ब्रिटीश कवी T. S.Eliot यांच्या Waste Land या कवितेने प्रेरित होऊन मी लिहलेली ओसाड जमीन ही कविता
कित्येक गढूळ लोंढे प्रत्येक ऋतूत
शहराच्या गल्लीबोळात शिरतात
रिकाम्या निर्जन शांततेच्या सागरात
चेहरा नसलेली धक्का खात फिरतात
पेरणी करून अथवा तरव्यासाठी कोवळं पेटवूनही
येथे प्रेतांना धुमारे फुटतच नाहीत
खाली मान घालून अंत्ययात्रेत सुतक पाळणारे
एकमेकांना ओळखू येतीलच असे नाहीत
संवेदना सुगंधीत कफनात गुंडाळून
अर्धमेलेले मृत्यू भासावेत तसे
कांचन,रंगद्रव्यांनी माखलेले बुरखे
खरे खोटे ओळखावेत कसे
झऱ्यांचं शुभ्र खळखळतं हसणं दिसत नाही
वाऱ्यांचे मंजुळ नाद कोणाच्या कानात गुंजणार नाहीत
ज्यांनी ही सुंदर फुललेली जीवनाची बाग नाकारली
ते शाश्वत व अटळ मृत्युंची आशा धरणार नाहीत
दुपारी शरदाच्या तपकिरी धुक्यात
येथे सर्वच काही वास्तव राहत नाही
दबलेल्या , ओझ्याखाली यंत्रवत झालेल्या
ओसाड जमिनीत शुद्ध प्रेम मात्र उगवत नाही
प्रकाश भोसले
मल्हारपेठ - सावर्डे
9421974209
स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ?
चालेल पुढें हें मढें काय ?
स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले
अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ?
सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे
गाजण्यांयोग्य पण घडे काय ?
सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी
अविरत त्याचे चौघडे काय !
राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा !
मग राज्य बुडालें, अडे काय ?
जो खाली, तो तर खाली-खाली जातो
अंधांच्या दृष्टिस पडे काय ?
जो वर चढतो, त्याला खेचूं रे खाली
आम्हांला टाळुन उडे काय !!
स्वातंत्र्याच्या हर्षानें पोट भरा
अन्नासाठी कुणि रडे काय ?
नेते-च गुन्ह्यांना देती चिथावणी
लावतील पोलिस छडे काय !
करीतसे आगळीक राष्ट्र-शेजारी
पण करील UN-बडें काय ?
दुर्दशा बघुन दो-चार फार अस्वस्थऽ
पण, त्यांशिवाय, कुणि कुढे काय ?
दुस्थिती सांगु जर जाई कुणि नेत्यांना
ते मख्ख उत्तरत, ‘कुठे काय ?’
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
…बहिणाबाई चौधरी यांची एक सुंदर रचना
-- वर्षा कदम.
शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात,
जळून जळून प्रकाश देत,
क्षणिक फक्त मोठ्या होत,--!!!
पणतीची ज्योत तशी,
आमुची ही असे जात,--
जगच छोटे भोवतालचे,-- स्वयंप्रकाशी मोठे करत,
लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत,
मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,--!!!
नंदादीपातील जशी ज्योत,
स्त्री तशी तिच्या संसारात,
हळूहळू अगदी तेवत,--!!!
दुसऱ्याला प्रकाशमान करत,--!
निरांजनातील छोटीवात, संसारासाठी उभी राहत,
सारखे सारखे पहा जळत,
स्वतःला ओवाळून टाकत,--!!!
निमूट उभे राहणे,
खंबीर अचल होणे,
स्वतः चटके सोसत,
भोवताल उजळून टाकणे,--!!!
अंधारावर मात करत करत,
काळ्या तमास नष्ट करणे,
आपले स्त्रीत्व साकारत,
प्रकाश-कारणे झिजणे,--!!!
असे झिजत झिजत,
पुढे वाटचाल करणे,--
वाऱ्यावादळांतही पुरत्या,
जिद्दीने पुन्हा फडफडणे--!!!
जो येई तो हात लावी,
धक्के सहत राहणे,
वेदनांनी तडफडत,
आपुले तेज सांभाळणे,--!!!
कुणी धरू पाहे ज्योत"",
त्यास धीराने सामोरे जाणे,
वेळीअवेळी चमकत, चमकत
आपली अस्मिता जपत राहणे,-!
कणाकणाने पळापळाने,
जिवांत जीव आहे तोवर, उभे-आडवे, जळत राहणे,
मग तेजाचावसा,दान देणे,--!!!
ज्योतीने ज्योत पेटवीत,
मगच संपत संपत जाणे,!--
उजेडाच्या वाटेअंती, *ज्योतिर्मय श्वास सोडणे,!
हिमगौरी कर्वे.©
मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे
गमावून टाकी, जाणूनी फुकाचे....१,
लागत नसते, दाम वेळेसाठीं
म्हणून दवडे अकारणा पोटीं....२,
वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते
समज सर्वांची, अशीच असते...३,
वेडे अहा सारे, कसे होई मूल्य
वेळ जातां मग, आयुष्य जाईल...४,
वेळ दवडतां, कांहीं न राहते
सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
फेब्रुवारीला एवढी का बरं घाई
दोन दिवस आधीच गुंडाळल्या जाई !
******
आली का सुचना,आदेश कुठून आताशा
फेब्रुवारी आटोपतं घेवून गुंडाळतो गाशा !
-- श्रीकांत पेटकर
लक्ष आपले जात असते,
सदैव प्रभूकडे,
मार्ग सारे ठरलेले,
जे मिळती तिकडे ।।१।।
‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो,
प्रथम मुखातून,
जन्मताच तो प्रश्न विचारी,
“मी आहे कोण?” ।।२।।
मार्ग हा तर सुख दु:खाने,
भरला आहे सारा,
राग लोभ मोह अंहकार,
याचा येथे पसारा ।।३।।
वाटचाल करिता यातून,
कठीण होवून जाते,
जीवन सारे अपूरे पडून,
अपूर्ण ज्ञान मिळते ।।४।।
आयुष्य तुमचे थोडे असूनी,
काळ वेळीच जाणावा,
मिळेल जो क्षण तुमचे हातीं,
प्रभूसाठी तो असावा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
मी नदी...
तुमच्या आईसारखीच...
फरक एवढाच,
तिने तुम्हाला जन्म दिला,
आणि मी तुम्हाला जगवलं...
हिमशिखरांच्या कुशीत जन्म घेऊन,
डोंगरदऱ्यांतून धावत आले.
तुमच्या सुखासाठी माझे आयुष्य,
हसत-हसत मी वाहत राहिले.
माझ्या कुशीत खेळलात तुम्ही,
माझ्याच पाण्यात वाढलात तुम्ही.
माझ्या काठी स्वप्नं पेरून,
सोन्याची शेती फुलवलात तुम्ही.
तहान तुमची मीच भागवली,
भूक तुमची मीच हरवली.
तुमच्या प्रत्येक आनंदासाठी,
माझी प्रत्येक लाट झिजत गेली.
पण...
आज माझ्याच लेकरांनी,
माझ्या कुशीत विष कालवलं.
कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली,
माझं ममत्वच गाडून टाकलं.
आज माझ्या लाटा वाहत नाहीत,
त्या तर निःशब्द रडत आहेत.
प्रत्येक लाटेच्या हुंदक्यात,
हजारो वेदना दडल्या आहेत.
माझे मासे तडफडून मेले,
पक्ष्यांनी माझी साथ सोडली.
हिरवीगार किनाऱ्यांची शाल,
आज विराण वाळूत हरवली.
मी कधीच काही मागितलं नाही,
फक्त तुमच्यावर प्रेम केलं.
तुमच्या सुखासाठी आयुष्यभर,
स्वतःचं अस्तित्व अर्पण केलं.
आज मात्र एकच प्रश्न विचारते...
**आईचं दूध विषारी झालं तर,
लेकरं कशी जगतील?
नदीचं पाणीच मेलं तर,
माणसं तरी कशी वाचतील?**
अजूनही माझ्या डोळ्यांत आशा आहे,
अजूनही तुमच्यावर विश्वास आहे.
माझे अश्रू पुसा...
माझ्या जखमा भरा...
माझ्या प्रवाहाला पुन्हा
निर्मळ श्वास द्या...
कारण...
*मी फक्त नदी नाही...
मी तुमचा श्वास आहे...
मी तुमचं भविष्य आहे...
मी जिवंत राहिले तरच,
तुमचं उद्याही जिवंत राहील...*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti