निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें,
विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।
जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी,
धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।
तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन,
परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।।
सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते,
निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।।
अस्तित्वाची जाणीव देतो, हर एक घडीचा ठेवा,
ध्यास लागतो आम्ही, परी कल्पिलेल्या रूपी दिसावा ।।५।।
निराशा राहते सदैव, दर्शन न मिळता त्याचे,
पाण्यात राहून देखील, तहानलेला असे याचे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दु:खे आणि वेदना,
जीवना,तुझे दुसरे नाव,
माणूस हरून जातो,
जेव्हा घेतसे तुझा ठांव,
आपुले परके होती,
परके म्हणती आपुले,
या सगळ्यात सारखे,
भरडत जातो चांगले,--!!!
जीव किती जखमी होतो,
प्रेमाचा नसता लवलेश,
मानसिक यातना भोगतो,
अगणित असती क्लेश,--!!!
दात आहेत, चणे नसती,
चणे असती, दात नाहीत,
अशांत कोण घांस घेई,
कोण फडशा जातो पाडीत,--!!!
विचारताना साधे काही,
कोणी अंगावरी येते,
शब्द बोलतां पुढे-मागे,
अर्थाचा अनर्थ करीते,
द्यावा हात पुढे जाऊन,
तो झिडकारला जातो,
वास्तवाच्या अग्निदाहांत,
मनपक्षी कसा होरपळतो,-?
माझे सुख, तुझे दु:ख,
तुझे दु:ख ते माझे सुख,
का असे विपरीत होते,
नियतीच्या पटावर साऱ्या,
उलटेच का सगळे घडते,--!!!
प्रश्न राहती अनुत्तरीत,
उत्तरेही बनतील गहन,
या आवर्तातच मात्र,
घायाळ होई अंतर्मन,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
१९८५ सालच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली ही कविता ! आजही तितकीच ताजी आणि संदर्भयुक्त आहे –
वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नाच नाचती तालावरती
मीरेची पाऊले
चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ
लागला प्रभुचा ध्यास
हरि दिसे नयनास
चलबिचल नजर होऊन
अंग सारे मोहरले - - -१
चित्त ते हरीमय जाहाले
न राही आपले भान
झाली भजनी तल्लीन
तनमन प्रभुचे ठायी जाता
संसार ते विसरले. - - - २
चित्त ते हरीमय जाहाले
विषाचा घेता प्याला
हरि तो त्यातची दिसला
झेपावूनी गेली त्याच क्षणी
घट घटा प्राशन केले. - - - ३
चित्त ते हरीमय जाहाले
जहाल होते विष
मृत्युचा तो पाश
प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
अमृत ते बनले - - - ४
चित्त ते हरीमय जाहाले
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे
बाया बी गोळा करा समद्या
मारा समद्यांनला जोरात हाका,
आन् ती समदी मेंढरं हाका.
चला आपन बहिनी-भाऊ
मतदानासाठी जाऊ.
देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा.
तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका.
- सुभाष स. नाईक
रिमझिमत्या पावसात
माझ्या गर्द केसात मोगरा माळताना
तू दाखवलीस स्वप्नं...
रुणझुणत्या चुड्याची
भरजरी शालूच्या स्पर्शाची
पराक्रमी राजपुत्रानं
नजर करावं गुलबकावलीचं फूल
हळव्या राजकन्येला
तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली
तुझी शपथ, तेव्हा वाटलं
पायतळी मंझिल आली !
आणि मग -
हातीच्या गुलाबाची
पाकळी पाकळी पडावी गळून..
तसे क्षण गेले निसटून
नि कसली अगम्य ओढ
मनात राहिली दाटून?
चालत्या पावलांना मी विचारते,
"तुम्हाला काय हवंय बाबांनो?'
कालचा मोगरीचा गंध
तस्सा ताजा --टवटवीत...
की पूर्ती झालेली सारी स्वप्ने.....
की त्याही पलिकडचं काही... अरुप.... अनाम..
जे काय तेही नक्की कळत नाही.....
साऱ्याच सुखाचा असा अर्थ शोधत राहिलास
तर हाय हृदया !
तुझ्या अतृप्तीला सीमा नाही।
तुझ्या अतृप्तीला. सीमा नाही !!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई
एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची
जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
कशांत दडले सुख उमज येईना मनीं
देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी
ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.
-- डॉ. भगवान नागापूरकर
9004079850 b
bknagapurkar@gmail.com
पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,
या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,
हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,
उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
झी' ने एक अनाऊन्समेंट केली,
ऐकून मनाची चलबिचल झाली,
भाग घ्यायची मी तयारीच केली,
कारण स्पर्धा होती .... एकापेक्षा एक "आजी" आली |
हे आणि मुल म्हणे,
अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ,
'महागुरुंच्या' डोळ्यात मावेल कां हा 'ढग' ?
पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट,
म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप |
काय नशिब पहा, चक्क मी झाले 'सिलेक्ट'
आणि कोरीओग्राफरकडे शिकले, डान्स परफेक्ट |
पडले, गडबडले तरी नाही बाळगली तमा,
स्पर्धेसाठी शरीराचा, उतरवला होता न विमा |
बुधवार गुरुवार माझा 'सेफ' झोन प्रत्येक,
महागुरुंकडून मिळवले, रुपये 'शंभर' कित्येक |
एकेक करुन गाठली 'महाअंतीम' फेरी
घरच्यांनी घेतली होती SMS ची जबाबदारी |
बघता बघता निकालाचा 'क्षण' येऊन ठेपला
म्हटल दोन लाखांचा चेक नक्कीच 'आपला' |
हातातला कागद आता महागुरुंनी वाचला,
आणि विजेती आजी आहे.... आजी आहे.....
ऐकून, सार स्टेज गरागरा फिरल,
पडता पडता मला, कुणी तरी धरलं |
डोळ्यावर सपकन पाणी मारलं,
झाली वाटतं जागी, कानानी हेरलं
बाजूलाच उभे होत 'महागुरु' घरचे,
स्वप्नच कां शेवटी, "बिच्चारा आजीचे" |
-- सौ. अलका वढावकर
Copyright © 2025 | Marathisrushti