जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ?
मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना....१,
असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा
सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा....२,
आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी
मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी....३,
पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद
सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी जातो तो नाद.....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तू दिलेल्या फुलांबरोबर
थोडे काटेही आले, म्हणून काय बिघडलं?
ते 'तू' दिलेले आहेत
हे सुख काय कमी आहे?
तसं मान्य केलंय मी
चालणं काट्यांवरुनही
बघ, ओठावरचं स्मित
पुरतं ढळलं नाहीए
डोळेही आहेत कोरडे
थोडं रक्त वाहतंच अटळपणे..
तिकडे लक्ष देऊ नकोस
माझी पावलं लोखंडाची नाहीत रे ।
अढळ विश्वास आहे तुझ्यावर
तितका देवावरही नाही
पण कसा देऊ भरवसा दैवाचा?
रक्त पुसणारा तुझा हातच
काट्यांनी भरणार नाही ना?
पहाटे कवितांना
होता प्राजक्त गंध
आज भळाळतेय
जखम काट्यांची
हे आवडलं नाही?
अरे, आताच तर पहिलं दर्शन झालंय
खऱ्या जगाचं ।
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।। १
फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।। २
शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।। ३
प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।
आनंदी लहरी, मनां सुखावते ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गुंतू नकोस, प्रीतीत वेडया जीवा
निस्वार्थी! नूरली प्रीती ही मानवा ।।धृ।।
वनांतरी सीता, सुख त्यागी रघुराजा
हनुमंत दावी, हृदयीचे रूप रघुराया
रक्ताळला हरि, काटे बोचता सुदामा
पांचालीची, लज्जा राखे मुरलीवाला
भाव भक्तीप्रीतीचा हा कुणा सांगावा ।।१।।
अर्थ प्रीतीचा अर्थ! अर्थची रे गुणवत्ता
नटली प्रीती नाटकी, बेगडी हसूं आता
औपचारिक, पोकळ प्रीतीभाव आता
नका दुःख ते सांगु, सुख तेवढेच सांगा
निष्पाप! भाव प्रितीचा कसा जाणावा ।।२।।
जोवरी शिजती शिते, तोवरी येती भुते
यौवनी, दाटते मिठी, वृद्धत्वे रे दुरावा
नसता माया,नसे माया, रुक्ष जिव्हाळा
प्रीत, सारी विखुरलेली मृगजळी आता
निष्प्राण प्रीतीत, काय सुखदा मानवा ।।३।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७.
७ - १ - २०२२.
पूर्वी कसे नवरात्रीला
नऊ दिवस आपण
नऊ रंगाचे कपडे
परिधान करायचो...
तू नाचायचीस मनसोक्त
आणि मी तुझं ते
नाचणं डोळेभरून
पाहत राहायचो...
रंगाच फार काही नाही
पण तू जवळ असल्यावर
मी नेहमीच आनंदात
भरभरून जगायचो...
तुझा आनंद मी माझ्या
हृदयात साठवून तो
साऱ्या जगाला हसत
आनंदाने वाटायचो...
आता फक्त राहतो उभा
तुझी वाट पाहत
तसाच त्या वळणावर
जसा पूर्वी राहायचो...
© कवी - निलेश बामणे
दिनांक - ९ ऑक्टोबर २०२१
जगाला कधीच
न पडणारी कोडी
मला पडलीच नसती ...
ती कोडी सोडविण्यात
माझ्या आयुष्याची वर्षे
खर्ची पडलीच नसती...
भूत भविष्य वर्तमानाची भुते
माझ्या मानगुटीवर
कधी बसलीच नसती...
देवाच्या अस्तित्वाचा शोध
घेण्याची गरज मला
वेड्यागत भासलीच नसती...
माझी नजर फक्त सुखावर असती
तर दुःखाची धग मला
कधी लागलीच नसती ...
प्रेमातील वासना आणि
वासनेतील मुक्ती शोधली नसती
तर मला खरे प्रेम शोधण्याची
गरज कधी जाणवलीच नसती....
भल्या भल्यानां न सुटणारी कोडी
मला सहज सुटलीच नसती
निरर्थक जीवनातील निरर्थकता
मला कधी पटलीचं नसती...
भविष्याच्या उदरात शिरण्याची
माझी हिंमत झालीच नसती
भविष्यातील कोडी मला
स्पष्ट दिसलीच नसती...
माझ्या सभोवताली स्वैराचार
बोकाळला असताना
माझी समाधी लागलीच नसती ...
मी अज्ञानी असतो तर जगाला
उत्तरे देण्याची वेळ
माझ्यावर आलीच नसती...
माझ्या मेंदूत सारी
ज्ञानाची भंडारे नसती
तर अज्ञानात माझ्या भोवती
सुखे नांदली असती...
©कवी - निलेश बामणे
मनातल्या कोलाहलाला मार्गस्थ करतोय मी,
नेणीवेच्या जाणिवांना ही ...
प्रकांड तांडवाचा अभिशाप भोगतोय..
उसळणाऱ्या माझ्यातल्या उर्मींना शमवतोय ही मीच...
सोनेरी वर्खाचा देखणा गालीचा,
अवकाशाचे मखमली पांघरुण आच्छादून, निद्रीस्त होणारा,
सृष्टीच्यावरच्या प्रत्येक घटनांचा साक्षीदार ही मीच...
क्षितिजाचा अनादी अनंत रक्षक मी ...
निर्झरणि , तरंगिणी चे समर्पण स्विकारणारा ,
व्योमात व्यापून राहीलेल्या शशांक,भास्कराची धूनी शांत करणारा ही मीच ..
रक्षक ही मीच, भक्षक ही मीच ...
आश्वस्त ,निरागस तरीही अनासक्त
भीष्मा सारखा योगी, पयोधि मी व्रतस्थ...
© लीना राजीव.
-- सौ. लीना राजीव देशपांडे
कोणी म्हणे बाप माझा शेतकरी,
झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी,
घेवून वाड वडिलांची आण,
बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण..
जवान मरतो देशासाठी,
लाभते त्यास वीरमरण प्राप्ती,
मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी,
तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी…
अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई,
निसर्ग कोपाची भलतीच घाई,
उजाड माळरान फाटकी धरती,
कळोखांचा नभ डोळ्यांनभावती…
मान- सन्मान- सत्ता नाही,
काळी काया, हाडावर मुठभर मांस नाही,
मजसाठी नाही राजा कोणी,
छळवाद मांडला माझ्या भाळी…
पोशिंद्याची उपमा मला,
जय जवान जय किसान नारा,
जरी स्वातंत्र्य मिळाले देशाला,
तरी पारतंत्र्यात जगतोय माझा बळीराजा….!
उलट पालट सारे घडे,
दिसानंतर रात्र चढे,
खेळ सारखे निसर्गाचे,
त्याचेच ना कोडे पडे,--!!!
कधी उष्णतेची रांस,
कधी शीतल चंद्रप्रकाश,
कधी मुसळधार पाऊस,
केव्हा शांत निरभ्र आकाश,--!!
कधी पृथा हिरवी हिरवी,
कधी सचैल पहा भिजलेली,
कशी रुक्ष कोरडी-कोरडी,
कधी थंडीने समेटलेली,--!!!!
धरेवर असंख्य झाडे,
वृक्ष,लता आणखी वेली,
बहरलेली फुले पाने,
विविधतेने का नटलेली,-?!!
एक नसे दुसऱ्यासारखे,
रंग त्यांचे निरनिराळे,
चवी,आकार नक्षी,
सगळेच दिसे वेगवेगळे,--!!!
धरेवरील मानव,प्राणी,
ठेवण त्यांची आगळी-वेगळी,
आकार, उंची, वजने, यष्टी,
का असे विविधता इतुकी,--!!!
रंग वेगळे,वेगळे त्यांचे,
स्वभावातील अनेक कंगोरे,
आवाजाचे पोत निराळे,
डोळ्यांचेही रंग निराळे,--!!!
पाण्याचे प्रकार निराळे,
कधी नदी दिसे वाहती,
आगळीच त्यांची स्थाने,
कधी सागरास येई भरती,--!!
हिमगौरी कर्वे.©
कविता
Copyright © 2025 | Marathisrushti