे मिळते
मनुजा धनाने कबर तुझी खोदली ।।४।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २६.
२६ - १ - २०२२.
स्वातंत्त्र्यदिनानिमित्त
ढम ढमा ढम ढोल वाजवा ढोल
ढम ढमा गा सत्तरीचे बोल ।।
ढम ढमा सत्तरी हेंच अत्तर
हिनें मनांवर केला हल्लाबोल ।।
ढम ढमा ढम सत्तेचाळिसला
देशाला स्वातंत्र्य मिळे अनमोल ।।
ढम ढमा त्या स्वातंत्र्यासाठी
कितिकांनी प्राणांचें दिधलें मोल ।।
ढम ढमा ढम दशकांनी दो-तीन
आणिबाणिची अंधारी झांकोळ ।।
ढम ढमा ढम आदरणिय नेते
चरती, चरुनी बनती गोलमटोल ।।
ढम ढमा ढम सार्या जनतेचा
ऐकूं येतो कोणां ना कल्लोळ !
ढम ढम शंभरिही येईल, तरी
जनता नशिबा लावत राहिल बोल ।।
ढम ढमा अति सोशिक जरि जनता ,
किती भावनांचा राखिल समतोल ?
‘रामनाम सत’ देशाचें होतां
ढम ढम मनुजा, वाजवीत बस ढोल !
ढम ढम तरिही आशा नवी फुले
खचित जन नवे बदलतील माहौल ।
-- सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Copyright © 2025 | Marathisrushti