(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • सुखाची मोहमाया

    तप्त लोखंडात, लपली ती आग
    दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,

    सुंदर फूलात, सुंगध तो छान
    अवती भवती काटे, ते कठीण...२,

    विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
    झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,

    सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
    न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • थोडे अपयश, थोडी भरारी ठेव

    थोडे अपयश,थोडी भरारी ठेव
    मुबलक जमीन व थोडे आकाश ठेव

    सर्वोच्च शिखरा साठी हजार पायऱ्या ठेव
    जमिनीवर येण्या साठी
    मात्र एक घसरण ठेव

    आता कुठे तो देह अन
    आग बाकी आहे
    चर्चाच आता हजार बाकी
    तू आता माझ्या समीप आहे

    माझ्या वैऱ्या बरोबर
    नमस्कार राम राम राहू दे
    तूझ्या शहरात आता
    माझे एक घर राहू दे

    माझ्या पराजयचे कारण
    तूच राहू दे
    हे सत्य कुणा सांगू नकोस
    हा भ्रम आपल्यात राहू दे

    माझ्या हृदयातील हे डाग
    निसंकोच मिटवून दे
    जुन्याच एक दोन जखमा
    मात्र अंगावर राहू दे

    तुझ्या आश्रयात
    मला बेहोष राहू दे
    आता आपल्या देहात
    हा थकवा असाच राहू दे

    मूळ हिंदी गज़ल- ध्रुव गुप्त
    मराठी अनुवाद- विजय नगरकर

  • एक होती शाळा

    एक होती शाळा
    शाळेत होता फळा
    फळ्यासमोर मुले बसत
    असेच रोज वर्ग भरत

    शाळेचे एक होते मैदान
    चाले तिथे रोज घमासान
    खेळांचे मग डाव भरत
    दिवसा मागून दिवस सरत

    बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी
    रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी

    आता कसली शाळा
    आणि कसले मैदान
    कोरोना च्या धाका पाई
    मुले झालीत हैराण

    हात धु , मास्क घाल, हेच रोज ऐकू येतं
    अन मोबाईल हाती घेऊन, युद्ध त्यांचे सुरू होतं.

    -- भैय्यानंद वसंत बागुल.

  • सय माहेराची (ओवीबद्ध रचना)

    सय माहेराची येते
    मन झुलते झुलते
    क्षणात माहेरी जाते
    मी तिथेच रमते।।१।।

    आहे प्रेमाचे आगर
    तिथे मायेचा सागर
    घडे प्रितीचा जागर
    हा बंधू भगिनीत।।२।।

    हे केवड्याचे कणीस
    सुगंध रातराणीस
    बकुळ माळे वेणीस
    परसदार खास।।३।।

    मित्र मैत्रिणींचा मेळा
    जमतो ना वेळोवेळा
    झिम्मा फुगडीही खेळा
    हा मैत्रीचा सोहळा।।४।।

    आई माझी सुगरण
    करी पुरण वरण
    मिळे स्वादिष्ट भोजन
    अगत्याचे योजन।।५।।

    आठव साऱ्या साऱ्याची
    मनी पिंगा घालायाची
    अडसर संसाराची
    ओढ ही माहेराची।।६।।

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • सुखाचे मृगजळ

    धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला
    सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१

    मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,
    वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,

    आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे
    जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,

    खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत
    बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,

    दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं
    बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • शुभ दसरा ……………

  • त्यागवृत्ति

    जीवनाच्या सांज समयीं ।

    उसंत मिळतां थोडीशी ।।

    हिशोब केला स्वकर्माचा ।

    वर्षे गेली होती कशी ।।

    दिवसामागून वर्षे गेली ।

    नकळत अशा वेगानें ।।

    सुख दुःखाच्या मिश्रणीं ।

    जीवन गेले क्रमाक्रमानें ।।

    आज वाटे खंत मनीं ।

    आयुष्य वाया दवडिले ।।

    ऐहिक सुखाच्या मागे जातां ।

    हातीं न कांहीं राहीले ।।

    ' घेणे ' सारे आपल्यासाठीं ।

    करीत जीवन घालविले ।।

    ' देण्या ' मधल्या आनंदाला ।

    मन सदा वंचित राहिले ।।

    सुधारुन घे आतां तरी ।

    अनुभवाने चूक आपली ।।

    उर्वरित वर्षे जाऊं दे ।

    त्यागवृत्ति मध्यें सगळी ।।

    भोगातले सुख कसे ते ।

    क्षणांत येवून क्षणांत जाई ।।

    त्यागातील समाधान परि ।

    उशीरा लाभून सदैव राही ।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • प्रेम म्हणजे…..

    प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं
    प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं !

    प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं
    प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं !

    प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं
    प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं !

    प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं
    प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग गिळणं असतं !

    प्रेम म्हणजे अापल्या भावना अंतापर्यंत पाळणं असतं
    प्रेम म्हणजे स्मितातून नेमका विशाद गाळणं असतं !

    प्रेम म्हणजे अावडतीला परकी , पण सुखी पहाणं असतं
    प्रेम म्हणजे मिळालेल्या माणसाची अावड जपणं असतं !

    प्रेम म्हणजे मधुबालाचं निर्व्याज हसणं असतं
    अाणि.....
    प्रेम म्हणजे बायकोच अापली मधुबाला हे असणं असतं !

    कवी : उदय गंगाधर सप्रेम
    ठाणे

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेली कविता साभार प्रकाशित

  • पणजीचा पहिला मान

    गोरं गोरं पान फुला सारखं छान
    घरी येणार आहे आता गोडूल सान

    बाळाला आणायला बाबाची नवी गाडी
    गाडीत बसणार आज्जी आजोबाची जोडी
    गाडीची लकेर आणि सुंदर पाहून ती शान
    घरी येणार आहे गोडूल सान

    बाळाला घालायला रेशमी कुंची मी शिवणार
    बारीक मोत्याची सुंदर सुबक झालर लावणार
    कपाळावर येईलच मग सोन्याचे पिंपळपान
    घरी येणार आहे गोडूल सान

    बारश्याला दोन्ही घरचे गणगोत जमणार
    पाळण्यात वाकून वाकून सगळेच पाहणार
    बाळाला मांडीवर घेण्याचा माझाच असेल पहिला मान

    पणजी होऊ इच्छिणारी पणजीचे मनोगत

    -- सौ कुमुद ढवळेकर.

  • घाणे

    आधी मूळ धाडा
    अष्ट गणेशांना
    इच्छिल्या कार्याला शुभारंभ ।
    आधी मूळ धाडा
    बापुजी देवाला
    घरच्या कार्याला हातभार ।
    आधी मूळ धाडा
    कार्ला गडावरी
    बैसोनी अंबारी येई माते ।
    आधी मूळ धाडा
    सप्तश्रुंगावरी
    भगवतीची स्वारी येई कार्या ।
    आधी मूळ धाडा
    कृष्णेला वाईच्या
    मान आजोळीचा आहे तिचा ।
    आधी मूळ धाडा
    जेजूरी खंडेराया
    बहिणीच्या कार्या पाठी उभा ।