(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • सासुरवाशिण

    सासुरवाशिण

  • हा मंच खास

    नमन असे हे माझे तुला
    आभार असो या विश्वाला
    तू असे गुणांची खाण
    तुला वर्णाया शब्दांची वाण
    तुझे कर्म जणू कर्तव्य
    तू जणू विश्वाची ठेव
    तू मायेचा आधार
    तू जणू भविष्याचे द्वार
    हरविलेल्या तुझ्यातल्या 'मी' साठी
    केला हा एक उपहास
    आनंद, उत्साह, सोहळा
    तुला तुझेपण जगाया
    व्यास क्रिएशन्स्ने
    केला हा मंच खास

    - अस्मिता निंबर्गी

    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

  • ती – माझी छत्री

    ती – माझी छत्री
    हल्ली असे होत नाही...
    मी घराबाहेर पडल्यावर ती माझ्या सोबत नाही...
    तिला माझ्या सोबत पाहून तो आलाच नाही...
    तिला पाहताच तो कोठे दडून बसला मला माहीत नाही...
    तो आल्याखेरीज तिच्या माझ्यासोबत असण्याला काही अर्थच नाही...
    तो आल्याखेरीज ती ही कधी मोकळी होत नाही...
    तो आल्यावर ती मोकळी झाल्याखेरीज राहात नाही...
    आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने मायेचा पदर धरायला ती विसरत नाही...
    तेंव्हाच मला तिची माझ्यासोबत असण्याची खरी किंमत कळल्या खेरीज राहात नाही....
    तो येतो तसा जातो... त्याच्या प्रेमात ओलीचिंब झालेली ती ही मग सुकल्याखेरीज शांत होत नाही...
    मी तर सुकाच असतो... तिच्यामुळे....
    पावसात भिजणार्‍या तिच्याकडे पाहात... ती भिजून ओलीचिंब झाल्याखेरीज मी काही जागचा हळत नाही...

    -- कवी- निलेश बामणे ( एन.डी. )

  • दुःख विसर बुद्धी

    कसे मानू उपकार, देवा तुझे
    देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे

    खेळ आहे जेथें, हार जीत आहे
    घर बांधणीते, पड झड पाहे

    असे जन्ममरण, ह्याच देहीं
    हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही

    एक दुःख येतां, मन होई निराश
    काळ पुढे जाता,विसरे ते सावकाश

    एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां
    जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां

    निसर्गाची रीत, दुःख तोची काढी
    करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी

    दुःख होते दुर, हेच आणिल समाधान
    दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान नागापूरकर

  • मुर्तीतल्या देवा

    मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव

    पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव ||

    मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव

    बाहेर समित्या साधती आपलाच डाव ||

    माणसाला किती रे ही संपत्तीची हाव

    नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव ||

    मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव

    विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव ||

    मनी नाही भाव तरी देवा मला पाव

    अशा भक्तांसाठी किती ही धावा धाव ||

    नाचती करुनी रे वेडेवाकडे हाव भाव

    भक्तांच्या ह्या भक्तीचा लागत नाही ठाव ||

    मुर्तीतल्या देवा कर न रे तू एक ठराव

    राखेल पर्यावरण शाबूत त्यालाच पाव ||

    रविंद्र कामठे

    २२ सप्टेंबर २०१५.

  • माझं काय, तुमचं काय,

    माझं काय, तुमचं काय,
    प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
    तिचं बोलणं, तिचं हसणं
    जवळपास नसूनही जवळ असणं;

    जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
    अचानक स्वप्नात दिसणं !
    खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
    माझं काय, तुमचं काय
    प्रेमात पडलं की असच व्हायचं !!

    केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
    डावा हात होता की उजवा हात होता?
    आपण सारखं आठवतो,

    प्रत्येक क्षण,
    मनात आपल्या साठवतो
    ती रुमाल विसरुन गेली !
    विसरुन गेली की ठेवून गेली?
    आपण सारखं आठवतो,

    प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
    आठवणींचं चांदण
    असं झेलून घ्यायचं !
    माझं काय, तुमचं काय,

    प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
    तिची वाट बघत आपण उभे असतो ...
    ठरलेली वेळ कधीच टळलेली !
    येरझारा घालणंसुद्धा

    शक्य नसतं रस्त्यावर!
    सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
    माणसं येतात, माणसं जातात
    आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
    उभे असतो आपण

    आपले मोजीत श्वासः
    एक तास ! चक्क अगदी एक तास !!
    अशी आपली तपश्चर्या
    आपलं त्राण तगवते !
    अखेर ती उगवते !!

    इतकी सहज! इतकी शांत !
    चलबिचल मुळीच नाही !
    ठरलेल्या वेळेआधीच
    आली होती जशी काही !!

    मग तिचा मंजुळ प्रश्नः
    "अय्या! तुम्ही आलात पण?"
    आणि आपलं गोड उत्तरः
    "नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

    काळावर मात अशी !
    तिच्यासोबत भुलत जायचं!
    माझं काय, तुमचं काय,
    प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

    एकच वचन
    कितीदा देतो आपण !
    एकच शपथ कितीदा घेतो आपण !

    तरीसुद्धा आपले शब्द
    प्रत्येक वेळी नवे असतात !
    पुन्हा पुन्हा येऊनही
    पुन्हा पुन्हा हवे असतात !!

    साधंसुधं बोलताना
    ती उगीच लाजू लगते,
    फुलांची नाजूक गत
    आपल्या मनात वाजू लागते !!

    उत्सुक उत्सुक सरींनी
    आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
    भिजलेल्या मातीसारखं
    आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

    भरलेल्या ढगासारखं
    मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
    माझं काय, तुमचं काय,
    प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

    - मंगेश पाडगांवकर मराठी कविता

  • तिरंगा स्वाभिमानाचा

    अभिमान अम्हा देशाचा
    विश्वास असे ज्ञानाचा,
    तो क्षणही दूरवर नाही
    नव उदय महासत्तेचा

    आव्हान संकटे आली
    ना मानली कधिही हार,
    त्वेषात पेटुनी लढलो
    उघडले कीर्तीचे दार

    संघर्ष जरीही केला
    पण हात पसरले नाही,
    अडखळलो पडलो उठलो
    परि इमान विकले नाही

    बुद्धीच्या जोरावरती
    श्रम जिद्द आणि शांतीने,
    उत्तुंग भरारी घेता
    यश आले आनंदाने

    त्यागाची लावुनी ज्योत
    आत्मनिर्भर भारत बनवू,
    करोनि स्वदेशी जागर
    हा महान भारत घडवू

    ही हिंद संस्कृती मोठी
    संदेश विश्वशांतीचा,
    अन् फडकत अविरत ठेवू
    तिरंगा स्वाभिमानाचा

    - विजय जोशी

  • हक्क !

    हक्क तुझा,हक्क माझा,
    हक्क याचा अन त्याचाही.....
    पण मला एक सांगा.....
    हक्क कधी हक्काचा आहे का हो...?
    एकदा आसच चालत आसतांनी....
    रस्त्यानं.....!
    अविरत पहात व्हतो....
    वेगवेगळे रूपं....
    ना निरगुण न ही निराकार....
    ते तं होते,
    आंकुचित....,
    अन संकुचितही.....!
    व्याख्याच बदलली व्हती
    हक्कानं आपली....
    सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं
    फाईल करप्ट व्हावी
    तसा करप्ट झालता हक्क....!
    अन मंग काय,
    हक्कानं आपलीच संस्थानं तय्यार केली.......
    आपल्याच
    हक्काची......!!!
    स्वतःचीच......
    स्वतःसाठी
    हक्कानं चालवलेली.....!
    हक्कालं वावडं व्हतं....
    गरीबाच्या घामाच,
    भटक्याच्या पालाचं,
    श्रमिकाच्या झोपडीचं
    अन विद्रोहाच्या चोपडीचं...!!!
    हक्क पोचलाच नाही कधी
    रंजल्याजवळ बी आन गांजल्याजवळ बी.....
    ना पालात,ना रानात,
    नाही झोपडीत.....!
    तो तं.....
    आरामात राबतोय......
    संस्थानिकांच्या महालातं.....
    हक्कानं....!!!

    ©गोडाती बबनराव काळे, हाताळा,हिंगोली
    9405807079

  • गुज सांगती

    झाडा वरल्या
    खोप्या मधल्या
    गुज सांगती
    पिला आपल्या.... १

    चारा खाऊनी
    पाणी पिऊनी
    घरी आपल्या
    सुखी राहूनी.....२

    पंखात बळ
    येता बक्कळ
    उडून जाती
    पिले सकळ......३

    पिले उडाली
    आई एकली
    पाखरांसाठी
    हळहळली.....४

    दुनियादारी
    ऐक रे न्यारी
    गुज सांगती
    समर्थ सारी....५

    -- सौ.माणिक शुरजोशी

  • कन्येस निराश बघून

    कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं
    समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं

    झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी
    चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी

    तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी
    खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी

    उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं
    झेप तुझी आणि झेप आमची, विसंगत राही

    असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी
    धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी

    होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले
    हेच मग दुजाचे समजतां, मन चरकले

    प्रयत्न होतील सुखी ठेवण्या, राहून अर्धपोटीं
    आशिर्वाद तरी निश्चित असतील, सदैव तव पाठीं

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com