जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी
व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी
नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या
शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या
माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता
तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता
घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी
समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी
वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा
हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा
मृतदेह जर तसाच पडला, किडे मुंग्या खाती
त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती
जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन
कुणी तरी दिले तुजसाठीं, हे घे जाणून
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वालाl मात्रा: ८+८+८=२४मात्रा
मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।।
नदी कांठच्या वनीं
थुई थुई नाचूनी
पिसारा फुलवुनी
तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु ।।१।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
मोरपिसे सुंदर
रंग बहारदार
दिसे चमकदार
बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं ।।२।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
रुप डौलदार
चाल ऐटदार
भासे रुबाबदार
बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं ।।३।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सुखी रहा तू लाडके,दिल्या घरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।धृ।।
कन्यारत्न जन्मताच,आनंदलो
वाढवले ना लाडात,धन्य झालो
बालक्रीडा सुखविती,हो संस्कारी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।१।।
आला हो राजकुमार,नेण्या परी
नववधू दिसे कशी,ही गोजिरी
माय तुझी मालत्यांनी,ओटी भरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।२।।
येता दाटुनी कंठ हा,काय करू
पाठवणी करतो,कसा सावरू
जा निवांत तू,वळू नको माघारी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।३।।
सेतू बनूनी रहा,दोन कुलांचा
बंध रेशमी हा ,तू जोडायचा
सोबत तुझ्या,संस्कारांची शिदोरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।४।।
-- सौ.माणिक (रुबी)
शरीर निरोगी असतां तुमचे, नामस्मरण ते करा हो प्रभूचे
ठेवू नका कार्य उद्या करिता, हाती काय येई वेळ गमविता
शरिराच्या जेव्हा नसतात व्याधी, राहू शकतात तुम्हीच आनंदी
आनंदातच सारे होवू शकते, प्रभू चरणी चित्त लागून जाते
व्याधीने जरजर होता शरिर, कसे होईल मग ते चित्त स्थिर
स्थिरांत दडला असूनी प्रभू तो, स्थिर होवूनीच बघता येतो
नाशवंत असता देह तुमचा, व्याधीयुक्त होणे गुणधर्म त्याचा
कोण देईल उद्याचा भरवसा, उमटू दे मनी आंत प्रभूचा ठसा
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
चल सये ग झणीं,
मांडू या खेळ अंगणी,
लहान वयातली भातुकली,
धांदल बाहुलीच्या लग्नाची,--!!!
लग्न करण्या त्यांचे,
घालत होतो घाट,
धावपळ करत सगळी,
मांडायचा सर्व थाट,----!!!!
इवले इवले बाहुला बाहुली,
सुंदर गोंडस खूप छोटुकली,
मुंडावळ्या बांधून त्यांना,
उभे सगे घेऊनी हाती,--!!!
सासर माहेर सगळे मिळुनी,
अंगण जायचे गजबजुनी,
ठुमकत येई वरमाई,
नाकात झोकात नथ घालुनी,--!!!
देण्याघेण्यावरून गोष्टी,---
मात्र सगळ्या फिस्कटती,
सासरकडच्या आयाबाया,
एकदम सगळ्या रुसून' बसती, --!!
मग आजोबा मोठे ,
उगा मध्यस्थी करती,--!!!
सनई चौघडा घेऊन उभे
त्यांना कशा "खुणा" करिती,--!!!
बाहुल्या'च्या घरचे सांगती,;---
सासरकडची इटुकली पिटुकली,
म्हणती मिळेल का असा जावई,-?जरा जास्तच फणकारुनी,--!!!!
मग तोडगा मधे निघे,
आई आजी म्हणतील तसे ,
पुसावया" जाती, -सगळे,
वधू-वर' पण, इकडे एकटे,--!!!!
पाहून त्यांना हळूच असे,
मोठे आजोबा युक्ती करिती, एकत्र आणून दोघांनाही,--!!!
लग्न लावून मोकळे होती,--!!!
आज आठवते सयी,"
त्या प्रसंगाची लगीन -घाई
असे लग्न लावण्या पण,---
कुणी आजोबा उरला नाही,--!!
हिमगौरी कर्वे.
प्रार्थना कर त्या ईश्वराकडे…
प्रार्थना कर त्या ईश्वराकडे,
माझ्याही नशिबात एक कोमल हात लिही,
ज्याच्या स्पर्शात आश्वासक ऊब असेल,
आणि डोळ्यांत माझ्यासाठीच राखलेली शांत नदी असेल.
मलाही कोणीतरी मिळू दे,
जी निस्वार्थ प्रेमाची ओंजळ उघडेल,
जिथे अपेक्षांची सावली नसेल,
फक्त साथ देणाऱ्या श्वासांची चाहूल असेल.
जी माझ्यासाठी वेळ काढेल,
गर्दीच्या या जगातही
क्षणभर थांबून म्हणेल,
“कसा आहेस तू? जेवलास का?”
आणि त्या साध्या प्रश्नांत
माझ्यासाठी संपूर्ण काळजी गुंफलेली असेल.
जिला माझ्या आवाजातील चढ-उतार कळतील,
शब्द न उच्चारताही
मनातील वादळांची चाहूल लागेल,
आणि शांततेतही संवाद सापडेल.
जिच्यासाठी मी पर्याय नसेन,
तर पहाटेच्या पहिल्या किरणासारखा प्राधान्य असेन,
जिच्या दिवसाची सुरुवात माझ्या आठवणीने
आणि शेवट माझ्या नावाने होईल.
जिला माझ्या भेटीची ओढ असेल,
जशी कोरड्या धरतीला पावसाची आस,
जशी समुद्राला चंद्राची प्रतीक्षा,
तशी तिच्या मनात माझी हलकीशी धडधड असेल.
ईश्वराकडे इतकीच विनंती,
नको सोने, नको वैभव,
फक्त एक मन दे
जे माझ्या मनाशी जुळेल.
जिथे प्रेम दिखाव्याचं नसेल,
तर साधेपणातली गोड सवय असेल,
जिथे “आपण” हा शब्द
“मी” पेक्षा मोठा असेल.
प्रार्थना कर त्या ईश्वराकडे…
की कधीतरी माझ्याही आयुष्यात
कोणीतरी अशी येवो,
जिच्या प्रेमाने माझं अपूर्ण आयुष्य
पूर्णत्वाला जावो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना
जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना,
जळत असते तेल, देवूनी प्रकाश सारा
आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा
बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते
आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते
कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी
गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अंग हळदीत न्हाले
म्हणून हुरळू नकोस गं
आता हळदीचा रंग
रोज अनंत छटांत गं
अक्षता त्या रंगीत
येता वाट्यास गं
आता तसे शुभ्र कण
निवडून तू रांध गं
तुझ्यातले जे भले बुरे
दिसेल अगदी उठून गं
आधी लपेटी सारे
मायेच्या मखमली पदरी गं
बोल लावील कोणी तेव्हा
कोसळून उन्मळू नको गं
समजून उमजण्या वेळ लागे
तेव्हा हे कोडे सुटेल गं
जे जे होई सारे ठेवी
अंगणी थोडं थोपवून गं
नकोस देऊ हवा निखाऱ्या
ठिणग्या साऱ्या फुलतील गं
दिस मास घर आंगण
आनंदाने फुलवं गं
मनाची वाट पोटातून
सांगून जाते माय गं
शिकून सवरून शहाणी हो
सारखे तोलू मोलू नये गं
धीर धर, धारेवर नको
आठव मायबापाचा संसार गं
साऱ्यात मिसळून विसरू
नको तू स्वतःलाही जप गं
हीच शुभेच्छा देते सखी तुजला
समाधानी सुख हेच खरे साज गं!!
-- वर्षा कदम.
चकली, कडबोळी, भाजाणी आणि करंज्या… या गाण्यात…
Copyright © 2025 | Marathisrushti