अनुप्रास अलंकार
चारोळी
(१)
गाता गीत गाऊनी
गायकाघरी गायकी
गाजती गीतमैफीली
गान कोकीळ गात की
(२)
चमच्याने चिवडा चाखा
चाखतांना चापून चारा
चिवड्यातल्या चारदाण्यासह
चावून चावाच चुपचाप सारा
(३)
गंध गुलमोहराचा
गंधाळला गारवारा
गोकर्ण गेला गगनासी
गुरवाघरी गेला गावसारा
(४)
हलवाई हलवती हलवा
हल्दीरामचीच हवा
हिरवीबर्फी हिरवापिस्ता
हिरव्यातील हिरवा
(५)
नव्याची नवलाई
नवरीच्या नथनीची
नाकात नसतांना
नकोशीच नाचक्की
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी,
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी,
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले,
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला,
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तुझा कोपही वाटतो मज प्रणय!
तुझी हर अदा आणते बघ, प्रलय!!
हृदयही तुझे, स्पंदनेही तुझी
किती गोड माझा-तुझा हा विलय!
तुझी नस नि नस जाणतो मी सखे
तुझे चित्त, मन मी, तुझे मी हृदय!
असे काय माझ्यातले डाचते?
तुझे माझिया भोवतीचे वलय!
जगाला कसा कमकुवत वाटलो?
असे कारणीभूत माझा विनय!
अता लागली जिंदगानी कलू....
कधी व्हायचा सांग, माझा उदय!
दिवेलागणीला हरवतोच मी
तुझी रोज येतेच हटकून सय!
अता या वयाला कशाला फुले?
मला कंटकांचीच झाली सवय!
कसे लोक होणार निर्भय तरी?
दवंडीच देऊन देती अभय!
असे ज्ञान पान्हावते रोज का?
मला मूल प्रत्येक वाटे तनय!
प्रोफेसर
प्रा.सतीश देवपूरकर
हात जेव्हां हे जळाया लागले
रंग दुनियेचे कळाया लागले .
ठाकतां संकट, पळाल्या वल्गना
पायही मागे पळाया लागले .
जग दगा देताच, देती नयनही
रोखलें, तरिही गळाया लागले .
पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें
येथलें येथें फळाया लागलें .
शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना
आंतुनी पण मन मळाया लागलें .
पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी
बावळे आंधळे, दळाया लागले .
संधिसाधू भरत भरपूरच खिसे
बघुन तृषितां मळमळाया लागलें .
मिट्ट रजनी, मोजके अंधुक दिवे
हाय ! तेही काजळाया लागले .
-- सुभाष स. नाईक
सांताक्रुझ, मुंबई.
फोन : 022-26105365.
मोबाईल : 9869002126.
आज हे आकाश मजला, थोटके का भासते
झेप घेण्या पंख फूटतां, हाती येईल काय ते ?
उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते
चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ?
अथांग सागर खोल जरी ती, डूबकी घ्यावी वाटते
जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते?
काव्य सरिता वाहात आहे, ज्ञान गंगोत्री भासते
केवळ कविता चार रचूनी, त्यात डूबनें शक्य कां ते?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला.
तो माणूस म्हणाला, 'माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट आला आहे. जगण्यात आता रस उरला नाही. आपल्या बोलण्यावर साधू काही तरी उपदेश करील, कदाचित एखादा आशीर्वाद देईल, एखादा चमत्कारही घडविल ज्यायोगे आपली स्थिती सुधारेल, या अपेक्षेने तो माणूस साधूकडे पहात होता. साधूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव दिसले नाहीत. काही न बोलता साधूने एकवार इकडेतिकडे नजर टाकली आणि त्या माणसाला काही कळायच्या आत अचानक त्याचे गाठोडे उचलून धूम ठोकली. साधूच्या या अनपेक्षित वागण्याने तो माणूस एकदम गोंधळला, बावरला, उठला आणि आपल्या चपला तिकडेच टाकून जीवाच्या आकांताने त्या साधूमागे पळत सुटला. साधूचा बराच पाठलाग केला तरी त्याला काही गाठता येईना.
बऱ्याच अंतरावर रस्ता एका बाजूला वळला होता. आता तर साधूने गति वाढविली तो दिसेनासाही झाला. तो माणूस वळणावर आला तर एका झाडाखाली आपले गाठोडे पडलेले त्याला दिसले. धापा टाकतच तो गाठोड्याजवळ आला आणि संशयाने त्याने ते उघडूनही पाहिले. सर्व वस्तू तशाच असल्याचे दिसल्यावर तर त्याला आश्चर्य वाटले. तोच झाडामागून तो साधूही पुढे आल्यावर तर तो अधिकच कोड्यात पडला.
साधू हसत हसत म्हणाला, जीवनाला कंटाळला असताना आणि निराशेने घेरले असतानाही या यःकिंचित गाठोड्यासाठी तुला माझा पाठलाग करावासा वाटला. त्या पाठलागात तुझ्यातले नैराश्य, तुझ्यातले दुर्मुखलेपण आणि जगण्यातली उदासी तर कुठल्याकुठे दूर पळाली! हे गाठोडे मिळविण्यासाठी जसा तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न एखादे ध्येय समोर ठेवून तू मोठ्या उमेदीने केलास तर तुला जीवनात रस वाटेल!
ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही की जीवनात रसही नाही!
जगून घे जरा
उद्याची वाट पाहू नको..
कोणाच्या विचाराने
तू विचार बदलू नको...
तुझ्यात आहे
आत्मविश्वासाची खाण..
स्वतःच जरा
देत जा स्वतःलाच मान..
खचलेल्या मनाला
उभारी तूच देशील..
दुःख जात्यावर भरडत
सुखाची ओवी गाशील..
निवाऱ्याचे ठिकाण
तुझे तुच व्हावे..
प्रेमळ सावली म्हणून
इतरांकडे का पहावे?
संघर्षाच्या अनेक घडल्या
जन्मोजन्मी गाथा..
एखादीच झाली आहे
जिजाऊ सम माता
सन्मानाने जगण्यासाठी
स्वतःला पात्र ठेव..
स्वाभिमानाने जगण्याची
खात्री मात्र ठेव..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
ज्येष्ठत्वे आता फक्त तडजोड करावी
आपुल्याच मनाची समजूत घालावी
चूक की बरोबर, व्यर्थची वादविवाद
अंतरी संघर्षाविना मन:शांती लाभावी
आता जगती जन्मताच सारेच सर्वज्ञ
इथे कलियुगाचे निर्बंधी दृष्टांत वाजवी
भौतिक सुखाचा सभोवार मुक्त संचार
आपण स्वतःलाच अंती मुरड घालावी
या युगी संस्कारांची, नित्य पायमल्ली
हीच जीवनाचीच, जगरहाटी वास्तवी
उमजुनी सारे,जगाशी तडजोड करावी
सोडुनीया हटवादा, मन:शांती भोगावी
या जन्मी नाती सारी निर्मळ ऋणानुबंधी
भाग्ययोगे ! सावरणारी सकलां लाभावी
जन्म मानवी अनेक जन्मांचीच पुण्यदा
जगता वृद्धत्वे अंती मोक्षमुक्ती लाभावी
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३२
६ - १० - २०२१.
स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।
पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।
फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।
अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।
चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।
पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।
अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला।
कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥
सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला ।
धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना।
नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।।
जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे।
सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे।
गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।।
राजनितीचे सुत्र नवे मग विश्वपटावर मांडियले
अखंड भारत पाहीन डोळा शब्द कृतीतुन अवतरले।
सेल्युकस मग सिमेवरती काही मिनिटांत लोळविला॥३॥
कसे नियंत्रित राखावे या राष्ट्राला मग एकवटुन।
सुत्रबध्द ते केले सारे ज्ञान आपुले ग्रंथातुन।
अलौकिक तो अजुनी आहे ग्रंथ जगातील ठरलेला॥४॥
- रणजित हिर्लेकर
Copyright © 2025 | Marathisrushti