आईबरोबर भांडल्याशिवाय मला
चैन नाही पडायची
आणि तिच्या कुशीशिवाय मला
निज नाही यायची ||१||
कारण मी होते मुलगी आणि
ती होती आई
मी चांगली घडावे म्हणून
तीची सारखी घाई ||२||
आता मी झाले आई तेव्हा
कळून चुकलं सारं
आई म्हणजे झूळूक होती
नव्हतं नुस्त वारं ||३||
आईबरोबर भांडायला मला
मुळी आवडत नाही
पण तीची कुस मला आता
कुठं दिसतच नाही ||४||
प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत
ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच ती मिळते
प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशिबाचा
जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे
फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई
परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला
चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले
जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग
प्रभू असतो सतत तयार, ठरवा तुम्ही दया कशी घेणार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जगाला कधीच
न पडणारी कोडी
मला पडलीच नसती ...
ती कोडी सोडविण्यात
माझ्या आयुष्याची वर्षे
खर्ची पडलीच नसती...
भूत भविष्य वर्तमानाची भुते
माझ्या मानगुटीवर
कधी बसलीच नसती...
देवाच्या अस्तित्वाचा शोध
घेण्याची गरज मला
वेड्यागत भासलीच नसती...
माझी नजर फक्त सुखावर असती
तर दुःखाची धग मला
कधी लागलीच नसती ...
प्रेमातील वासना आणि
वासनेतील मुक्ती शोधली नसती
तर मला खरे प्रेम शोधण्याची
गरज कधी जाणवलीच नसती....
भल्या भल्यानां न सुटणारी कोडी
मला सहज सुटलीच नसती
निरर्थक जीवनातील निरर्थकता
मला कधी पटलीचं नसती...
भविष्याच्या उदरात शिरण्याची
माझी हिंमत झालीच नसती
भविष्यातील कोडी मला
स्पष्ट दिसलीच नसती...
माझ्या सभोवताली स्वैराचार
बोकाळला असताना
माझी समाधी लागलीच नसती ...
मी अज्ञानी असतो तर जगाला
उत्तरे देण्याची वेळ
माझ्यावर आलीच नसती...
माझ्या मेंदूत सारी
ज्ञानाची भंडारे नसती
तर अज्ञानात माझ्या भोवती
सुखे नांदली असती...
©कवी - निलेश बामणे
प्रदीप निफाडकरांची गझल
तुझ्यात जीव रंगला...
पाहता पाहता तिच्यात गुंतला...
शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला...
विमान सोडून बैलगाडीला भुलला...
मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला...
पांढरपेशा अचानक गावरान झाला...
स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला...
प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला...
कवी - निलेश बामणे
निघून जरी जाशी,---
मम आयुष्यातुनी तू ,
तरी सारखा मागे उरशी,
लपलेल्या अंत:करणी तू ,---
तीर जसा वेगे शिरतो,
घायाळ करत अचानक,
तसा तू बाण बनतो,
छेद आरपार देत,--!!!
तो जसा बंबाळ करी,
पर्वा ना त्याला कुठली,
कोण त्याला थोपवी,
न कुणी त्यावर मात करी,
तसेच तुझे घुसणे,--
मम हृदयी, आंत आंत,
कितीदा नव्याने पुन्हा जगावे मरणच पाहे अगदी वाट,--!!! मुखवटे सुखाचे घालून सगळे,
आता थकावयांस होते,-- मुखवट्यामागे काय दडले ते, कुणास काय ठाऊक असते,--? रात्रंदिन तुझे असे छळणे,
कुठवर मी आता सहावे,?
बरसात पोकळ सुखांची होता, त्यात किती कोरडे राहावे,--
तू स्वतःत नाहीस राहिला,
तितुका माझ्यात सामावला,---
दूर तरी कसे जावे,--
प्रश्न अनुत्तरीत राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे ©
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे,
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे ।।१।।
पोहणे जगणे कला असूनी,
अनुभव हा शिकवूनी जातो,
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो ।।२।।
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान,
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून ।।३।।
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।
राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।
नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।
आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।
दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।
सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू
विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं ।।
‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका
‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर अन् कृमि-कीटकां
‘ग’कार तव रक्षी गगनींचें प्रत्येकच पाखरूं ।।
संथ करत तव मंत्र-पठण, गायी ‘ॐ गँ गणपती’
नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती
कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष स्फुरूं ।।
शिशूमुखातुन भाषेआधी ‘गँ’ उच्चार फुटे
दर कंठीं निद्रेत, लयीनें ओंकारच उमटे
नाद-अनाहत मृत्युपथीं ‘गँ गँ’ लागे बहरूं ।।
गातें जग, तूं मातृ-पिता, सर्वस्वच गणदेवा
मित्र-बंधु तूं, तूं विद्या , तूं ओजस ज्ञानदिवा
ने मोक्षाप्रत, हे गजमुख पथदर्शक परमगुरू ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे ।
बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।।
लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा ।
उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।।
कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते ।
फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।।
दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी ।
केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत ।।
प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे ।
समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणाणे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti