अलार्म वाजला कानी, म्हणून आली मला जाग
तशी ही म्हणे, उठा लवकर, आठ मार्च आज |
मनी म्हटल चला नवरोजी, एक दिवस हा बयकोचा
चहा-नाश्ता-डब्यासाठी, ताबा घेतला किचनचा |
मुले बाहेर पडेस्तवर, ही खुशाल पडली लोळत
मीच सगळ आवरुन सवरुन, ऑफीस गाठल पळत |
घरकामवाल्यांची रजा होतीच, आजच्या महिला दिनाला
ऑफीसांतही महिला वर्ग, येणार नव्हता कामाला |
घरची दारची कसरत करत, फेस आला तोंडाल,
खरेदी-हॉटेल-सिनेमा उरकून, हिला उशीर झाला यायला |
हुश: करतोय तोच परिचित, शब्द आले कानी
आठ वाजून गेले, अहो उठताय नं तुम्ही?
खर सांगतो त्याच क्षणी
जाग आणली स्वप्नानी
Hats off to you
बायकोस म्हटलं महिला दिनी |
दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं ।
जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं ।।
घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण ।
प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण ।।
कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता ।
उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता ।।
कधी काळचा निवांतपणा, घालविला दुजाच्या सेवेत ।
पुण्य राहिले शिल्लकीमध्ये, वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सदरची कविता कोणावर टीकाटिप्पणीसाठी नसून शेतकऱ्यांच्याबद्दल वाटणाऱ्या दुजाभावाबद्दल आहे याची कृपया नोंद घ्यावी
तो तर देत नसतो कांहीं,
घ्यावे लागते खेचूनी ।
शक्ती लावूनी खेचा सारे,
देईल परि ढील सोडूनी ।।१।।
जरी असला दयेचा सागर,
केवळ मागणें मान्य नसे ।
तुटून तुमचे प्रयत्न होता,
ओजळीने तो देत दिसे ।।२।।
व्यर्थ घालवी जीवन कांही,
स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
वेडे ठराल तुम्हींच परि,
काळ मात्र कधी थांबत नाही ।।३।।
धडपड करा, लुटून घ्या
सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
जाच न होई दुजास त्याचा,
हीच भावना उरी बाळगूनी ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥
सत्तेवरल्या मंत्र्याकडून
भले मोठे पोट घ्यावे
मऊ मऊ खुर्चीसाठी
डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥
गरीबशा लोकांकडून
गरीबीची दु:खे घ्यावी
पोटातल्या आगीसाठी
हातचलाखी शिकावी ॥ २ ॥
भडकलेल्या आगीवरुन
तडकण्याचा गुण घ्यावा
भरलेल्याशा 'खिशा'कडून
आपला तेवढा 'हप्ता' खावा ॥ ३ ॥
मेलेल्याने मरत रहावे
खाणाऱ्याने खात जावे
नरकातल्या जागेविषयी
'खाऊबा'ने निश्चिंत रहावे ॥ ४ ॥
(कवी विंदा करंदीकरांची 'देता' कविता, जी आमच्या शालेय अभ्यासक्रमात होती, ती प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९७४)
अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती
तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।
गरिबीत जगती कित्येक,
भ्रांत पाडे ती भाकरी एक
जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति....१,
आरोग्याला धक्का बसतां
शरिर जर्जर होवूनी जातां
देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति....२,
समाज रचना बघा कशी,
लौकिक जाई तो राही उपाशी
कुणी न दाखवी सहानुभूती, तयांना मृत्यूची वाटे भीति...३,
प्रवास करिता वाहनातूनी
अपघात शंका येई मनी
अवलंबून जे दुजावरती, तयांना मृत्यूची वाटे भीती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एखाद्या प्रॉडक्टला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.
*हायकू*
नववर्ष
*१*
सु स्वागतम्
द्वि सहस्त्र वीसात
हो सुफलाम्
*२*
गरुड झेप
घे या नव वर्षात
दे स्वर्ण लेप
*३*
सुर जुळावे
तन-मन-धनाचे
सुख लाभावे
*४*
प्रभा फाकता
कलरव हो झाला
वर्ष -स्वागता
*५*
या पायघड्या
घालते रे स्वागता
आता ये गड्या
*६*
झाले स्वागत
मोहरता लेखणी
नव वर्षात
-- सौ.माणिक शुरजोशी
गुलाब कशाला मी देवू , उद्याच ते सुकणारे
काव्य गुंफले मी गं, सदाच ते टिकणारे!
भाव चालतो येथे, असली का अपुली प्रिती?
बसले चौकाचौकावर, फुलास ते विकणारे !
येती अनंत अडथळे,त्यांचा मार्ग हा असावा
जाणेच भाग त्यावरुनी,नाहीच ते चुकणारे!
हारलो नाही संपलो,सुरुवात ही तर खरी
कटाक्ष तिरका मारी,उगाच ते जिंकणारे!
नकोच विचार सुडाचा,युध्दाने वाढते युध्द
लावूच नये ते बीज, नाहीच जे पिकणारे !
Copyright © 2025 | Marathisrushti