मनाला जुळती मन....
नाते उदयास येते....
'माना'ची मातंबरी
मन गुंतुनि जाते....
भावनांचा खेळ....
'मान'ली तरच नाती....
आज करावा गोड...
उद्या कुणाचे हाती....
दु:ख ही गोड मानावे..
गोड ही विष ठरते......
कुण्या 'मधुमेही'च्या
मनात शिरून जाणावे....
बिंदुला जोडुनिया बिंदु....
रांगोळी बनते.....
तयासी रंगत
आपले 'जीवन' रंगते.....
लाभता ध्येय....
अन् उद्देश....
हा 'जीव' भरतो रंग....
जगण्याचे तरंग...
भाव बुडबुडे....अन्
मानलेले 'गोता'वळे....
कधी अर्थ....
सर्वार्थाने निरर्थक.....
अथांग....
अबोध.....
अनंत.....
न उमजे मज....
बिंदु शी बिंदु.....
जीवनाचे कोडे....
न उलगडे मज.....
डॉ.दीपक सवालाखे....
यवतमाळ.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
तीन तपे गेली गौरी घरी नव्हती आली
चिमुकल्या पावलांनी दारी प्रकटली
गौरी आली गौरी कसे करू मी स्वागत
हृदयाच्या पाळण्यात झेलते अलगद ।।
गौरी आली गौरी आनंदले घरदार
आगमने तिच्या परिपूर्ण हा संसार ।।
गौरी आली गौरी सानथोर पुलकित
कुठे ठेवू कुठे नको झाले कवतिक ।।
गौरी आली गौरी झूला फुलांनी सजवा
सोनुल्या ह्या अपर्णेला पाळणी मिरवा ।।
गौरी आली गौरी सोन्या मोत्यांनी नटवा
रेशमाच्या गादीवर हलके जोजवा ।।
गौरी आली गौरी वाटा बाई गोड धोड
आजी काकी मामी मावशी पुरवती कोड ।।
गौरी आली गौरी नांव ........... ठेवियले
....... च्या कुळी लाख दिवे उजळले ।।
(आडनांव)
सतत गुंतलो आहो सारे
शोध घेण्यास त्या 'आनंदाला'
युगानूयुगे प्रयत्न होतो
मिळवण्यासाठींच प्रभूला...१
बाह्य जगाचे सुख आगळे
लागले सारे त्याच्या पाठीं
'देह सुख' अंतीम वाटे,
खरा 'आनंद' देण्यापोटी...२
'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'
समजूत झाली ही कांहींना
लेखक, कवी, साहीत्यिक हे
पाठ त्याची कांहीं सोडीना...३,
साधू संत हे थोर महात्मे
आनंद शोधूती 'विश्रमांत'
'ध्यान' लावून एक मनानें
शांत होवूनी डूबती त्यांत...४,
आनंदची 'मोक्ष' असून
ध्येय साऱ्यांचे त्याजकडे
मार्ग सर्वांचे वेगळे असून
'तन्मयता' खेची प्रभूकडे...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बघता तुला प्रिया रे ,--जिवा बेचैनी येते,
कासाविशी होता हृदयी,
आत मोरपीस हलते,--!!!
विलक्षण ओढ तुझी,
काळजाला किती छळते,
मूर्त माझ्या अंतरीची,
अढळ अढळ होतं जाते,--!!!
स्पर्श होता तुझा सख्या,
माझी न मी असते,
बाहूंत तुझ्या विसावण्या,
किती काळ मी तरसते,--!!!
तुझ्यातच सारे विश्व माझे,
जगही तोकडे भासे,
तुझ्याचसाठी राजसा,
मन्मनीचा चकोर तरसे,--!!!
उषा आणि संध्या,
आपले रंग उधळती,
प्रेम रंगाचाच वर्षाव,
भास्करावरती करिती,--!!!
रात्र येते चंदेरी ती ,
जेव्हा जवळ तू असशी,
जिवापाड जाऊन तूही,
प्रीत" माझ्यावर करशी,--!!!
धुंद रात्रीची मदमस्त किमया,
प्रेमात नखशिखांत नहाते,
आभाळीची चटोर चांदणी,
प्रेम--लीलेसाठी धडपडते'--!!!
हिमगौरी कर्वे©
मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव
पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव ||
मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव
बाहेर समित्या साधती आपलाच डाव ||
माणसाला किती रे ही संपत्तीची हाव
नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव ||
मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव
विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव ||
मनी नाही भाव तरी देवा मला पाव
अशा भक्तांसाठी किती ही धावा धाव ||
नाचती करुनी रे वेडेवाकडे हाव भाव
भक्तांच्या ह्या भक्तीचा लागत नाही ठाव ||
मुर्तीतल्या देवा कर न रे तू एक ठराव
राखेल पर्यावरण शाबूत त्यालाच पाव ||
रविंद्र कामठे
२२ सप्टेंबर २०१५.
तू आहेस ना घरट्यात
मी आत्ता आलो'
असं म्हणून तो गेला
तेव्हा मला दिसला - अपरंपार विश्वास
.त्याच्या डोळ्यात
दूरदेशी जाताना लढावं लागलंच
तर आपले जायबंदी पंख घेऊन
तो येईल माझ्याचकडे
किंवा टिपलेलं सोनं मोती
आणून देईल माझ्याच पदरात !
त्याच्या डोळ्यातला विश्वास - मला जपायलाच हवा !
हसरं चिवचिवतं चिमणंपाखरू घरट्यात शिरलं
तर त्याला मी दिसलेच नाही
त्याला मी हवी होते.
त्याच्या दृष्टीत पोरके अश्रू तरळले
तेवढ्यात त्याला मी दिसले
आणि पाखरू चिवचिवलं हसून पुन:
त्याच्या हसण्यानं घरट्यामध्ये आभाळ थिटं झालं
त्याचं हसणं मला जपायलाच हवं !
एकदा मीही आभाळात गेले
परतल्यावर दिसली त्याच्या नजरेत माझी प्रतीक्षा
आणि चिवचिवत पाखरू माझ्या गळ्यात पडलं
तेव्हाच ठरवलं -
आभाळ निसटलं हातातून तरी चालेल
घरटं जपायला हवं!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
शेतात टाकले
विषाक्त रसायने
तिकीट कैंसर ट्रेनचे
एडवान्स काढले.
टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.
गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे ।
जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।।
निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा ।
झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।।
दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं ।
आज दुवा नसता सारे पडती पाठी ।।
तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे ।
वंशाने जे मिळे त्याला, जीवन झगडा देणारे ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सारे जीवन जाते आपले, अन्न शोधण्याकडे ।
काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।।
जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे ।
आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।।
धडपड करी आम्ही सारी, देह सुखापाठी ।
विचार ही मनांत नसतो, इतरांच्यासाठी ।।३।।
वेळ काढावा जीवनामधूनी, इतरांकरीता थोडा,
सार्थकी लावा आयुष्य, जीवन शिकवी धडा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
ओंजळीतली कळी
फुलात कधी उमलते
न कळतच दुज्या
अंगणात बहरते..
भातुकलीचा खेळ
चिमुकली खेळते..
संसारात पहिले
पाऊल तिचे पडते..
इवल्याश्या हाताने
ती भरवते खाऊ
सासरी जाताना
वळून नको पाहू..
मायेच्या कुशीत ती
येते दुडूदुडू धावून
पाठवणी करताना
रूखरुख मनी राहून ..
छोट्याश्या छकुलीचा
सगळा पुरवला हट्ट
किती ही दूर तरी
नाते आमचे घट्ट..
लहान किंवा मोठी
ती तर काळीज असते
लेक परक्याचे धन तरी
आई बाबांची ठेव असते..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
Copyright © 2025 | Marathisrushti