पंख फुटता उडूनी गेला, सात समुद्रा पलीकडे
आकाशातील तारका होत्या, लक्ष्य तयाच्या नजरेपुढे
निसर्गाने साथ देवूनी, दणकट दिले पंख तयाला
झेप घेत जा दाही दिशांनी, मनी ठसविले त्या पक्षाला
आत्मविश्वास तो जागृत होता, चिंता नव्हती स्थळ काळाची
कुठेही जाईन झेपावत तो, ओढ तयाला दिव्यत्वाची
निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या
देईन अंगच्या छटा निराळ्या, चमक दाखवित ह्या जगताला
स्वच्छंदाची नशा मनस्वी, विसरूनी गेला सर्व जगाला
कुठे तो होता कोठूनी आला, आठवण येई मध्येच त्याला
सोडूनी दिले सारे ते त्याचे, आजभोवती विश्व निराळे
नाविन्याचा शोध शोधता, जुने विसरणे आता आले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
(गझलनुमा गीत)
रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ?
लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ?
हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा
रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ?
रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो
दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ?
नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी
वेड असें लावतोस भक्तांना, सांग, कसें ?
फक्त स्वानुभवानेंच आकळतें हें मनुजा –
‘पांडुरंग’ नाम मना आणतसे झिंग कसे ।।
दामाजीचा ‘महार’, नाथांचा श्रीखंड्या
विठुराया, नित्यनवें वठवतोस सोंग कसें ?
पंढरिच्या भेटीनें भीमा बनते ‘गंगा’
नवल नसे - अमृत बनती तिचे तरंग कसे ।।
बह्मांडाहुन विशाल तूं, धूलिकणच मी
तरि वसशी मम हृदयीं, फेडूं तव पांग कसे ?
शीश तुझ्या चरण नत, पुरव हेंच मागणें –
शिकव - ‘जन्ममृत्युचक्र करायचें भंग कसे’ ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
हे असेच मी बनावे..
नी असेच मी घडावे..
शब्दांनी ही रे माझ्या,
माणसासाठीच लढावे.
विष प्यावे अन शंकर व्हावे,
शब्द माझे पैगंबर व्हावे..
फकिरा लिहावी इथे साठे नी
शब्दांनीच आंबेडकर व्हावे..
आगरकर सुधारक हे दिवाने यावे,
खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे..
जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे,
कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे..
पाजावे नाथाने गाढवास काशीचे पाणी,
माणसाला माणुसकीचे दर्शन व्हावे ..
गावे तुकाने जे का रंजले गांजले
ज्ञानदेवांनी जगासाठी पसायदान घ्यावे ..
देश भक्तीची मदिरा घ्यावी,
आणि नशेत असे झिंग व्हावे.
पेटावे असे मग रक्ताने माझ्या,
क्रांतिकारक भगतसिंग व्हावे.
मातीसाठी कधीही अव्वल,
शर्थ माझ्या जिवाची व्हावी..
बघावे मी परस्त्रीस जेंव्हा
नजर माझी शिवाजी व्हावी ,,
अहिंसक गांधी यावा इथे ,
विचारांनी माझ्या शुद्ध व्हावे
षड्रिपूंशी व्हावी सुटका,
मन हे माझे बुद्ध व्हावे..
सोडून सारे द्वेष मनीचे,
सारेच प्रेमात अधीर व्हावे,..
कालिदास व्हावे शब्द काही,
काही शब्दांनी कबीर व्हावे..
एक उत्सव माझ्या कवितेचा,
मला असा भरवायचा आहे.
मलाच माझ्यामध्ये एक,
माणूस असा घडवायचा आहे...
-- लतीफ शेख सारोळकर
लातूर
8975071158
https://www.facebook.com/shaikh.latif.988
( “आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन )
सांजाळलेल्या या सांजवेळी
सुंदर, शाममनोहारी लोचनी
घुमवित येता मंत्रमुग्ध पावरी
भुलूनीया सारे बावरते अवनी....
स्पंदनी अवीट, मधुर सुरावट
आत्मरंगी अनुपम येते उमलूनी
तो लाघवी, लडिवाळ सावळा
झरतो, हृदयी स्वरतालातुनी.....
भक्तीतुनी विर्घळता आसक्ती
मोहमाया सारी जाते वितळुनी
होता अगम्य साक्षात्कार ईश्वरी
चाहूल चैतन्याची चराचरातुनी...
शुचितसोज्वळी सुरम्य सुंदरम
ब्रह्मरूप हरिहराचे या नंदनवनी
महासागर कृपावंती स्वानंदाचा
निर्मोही त्यात जावे तृप्त डुंबूनी
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. १४८
३१/१०/२०२३
9766544908
जगायचे ते जगले
नाही काही राहीले
श्वासही भगवंताचे
नाही काही आपुले
जन्म, मृत्यु प्रवास
ते भ्रमणही आपुले
बाहुले, कळसूत्रीचे
चक्र ऋतुंचे चालले
दशदिशा भारलेल्या
नेत्री दृष्टांत रंगलेले
भोगणेच संचिताचे
या जन्मी लाभलेले
पसरूनी दोन्ही बाहु
क्षणक्षण ते झेललेले
हेच सत्य साक्षात्कारी
अस्ताचली सांज रंगले
-- वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र.१७४
२०/७/२०२२
कसे मानूं उपकार
निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार
आलास तूं कामी
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य
राघूच्या वाणीनें शिकविले सत्य
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी
चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला
कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला
घारीची भरारी स्वछंद केले मनां
मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा
विजेची चपळता चंचल बनवी
धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत, आनंदी होण्या जीवन
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आज हे आकाश मजला, थोटके का भासते
झेप घेण्या पंख फूटतां, हाती येईल काय ते ?
उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते
चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ?
अथांग सागर खोल जरी ती, डूबकी घ्यावी वाटते
जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते?
काव्य सरिता वाहात आहे, ज्ञान गंगोत्री भासते
केवळ कविता चार रचूनी, त्यात डूबनें शक्य कां ते?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१||
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२||
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३||
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४||
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ||५||
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें
लूटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ||६||
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ||७||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी वाहूनी तो गेला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।
बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।१।।
तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।२।।
प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।३।।
जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।४।।
आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा
तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti