(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • साहित्यिक

    साहित्यिक

    परखड
    लिहीतात
    अंजनही
    घालतात

    व्रत घेती
    लिखाणाचे
    जागरण
    समाजाचे

    अग्रलेख
    मुद्देसुद
    देखरेख
    साळसुद

    माहितीचा
    स्त्रोत वाहे
    अखंडची
    टिका साहे

    विविधांगी
    लेख लिही
    साहित्यात
    नसे दुही

    साहित्यिक
    अग्रस्थानी
    वैचारिक
    खतपाणी

    ज्ञानदाते
    बुद्धित्राते
    नमू तया
    चरणाते

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • जिणे (वृद्धत्वाची  व्यथा)

    एक होता कप
    एक होती बशी
    दोघांची जमली गट्टी खाशी
    पांढरा शुभ्र त्यांचा
    रंग चमकदार
    त्यावर नाजूक फुलांची
    नक्षी झोकदार
    दिसायचे ऐटदार
    आणि आकार डौलदार
    सकाळ-संध्याकाळ
    गोड किणकिण चालायची फार
    कपाने ओतायचा
    बशीत चहा सुगंधी
    तिने हळूहळू प्यायची
    साधायची संधी
    एक दिवशी फुटली बशी
    झाले तिचे तुकडे
    कपाचा ही कान तुटला गेले त्याचे रुपडे
    बशीचे तुकडे
    दिले फेकून
    कपाला ही दिले
    अडगळीत भिरकावून
    एक दिवस आले
    एक पाहुणे
    त्यांना दाढीसाठी हवे
    गरम पाणी म्हणे
    अडगळीतून काढला का
    दिले त्यात पाणी भरून
    पाहुण्याने केली दाढी घोटून
    आरशात पाहिले रूप न्याहाळून
    कपाचे जिणे झाले केविलवाणे
    कुठे सुगंधी चहा कुठे हे लाजिरवाणी जिणे?

    -- विनायक अत्रे.

  • सहचारीणी

    कृष्ण कमळ-

  • सूर्योदय

    प्रभात झाली रवी उगवला

    दाही दिशा उजळल्या

    रात्रीचा अंधार जावूनी

    नवीन आशा अंकूरल्या १

    बरसत आहे सूर्यकिरणे

    पृथ्वीच्या भूतली

    आनंदाने पुलकित होवून

    धरणीमाता शहारली २

    निघूनी गेला रात्रीचा गारवा

    त्याच्या आगमानाने

    उल्हासीत होवून प्राणी जीवन

    नाचत राही ऊबेने ३

    पुनरपि आता झाले सुरु

    चक्र जीवनाचे

    मिळवू आज काही तरी

    किरण चमकती आशेचे ४

    काळोखाची भयाणता

    आता गेली निघूनी

    प्रकाशाच्या मदतीने

    कामास लागती जोमानी ५

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • कोरडे पाषाण

    कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे
    वैराण वाळवंटातील भगभगीत वारे

    नात्यांचे आखीवरेखीव बंध काही
    आपुलकीचा आनंद गंध नाही
    हास्याच्या कृत्रिम कवायती या
    अंतरीचा त्यात उन्माद नाही

    भावनांना यांच्या ओल नाही
    जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही
    आटलेल्याच मनोनद्या साऱ्या
    पात्र कुणाचेच खोल नाही

    आपुलकीची ओसरतीही सर नाही
    भावनांना कुणाच्याही घर नाही
    अहिल्याच्या शिळांना तर आता
    कुणा श्रीरामाचा कर नाही

    काळजात सल कधी उठत नाही
    आतड्यातही यांच्या का तुटत नाही
    मनं कशी कुणात गुंततच नाही
    नाती जुळलीच जर, तर कळत नाही

    देणगी भेटी, दिखाव्याचा महापूर
    भावनेचा ओलावा नाही ताकास तूर
    कातळात उमलत नाही आज अंकुराचा अंश
    सुदाम्याच्या पोह्यांचा झाला केव्हाचा निर्वंश

    कोरडा मी, कोरडा तू, कोरडपाषाण सारे
    विमनस्क अशा आभाळी विखुरले तारे
    नाळ आमची लुप्त झाली होऊनी शततुकडे
    पताका प्रगतीची मिरविती मनाचे हे नागडे

    नव्या युगाचे श्रीमंत भिकारी आम्ही
    भावनांचा बाजार मांडाया सज्ज होतो
    रसरशीत कांतीच्या चालत्या बोलत्या
    मडद्यांच्या गर्दीत सामावण्या धावतो

    (आजच्या व्यवहारी (केवळ व्यावहारिक?) जगामध्ये वावरताना पुष्कळदा एक तटस्थ कोरडेपणा जाणवतो. माणसं सारी चांगलीच असतात - वाईट मुद्दामहून कुणीच वागत नाही. पण आपलं असं कुणीच वाटत नाही. अगदी नात्यातसुद्धा वैर कुणाचंच नसतं पण प्रेमही कुणी करत नाही. एक प्रकारचा भौतिक रोखठोकपणा, कोरडेपणा प्रत्येक व्यवहारातला भावनिक ओलावा-आपुलकी फार झपाट्याने शोषून घेत आहे. काळ जसजसा पुढे जात आहे तसा हा कोरडेपणा फारच प्रकर्षाने जाणवतो. कोरडेपणातच जन्म झालेल्या नवनव्या पिढींना कदाचित तो भासणारही नाही पण ज्यांनी भावनिक ओलावा अनुभवला असेल त्यांना ही रखरखीत माध्यान्हं फारच जड जात असतील.)

    - यतीन सामंत

  • चल, चांदण्यांची सैर करू

    चल, चांदण्यांची सैर करू,अंबरी, ढगां-ढगांत विहरू,
    कडेकडेने मेघांच्या,जाऊ,
    हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!!

    मिचकावून डोळे आपुले,
    चांदण्यांची वरातच पाहू,
    सुंदर चमचमत्या प्रकाशात,
    त्यांची आभा नीट न्याहाळू,--!!

    काळ्याशार गालिच्यावर नभांत,
    वावरते प्रकाश--झोत पाहू,
    इकडून तिकडे हलत्या प्रवासी,
    चंद्राचीही धांदल बघू,---!!

    कोण त्यांच्यात अधिक सुंदर,
    मनी मानसी स्पर्धाच लावू,
    चंद्राचा मुखडा लोभसवाणा,
    पाहून आपण अचंबित होऊ,--!!

    धरेवर ती मजा नाही,
    ना कुठली दिसे चांदणी,
    नकली नको त्या, असली पाहू,
    देखणी, नाजूक त्यांची बांधणी,--!!

    पृथेवर का कधी चंद्र दिसे,
    तोही इतुका जवळून आढळे,-?
    थंडगार त्या वातावरणी,
    झोपण्यात केवढी मजा असे,-?

    अंतराळाचे सुख निराळे,
    दु:खाची मुळी बात नसे,
    ताण-तणांवा नसेल जागा,
    ताणून द्या हो,शरीर सगळे,--!!

    ओढाताण नाही कुठली,
    जिवां मिळेल विश्रांती,
    मानापमानाची कल्पनाही,
    तिथे करायाची नाही,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • दत्तात बुडून

    व्यापुनी राहावा
    श्रीदत्त सतत
    माझिया श्वासात
    नाम रुपे
    हृदयी वसावा
    स्पंदनात दत्त
    रक्त कनिकात
    एकएक
    डोळ्यांनी पाहावा
    दत्तची सुंदर
    आत नि बाहेर
    भरलेला
    कानांनी ऐकावा
    रव दत्त दत्त
    अणुरेणूत
    साठलेला
    अवघाचि व्हावा
    रस रंग गंध
    स्वतः अवधुत
    मजसाठी
    विक्रांत वहावा
    घट हा भरुन
    दत्तात बुडून
    तनमन
    © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  • दिस कलतीला आल्यावर

    दिस कलतीला आल्यावर
    ओढ लागते घराची
    माय बाप पोरं ढोर
    आसेसुन असतात कवाची

    येणार बा, येणार मा
    तोंडात साय दुधाची
    उरफाट जग हाय
    उलघाल उराची

    थांब जरासा पुरा कर
    झाली का येल
    केकावतो लमंढीचा
    म्हणतो फुकाचा तेल

    -- शरद शहारे, वेलतूर

  • कृष्णरंगली राधा

    श्रीरंगी रंगात रंगलेली राधा
    कृष्णा संगती भिजली राधा

    भक्तीप्रीतीचे रंगरूप अनोखे
    हरिहरात विरघळलेली राधा

    द्वैत,अद्वैताचे मिलन सुंदर
    होळीत रंगली सोज्वळ राधा

    अतरंगी सावळ्याचीच बाधा
    कृष्णरुपातुनी दंगलेली राधा

    धावा कृष्ण! कृष्ण! कृष्ण!
    हरिपावरीतही स्वरसुरी राधा

    मनअतरंग होई पावन पावन
    भक्ती प्रीतीत ओसंडिते राधा

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८५.

    १८ - ३ - २०२२.

  • मी तिथेच तुमची वाट पाहतोय…

    त्याने तेव्हाही कंबरेवरचे हात काढले नव्हते,
    तो आजही कंबरेवरचा हात उगारत नाहीये..
    अन् हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे..

    तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता,
    तो आजही विटेवरून उतरत नाहीये..
    अन् पायी चालून वारी गाजवणाऱ्या भाबड्या मनाचा आकांत मात्र दिवसेंदिवस वाढत आहे..

    त्याने तेव्हाही गार्‍हाणी ऐकली नव्हती
    तो आजही गार्‍हाणी ऐकत नाहीये..
    अन् माळकरी टोपीवाल्यांची आषाढी एकादशी मात्र कुठल्याही परिस्थितीत चुकत नाहीये..

    तो तेव्हाही म्हणाला होता
    तो आजही हेच सांगतोय..
    माणसा-माणसांमध्ये मला शोधा
    मी तिथेच तुमची वाट पाहतोय..............