विचारांची उठती वादळे ।
अशांत होते चित्त सदा ।।
आवर घालण्या चंचल मना ।
अपयशी झालो अनेकदां ।।
विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।
नदीकांठच्या किनारीं गेलो ।।
वटवृक्षाचे छायेखाली ।
चौरस आसनावरी बसलो ।।
डोळे मिटूनी शांत बसतां ।
अवचित घटना घडली ।।
विचारांतले दुःख जाऊनी ।
आनंदी भावना येऊं लागली ।।
एक साधूजन ध्यान लावीत ।
बसत होता त्या आसनावरी ।।
पावित्र्याची वलये फिरती ।
आसन दिसले रिकामें जरी ।।
वातावरणाची ही किमया ।
अनुभवते प्रखरतेनें ।।
शुद्ध अशुद्ध विचार येती ।
सभोवतालच्या जाणिवेने ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी
केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी १
असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे
सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे २
सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी
कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी ३
मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा
सर्वजणाची दु:खे झेलण्या, वज्र देह हा धारीला असवा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वातावरणी वस्तू पडतां, नाश पावते लवकर ती
हवा पाण्याच्या परिणामानें, हलके हलके दूषित होती
ठेवूं नका उघडयावरती, वस्तू टिकते निश्चीतपणे
दूषितपणाला बांध घालता, कसे येई मग त्यात उणे
बाह्य जगातील साऱ्या शक्ति, आघात करती मनावरी
दुषिततेचे थर सांचूनी, मनास सारे दुबळे करी
देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला
कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य गुणाला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रफुल्लित ते भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं
गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं...१
खेळत होता दिवसभर तो, इतर चिमुकल्या मित्रांसंगे
खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे...२
सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली
भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३
निद्रेच्या तो आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने
येणाऱ्या त्या दिवसा विषयी अजाण होता संपूर्णपणे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तेच दिवाळीचे दिस
तोच आनंद उल्हास
परि बाबा-आई माझे
मज दिसले उदास.....
कसे जुळावे गणित
नव्या खाऊ कपड्यांचे
अन् खुलेल मानस
सान कोवळ्या जीवाचे
इथे वाढती असोशि
तिथे मन कासावीस
तेच दिवाळीचे दिस....
कधी आईचा दागिना
कधी एखादा ऐवज
जाई सावकारा हाती
खुल्या मनाने सहज
अन् सजली दिवाळी
मला हवी तशी खास
तेच दिवाळीचे दिस...
आज काही नाही उणे
तरी उरलेच देणे
आई-बाबांनी दिलेले
सहजची मुकपणे
मग ओलावती डोळे
मनी उरतात भास
तेच दिवाळीचे दिस...
आणि आई- बाबा माझे
होते दिसले उदास...
.....मी मानसी
डोहात वेदनेच्या, आनंद शोधतो मी, दु:खातही हसावे, हृदयास सांगतो मी
उगवत्या सूर्याच्या कुशीत,
नवं वर्ष अलगद जागं होतं।
मनाच्या शांत अंगणात,
आशेचं एक फुल उमलतं॥
दारी उभी गुढी निरभ्र,
आकाशाशी बोलत राहते।
"जगणं म्हणजे पुढे जाणं",
हळुवार सांगत राहते॥
कडू-गोड त्या नीम-गुळात,
जीवनाचं गूढ दडलंय।
हसत-रडत, पडत-उठत,
सुखाचं बीज रुजलेलंय॥
वाऱ्यावरती सणाची चाहूल,
घराघरात शांत आनंद।
साध्या क्षणातही सापडतो,
मनात दरवळणारा सुगंध॥
गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही,
तो मनाचा एक नवा श्वास आहे |
जुनं सगळं मागे सोडून,
नव्यानं जगण्याचा विश्वास आहे ||
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
माझ्या भावाने लिहिलेली कविता...
दिवाळीची हळुहळु पुर्ण झाली तयारी,
झाडलोट, साफसफाई तोरणे लागली दारी.
फडताळात फ़राळानी भरल्या बरण्या,
सजल्या साऱ्या वृद्ध अन बाया तरण्या.
पण हा कसला गोंधळ नी आदळआपट?
फडताळाच्या कड्यांची कर्कश खाटखुट?
हळुच डोकावून पाहिले स्वयंपाक घरात,
बुंदिचा लाडू टणकन आदळला कपाळात.
आत सगळ्या फराळाची जुंपली होती लढाई,
चुलीवरची तेलाची उलटली होती कढई.
तिखट शेवेनी घेरला होता बर्फीचा तुकडा,
फोडणीचा ठसका लागून खोकत होता चिवडा.
बेसनाचा लाडू रागाने झाला होता लाल,
गाल फुगवून बसले होते इवले शंकरपाळ.
चकलीला ही तिळा तिळा ने आले शहारे,
अनारसांचे खसखसले, कोसळले उंच हारे.
प्रमाणात कोंबून भरल्या करंजीच्या होड्या,
काजू, बेदाण्याने फुटल्या ढेऱ्या पण थोड्या.
पटकन लावून घेतले स्वयंपाक घराचे दार,
रोज कसे न काय खाऊ आता हाच तर विचार.
किरण कमलाक्ष कोठारे.
११-१०-२०१४.
चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी वाहूनी तो गेला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
आत्माराम हा पांडुरंग माझा
अंतरीचा हाच विश्राम माझा।।धृ।।
सदानसदा चालतो सांगाती
सदासर्वदा देई मज सन्मती
जागवितो, जगदिशा अंतरी
कृपाळू हा आत्माराम माझा।।१।।
जगत , व्यवहारी तो रमतो
सत्कर्माची चाल चालवीतो
निष्काम! सत्यरुप दावितो
निर्विकार , आत्माराम माझा।।२।।
जन्मूनीही , मरणच जीवाला
व्यालेले , हेची सत्य सृष्टीला
स्मृतीगंध तो सात्विक गंधावा
सांगतो आत्माराम हा माझा।।३।।
सत्यात वाहते , निर्मल शांती
असत्यात, असे अंती अशांती
जन्मात लाभावी आत्मशांती
भजण्यास आत्माराम माझा।।४।।
वैखरीवरी विठ्ठल! विठ्ठल!!
आत्मरंगी , रमतो आत्माराम
उघडता कवाडे मोक्षमुक्तीची
नेत्री नांदतो आत्माराम माझा।।५।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १६१
२५ - १२ - २०२१.
Copyright © 2025 | Marathisrushti