सत्य हे नेहमीच पोरकं असतं
माझ्या जीवनात जर तो आला नसता
तर कदाचित मीही हे मानलं नसतं
पण... तसं व्हायचं नव्हतं
अजूनही मला तो आठवतो आहे
उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा
आणि हो, त्याचे डोळे!
त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते
तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत
तुमच्याशी संवाद साधायला लागायचे
सत्याबद्दल त्याला अपार आदर होता-असीम निष्ठा होती
आदर्श जगाबद्दल काही कल्पना होत्या त्याच्या
पहिल्या भेटीत मी काहीच बोललो नाही
नंतरच्या भेटीत त्याच्या डोळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला
त्याची मूल्यांवरची निष्ठा अटळ होती
मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला
पण.... त्याने मानलं नाही
त्यानंतर तो अनेकदा भेटला
नेहमी काहीतरी आदर्शवादी बोलायचा
सगळंच काही लक्षात राहणं शक्य नव्हतं पण
त्याचे ते विलक्षण बोलके डोळे मात्र सतत जाणवायचे
असाच एकदा भेटला असताना
मिळालेल्या नोकरीविषयी उत्साहाने बोलत होता
मी त्याला आदर्शवादी भूमिका सोडून द्यायला सांगितली
तडजोडीचा व्यावहारिक अर्थ समजावला... पण
त्याने दुर्लक्ष केले
त्याला सत्यकाम बनायचं होतं
तेव्हाच मला त्याच्या गंभीर भवितव्याची कल्पना आली
पण तरीही; त्याच्या डोळ्यातील तेजस्वीपणाचा मला हेवा वाटला
मध्यंतरी त्याला नोकरीवरुन हाकलण्यात आल्याचं समजलं
'सत्यकाम'च भूत त्याला अद्यापि छळत होतं
एका खटल्यातही त्याला गोवण्यात आलं होतं
त्याबद्दल त्याला मी नंतर हटकल्यावर
'पराभव मान्य!'
एवढंच बोलून तो गप्प झाला
कदाचित ओठांतून व्यथा ओसंडेल म्हणून
ओठ घट्ट आवळून घेतले होते त्याने
आपली निराशा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यानं
पण; आपले डोळे विलक्षण बोलके आहेत
हे मात्र तो विसरला
त्या नंतरच्या भेटीमध्ये, त्याच्या डोळ्यातील तेज
अस्तंगत होत जाणं पहाणंच माझ्या नशीबी होतं
असेच काही दिवस गेले, आणि...
अचानक 'ती' बातमी कानांवर आदळली
झालं ते अटळ असूनही मला खूप वाईट वाटलं
जीवनभर सत्याच्या पाठी धावणाऱ्या वेड्याला
सत्य नेहमी पोरकं असतं हे कटू सत्य उमगलं नव्हतं
आणि अशाप्रकारे सत्य अखेरीस पोरकंच राहिलं
आणखी एका आहुतीनंतरही...!
-- यतीन सामंत
संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।
जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।१।।
जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।
नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।२।।
मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।
मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।३।।
पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।
मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।४।।
विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।
बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।
ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।
चमत्कार दिसून आला एके दिवशी ।
राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।
विज्ञानाने उकल केली या घटनेची ।
खात्री करिता सत्यता पटली याची ।।
चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।
त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।
शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।
शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।
जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।
शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।
हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।
निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।
सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।
रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,-- किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!
दोन "सांसारिक" जीव आपुले,
करती मधुर रसपाना,--!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!
संसार या कैरीसारखा,--
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,--!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,--!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,--!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,--!!!
हिमगौरी कर्वे.©
आंस लागली मजला
बघून याव्या त्या शाळा
देहू, आळंदी, परिसर
जाऊनी तो धुंडाळला
कोठे शिकले तुकोबा
ज्ञानोबांना ज्ञान मिळे
साधन दिसले नाहीं
परि तेज भासे आगळे
विचार झेंप बघतां
आचंबा आम्हां वाटतो
कोठून शिकले सारे
मनी हा प्रश्न पडतो
त्यांची शाळा अतर्मनीं
गंगोत्री ज्ञानाची ती
वाहात होती बाहेरी
पावन करी धरती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
(अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची जुनी प्रथा. आता सासूने आपल्या सुनेला वाण देऊन तिच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर)
अधिकाचे फळ अधिकच लाभते
अशा कथा ऐकते
तीसतीन ह्या वर्ष दिनाला
अभिनंदन करते ।
पोटी न आलीस
तुझ्या आईने भरली माझी ओटी
देवाजीने तुला नर्मिले
केवळ आमच्यासाठी ।
घरात आलीस घरची झालीस
दूधात साखर पडली
दुध कोठले साखर कुठली
अवघी गोडी उरली ।
किती करिशी तू आमची सेवा
होऊ कशी उतराई
ह्या वास्तूतील वस्तू वस्तू
तुझे गोडवे गाई ।
गृहलक्ष्मी तू स्थान तुझे ग
घरच्या देव्हार्यात
दुर्गा होऊन झुंजून
करसी संकटावरी मात ।
जगावेगळे असे कसे हे
सासूसुनेचे नाते
दृष्ट लागो तुझ्यावरोनी
शब्दफुले उतरते ।
देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,
झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।
जाई जेव्हां मंदिरी,
घेतां प्रभू दर्शन,
आनंदानें नाचते,
हर्षित चंचल मन,
नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।
नदीनाले धबधबा,
उंच उंच वृक्ष वेली,
कोकीळ गाती, मोर नाचे,
इंद्रधनुष्याच्या खाली,
रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।
दु:खी – कष्टी दुबळा,
दीनवाणा दिसे,
प्रभूच्याच आज्ञेने,
भोग भोगीत असे,
जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे ।
परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१
आपण कर्म केलेले आपणचि भोगतो ।
फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२
आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना ।
खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३
इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं ।
सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४
शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची ।
नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जीवन, जगण्यासाठी
जीव, आतुरलेला आहे
जन्म! हा मानवाचा
विवेकी जगायचाआहे
ऋतूऋतूंचे आविष्कार
निसर्गाचे वरदान आहे
नाती सारी ऋणानुबंधी
भावप्रिती! साक्ष आहे
अंतरी लळा जिव्हाळा
प्रारब्धाचे वरदान आहे
शिरी आभाळ नक्षत्रांचे
मनस्वी सुखशांती आहे
निर्मोही स्पर्श भावनांचे
स्वर्गसुखाची नांदी आहे
जगता जगता जगवावे
मानवी नितीमुल्य आहे
येताजाता रिक्त ओंजळी
अंतिम नग्न सत्य आहे
सदा भजावे अनामिका
तो कृपाळू तारणार आहे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३६
२१ - १० - २०२१.
भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती
परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती
लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा
जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा
झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा
तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा
प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही
होऊन गेले तेच प्रभूमय, सतत त्याचाच ध्यास घेई
रोम रोम तो शोधत होता, कोठे लपला आहे ईश्वर
भक्ति असो वा विरोध असो, तन्मयताच करी साकार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti